इतर
खरच सत्यमेव जयते……?
*खरच सत्यमेव जयते.....????*
सुरुवातच अशी प्रश्नाने तेही सत्यमेव जयते...? नक्कीच खूप विचित्र वाटले असेल.पण असं म्हणत असताना त्याची पार्श्वभूमी पण जाणून घेणं फार गरजेचं आहे.गेली २महिने हा प्रश्न मनात घोंगावत आहे.पण व्यक्त कसे व्हावे हेच तर सुचत न्हवते.
संशय चारित्र्याचा हा लेख लिहिल्या नंतर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या होत्या.कोणी काही चांगले मार्ग सुचवले,कोणी आलेले अनुभव सांगितले.पण असाच एक मेसेज आला की "फक्त चारित्र्याचा संशय यावर नाही तर नवऱ्याच्या आयुष्यात दुसरे कोण आले तरी संसार मोडतात.मग अशावेळी जी हतबल स्त्री असते ती ना माहेरची राहते ना सासरची."
जरी हे मनाला पटत असले तरी नक्की त्यांना काय सांगायचे आहे हे मला स्पष्ट समजत नव्हतं.म्हणून मी विचारले की जे काय असेल ते स्पष्ट सांगू शकता का...? म्हणजे तुम्हाला काही हरकत नसेल तरच सांगा.
तेव्हा समोरून उत्तर आले की "सांगून तरी तुम्ही काय करणार....? जे आहे ते मलाच भोगावे लागत आहे.पण जेव्हा स्त्रीची काहीच चूक नसताना तिला संसारातून बेदखल केलं जातं. मग तिचे पुढे काय होईल याचा विचारही समाज करत नसेल तर अशा समाजात जगण्याला खरच काही अर्थ आहे का....?"
तर या लेखात मी पुढे काही लिहिण्या अगोदर *संशय चारित्र्याचा* या लेखात मी नक्की काय मांडले होते ते थोडक्यात सांगतो.एक गरोदर मुलगी जी संसाराच्या वेलीवर आपले आयुष्य फुलवत असताना २ वर्षही झाले न्हवते पण नवरा आणि सासरच्या लोकांनी सुरू केलेल्या संशयाच्या त्रासाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवते....गरिबीमुळे माहेरचे ही कधी साथ देत न्हवते...."तुझी काय चूक नाही ना मग गप कर सहन होईल सर्व ठीक." याच आश्वासनावर तिचे सांत्वन करत राहिले......"जर संसार मोडला तर आम्ही कुठे तोंड दाखवू" या समाजाच्या अलिखित भीतीने मुलीला कायम सहनच कर हा सल्ला देणारे माहेरचे......मग सासरच्या जाचाने कंटाळलेली आणि माहेरच्या लोकांनी नाकारलेली हतबल तरुण मुलगी स्वतःच्या पोटात असणाऱ्या बाळासहित स्वतःचं आयुष्य संपवते.....आणि आपण स्वतंत्र झालो....आपला देश महान आहे....लोकशाही आहे.....इथे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा संविधानिक हक्क आहे.....इथे प्रत्येकाला न्याय मिळतो.......भगवान के घर में देर है अंधेर नही.....अशी मोठी मोठी वाक्य बोलत बसतो.....पण शेवट काय......? यात नक्की कोणाला न्याय मिळाला......? जे झालं ते बदलू शकत नाही......एवढा एवढा शासकीय खर्च.....आणि एवढ्या पैशाचा दंड.....संपले सर्व....लागला निकाल......असच तर घडते आहे.
हे सर्व त्या लेखात लिहिल्या नंतर झालेला या व्यक्तीशी संवाद झाला.....त्यांचं मत हेच की.....लिहून काही होत नसते.....ना लढून काही न्याय मिळतो.......जर पैसा असेल तरच नीट जगता ही येत आणि मरता ही येत......अहो पैसे नसतील तर मरणे पण महाग आहे..... तुम्हाला जाळायचे कुठे आणि कोण घेणार ती जबाबदारी इथपासून प्रश्न उभे असताना काय न्याय मिळतो आपल्या या समाजात.....?
हे मनाला टोचनारे पण तितकेच खरे शब्द नक्कीच होते..... *"अहो लिहून काय होते....४ जण तुम्हाला कमेंट करणार.....आणि तुम्हाला त्यातच समाधान मिळणार की मी किती चांगले लिहिले....यापलीकडे तुमच्या लेखाला काय किंमत......* हे जरी माझ्या मनाला लागणारे शब्द होते तरी त्यात सत्यता ही सूर्याच्या तेजाहून प्रखर नक्कीच होती.
मला त्यांना काय उत्तर द्यावे समजत न्हवते.....त्यांचा नक्की काय प्रॉब्लेम आहे तेही माहीत न्हवते.....पण ज्याअर्थी एवढं काही ती व्यक्ती स्पष्ट बोलू शकते त्याअर्थी नक्कीच त्या व्यक्तीने बरच काही भोगलेलं असणार हे जाणवत होते.
मी मनात येईल ते थोडे बहुत लिहिणारा आणि थोडे बहुत काम करून घर चालवणारा समाजातील मध्यम घटकांपैकी एक माणूस.असा साधारण असणारा मी एक व्यक्ती नक्की काय त्यांना जाणून तरी घेणार आणि मदत तरी करणार......आणि मदत तरी काय ओ....ती व्यक्ती काय पैसे मागत होती की....आधार......ती फक्त न्याय मागत होती......
आता न्याय मागताना मी ना वकील ना पोलीस....ना कसली राजकीय ओळख....ना कसले कायद्याचे ज्ञान......मग काय मदत तरी करणार.....पण तरीही त्यांचा नक्की प्रॉब्लेम काय आहे हे जाणून घ्यावं यासाठी....." मला जे काय असेल ते स्पष्ट सांगाल का हा प्रश्न घाबरत घाबरतच मी विचारला ....."
असेही न्यायाच्या देवालयात हरलेल्या त्यांनी कमीतकमी मन तरी मोकळे करू याच एका विचाराने त्यांनी सर्व सांगण्याचा निर्णय बहुतेक घेतला असावा.आता मी जे काही यापुढे लेखात मांडत आहे ते त्यांच्या आयुष्यात त्यांनी भोगलेले त्रास आणि आपल्या न्याय व्यवस्थेने दिलेला कौल यावर सर्व आधारित आहे....मग लेखाची सुरुवात सत्यमेव जयते आणि त्यापुढे प्रश्न चिन्ह देणे योग्य की अयोग्य ते तुम्हीच सांगा.
घरात सगळ्या मुली त्यात एक मुलगा होता त्याचे अपघाती निधन......मनाने खचलेल्या वडिलांनी मोठ्या मुलींची लग्न लावून दिली होती.पण जी लहान आहे तिचे १० वी मधून शिक्षण थांबवून लग्न लावून दिले.
लग्नाच्या पुजेपासून भांडणाला झालेली सुरुवात..... पण एक मूल झाल की होईल सर्व काही ठीक हा आईने दिलेला दिलासा यावर संसाराला सुरुवात.....मुलगी झाली....तरीही नवरा सांभाळत नाही......मग मुलगा झाला की बघ तुला नीट बघेल हे आईचे शुभ आशीर्वाद घेवून पुन्हा संसाराला सुरुवात.....*पडणाऱ्या अवकाळी पावसाचा कितीजरी राग आला तरी तो सहन करून चिखलातून वाटा काढणारे आपण आणि नवऱ्याने कितीही मारले तरी पुढचा मार्ग चांगला असेल या आशेवर असणारी स्त्री* यात काहीच फरक नाही.
संसारात मार खात....सहन करत मुलगा ही झाला....आता तरी सर्व ठीक होईल या आशेवर असणाऱ्या त्या बाईला नंतर समजले की मुल जसे पोटात वाढत होते त्याहीपेक्षा मोठ्या आनंदात नवऱ्याचे दुसरे प्रेम वाढत होते.
शेवटी माहेरून एकच शिकवण काही झाले तरी सहन करायचे.....होतात अशा चुका....बाईच्या जातीने समजून घ्यायला पाहिजे......कितीही राग आला तरी हे सर्व गप्प सहन करून मनातून तुटले तरी वेड्या आशेने संसाराची स्वप्न पाहणाऱ्या तिने सर्व गृहीत धरून नवी सुरुवात केली.
तिने सुरुवात दोन मुलांसोबत त्याच नवऱ्यासोबत केली....मात्र तीच स्वप्न तिच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईसोबत पाहिली.....मग आता अशा नात्याला नक्की अर्थ काय....?असा प्रश्न विचारावा तरी कोणाला....?कारण आपल्या समाजात एकच म्हण आहे ना....*नाती ही स्वर्गात जोडली असतात.....मग बहुतेक जोडताना काहीतरी क्रॉस कनेक्शन झालेलं असावं अस म्हणून आपण पुन्हा नव्याने कॉल करावा तर आपण चुकीचा नंबर डायल केला आहे असा जर समोरून आवाज आला तर देवाने बनवलेल्या नात्याच्या या नेटवर्कवर विश्वास तरी किती ठेवावा हा प्रश्न पडणे स्वाभाविक नाही का...?*
"मला तू नको आहेस तुझे तू बघ" असे म्हणून नव्या नात्यात गुंतलेला नवरा....भरपूर पैसा पण आता बायको नको.....मग मुलांचे काय.....? दोन मुले पण तीही नको.....मग नक्की बायको नको..... मुल नको....तर नक्की लग्न केलं होत कशासाठी.....? लग्नाआधी आवडली.... मुल जन्माला घालताना नाही खराब वाटली....पण मुलं झाली......दुसरी बाई मिळाली की मग हिचे शिक्षण कमी दिसू लागले......मग शिक्षण कमी तर शिकवायचे होते ना.....पण काय करणार वेळेनुसार गरज बदलली होती.......आणि शेवटी आपल्या समाजात नवऱ्याने सोडलेली बाई माहेरच्यांना ओझे न होणे म्हणजे दुर्मिळच.......आता दोन मुले...त्यांना सांभाळणे.......शिक्षण कमी मग नोकरी तरी कुठे चांगली मिळणार......सल्ले देणारे सांगतात छोटा मोठा व्यवसाय कर.....अरे पण इथे खायचे वांदे असणाऱ्या बाईला स्वतःच कसं बघू....मुलांचे कसे भागवू या विवंचेत जगताना तुम्ही व्यवसायाची स्वप्न कशी दाखवता.....?
पण असो ज्याने त्याने आपल्या परीने सल्ले द्यायचा प्रयत्न केला.....आता...." मी माझे बघेन कसेही पण मुलांचे शिक्षण आणि त्यांना काय लागते तेवढे तरी बघा...." ही साधी अपेक्षा करणाऱ्या तिला नवऱ्याने जराही किंमत देवू नये.....हे कितपत योग्य....? "२लाख देतो पण तुझा माझा पुन्हा कसला संबंध नाही.... मुलं पण तूच बघ आणि गप घटस्फोटाच्या पेपर वर सही कर"....हा एकदम उत्तम मार्ग नवऱ्याने शोधून काढला......
एकतर एका विचित्र आजाराने त्रस्त ही स्त्री....त्यात दोन मुले.....त्यांचा संपूर्ण आयुष्याचा खर्च २ लाख रुपये.....?????? एक स्वाभिमानी स्त्री कशी हे मान्य करेल....? पैसे घेऊन घटस्फोट दिला तर पुढे काय.....? भविष्यात मुलांना खर्च लागणार....आपले एकतर शिक्षण कमी......या २ लाखात काय काय करणार.....? सगळ्या प्रश्नांच्या जाळ्यात अडकलेल्या तिने न्याय मिळावा या हेतूने... सरळ आपली न्यायव्यवस्था गाठली....... न्यायालय......सर्वांना समान न्याय देणारे मंदिर......आता इथे तरी आपले ऐकले जाईल......आपल्याला योग्य न्याय मिळेल या आशेवर त्या तिथे गेल्या तर खर.....पण तिथेही पैसे लागतात ना....रोजचा खर्च आहेच ना......मग एका खाजगी ठिकाणी नोकरी सुरू केली.......नवऱ्याने तिथे जावून ती नोकरी करते तिथले फोटो काढले......व्हिडिओ शूटिंग केले......आणि न्यायालयात हेही दाखवले की ही नोकरी करते......पण मला एक प्रश्न विचारायचा आहे......जरी कामाचे ठिकाण मोठे असले....तरी ही व्यक्ती एकतर शिक्षणाने कमी....त्या व्यक्तिला तिथे काय दर्जाचे काम मिळाले असणार....आणि किती पगार असणार.....? पण न्याय व्यवस्थेने ते ऐकले नाहीच.एकतर कंत्राटी काम....१० ११ महिन्यांचा करार...त्यात सुट्टी मिळणे अवघड......कोर्टाच्या तारखेला येत नाही याचा अर्थ तिला पोटगी ची गरज नाही....ती सर्व स्वतः पहायला सक्षम आहे.....असा युक्तिवाद केला जातो काय.... आणि शेवटी पुरावे असले की त्यावर न्याय दिला जातो....हे तर ठरलेलं आहे.......
न्यायालयाने पोटगी या स्त्रीला मिळणार नाही....पण मुलांच्या शिक्षणाला दरमहा एवढी रक्कम द्यावी असे सांगून केसचा निकाल लावून दिला...पण आता त्या मुलांना कित्येक महिने पैसे मिळाले नाहीत....या निर्णयाच्या विरोधात पुन्हा केस करावी तर मोठ्या कोर्टात जायचे कसे.....?मुलांच्या खर्चाला ठरलेले पैसे मिळत नाहीत हे सांगायला कोर्टात जायचे;तरी पैसे कुठे आहेत.....?नोकरी शोधते तर कमी शिक्षण आणि आजार यामुळे चांगली नोकरी मिळते तरी कुठे....?वकिलाच्या फीचे काय....? सध्या जे कंत्राटी काम होते तेही संपले....आता कोणते कामही नाही....मग पैसा आणायचा कुठून .....जो निकाल कोर्टाने दिला तो मान्य करून स्वतःचे स्वतः बघेन...पण मुलांसाठी पैसे देतो म्हणून अजून देत नाहीत याचे काय करायचे......? असे कितीतरी प्रश्न.....
पण मग मला सांगा......फक्त हीच केस....हीच घटना एकमेव आहे असे नाही....अशा कित्येक घटना आपण ऐकल्या आहेत की पैसे खर्च करून त्या दाबल्या किंवा पुरावे नसल्याने काही गोष्टी सिध्द करू शकले नाही....मग दोषी व्यक्तीही निर्दोष सुटले.....मग आपण नक्की कोणता आधार घेतो आणि म्हणतो की.....सत्यमेव जयते.....????
काही चांगल्या घटना आहेत.... ज्यात न्याय मिळाला....जय भीम फिल्म पाहिली...त्यात महिलेला कसा न्याय मिळवून दिला हेही पाहिले.....पण अशा बोटावर मोजता येतील अशा घटनांचा दाखला घेवून आपण म्हणायचे का की सत्यमेव जयते......????
न्याय जर सर्वांना मिळत नसेल....पैसाच जर सर्व ठरवत असेल की कोणत्या बाजूने निकाल लावायचा......तर आपण कसे म्हणायचे सत्यमेव जयते......? मला हेही माहीत आहे.हा लेख पूर्ण वाचणारे फार कमी असतील......कारण इन्स्टंट फूड ची सवय झालेल्या आपल्याला हॉटेल मध्ये ऑर्डर देवून १५ मिनिट थांबणे पण जास्त त्रासाचे वाटते...... रिल्स ज्या जमान्यात कोणतीही कला ३० सेकंदाच्या वर पाहणे बोअर होवून जाते....तिथे काय हा लेख तरी वाचला जाईल.....आणि जरी वाचला तरी यावर नक्की काय न्याय मिळेल.....
वाचणारे कदाचित फारच छान लिहिले आहे....उत्तम विचार म्हणतील आणि सर्व विसरून जातील.....आणि जसे त्या म्हणाल्या की लिहून काय होणार ४ कमेंट मिळतील....आणि छान लिहिल्याचा ४ दिवस आनंद घ्याल यापलीकडे काही नाही.....
खरच असेच होणार हे मलाही वाटत असले तरीही आतून कुठेतरी वाटतेय की..... खरच कोणीतरी योग्य व्यक्ती या घटनेचे गांभीर्य समजून घेवून त्या स्त्रीला योग्य न्याय देईल.त्या व्यक्तीला तुमचे पैसे नको आहेत....योग्य काम हवेय.....ज्याने ती तिचे घर चालवू शकते....मुलांना सांभाळू शकते.....नवऱ्याने सोडले आहेच...पण जे मुलांसाठी पैसे मंजूर होत आहेत ते तरी त्याने वेळेत द्यावेत......एवढं जरी कोण करू शकले तर खरच मलाही वाटेल की लेखणीतून समाज बदलू शकतो.
स्वतः बाबासाहेब आंबेडकर साहेब सांगून गेले.....शक्तीने तुम्ही जे काही करू शकत नाही ते सर्व युक्तीने.....शिक्षणाने.....सत्य विचाराने करू शकता.....आज त्यांनी लिहिलेले संविधान सर्वसमावेशक आहेच....पण पैशाचा जोर लावून त्यातून पळवाटा शोधणे हाच जास्त अभ्यास त्यातून होताना दिसतोय....जितकी अवघड केस तितका जास्त पैसा.....आणि तितका जास्त युक्तिवाद....मग पैसा वापरून पुरावे नष्ट तरी करणे.....किंवा खोटे पुरावे सादर करून ते सत्य आहे हे दाखवणे.....असा गैरवापर सर्रास होताना दिसतोय....यात काही मी खोटे बोलतो आहे का....?
शेवटी मी एक सामान्य माणूस आहे.....कोणत्याही प्रकारे या सर्व व्यवस्थेला भिडणे शक्य तर नाहीच....पण ज्या कोणाकडे ते सामर्थ्य आहे त्यांनी कृपया या घटनेला न्याय द्यायचा प्रयत्न केला तर बरे होईल असे मला वाटते.
जर बोलण्याच्या ओघात काही आक्षेपार्ह बोलून गेलो असेन तरी ते समजून मला सांगा....पण मांडलेल्या भवांनाना चुकीचे समजून टाळू नका.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध…..ट्रेक नंबर १६…भाग २…कोळे नृसिंहपुर
*स्मृतीगंध*
*ट्रेक नंबर १६ भाग २*
*कोळे नृसिंहपुर*
*५ डिसेंबर २०२१* आणि
*२५ मार्च २०२२*
डिसेंबर मध्ये भेट दिलेल्या ह्या ठिकाणाबद्दल लिहायला खर तर फारच उशीर झाला.यांनतरही बऱ्याच स्थळांना भेटी दिल्या पण आधी कोळे नृसिंहपुरबद्दल लिखाण करायचे मगच स्मृतीगंध या भ्रमंतीच्या पुढच्या प्रवासाचे वर्णन करायचे हेच मनाशी ठरवून होतो.
अत्यंत सुंदर ठिकाण पण तिथली पूर्ण माहिती नसल्याने काय लिहावं हा सुद्धा मोठा प्रश्न होता.पण तिथे असणाऱ्या ओमकार कुलकर्णी आणि त्यांच्या वडिलांनी खूप मदत केली.बऱ्याच गोष्टी सांगितल्या.संपूर्ण शाळिग्राम मध्ये असणाऱ्या या अंदाजे ५ फूट उंचीच्या नृसिंहमूर्तीचे यथायोग्य सोहळे करून पूजा अर्चा करणाऱ्या या कुलकर्णी कुटुंबाने खूप आपुलकीने घरातही बोलवून पाहुणचार केला.
संपूर्ण माहिती ही ५ डिसेंबर ला गेलो आणि मिळाली असे नाही.तर २५ मार्च २०२२ला पुन्हा तिथे जावून बरीच माहिती घ्यावी लागली.
नृसिंहपुर म्हणजे नक्कीच नरसिंहाचे मंदिर असणार हे मात्र लगेच समजते.पण इथे असणारी मूर्ती,हा परिसर आणि इथला असणारा इतिहास हा फारच रंजक आहे.संपूर्ण माहिती देताना नक्कीच हे सर्व थोडक्यात लिहून होणार नाही.पण हे स्थळ आणि इथला इतिहास आपण मनापासून जर वाचलात.तर नक्कीच तुम्हाला या स्थळाला भेट देण्याची मनापासून इच्छा होईल.असं मला वाटतं.
साताऱ्यातून ७०किमी अंतरावर असणारे हे गाव.....याला अगदी पहिल्या शतकापासूनचा इतिहास आहे.पण अशा पुरातन गोष्टी पाहताना तिथली आख्यायिका माहीत असणे हेही तितकेच महत्वाचे.
*आख्यायिका आणि मूर्ती इतिहास*
कर्नाटक भागातील अंजन गावात असणाऱ्या ब्राम्हण दांपत्याने नृसिंहपुरमध्ये बरीच वर्ष घालवली.कृष्णेच्या या अथांग वाहणाऱ्या पाण्यात नरसिंहाची मूर्ती आहे. ती आपण शोधून काढावी असे त्यांनी राजा भीमदेव कौंडिण्यपूर (कुंडल) यांना सांगितले.
त्यानुसार राजा भीमदेव यांनी इ.स.१०७ मध्ये कृष्णेच्या पाण्यातून ही मूर्ती वरती काढून कोळ्याच्या सिद्ध भूमीवर तिला स्थापन केले.
हा इतिहास पहिल्या शतकातील असला तरी या शाळिग्राम मधील मूर्तीचा इतिहास फार पुरातन आहे. इ.स.पूर्व ५५६१ वर्ष.... एवढ्या वर्ष आधी व्यास ऋषींचे वडील पराशर ऋषींनी आपल्या साधनेने षोडशभुज( सोळा हात ),एका पायावर उभी अशी नृसिंहमूर्ती बनवली.मूर्तीच्या हातांमध्ये,शंक,चक्र,गदा,फुल,बासरी,धनुष्य अशी आयुधे आहेत.या मूर्ती निर्मितीची कथाही तितकीच रंजक आहे.पराशर ऋषींनी केलेल्या कठोर तपश्चर्येेनंतर भगवान श्री विष्णूंनी त्यांना दर्शन दिले. तेव्हा तुमचे नरसिंह अवतारातील मुद्रेचे दर्शन व्हावे हीच इच्छा पराशर ऋषींनी मांडली.नरसिंह रूप हे खूप दाहक आणि तेजस्वी असल्याने ते जास्त काळ नजरेस सहन होणार नाही यामुळे कृष्णा नदीच्या तीरावर काही क्षण भगवान श्री विष्णूंनी नरसिंह अवतारात दर्शन दिले आणि पुन्हा त्यातून तिथे शाळिग्राम ची साधारण ५ फूट उंचीची शोडस भुज मूर्ती तयार झाली.मूर्तीचे तापमान जास्तच होते याकारणें ती तेव्हाच कृष्णेच्या डोहात सोडली गेली.
जेव्हा कर्नाटक प्रांतातील अंजन गावचे वृध्द दाम्पत्य ज्वाला नृसिंहतीर्थी कठोर तपश्चर्या करत होते तेव्हा त्यांना दृष्टांत झाला.त्यानुसार त्यांनी राजा भीमदेव यांना भेटून कृष्णेच्या डोहातून नृसिंहाची मूर्ती पुन्हा वर काढावी अशी विनंती केली.पण एवढ्या मोठ्या पाण्याच्या प्रवाहात मूर्ती शोधणार कशी हा मोठा प्रश्न राजा भीमदेव आणि त्यांच्या सैन्यापुढे होता.
तेव्हा गवताची काडी प्रवाहात टाकत पुढे ते आले आणि जिथे गवताच्या काडीने पाण्यातही पेट घेतला तिथे मूर्ती असल्याचे संकेत मिळाले.त्यानुसार इ.स.१०७ मध्ये ती मूर्ती पाण्यातून वर काढण्यात आली.
संपूर्ण यथोचित विधी करून मूर्तीची स्थापना करण्यात आली.
यानंतर इ.स.१२७३ मध्ये देवगिरीचे राजा रामदेवराय यादव यांनी हेमाद्री पंत यांच्याकडून मंदिराच्या भुयारी मार्गाचे काम करून घेतले.तीन भुयारे उतरून मग मूर्तीजवळ जाता येते.भूयाराची असणारी अप्रतिम रचना ही खरच पाहण्यायोग्य आहे.
१४ व्या शतकानंतर या ठिकाणी बऱ्याचदा मुस्लिम राजवटींनी मंदिराची आणि मूर्तीची नासधूस करण्यासाठी आक्रमणे केली.पण पहिल्या भुयारात उरतून जेव्हा तिथून खाली दुसरे भुयार लागते तिथे असणारी नृसिंहाची खोटी मूर्ती आणि दगडी शिळेने तिथून खाली उतरण्याचा झाकून बंद केलेला मार्ग यावरून त्यावेळच्या त्या स्थापत्य शास्त्राचे आपण कौतुक केल्या शिवाय राहू शकत नाही.
*मंदिर परिसराची माहिती*
ज्या ज्या वेळी इथे आक्रमणे झाली तेव्हा गावकरी एकत्र या भुयारात जमत असत.वरच्या दोन्ही भुयारात नासधूस करून शत्रू निघून जात होते.यादरम्यान खाली तिसऱ्या भुयारात अंधारात लपून बसलेल्या या गावकऱ्यांना बाहेरची माहिती कशी मिळत असेल हा प्रश्न आपल्याला ही पडत असेल ना.....?
तर तुम्ही नक्कीच या मंदिराला भेट द्या.आता मंदिरात जायला वेगळा मार्ग तयार केला आहे.आणि जुना असणारा भुयारी मार्ग बंद केला आहे.पण तरीही संपूर्ण परिसर तुम्हाला पाहता येतो.
तर महत्वाचे सांगायचे ते म्हणजे इथे असणारा तुळशी वृंदावनाचा भाग. इथे अशी रचना आहे की तुम्ही जर कॉइन किंवा सुपारी जर इथे असणाऱ्या तुळशीमध्ये जी खोबणी आहे तिथे टाकली तर ती सरळ नृसिंह मूर्तीच्या पायाशी पडते.
ऐकून फार विलक्षण वाटते ना पण हे अगदी खर आहे.तुळशी वृंदावनाच्या बरोबर खालच्या भागात तिसऱ्या भुयारात जाईल असा छोटा रस्ता आहे.त्याकाळी इथून काही संदेश हे खाली टाकले जायचे ते बरोबर मूर्ती शेजारी जावून पडत होते.त्यानुसार तिथे लपून बसलेल्या गावकऱ्यांना बाहेरच्या परिस्थितीची माहिती मिळत होती.
आता आपण तिथे पाहता येणाऱ्या सर्व ठिकाणांची माहिती घेवू.मंदिराच्या पूर्व दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला समोर दिसते तो छोटासा दिंडी दरवाजा.आत जाण्याचा हा फारच छोटा मार्ग आहे.परंतु तिकडे न जाता उजव्या बाजूला वळले तर अलीकडे बांधण्यात आलेला भला मोठा सभामंडप दिसतो.तो उतरून खाली आलो की दोन मोठ्या दीपमाळा आपल्या नजरेस पडतात.एका दीपमाळेवर हनुमान दुसऱ्यावर गरुडाची मूर्ती कोरलेली दिसते.
दीपमाळेच्या विरुद्ध बाजूस पाहिले तर आपल्याला सध्या नव्याने बनवलेले भुयार दिसते.त्यातून आत प्रवेश केला की तुम्ही सरळ नृसिंह मूर्तीच्या जवळ जाता.छोट्याश्या दरवाजातून आत गेल्यावर आत दिसणारी शाळिग्राम मध्ये असणारी ती भव्य मूर्ती पाहून तुमचे मन नक्कीच प्रसन्न होईल.
*मुर्तीवर्णन*
साधारण ५ फूट उंचीच्या या मूर्तीकडे आपण शांतपणे पाहिले तर आपल्याला दिसेल की सोळा हात असणाऱ्या या मूर्तीच्या हातात शंख,सुदर्शन चक्र, गदा,पुष्प,बासरी,धनुष्यबाण,कलश ढाल अशी आयुधे आहेत.तर मूर्तीच्या मागे असणाऱ्या प्रभावळीवर मध्यभागी भलेमोठे किर्तीमुख कोरले असून त्याच्या दोन्ही बाजूस वराह,मत्स्य,कुर्म( कासव),नृसिंह,वामन, श्रीराम,श्रीकृष्ण,परशुराम, कल्की,बुद्ध,ऋषभदेव,अशी विष्णूरूपे कोरली असून मूर्तीच्या याच प्रभावळीवर वळणावळणाची असणारी महिरप जणू शेषनागाने घातलेला वेढा असावा अशी दिसते.
मूर्तीच्या उजव्या पायाजवळ भुदेवी आणि गरुड तर डाव्या पायाजवळ भक्त प्रल्हाद आणि देवी लक्ष्मी यांची सुरेख मूर्ती कोरली आहे.याबद्दल माहिती अशी आहे की जेव्हा नृसिंहाने हिरण्यकशपूचा वध केला तेव्हा त्यांचा क्रोध काही केल्या शांत होत न्हवता.कोणत्याच देवाला नृसिंह देवासमोर जाण्याचे धारिष्ट होत नव्हते तेव्हा भूदेवी समोर गेली त्यांनतर भगवान विष्णूचे वाहन असणारा गरुड सामोरा गेला,त्यांनतर स्वतः देवी लक्ष्मीने नृसिंहरुपी भगवान विष्णूंचा क्रोध शांत करण्याचा प्रयत्न केला.सर्वांनी केलेले हे प्रयत्न वाया गेल्यानंतर भक्त प्रल्हाद सामोरे जातो तेव्हा कुठे नृसिंहाचा क्रोध शांत होतो.
क्रोधित डोळे,मांडीवर घेतलेला हिरण्यकश्यपू,दोन्ही हाताने फाडलेले त्याचे पोट,उजव्या पायाखाली मुडपलेला हिरण्यकश्यपूचा डावा पाय आणि उजव्या पायाने दाबून धरलेला हिरण्यकश्यपूचा डावा हात,एका हाताने दाबून धरलेले त्याचे डोके तर एका हाताने धरलेला त्याचा उजवा पाय अशाप्रकारे पूर्ण जखडून ठेवलेला हिरण्यकश्यपू भगवान नृसिंहाच्या पुढे पूर्ण हतबल दिसून येतो.
एका अखंड शाळिग्राम दगडात कोरलेली ही मूर्ती जेवढा वेळ पाहू तेवढे कमीच.
*इतर ठिकाणे*
मूर्ती पाहून बाहेर आलो की डाव्या बाजूस एक छोटासा रस्ता दिसेल.त्या छोट्या दगडी चौकटीतून आत आलो की उजवीकडे वळून थोडे अंतर चालत गेलो की समोर एक भिंत दिसते पण तिथून पुन्हा उजवीकडे वळायचे.थोडे अंतर चालून आलो की एक चौकोनी कोरलेली शिळा दिसेल त्यातून वरती यायचे. वरती आलो की बरोबर मागच्या बाजूला एक मूर्ती दिसेल.जी तुटलेल्या अवस्थेत आहे.हीच ती नृसिंहाची खोटी मूर्ती.ती पाहून आत आलो की आपल्याला अंबाबाईचा मंडप दिसतो.त्यात अंबाबाई, गजान्तलक्ष्मी,इतर काही देवदेवता आणि श्री सिध्देश्वर महाराजांची समाधी पहायला मिळेल.तिथे तुम्हाला एक दरवाजा दिसेल पण सध्या तो बंद असतो.इथूनच पूर्वी वरती जाण्याचा आणि खाली उतरण्याचा एकमेव मार्ग होता.
हे पाहून झाले की पुन्हा आहे त्याच मार्गे बाहेर आल्यावर तुम्ही तुळशी वृंदावन,त्याच्या बाजूला असलेले शेजघर पाहू शकता.तिथून पुन्हा बाहेर येवून पूर्वी ज्या मार्गे भुयारात उरतले जात होते तिथे आलो की पहिल्या पायरीवर काही लिहिलेले दिसेल ते असे
*"भानू तुकदेव त्याचा पुत्र*
*गोपाळ भास्कर त्याचा पुत्र*
*भानू गोपाळ"*
तिथून बरोबर नऊ पायरी उतरलो की भुयारात जाणारा पहिला दरवाजा दिसतो की जो सध्या बंद आहे.
हे मंदिर पाहून झाल्यावर तिथून पुढे साधारण ३किमी अंतरावर कृष्णेच्या पाण्यावर बांधलेला घाट हा देखील पाहण्यासारखा आहे.तिथून जवळच आहे रामदास स्वामी यांनी बांधलेले श्रीराम आणि हनुमान मंदिर.
या मंदिराची देखील एक फार मोठी आख्यायिका आहे.पण माझ्या मते ते सर्व मी सांगण्यापेक्षा आपण जर स्वतः जावून हा परिसर पाहिला तर फार उत्तमरीत्या समजेल असे मला वाटते.
तिथल्या स्थानिक लोकांनी सांगितलेली माहिती.बारकाव्याने पाहिलेल्या काही गोष्टी या आधारावर मी हे सर्व लिहिले आहे.यात काही चुकाही असू शकतात.पण आपण त्या समजून घ्याल हीच अपेक्षा.
या सर्व गोष्टी मध्ये मला थोडा बदल करू वाटला तो म्हणजे ही मूर्ती इ.स.५५६१ वर्ष जुनी नसावी. कारण मूर्तीच्या प्रभावळीवर कोरलेली भगवान बुद्ध आणि ऋषभदेव यांची मूर्ती.तसे पाहिले तर यांचा इतिहास एवढा जुना नसल्याने मूर्तीचा इतिहास एवढा जुना नसावा असे मला वाटते.पण हा परिसर, हेमाडपंती बांधकाम,भुयार त्यात अगदी तिसऱ्या भुयारात एवढ्या खाली वारा खेळता रहावा यासाठी केलेली विशिष्ट रचना हे सर्व पाहण्यासारखे आहे.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*
मेहनतीची पोहोचपावती
*मेहनतीची पोहोचपावती*
यात्रा असो वा गणपती उत्सव; प्रत्येक मंडळ हे काही जिवंत देखावे सादर करून आपल्या प्रेक्षकांना काहीतरी सामाजिक जाणिवेचे भान राखून काही तरी संदेश द्यायचा प्रयत्न करत असते.
यानुसार *बाल गणेशोत्सव मंडळ,खिंडवाडी.....* आम्ही यात्रेमध्ये असणाऱ्या सोंगामध्ये *बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण* यावर आधारित एक सुंदर देखावा सादर केला होता.
सर्व ग्रामस्थ,बाहेरून आलेले प्रेक्षक या सर्वांना आवडेल आणि हृदयाला स्पर्श करेल असा सुंदर देखावा आम्हाला सादर करता आला त्याबद्दल आम्ही सर्वजण खूप आनंदी होतो.
पण त्या आनंदात भर म्हणून अजून एक गोष्ट घडली. सोशल मीडिया वर आम्ही आमचे हे छोटेसे नाटक अपलोड केले होते ते पाहून आपल्या सातारा पंचक्रोशीत असणारे क्षेत्रमाऊली परिसरातील बाल गोपाल गणेशोत्सव मंडळ यांनी आमच्याशी संपर्क साधला.
आपल्या नाटकाची आणि सादर केलेल्या विषयाची दाद अशी बाहेरून होतेय ही गोष्ट मनाला जास्तच आनंद देणारी होती.त्यानंतर बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाचे सदस्य भेटीस आले.संपूर्ण नाटक कसे लिहिले,त्यातून कशाप्रकारे संदेश दिला,लिहिताना मनात काय विचार होते,सादरीकरणात कशा गोष्टींचा विचार करावा यावर बरीच चर्चा झाली.
त्यांना विषय आवडला ही जमेची बाजू होतीच.पण पुढे विषय येतो तो व्यवहाराचा.कारण प्रत्येक मंडळ हे अशा सादरीकरणासाठी बराच पैसा खर्च करत असते.आम्हीही त्यापैकी एक.मग ठराविक रक्कम देवून नाटकाची रेकॉर्ड केलेली मूळ ऑडिओ क्लिप त्यांना दिली.
आम्ही कशाप्रकारे सादर करतो बघायला या असे म्हणून ते निघून गेले.मग आम्हीही आमच्या मंडळाच्या पुढील नियोजनात गुंतून गेलो.काल रात्री अचानक १०.३० वाजता फोन आला की अहो क्षेत्रमाऊली मधून बोलतोय....तुम्ही दिलेल्या विषयावर आम्ही आमच्या पद्धतीने सादरीकरण केले आहे.तुम्ही पहायला या की.
वेळ खूप झाली होती.त्यामुळे नकार देण्याच्या मानसिकतेत मी होतो.पण लगेच पुढून आवाज आला.रात्री १ वाजले यायला तरी या.तुमच्यासाठी पुन्हा शो लावतो.पण या नक्की.
हे ऐकल्यावर नकार द्यायला जीभ उचलली नाहीच.सरळ हो येतो पण वेळ होईल अस सांगून फोन ठेवून दिला.आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांना ही माहिती दिली आणि त्यांच्या सोबत गेलो ते थेट बाल गोपाल गणेशोत्सव मंडळाच्या शेड जवळ.
गेल्या गेल्या श्रीफळ देवून आमचा त्यांनी सत्कार केला आणि मग नाटकाच्या सादरीकरणाला सुरुवात केली.
*जेव्हा तुम्ही लिहिलेले,स्वतःच्या आवाजात रेकॉर्ड केलेले आणि त्या कथानकात एक भूमिका स्वतः साकारलेले नाटक* आपल्याच समोर एक दुसरा समूह सादर करतोय हे पाहताना मनाला मिळणारा आनंद मला ठीक मांडता येत नाही.पण प्रत्येक कलाकाराचा उत्कृष्ट अभिनय,अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण आपल्या भूमिकेला योग्य न्याय देत होते.
हे सर्व पाहत असताना काही महिन्यापूर्वी आम्ही केलेले ते सादरीकरण त्यासाठी सर्वांनी घेतलेली मेहनत,आलेल्या अडचणी,त्यातून काढलेले मार्ग हे सगळेच डोळ्यासमोरून जात होते.
मूळ कथानकात काही किरकोळ बदल करून त्यांनी सादर केलेल्या या नाटकाला तिथे देखील मिळणारी पसंती सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती.
नाटक संपल्यावर सर्व कलाकारांसोबत फोटो घेण्याचा मोह झाला आणि तो सुंदर प्रसंग आम्ही कॅमेऱ्यात कैद केला.कसे झाले आमचे नाटक....? झाले का नीट...?आवडले का....? अशा सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर होत माझ्याकडे.....उत्तम....खरच फार छान केले तुम्ही.
तेव्हा अजून एक गोष्ट लक्षात आली.आपण मेहनत घेतो आणि आपल्या मनाला वाटेल असे सादर करतो.यात खरा आनंद नसतो.आनंद तेव्हाच होतो जेव्हा त्याला प्रेक्षकांच्या पसंतीची दाद मिळते.
खरच कलाकाराला अजून काय हवे असते.....आपल्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी प्रेमाचे २ शब्द आणि थोडंसं कौतुक.आज आमच्याकडुन ते त्यांना मिळत होत....आणि त्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.
पण त्यांच्याहीपेक्षा माझ्या मनात जो एक सकारात्मक उर्जेचा प्रवाह जागा झाला तो मी कधीच नाही विसरू शकत.पुसेसावळी येथे देखील आमच्या या नाटकाचे प्रयोग दाखवले गेले.पण तिथे आम्हाला जाता आले नाही.
लिखाणात सहकार्य करणाऱ्या माझ्या मंडळातील सदस्यांचे जे मार्गदर्शन मिळाले,सादरीकरणात माझ्या सोबतच्या ज्या कलाकारांनी उत्तम अभिनय केले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे रेकॉर्डिंग मध्ये ज्या कलाकारांनी आपले आवाज दिले.आज त्या सर्वांच्या मेहनतीला पोहोचपावती मिळाली होती.
सन्मानाने मिळालेले श्रीफळ घेवून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो ते मनात एक वेगळाच आत्मविश्वास घेवून.
निलेश बाबर
शब्दसारथी
९२७१००८८९३
संशय चारित्र्याचा
*संशय चारित्र्याचा* अशा संवेदनशील विषयावर लिहिताना नक्कीच माझ्याकडुन लिखाणात बऱ्याच उणीवा सापडतील.पण मला समजून घ्याल ही आशा बाळगून मी आज माझं मत व्यक्त करतोय. *धाग्याच्या सोबतीने सुई नवं वस्त्र निर्माण करते हे सर्वांना माहीत असलं तरी संशयाची सुई जेव्हा संसारात प्रवेश करते तेव्हा मात्र ही सुई संसारच विवस्त्र करते(इथे संसार उघड्यावर पाडते असा अर्थ घ्यावा)* समज,गैरसमज या नाजूक गोष्टींच्या विचाराने मनावर येणारा ताण नक्कीच मेंदूचा समतोल ढासळवू शकतो.हे जरी खरे असले तरी हा सुटणारा संयम फार मोठं पाप हातून घडवून जातोय हे त्या क्षणाला समजत नाही. हे अनेक घटनांतून आपण पाहत आलो आहेच. मग या रागाच्या होळीत कित्येक कुटुंब आजवर जळून खाक झाली.पण द्वेषाची ही होळी कायम पेटलेलीच राहिलीय कारण रोज नव्याने त्यात संशयाच्या घाण्याचं तेल ओतले जातच आहे.कधी आटणार हा घाणा....? आणि कधी विझणार ही होळी....? हे प्रश्न तसे अनुत्तरीतच राहणार कारण संशयाला उगीच टोचणारी सुई म्हणत नाहीत.ती सतत वेदनेला ओलीच ठेवण्याचं काम अगदी व्यवस्थित पार पाडत असते. *"नात्याच्या बहरणाऱ्या वेलीवर जेव्हा* *संशयाच्या सापांचे पडतात वेटोळे* *तेव्हा कोमेजून जातात उमलणारी फुले* *अन् संसाराचे होते वाटोळे"* यावर बोलायला अनेक बाजू आहेत.जेवढ्या घटना.... त्यातील वेगळे अनुभव आणि त्यावर वेगळे निष्कर्ष नक्की मांडणार तरी काय.रागाच्या भरात क्षणात सगळं संपवणारे आपण खूप पाहिले.पण मी आज बोलणार आहे ते क्षणात संपवणाऱ्या बद्दल नाही तर क्षणाक्षणाला थोड थोड मारणाऱ्या बद्दल. मागच्या आठवड्यात अगदी जवळच्या ठिकाणी एक घटना घडली.नाव....गाव....प्रसंग यावर काहीच भाष्य मला करायचं नाही.पण त्याच घटनेचा विचार मी गेली १ आठवडा रोज करतोय.मग त्याला जोडून असणारे इतर दुवे आणि घटनांचा आधार घेवून मला माझी काही मतं आज तुमच्यासमोर मांडू वाटली.प्रतिक्रियेत आपण आपली मते मांडून जरी काही सुधारणा सांगितल्या तरी मला आवडेल.त्यातूनच तर या विषयावर काहीतरी चर्चा होईल. एक मुलगी जेव्हा नव्या संसाराचं स्वप्न बघते तेव्हा तिला स्वतःच जग हे नवऱ्याच्या चष्म्यातूनच बघावं लागतं.हे आजवर आपण सर्वजण पाहत आलोच आहे.नवऱ्याच्या स्वप्नांना उभारी द्यायला आपल्या पंखांची ऊर्जा खर्च करून त्याचे विश्व निर्माण करण्यात धन्यता मानणाऱ्या तिला; त्या बदल्यात हवी असते फक्त मायेची हाक आणि प्रेमाची साथ. स्वतःच्या स्वप्नांना बाजूला ठेवताना तिला एवढं दुःख नसतं पण तिला खरं दुःख या गोष्टीचं होतं की ज्याच्यासाठी सर्वकाही पणाला लावून त्याच्याच स्वप्नांना आपलंसं करताना तिच्या कर्तुत्वाला जराही किंमत न मिळणं. कुणीतरी एक गोष्ट फार छान लिहिली आहे की स्त्री ही तिच्या बालपणात असते तिच्या वडिलांच्या घरात,लग्नानंतर असते ते तिच्या नवऱ्याचे घर आणि उतारवयात असते ते तिच्या मुलाचे घर......या सगळ्या घरघरीत तिचं असं हक्काचं काय असतं....? तिचं असं हक्काचं काही नसलं तरी तिला वाटत असतं हे सगळे मात्र आनंदात असावेत.मग सगळ्यांच्या सुखाचा विचार करणाऱ्या तिच्या आनंदाचं काय.....? यावर लिहीत बसलो तर फारच गोष्टी लिखाणात वाढत जातील.म्हणून मी थोडक्यात सांगतो ते सध्या माझ्या मनात घालमेल करणाऱ्या त्या घटनेबद्दल. परिस्थिती कशीही असली तरी आपल्या मुलीला चांगला मुलगा मिळावा म्हणून प्रयत्न करून तिचा विवाह रीतीरिवाजाने चांगल्या प्रकारे करून दिला जातो आणि कन्यादानाच्या फार मोठ्या जबाबदारीतून यशस्वीरित्या मोकळा झालो या आनंदात वडील असतात....यात काही वावगं नाहीच. मुलाचं लग्न झालं.....सून घरात आली आता घरातील थोड्या जबाबदारीतून मी मोकळी झाले.... सासूबाईंना होणाऱ्या या आनंदात ही काय वावगं असं नाही. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संसाराची धुरा सुपूर्त करण्याचा कार्यक्रम म्हणजेच तर लग्न.मग नवीन संसारात दोन वेगळे जीव एकत्र येताना वेगळ्या सवयी,आवडीनिवडी,स्वभाव,मतं व्यक्त करायची पद्धत,भावना समजून घेण्याची कला या नक्कीच वेगवेगळ्या असणार.बघा ना धर्म,जात,प्रांत जरी वेगळे असले तरी रीतसर लग्न कसे ठरवावे याच्याही पद्धती आहेत,लग्न पार कसे पाडावे याचे वेगवेगळे संस्कार आहेत,अगदी मधुचंद्राच्या रात्री पर्यंत सगळे रीतिरिवाज आहेत.पुढे गरोदरपणाचे संस्कार आहेत,बाळ झाले की त्याचे वेगळे संस्कार आहेत.....हे सगळे रीतिरिवाज....धर्म वेगळे असले तरी वेगळ्या प्रकारे का होईना अस्तित्वात आहेत. आता यापुढे मी एक गोष्ट बोलतोय ती सर्वांची माफी मागूनच....मला सांगा या सगळ्या संस्कारात नवी पिढी उत्तम घडते यात मला काहीच शंका नाही.पण काही अघटीत प्रसंग जेव्हा डोळ्यासमोर येतात तेव्हा वाटत..... खरा एक संस्कार सगळीकडेच कमी आहे तो म्हणजे नव्या नात्याला सुरुवात करताना त्या दोन मनांची,दोन जीवांची खरी होणारी ओळख.....मग तुम्ही कितीही म्हणाला की आजकाल दोघांना वेगळे बोलायला वेळ दिला जातो......अहो वेळ दिला जातो यात शंका नाहीच.....पण ती वेळ देताना आधीच कान भरले जातात त्याचे काय .......? हे बघ मुलगा चांगला आहे.....नोकरी चांगली आहे....घरचे चांगले आहेत......आणखी काय हवे......? आणि दुसऱ्या बाजूला ही एक वेगळीच पद्धत असते....हे बघ मुलगी चांगली आहे .....केलीय चौकशी.... साधी सरळ आहे .....दिसायला चांगली आहे ....बाकी काय लफडे बिफडे तसले काय नाही.....घरची कामं येतात सगळी.....अजून काय पाहिजे....? एवढे सगळे बोलून कान भरले जातात आणि एकांतात पाठवले जाते.... बोला काय तुम्हाला बोलायचं असेल ते.....आमची काय हरकत नाही....शेवटी तुम्हाला संसार करायचा आहे......यातून होणारे विवाह अयशस्वी होतात असे मी मुळीच म्हणत नाही.कृपया वेगळा अर्थ घेवू नये.यातून मला एकच सांगायचं आहे की खरच अशाप्रकारे कान भरून पाठवलेले ते दोन जीव आणि हवा भरून हवेत सोडलेले फुगे यात काय फरक आहे ...? मग फुगे असो वा ते दोघे अनुकूल वातावरणात मस्त वाहत जाणारच ना.पण जेव्हा काट्यांचा प्रवास सुरू होतो तेव्हा फुटणाऱ्या फुग्यात आणि त्या दोघात काय फरक असतो.....? जोरात आवाज निघतोच ना.....? मग हेच तर होते खऱ्या आयुष्यात ही. सुरुवातीला सगळे आलबेल असताना काही दिवस आनंदात निघून जातात.असेच काही या घटनेत ही आहे.मग आधी बायकोच हवहवसं वाटणारं सौंदर्य नंतर मनात आपोआप घर करायला लागत की..... ही एवढी चांगली म्हणजे ही अजून बऱ्याच जणांना आवडणार.....! मग आधी सुंदर वाटणारी बायको एक वरदान वाटत होती....तीच पुन्हा आपोआप शाप बनू लागते.....तू एवढी छान म्हणजे तुझ्या मागं बरीच पोरं असणारं......मग सांग कोण कोण होतं....????? स्वतःला एका भेटीत पसंत पडणारी मुलगी.....जगात बाकी पुरुषांच्या नजरेतून सुटलेली असणार का....? वयाच्या वेगवेगळ्या टप्यावर ती कोणाला ना कोणाला आवडू शकते यात तिचा दोष असणार का.....? रोज वेगवेगळ्या लोकांच्या नजरेच्या निखाऱ्यातून स्वतःला जपत स्वतःच आयुष्य,सर्वस्व ज्याच्या पायाशी ठेवते.... तो जेव्हा अचानक म्हणतो मला जशी आवडलीस तशी किती जणांना आवडली होतीस सांग.....? मला सांगा या प्रश्नानं तिला कोणता मोठा खिताब मिळाल्याचा आनंद होईल का .....? पायाखालची जमीन सरकल्याच्या भावनेत....अहो अस काय पण का बोलता.....? हेच शब्द तोंडातून बाहेर येतील....? की तू आवडतेस म्हणणारांची यादी वाचून दाखवेल ती.....? बायको सुंदर हवी हा अट्टाहास आणि तिला कधी कोणी विचारले नसावे ही गलिच्छ अपेक्षा.....कसे होणार मग पुढे......? सौंदर्य न पाहता फक्त गुणांकडे पाहून असंख्य लग्न यशस्वी झाली आहेत यात काही शंका नाहीच.मी जे बोलतोय ते काही अपवादात्मक गोष्टींवर.त्यामुळे कृपया कोणीही या गोष्टी वैयक्तिक घेवू नयेत हीच अपेक्षा. आपले सौंदर्य ही आपली छान संपत्ती आहे .....आता संसारात ही नवऱ्याला छान सुखी ठेवू हे स्वप्न पाहणाऱ्या तिला जेव्हा विनाकारण तिचे सौंदर्य हाच जेव्हा शाप वाटेल तेव्हा काय होणार.....?लग्न लावून देणारे घरचे हे मनमोकळे करायला मिळणारे हक्काचे ना.....? मग केले तिथे मन मोकळे.......काय चुकलं का......? नाही ना......?मग यावर प्रतिसाद काय यावा.......?यावर समंजसपणे चर्चा करून विनाकारण विकोपाला जाणाऱ्या वादात घरच्यांनी लक्ष द्यावे की नाही ......? मुलाच्या बोलण्यात तथ्य आहे म्हणून सासू सासरे त्याला दुजोरा देणार......आणि आता तुझे लग्न झालेय... होते असे. वाटते आहे तर वाटू दे.....तुझे नाय ना काय मग नको घाबरु....असे म्हणून एकप्रकारे घरचे तिला टाकूनच देतात..... सुखी संसारात आलेली ही वाईट वेळ..... ना तिचे घरचे समजून घेत ना सासरचे साथ देत......नवऱ्याचा वाढता संशय.....त्यात भर म्हणून सासू सासरे लक्ष ठेवायला.......अगदी घरच्यांना फोन करायची बंदी......त्यात या शंका घेणाऱ्या नवऱ्याचे पोटात वाढणारे बाळ.......होणाऱ्या मातृत्वाचा आनंद घ्यावा.....की जन्माला घातलेल्या या शंकेच्या भुताला तोंड द्यावं..... बर तोंड द्यायला ही तयार... पण नक्की बोलू काय......? सांगू काय....? गरीब परिस्थितीतून शिक्षण घेतलं.....सौंदर्य पाहून चांगलं स्थळ मिळालं.......लग्न करून संसार थाटला.....प्रेमानं सर्व अर्पण केलं......आनंदान पोटात जीव वाढताना.....नवऱ्यानं नवीन कारण काढलं......ज्या काळात तुला काय हवं काय नको हे विचारनं गरजेचं असताना तुला कोणी कोणी विचारलं हा प्रश्न जास्त महत्वाचा वाटणारा नवरा.......तुला काय खाऊ वाटत...? काय त्रास होतोय का...? हे विचारणं सोडून तुझ्यामुळं माझं पोरगं त्रासात जगतयं म्हणणारी सासू......हे बघ कर आता सहन.... काय बोलून फायदा......पोरीच्या जातीच असच असतं अस म्हणणारी आई ......या सगळ्यात काय अवस्था झाली असेल तिच्या मनाची......? काय वाटलं असेल स्वतःचं आयुष्य संपवून घेण्याचा निर्णय घेताना.....?आपणच नाही तर आपल्या पोटात अजून एक जीव वाढतोय.....हे माहीत असताना..... स्वतःच आयुष्य जेव्हा संपवून घेवू वाटत तेव्हा.... किती एकटी पडलेली असेल ती.....? यात दोष कोणाचा......? प्रवृत्त करणारे सासरचे......? हो ते नक्कीच दोषी आहेत यात काही शंकाच नाही.पण या सोबत अजून बरेच जण याला जबाबदार नाहीत का.....? अशी जेव्हा परिस्थती समाजात निर्माण होते तेव्हा मुलगी म्हणजे परक्याचे धन समजून.....लग्न लावून दिले की जबाबदारी संपते का.....?लग्न झाले म्हणजे तिने असेल ते सहन करून जगावं का.....? तिला तिचे स्वतःचे अस्तित्व नाही का.....? अशाप्रकारे आयुष्य संपवून घेणे हे चुकीचे आहेच.....पण प्रवृत्त करणारी विचारशैली संपायला नको का .....? आज स्त्रीला जगात मानाने जगता यावं यासाठी अवतीभोवती बऱ्याच सामाजिक संस्था कार्यरत आहेत यात काही शंका नाहीच...पण त्याला काही मर्यादा आहेत.....जोपर्यंत त्रासात खचलेली स्त्री स्वतः तिथे पोहोचत नाही....किंवा कोण तिला तिथे पोहोचवत नाही तोपर्यंत या संस्था तरी काय करणार ......? आज एक चांगली मुलगी या जगातून निघून गेली. कारण योग्यवेळी तिच्यापर्यंत कोण पोहोचू शकले नाही......माझी वाचकांना आणि अशा सेवाभावी संस्थांना एक विनंती आहे की आपण या चळवळीला मोठ्या प्रमाणात कसे जागृत करू शकतो यावर मार्ग शोधावा.....जी घटना घडली....कुठे घडली याची मला अजिबात वाच्यता करायची नाही....पण अशी घटना पुन्हा कुठे घडू नये यासाठी आपण काय करू शकतो.....यावर आपण सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.....जसे तहान लागली की पाणी विकत का होईना उपलब्ध आहे.....असे खरच फार त्रासात असणाऱ्या स्त्रीला पटकन ती ठिकाणं गाठता यावीत ......तिचे योग्य समुपदेशन व्हावे.....यासाठी काही मार्ग निघतील का.....?नक्कीच जेव्हा एखादी स्त्री असे शेवटचे पाऊल उचलायला तयार होते; तेव्हा तिला तिच्या आयुष्याची सगळी दारे बंद झालेली दिसत असतात.....मग अशा अत्यंत नाजूक आणि बिकट परिस्थितीत तिला हक्कांन एक मार्ग मोकळा दिसावा ज्यातून नाती गोती भले काही क्षण लांब जातील पण आयुष्य असे अर्ध्यात संपवले जाणार नाही. *"जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या....अमुक तमुक यांना अटक*" या चार ओळीत तिचे पूर्ण आयुष्य गुंडाळून ती बातमी दुसऱ्या दिवशी रद्दीत जाते.पण रद्दीत जाणाऱ्या या कागदातून अशा घटना कायमच्याच रद्द झाल्या तर खर आपली ही चळवळ यशस्वी होईल अस मला वाटत. या बऱ्याच मोठ्या लेखातून मला एक छोटीच गोष्ट खर तर सांगायची आहे ती म्हणजे मानसिक शारीरिक त्रासाला कंटाळून स्वतःच आयुष्य संपवून घेणं चूकच.पण अशाप्रकारे कोण कोणाला प्रवृत्त करत असेल हे जाणवले तरी तुम्ही स्वतः काही करू शकला नाही तरी समाजाचं काही देणं लागतो हे समजून कमीतकमी ही गोष्ट पोलिसांपर्यंत पोहोचवा. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *मोबा नं.-९२७१००८८९३*
शब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.
*शब्द*.......मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र. आपलं जीवन शब्दात बांधता येईल एवढं सोपं कधीच नसतं असं वाटतं ना....?कारण काहींना मनातलं शब्दात मांडता येतं,तर काहींचे शब्द मनातच राहून जातात. कधी डोळे बोलके भासतात तर कधी शब्दही मुके होतात. पण बघा ना धार बनून काळजाला चिरणारे ही शब्दच आणि काळजीने आधार देणारेही शब्दच.लहानपणीचे ते बोबडे बोल,तारुण्यातील प्रेमळ हाक आणि उतार वयात हवे असतात ते आधाराचे शब्द.हे सारंच कसं शब्दात बांधलं गेलंय ना....! खरंच शब्दांनी एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचता येतं.पण त्याआधी त्या शब्दांपर्यंत पोहोचता यायला हवं ना.कारण काही वेळा शब्दच हरवून जातात.मग का....? कसे....? असे अनेक प्रश्न पडतात ना....? पण अशा निशब्द भावनांवर बोलताना शब्दांत जरासा झालेला बदल हा देखील कित्येक नव्या अर्थांना जन्म देत असतो.मग अशा अनेक अर्थांनी भरलेल्या सोहळ्यात जन्म घेणारे हे शब्द कित्येकदा पूर्ण जन्म निघून गेला तरी मनातील दुरावे दूर करू शकत नाहीत. उब देणारी गोधडी थंडीत जशी हवीशी वाटते तशीच ती उन्हाळ्यात अगदी नकोशी झालेली असते.शब्दांची उब तरी काय अशीच तर असते.योग्य वेळी योग्य त्या शब्दातून व्यक्त झालो तरच ती उब हवीशी वाटते नाहीतर मग भावनाशून्य वाळवंटात तुमच्या आपुलकीच्या गोधडीला दूरवर फक्त टांगते ठेवले जाते कारण त्याखाली बसून.... फक्त सावलीत मिळणारा विसावा अनुभवता यावा म्हणून.मग एखाद्याच्या विरंगुळ्याचं कारण बनून असच हवेत फडफडणाऱ्या शब्दांच्या सावलीला किंमत..... ही फक्त समोरच्याला क्षणभर विश्रांती मिळावी एवढीच.म्हणूनच तर अर्थपूर्ण शब्दही निरर्थक ठरतात कारण त्यांच्या वापराच्या योग्य त्या वेळा साधता येत नाहीत.चुकलेली वेळ आयुष्याचा मेळ पुन्हा बसवेल असे कोणतेच शब्द नसतात.म्हणून योग्य त्या वेळी शब्दांचे बांध फोडत रहा.....कायम व्यक्त होत रहा.आपल्यांसाठी अन् आपल्यांपाशी शब्दांचा झरा कधी आटू देवू नका.तरच नात्यांचा ओलावा कायम टिकून राहील ना. शब्दांच्या या खेळामध्ये सावरताना स्वतःला हे शब्दच मला तारती कारण मी त्या शब्दांचा आणि शब्द माझे सारथी. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*
नातं
*नात*
कोण आहे आपण....?काय आहे आपलं अस्तित्व....?जर नसेल कोणाची सोबत तर काय आहे हे जीवन....?आयुष्यात बऱ्याचदा एकांत हवा असतो;पण एकटेपणा कोणाला हवासा असतो....?नाही ना....?म्हणूनच तर प्रत्येकाचं आयुष्य एका अदृश्य धाग्यानं बांधलं गेलयं.त्यालाच आपण म्हणतो नातं.
मग ते कोणते का असेना....ते जोडलं जातं....घडलं जातं....आणि आपुलकीनेच वाढलं जातं.... गैरसमजाने बिघडलं जातं....रागाने मोडलं जातं....प्रेमाने ओढलं जातं....तर तिरस्काराने सोडलं जातं.हे नातच तर असतं जे सारं काही उभारत असतं....मग त्या प्रेमाच्या इमारती असो वा द्वेषाच्या भिंती.
कोणाला हवा असतो नात्यातील दुरावा....?कोणाला वाटतं आपला जीव झुरावा....? सर्वांनाच तर वाटतं असतं सारा भोग सरावा आणि जीवनात फक्त आनंद उरावा....! मग नक्की चुकतं कुठं....?का निर्माण होतात हे दुरावे....?
नात्यांच्या या जाळ्यामध्ये थोडी चढाओढ,रुसवे फुगवे असतात आणि ते असावेत ही.त्यातूनच जीवनाची खरी गोडी ही समजते ना.पण आयुष्याच्या टोकापर्यंत फक्त टोकाचाच विचार करत गेलो ना तर......मागे वळून पाहिल्यावर दूरच्या टोकापर्यंत ही कोणी आपलं दिसणार नाही.कारण हे अंतर कधीही पार न करता येण्यासारखं असतं.
नात्यांची अनेक रूपं आहेत,अनेक छटा आहेत.पण मी आज सांगणार आहे ते एका नाजुकश्या नात्याबद्दल.काय असतं ते नातं....?कसं असावं ते नाजूकसं नातं....?प्रश्न खूप पडतात ना पण उत्तरं ही खूप साधी आहेत ओ.
दोन जीवांना एक जीव बनवणारं, आयुष्य सुरु होताना सुरू होणारं आणि आयुष्याच्या अंतानंतरही राहणारं....!जीवन किती सुरेख आहे हे शिकवणारं,आयुष्याच्या प्रत्येक पावलास साथ देणारं....! चंद्रकोरी प्रमाणं वाढणारं,चांदण्या प्रमाणं अमर्याद राहणारं....! जखमेवरचं औषध बनणारं,जोडीदारासाठी चंदन बनून झिजणारं....!संकटात प्रेरणेचा हाथ देणारं,आयुष्यभर प्रेमाची साथ देणारं,डोळ्यातून सुरू होणारं आणि श्वासापर्यंत जाणारं....!जागेपणी सुंदर स्वप्न दाखवणारं,त्या स्वप्नपूर्तीसाठी झगडणारही....! बुडणाऱ्याला हात देणारं, मरतानाही साथ देणारं,न सांगता ही सर्व काही समजणारं,न बोलता ही सारं काही समजून घेणारं....!शून्यातून विश्व निर्माण करणारं,शरीर न्हवे तर मनं जोडणारं....!तहानभूक विसरायला लावणारं,स्वतः जळून दुसऱ्याला वाट दाखवणारं....! असावं एक नातं नाजुकसं आयुष्यभर पुरणारं आणि पुरूनही उरणारं....!
शेवटी कोणतेही नातचं तर असतं जे एकमेकांना बांधून ठेवतं.फक्त विचार जुळावे लागतात. विचारांवरून एक गोष्ट लक्षात आली....विचार तेव्हाच जुळतात जेव्हा समोरच्याच्या भावना कळतात.मग भावना कळल्या तरच मनं जुळतात.आणि जर मनं जुळली ना की मग नातं कोणतं का असेना त्यातील गोडवा हा कायम टिकून राहतो.
जर वाटत असेल नात्यात कायम टिकून रहावी गोडी तर स्वतः पेक्षा समोरच्याच्या मनाची जाणीव असावी थोडी. जर जाणता येत नसेल समोरच्याच्या मनाची अगतिकता तर उगा वेडेवाकडे बोलण्याची नसावी मानसिकता.दोन गोड शब्द प्रेमाचे पुरे आयुष्य सुखाचे उभारती.मी त्या शब्दांचा अन् शब्द माझे सारथी.
नात्याबद्दलचे मनात आलेले विचार शब्दात मांडताना काही चुकलं असेल काही राहिलं असेल तरी आपलाच एक शब्दांशी जोडलेला नातलग समजून जरी काही सांगू वाटलं तरी अवश्य सांगा.
नात्यांच्या अमर्याद विश्वाचा अदृश्य धागा शोधताना शब्दांशी जोडलेल्या या नात्यात आपण शेवटपर्यंत लेख वाचलात त्याबद्दल आपले मनापासून आभार.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*
आठवण
*आठवण* आठवण.......म्हणजे तरी नक्की काय....? आपल्या आयुष्यात ठरलेल्या प्रत्येक वळणावर नकळत मनाला स्पर्श करून जाणारी भावना म्हणजेच तर आठवण.मग या कडू गोड आठवणींनी बनलेलं असतं तेच तर खर आयुष्य. आपल्या पूर्ण जगण्यावर प्रभाव असतो तो आठवणींचाच.काही आठवणी जगण्याला नवी कारणं देतात....तर काही आठवणी अशा असतात की का जगावं याची कारणं शोधावी लागतात.पण आठवण ही कशीही असली तरी स्वतःला सावरणं,मनाला आवरणं आणि विनाकारण न बावरणं जमलं ना तरच या जगात सर्वांसमोर हसत वावरणं जमतं. आठवणी या आठवायच्या असतात, साठवायच्या असतात.कडू असतात त्या गोठवायच्या असतात तर गोड असतात त्याच पुढे पाठवायच्या असतात. आठवण नेमकी केव्हा येते....?जेव्हा त्या क्षणांना साजेसं असं काही घडतं....मग तेव्हाच ते भूतकाळाचं पुस्तक नव्यानं उघडतं.मग हरवून स्वतःला त्या पुस्तकातच अडकायचं का साजेश्या त्या नव्या क्षणांना सुंदरतेनं घडवायचं हे आपल्याच हाती. मग एका निवांत वेळी शांत ठिकाणी बसावं साठवत हे निसर्गाचं रूप मनात.न्याहाळताना सौंदर्य त्याचे शोधावे आठवणींना ही त्यात.पानांची सळसळ,त्या जवळच वाहणारा तो ओहोळ वाहत राहतो खळखळ...खळखळ.पानांची सळसळ होणारी ती कुजबुज असते आपले हितगुज जपणारी......वाहणाऱ्या पाण्याची नसते ती फक्त खळखळ रोखून मनास पळभर असते ती चाहूल जीवनात पुढे धावण्याची.इथे पडलेल्या फांदीचा देखील असतो झडलेल्या झाडाला आधार....वाढणाऱ्या हिरव्या वेलीचा नसे सुकल्या फांदीस भार.पाहून असं हे निसर्गाचं अनमोल नातं,विसरून सारी दुःख उघडावं जीवनाचं एक नवं खातं. खरच चंद्रलाही लाजवणारं तेज असतं हो आपल्यात पण आपण उगाचचं सूर्याकडे पाहून आपली नजर कमजोर करून घेत असतो.आहे ते स्वीकारून नाही त्याकडे केलेला प्रवास ही प्रगती म्हणू शकतो.पण आपलं कुठं चुकत माहितेय.....?आपण जे आपल्याकडे नाही त्याचाच फक्त विचार करून तेच जिंकायला पाहतो.म्हणून जे आपलं आहे तेच एक दिवस आपल्याला नाकारतं.....आणि मग उरतात त्या फक्त आठवणी. समुद्राला आटताना पाहून कधी घाबरत नसते धरती....कारण तिलाही माहीत असतं पुन्हा नव्याने येणार आहे भरती.असच कोणत्याही संकटात जेव्हा प्रश्नांची मनात होते गर्दी तेव्हा त्यातून बाहेर येताना हे शब्दच मला तारती.कारण मी त्या शब्दांचा अन् शब्द माझे सारथी. आठवणींवर बोलायला जास्त काही आठवावं लागत नाही.कुठेतरी एक धागा सापडला तरी मग आपोआप तो धागा विणला जातो आणि बनते ती त्या सुंदर क्षणांची गोधडी.त्यात हरवून जाताना भान हरपते हे मात्र नक्की.असच वाचता वाचता मग आठवणीतलं काही आठवून काही साठवता आलं... दुःखांना थोडं गोठवता आलं....आणि सल्ला म्हणून मला जरी काय पाठवता आलं तरी अवश्य पाठवा. आठवणींच्या झुल्यावर झुलत सुरू असलेल्या या जीवनप्रवासात भेटू असेच पुन्हा केव्हातरी अशाच एखाद्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या विषयाला घेवून. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*
आठवण
*आठवण* आठवण.......म्हणजे तरी नक्की काय....? आपल्या आयुष्यात ठरलेल्या प्रत्येक वळणावर नकळत मनाला स्पर्श करून जाणारी भावना म्हणजेच तर आठवण.मग या कडू गोड आठवणींनी बनलेलं असतं तेच तर खर आयुष्य. आपल्या पूर्ण जगण्यावर प्रभाव असतो तो आठवणींचाच.काही आठवणी जगण्याला नवी कारणं देतात....तर काही आठवणी अशा असतात की का जगावं याची कारणं शोधावी लागतात.पण आठवण ही कशीही असली तरी स्वतःला सावरणं,मनाला आवरणं आणि विनाकारण न बावरणं जमलं ना तरच या जगात सर्वांसमोर हसत वावरणं जमतं. आठवणी या आठवायच्या असतात, साठवायच्या असतात.कडू असतात त्या गोठवायच्या असतात तर गोड असतात त्याच पुढे पाठवायच्या असतात. आठवण नेमकी केव्हा येते....?जेव्हा त्या क्षणांना साजेसं असं काही घडतं....मग तेव्हाच ते भूतकाळाचं पुस्तक नव्यानं उघडतं.मग हरवून स्वतःला त्या पुस्तकातच अडकायचं का साजेश्या त्या नव्या क्षणांना सुंदरतेनं घडवायचं हे आपल्याच हाती. मग एका निवांत वेळी शांत ठिकाणी बसावं साठवत हे निसर्गाचं रूप मनात.न्याहाळताना सौंदर्य त्याचे शोधावे आठवणींना ही त्यात.पानांची सळसळ,त्या जवळच वाहणारा तो ओहोळ वाहत राहतो खळखळ...खळखळ.पानांची सळसळ होणारी ती कुजबुज असते आपले हितगुज जपणारी......वाहणाऱ्या पाण्याची नसते ती फक्त खळखळ रोखून मनास पळभर असते ती चाहूल जीवनात पुढे धावण्याची.इथे पडलेल्या फांदीचा देखील असतो झडलेल्या झाडाला आधार....वाढणाऱ्या हिरव्या वेलीचा नसे सुकल्या फांदीस भार.पाहून असं हे निसर्गाचं अनमोल नातं,विसरून सारी दुःख उघडावं जीवनाचं एक नवं खातं. खरच चंद्रलाही लाजवणारं तेज असतं हो आपल्यात पण आपण उगाचचं सूर्याकडे पाहून आपली नजर कमजोर करून घेत असतो.आहे ते स्वीकारून नाही त्याकडे केलेला प्रवास ही प्रगती म्हणू शकतो.पण आपलं कुठं चुकत माहितेय.....?आपण जे आपल्याकडे नाही त्याचाच फक्त विचार करून तेच जिंकायला पाहतो.म्हणून जे आपलं आहे तेच एक दिवस आपल्याला नाकारतं.....आणि मग उरतात त्या फक्त आठवणी. समुद्राला आटताना पाहून कधी घाबरत नसते धरती....कारण तिलाही माहीत असतं पुन्हा नव्याने येणार आहे भरती.असच कोणत्याही संकटात जेव्हा प्रश्नांची मनात होते गर्दी तेव्हा त्यातून बाहेर येताना हे शब्दच मला तारती.कारण मी त्या शब्दांचा अन् शब्द माझे सारथी. आठवणींवर बोलायला जास्त काही आठवावं लागत नाही.कुठेतरी एक धागा सापडला तरी मग आपोआप तो धागा विणला जातो आणि बनते ती त्या सुंदर क्षणांची गोधडी.त्यात हरवून जाताना भान हरपते हे मात्र नक्की.असच वाचता वाचता मग आठवणीतलं काही आठवून काही साठवता आलं... दुःखांना थोडं गोठवता आलं....आणि सल्ला म्हणून मला जरी काय पाठवता आलं तरी अवश्य पाठवा. आठवणींच्या झुल्यावर झुलत सुरू असलेल्या या जीवनप्रवासात भेटू असेच पुन्हा केव्हातरी अशाच एखाद्या मनाला स्पर्श करून जाणाऱ्या विषयाला घेवून. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*
चांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ परी ऐसे जगणे करी जीवन सुफळ
*चांगुलपण दुर्लभ,दुर्मिळ पण*
*तैसे जगणे करी जीवन सुफळ*
चांगलेपणाने जगणे असो, वागणे असो वा चांगले दिसणे असो या सगळ्याचा मोह आजवर कोणाला आवरला आहे.... ? *कस्तुरीचा सुगंध....जो वेड लावे सर्वांना....अवघड होते जीवन जगणे तेच जपणाऱ्या हरणांना.*
खर तर चांगलं राहणं,चांगल्या गोष्टी सोबत राहणं.... हे एक सुंदर स्वप्न असलं तरी हे सारं सत्यात उतरवताना होणारी जीवाची घालमेल... ही म्हणावी तेवढी सोपी नसते. चांगुलपणाची एक वाईट गोष्ट काय असेल माहीत आहे....? तर ती म्हणजे त्या व्यक्तीच्या अस्तित्वात असताना... त्या व्यक्तीचा कधीच स्वीकार होत नाही..... उभ्या आयुष्यात कायम उपेक्षित राहिलेले संत असोत वा थोर रणवीर, योध्ये, महापुरुष असोत.....यांना कायम विरोधालाच सामोरं जावं लागलं.पण पचायला, रूचायला अवघड असणारी त्यांची वाणी असो वा त्यांची करणी... याचा जगजाहीर झालेला स्वीकार त्यांच्या पश्चात दिसून येतो आणि हे सत्य कोणी नाकारू शकत नाही अस मला तर वाटतं.
खरच अशा विचार करणाऱ्या व्यक्ती फारच कमी....म्हणूनच तर म्हणालो की चांगलेपणा हा फार दुर्लभ आहे.ज्ञानेश्वरांची अमृतवाणी जिवंतपणी ना जाणली कुणी,पण अल्पवयात त्यांनी निर्मिलेली ज्ञानेश्वरी आजही पुजली जाते मनोमनी.यावरून एक गोष्ट मात्र चांगली लक्षात येते की व्यक्तीचं शारीरिक आयुष्य किती मोठं आहे यापेक्षा त्याला लाभलेलं विचारांचं वेगळेपण किती भक्कम आहे यावर त्याच खर आयुष्य ठरतं.
तुम्हा आम्हासारख्यांच नक्की अस्तित्व तरी काय....? अजून दोन पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील.... कारण वडिलांचे पूर्ण नाव लिहिताना आजोबाच नाव लिहावं लागत....यापलीकडे आपले आयुष्य काय....? मी असा विचार करणं किंवा यावर मत मांडणं कितपत योग्य आहे नाही माहीत.पण ४ दिवसापूर्वी एक प्रसंग डोळ्यासमोर घडला आणि मग मनात विचारांचं सत्र सुरू झालं.
रोज सकाळी मित्रांसोबत डोंगरावर चालायला जाणे हा तसा हल्ली नित्याचा क्रम बनला आहे.मग कधी मोर,लांडोर,कधी ससे तर चुकून कधीतरी उदमांजराचे (रानमांजर)दर्शन हे आता जगण्याचा एक भाग झाले आहेत.२६ मेला रात्री घरी येताना रस्त्याच्या बाजूला एक प्राणी मरून पडला आहे हे दिसले होते.ते मांजर असावे हे समजले होते पण रात्र असल्याने गाडी काही थांबवली नाही.पण दुसऱ्या दिवशी मित्रांसोबत डोंगरात न जाता बायको सोबत रस्त्याने चालत त्या ठिकाणी आलो आणि त्या मेलेल्या प्राण्याच्या जवळ गेलो.तेव्हा समजले की हे एक उदमांजर आहे.दुर्मिळ असणारा हा प्राणी राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या सर्व्हिस रोडच्या बाजूला असे मरून पडलेला पाहणे हे थोडे धक्कादायक वाटले.म्हणून ठरवले की याचे फोटो घेवून वनविभागाला माहिती द्यावी.पण योगायोगच म्हणावा की काय श्री नितीन तुपे साहेब की जे त्या क्षणापर्यंत माझ्या काहीही परिचयाचे न्हवते.ते देखील चालायला सर्व्हिस रोडवर आले होते.त्यांनी आवाज दिला..."माझा नंबर घ्या आणि व्हॉट्सॲप वर मला फोटो पाठवा."
मी क्षणभर विचार केला.. काय लोक आहेत असे फोटो घेवून काय करणार आहेत....मी मनात आलेला प्रश्न त्यांना बोलून दाखवला....काय करणार आहे या फोटोंचे....?त्यांनी लगेच सांगितले....माझे काही मित्र आहेत वनविभागात त्यांना पाठवतो हे फोटो......मग मी त्यांना त्यांचे नाव विचारून त्यांचा नंबर घेतला आणि त्यावर हे फोटो पाठवून दिले.
तिथून पुन्हा बायकोला घरी सोडून मित्रांसोबत डोंगरात फिरायला गेलो तिथेही आमची हीच चर्चा सुरू होती.जेव्हा घरी आलो आणि आवरून कामाला निघालो तेव्हा त्या ठिकाणी गेलो तर त्या मांजराचा काहीच पत्ता न्हवता.....मनात अनेक प्रश्न निर्माण झाले....मग लगेच तुपे साहेबांना मेसेज करून विचारले "अहो तिथे ते मांजर दिसत नाही.वनविभागवाले घेवून गेले की काय....?" त्यांचा क्षणात मेसेज आला की "होय ते उदमांजरच आहे...अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत ते मेले आहे...."
वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे तत्पर भेट देवून त्याची दखल घेतली त्याबद्दल त्यांचे आणि त्याच तत्परतेने ही माहिती वनविभागापर्यंत पोहोचवली त्या श्री नितीन तुपे साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो.
घडलेली घटना....त्यात मृत पावलेले मांजर आणि त्याची योग्य दखल घेत वनविभागाने घेतलेला निर्णय यातून बरच काही शिकण्यासारखं आहे.स्वतःचा अधिवास विसरून मानवी वस्ती आणि वावर असणाऱ्या भागात स्वतःचा जीव गमावणारे हे एकमेव मांजर नसून काही वर्षांपूर्वी बिभट्या ,काळा बिभट्या हे देखील मेलेले मी जवळून पाहिले आहेत.शिकारीच्या शोधात डोंगर सोडून रस्त्यावर उतरणारे हे प्राणी अचानक येणाऱ्या वाहनाच्या उजेडात गोंधळून जावून हकनाक मृत्यूच्या खाईत जातात.आता यावर माणसाने त्यांच्या अधिवास क्षेत्रात केलेलं अतिक्रमण यावर मला आज काही बोलायचं नाही.
यातून मी ज्या विषयाकडे वळणार आहे तो वेगळाच आहे.बघा ना रस्त्यावर होणारे अपघात... त्यात कुत्री,मांजरं,कोंबड्या या देखील जीव गमावतात.पण दुर्मिळ अस्तित्व असलेले हे उदमांजर किती लक्षवेधक ठरले.जीव तर जीव असतो ना मग तो कुत्र्याचा असो वा या उदमांजराचा.....पण त्याचं मूल्य ठरते हे त्याच्या दुर्मिळ असणाऱ्या अस्तित्वावर.
अनेक वन्यजीव जपले जावेत,जगले जावेत यासाठी अतोनात मेहनत घेताना शासन दिसते.प्रत्येक जीवाला जगण्याचा,नवा जीव जन्माला घालून जतन करण्याचा अधिकार आहेच.पण त्यात काही क्रूर विचार असणाऱ्या व्यक्तींपासून बचावासाठी शासनाला बरेच कडक कायदे करावे लागले आणि ते योग्यच आहे.
मग ही दुर्मिळता जतन करण्यासाठी शासनाची होणारी ही धडपड आपल्याला नक्की काय शिकवून जाते.....? तर याच उत्तर एकच......" जतन केले तरच जगणार आहे.....जगले तरच टिकणार आहे.... टिकले तरच वाढणार आहे.....वाढले तरच फुलणार आहे..आणि हे जीव असेच फुलत राहिले तरच निसर्गचक्र सुरक्षित राहणार आहे"
मग सहज मनात विचार आला....मानवाच्या बाबतीत ही असेच आहे ना.....चांगले लोक,चांगले विचार दाबले जावेत म्हणून असेच असंख्य प्रयत्न सुरू असतात.त्या व्यक्तींना दाबण्यात, संपवण्यात यश जरी आले तरी ते विचार कधीच संपत नाहीत.छत्रपती संभाजी महाराजांना अगदी हालहाल करून मारण्यात औरंगजेबाला यश आले पण त्या तळपत्या सूर्याचे विचार आणि कार्य आजही जिवंत आहे आणि यापुढेही असेच राहणार,तुकारामांच्या गाथा नदीत बुडवण्यात यश मिळवणाऱ्यांना त्यांचे विचार संपवण्यात यश आले का...? स्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यावर शेण,चिखल फेकणाऱ्यांना स्त्रीला यशाची शिखरे गाठण्यापासून कोण रोखू शकले का....?अगदी गरिबीतून उठून देश न्हवे तर जगाच्या पाठीवर नाव कोरलेले कित्येक खेळाडू,वैज्ञानिक,कलाकार यांचं अस्तित्व,त्यांचं कार्य हे कोण मिटवू शकले का.....? तुम्ही कुठून आलात....? तुमच्या जवळ कोणा मोठ्या अधिकाऱ्याची ओळख आहे....? यापेक्षा तुमच्याकडे जगाला देण्यासाठी काय आहे....? स्वतःला इतरांच्या पेक्षा वेगळे सिध्द करून दाखवण्यासाठी काय कला आहेत....? कोणत्याही कठीण परिस्थितीत तुम्ही आलेल्या संकटांचा सामना करून त्यावर कशी मात करता....?म्हणजेच काय तर तुम्ही तुमचं दुर्मिळ असणारं अस्तित्व कसं सिध्द करता यावरच तुमची या जगात किंमत राहते.....मग ती तुमच्या जिवंतपणी आणि तुमच्या पश्चातही......
सोपं नसतं ना सगळ्या बिकट परित्स्थितीचा सामना करून स्वतःला सिध्द करणं.....म्हणून तर प्रवाहाविरुद्ध जाण्याऐवजी प्रवाहासोबत वाहणारे भरपूर असतात.....मग त्या प्रवाहात असणाऱ्या गर्दीत बुडालो तरी कोण असते विचारणारे....?मग स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठी इतरांच्या अस्तित्वाला धोका पोहोचवून स्वतःला सिध्द करणारे ही काही कमी नाहीत.पण *चांगुलपणानं निर्माण केलेलं तेज हे इतकं लख्ख असतं की वाईटाचं गर्द धुकं त्याला झाकाळू शकत नाही.म्हणून तर एका वतनदाराच्या पोरानं....... छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य, त्यांची ओळख,त्यांचे विचार आजही जिवंत आहेत.....मनामनावर राज्य करणारे छत्रपती शिवाजीराजे आजही प्रत्येक मनात जिवंत आहेत..... तेच देशभर क्रूरता आणि कपट यांचा वापर करून सत्ता मिळवणारा औरंगजेब किती जणांच्या मनात आहे.....?*
म्हणून शेवटी एकच सांगेन चांगुलपणाची असणारी दुर्मिळता भले तुम्हाला प्रसिध्दी कमी देईल,भोवती असणाऱ्या स्तुतीपाठकांची संख्या कमी असेल....पण आपल्या पश्चात आपले नाव निघताना तोंडात चार शिव्या न येता दोन गोड शब्द आले तरच तुमचे जीवन सुफळ ठरले असे मी म्हणेन.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*
पर्यायी मार्गात कधीच नसते समाधानाची खात्री
*पर्यायी मार्गांत असतील सुखाच्या सुंदर युक्ती*
*तरी त्यामध्ये कधी नसेल समाधानाची शक्ती*
*कितीही ठरवल मनानं की साधं सरळ राहू,*
*आहे त्या गोष्टींमध्ये सारं सुख पाहू.*
*इथे शोधत आहे प्रत्येकजण कसा लावता येईल यावर लगाम*
*पण मिळणाऱ्या सुख सोयींचे खरच होत आहोत आपण सारे गुलाम*
मित्रांसोबत सहज बर्फाचा गोळा खायला परवा गेलो.मला दहीखीस हवा असं सांगून आरामात मग आमचं गप्पांचं सत्र सुरू झालं.तिथे घोंगावणाऱ्या मधमाशांकडे पाहताना सहज मनात एक विचार आला.जीवनाचा आनंद घ्यायला आता कित्येक गोष्टी सहज बाजारात मिळत आहेत.त्यांचा मनसोक्त आनंद आपण घेतोही आणि उगाच पुन्हा मागे म्हणत राहतो की आधीचे जीवन मस्त होते.आता सगळे बदलले.मीही त्यापैकी एक बर का.
पण मिळणाऱ्या सोयींचा मिळेल तेवढा आनंद घेत असताना,काही गोष्टी मिळवण्यासाठी लहानपणी जी कसरत असायची ती आठवली की चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद उमटत असतो.
मग ते आठ आण्याचे (५०पैशाला आम्ही तर हेच म्हणायचो) गारीगार घ्यायला कुठे तरी देशी दारूची बाटली शोधून त्यावर फुकट ते गारीगार खाण्यात जो आनंद होता तो आता ३० रुपये देवून कॉरनॅटो खाताना मिळत नाही.
पण अशीच वर्ष निघून गेली आणि बऱ्याच गोष्टीही बदलून गेल्या.मग हा बदल फक्त माझ्यात झाला....?,दुसऱ्या कोणा एकात झाला.....? या बदलाचे शिकार आपण सगळे झालो.....? की निसर्ग ही आता बदलत चालला आहे....?
याच सहज सरळ एकच उत्तर आहे.....ते म्हणजे सारचं बदलत चाललं आहे.मला बाकी बदलत्या घटकांवर आज काही बोलायचं नाही.पण या मधमाशांना बर्फाच्या गोळ्यासाठी वापरत असलेल्या रंगातून रस शोषताना फार निरखून पाहिलं.निसर्गाने यांना नक्की कोणती शक्ती दिली होती.....?सभोवती असणाऱ्या सगळ्या प्रकारच्या फुलांमधून तो रस टिपणे हीच ना......?मग यातून जो तयार होतो तो खरा मध ना.....? पण यांचं असं बदलत वागणं पाहून मनात विचार आला की मग या माशा कुठेतरी एक पोळं बनवत असतील.त्या बनणाऱ्या मधाच्या पोळ्यातून तरी कसला मध तयार होणार......?मग याला जबाबदार तरी म्हणांव कोणाला.....?माणसाने खायचे रंग बनवले ते स्वतःच्या कलेने ,स्वतःच्या सोयीने,स्वतःच्या आवडीने......मग याच चवीची भुरळ या मधमाश्यांना का पडावी.....? सोयीचं आणि सहज मिळणार हे शस्त्र या माशांनी का वापरावं....? कोणी म्हणेल पाणी पिण्याच्या हेतूने त्या तिथे आल्या असाव्या.....पण मी स्वतः हे पाहत होतो.... तेव्हा मला स्पष्ट दिसून आलं बर्फाचे पाणी बनून त्या गाड्यावर सांडत होते तिथं एकही मधमाशी न्हवती.पण खायच्या रंगांच्या बाटलीवर.....फेकून दिलेल्या ग्लासवर मात्र त्या घोंगावत होत्या.
याची उत्तम माहिती असणाऱ्या जाणकार व्यक्तीने या बदलाची माहिती मला दिली तर छानच.पण या गोष्टीचा संदर्भ मी आज जोडणार आहे तो मानवी जीवनाशी.
सहज आणि सोप्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करण्यात आपण आपली खरी शक्ती... खरी ओळख नक्की हरवत चाललो आहोत का.....?साधारण कोणताही व्यक्ती आरामात कमीतकमी १५ ते २० किलो वजन घेवून अर्धा तास तरी चालत प्रवास करू शकतो.....पण सुविधांच्या मागे धावताना याचा एवढा विसर पडतो की मग मॉल मध्ये पावशेर चहापत्ती घेवून चाक असणाऱ्या बादलीत घेवून ती अर्धा तास सगळीकडे फिरवतो.
पाय खूप दुखतात म्हणून पायऱ्या नको तर लिफ्टने मजले आपण पार करतो.....पण त्या लिफ्ट मधून खाली येवून रोड वर सकाळ संध्याकाळ चालायला जातो....कारण तब्येत चांगली रहावी....दुचाकी गाडीवरून सुसाट वेगाने विना हेल्मेट दिवसा प्रवास करतो आणि शरीराची काळजी म्हणून पहाटे सायकल वर हेल्मेट घालून फिरतो....गाडीपेक्षा जास्त गती यांच्या सायकलला आहे की गाडीपेक्षा जास्त धोके सायकल वर आहेत काय माहित....? हेल्मेट घालने उत्तमच....पण त्याच्या वापराची ही बदलती समीकरणं प्रश्न उभा करतात की दिखाव्याच्या मागे आपण किती धावत आहोत.....
मी काय करतो.....?मला काय करायचं आहे....?मला कशात आनंद मिळतो....?यापेक्षा मी असं वागलो...मी असं केलं तरच मी आनंदी राहीन.....या दुसऱ्यांनी बनवलेल्या आखाड्यात प्रवेश करून त्या आखाड्याच्या मास्तरने बनवलेल्या नियमांत नाचून सुख शोधायचं...... की मग स्वतःच्या मनाभोवती फिरणाऱ्या रींगणाला आपल्या आनंदाचं मैदान बनवायचं.....हा ज्याचा त्याचा विचार.....
शेवटी यातून सांगण्याचा एकच भाग की आपल्यात असणारी ऊर्जा,विचार करण्याची शक्ती,काहीतरी नवीन निर्माण करण्याची ताकत हे सारं..... सभोवती असणाऱ्या अडचणीमुळे नाही संपून जात...... तर जेव्हा आपण आपली कुवत न ओळखुन आरामाच्या गोष्टींचा विचार करू तेव्हा खर आपल्या ऱ्हासाला सुरुवात होते.....मधुमक्षिका हे एक नाममात्र उदाहरण.....उदासीन,अस्वस्थ जगण्याला आहे अधीरता हेच कारण.....सुखाची वाटणारी अधीरताच मग पर्यायी मार्ग पाहते.....पण एक गोष्ट कायम लक्षात असावी......जी आपण अगदी शाळेपासून शिकत आलोय....ती म्हणजे आपल्या डोक्याला सर्वात जास्त त्रास देणारा प्रश्न तोच असतो ज्यात उत्तराला पर्याय असतात......मग जिथे प्रश्नाला उत्तराचे अनेक पर्याय निर्माण होतात......हेच पर्याय मग मनात अनेक प्रश्न निर्माण करतात.
आयुष्याच्या रिकाम्या जागा भरायला कोणत्या पर्यायाची गरज नसतेच मुळी.त्या भरल्या जातात आपोआप जर विचार करणाऱ्या मनात नसेल कोणती पोकळी.
*शब्दसारथी*
*निलेश बाबर*
*९२७१००८८९३*
बदलती शिक्षण पद्धती आणि शिक्षणाचे होत असलेले बाजारीकरण
*गावात भरणारी यात्रा मनातही एक वेगळीच गर्दी निर्माण करते*
*ज्ञानसागरात पोहताना कशाला हवी भाषेची सक्ती*
*वेचता यावे इच्छित सारे हीच रुजवावी मनात युक्ती*
*इवल्याश्या त्या जीवांच्या बाह्यरुपाला देवून किंमत*
*बिघडणाऱ्या त्यांच्या आंतर्मनाची का पहावी खुशाल गंमत*
*स्पर्धेच्या या युगात पाहता स्पर्धा असावी कोणाची कोणाशी...?*
*पालकांच्या अफाट अपेक्षा पण चिमुकल्यांची नाळ तुटते मातीशी*
*काय आवडते यापेक्षा हेच आवडावे असे बाळकडू मग पाजले जाते*
*कित्येक चिमुकल्यांचे मग जीवन... मात्र वाया जाते*
*सरकारी नोकरी म्हणजे आयुष्याची भाकरी ही म्हण पार रुजलेली*
*पण सरकारी शाळांत मुलांचे भविष्य घडेल ही वाट मात्र मुजलेली*
*सुविधा साऱ्या मिळाव्या सरकारी*
*पण शिक्षणासाठी खाजगी शाळाच बरी*
*बदलणाऱ्या विचारांच्या या पालकांस म्हणावे सुज्ञ*
*की असावेत हे सारे सत्यापासून अनभिज्ञ.....?*
खर तर आता सगळ्या गावांच्या यात्रा जवळपास संपल्या....सरतेशेवटी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भरते ती माझ्या गावची.....खिंडवाडीची यात्रा.साताऱ्याच्या बाहेर या यात्रांचं स्वरूप कसं असतं हे एवढं ठावूक नसले तरी साताऱ्याच्या पंचक्रोशीत असणारी ही यात्रेची धमाल फार जवळून पाहत आलोय.बैलगाडा शर्यती आता पुन्हा नव्याने सुरू झाल्याने जवळपास सगळीकडे एक वेगळंच आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं दिसत आहे.
कोरोनामुळे गेल्या २ वर्षात जी आपल्याच घरच्या लोकांसमोर जायची भीती निर्माण होईल असं वातावरण निर्माण झालं होत ते पूर्णपणे ओसरलेलं यंदा दिसलं.मग बावधनचे प्रसिद्ध बगाड असलेली यात्रा असो, पुसेगावची रथ यात्रा असो नाहीतर कित्येक गावांच्या गाव देवतेवरून भरणारी यात्रा... त्यातील छबिना, सासणकाठ्या,पालखी सोहळा,गुलाल, भंडाऱ्याची मुक्त उधळण असो वा लोटांगण,दंडस्थान असो.... सगळ्याच गोष्टी कशा यंदा आनंदात पार पडताना दिसल्या.
असच खेळीमेळीचे वातावरण... मित्र परिवार आणि पाहुण्यांच्या गाठीभेटी यातून वाढणारा नात्यांतील गोडवा हे सारे विलक्षणच.या साऱ्यात अजून एक भर पडते ती म्हणजे गावच्याच मंडळांनी समाजात काहीतरी संदेश जावा यासाठी सादर केलेलं काही देखावे( सोंगे).....सातारच्या पंचक्रोशीत बरीच गावे अशी आहेत की जे असे नवनवीन प्रयोग सादर करून यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न करत असतात.मग त्यासाठी लागणारा खर्च,वेळ हे सार काही स्वतः सांभाळून हे सारं दिव्य केलं जातं....त्याला कारण एकच ते म्हणजे गावच्या यात्रेला शोभा यावी.
या साऱ्यात मला आज सांगायचं आहे ते माझ्या गावाबद्दल.....सातारा शहरातून फक्त ४ किमी अंतरावर असणार माझं गाव.....खिंडवाडी....गाव तसं छोटसं पण सैन्यदलात सेवा बजावणाऱ्या जवांनाची संख्या फार. रिटायरमेंट नंतरचे आनंदी जीवन जगणारे... मग गावच्या विकासकामात ही हातभार लावत असतातच.
बऱ्याच गावांना यात्रेत ज्या काही जुन्या परंपरा,रीतिरिवाज आहेत त्यानुसार सगळा सोहळा पार पडताना आपण पाहतो.अशीच एक पद्धत मी साधारण १० वर्षाचा असेन तेव्हापासून माझ्याही गावात यात्रेत मी पहात आलोय ती म्हणजे पालखी समोर निघणारी सोंगे(देखावे).
मी जसे ऐकले तसे गावात ही परंपरा फार आधीपासून आहे.पूर्वी अगदी बैलगाडीतून निघणारी ही सोंगे पहायला गावात फार गर्दी जमायची. काळ बदलत गेला तसे या प्रथेत ही बरेच बदल होत गेले.गावात असणारी पाचही मंडळे मग दरवर्षी काही ना काही नवीन दाखवण्याचा प्रयत्न करू लागली आणि मग सुरू झाले ते हलते जिवंत देखावे दाखवण्याचे पर्व.
शिवकाळातील काही प्रसंग असो..... रामायण,महाभारतातील काही घटना असो.....हे करत करत हल्ली समाजात घडणाऱ्या काही हृदयस्पर्शी घटना असोत या दाखवण्याचा प्रयत्न गावातील सगळी मंडळे करत असतात.
मी श्री बाल गणेशोत्सव मंडळाचा सदस्य.....आमच्या मंडळाने आजवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील काही प्रसंगावर देखावे सादर केले आहेतच.....त्यासोबत भारतीय सैन्य दलावर आधारित प्रसंग...शेतकरी आत्महत्या,हुंडाबळी,महाराष्ट्राची लोकधारा,असे कित्येक विषय घेवून आजवर हे जिवंत देखावे दाखवले.या सोंगात त्या कथेचा....विषयाचा भाग म्हणून मलाही आजवर कलाकार म्हणून काम करता आले ही गोष्ट माझ्या मनाला खूप आनंद देवून जाते.
अगदी ट्रॉली ठरवण्यापासून ते लाकडे, फळ्या, लाइट्स,डॉल्बी ठरवणे असो वा कोणत्या विषयावर सोंग करायचे यावर चर्चा असो.....यात्रेच्या एक महिना आधीपासून मंडळाच्या सदस्यांमध्ये होणारी ही चर्चा.....मत मतांतरे....पुढे जावून मग एक विचाराने सगळे ठरवणे.....कोणी कोणती कामे करायची याचा बनवलेला आराखडा....मग जे काम असेल ते वेळेत पार पाडण्यासाठी सर्वांची होणारी धडपड.....हे सारे काही.....जरी यात्रेच्या एक रात्रीपुरते असले तरी त्यामागे मंडळांनी घेतलेली मेहनत ही कित्येक दिवसापासूनची असते.
त्यात गेली दोन वर्ष कोरोनामुळे पडलेला खंड....मग या प्रदीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर गावातील पाचही मंडळे अगदी जोमाने उभी राहिली होती.कारण फक्त एकच....यात्रेत असे ज्वलंत,जिवंत देखावे दाखवण्याची खंडित परंपरा पुन्हा नव्याने सुरू करायची होती.
रावणाचे गर्वहरण,स्त्री भ्रूण हत्या,शाहिस्तेखानाची बोटे छाटण्याचा प्रसंग,मुलींची छेडछाड करणारी मुले आणि त्यातून घडणाऱ्या वाईट घटना असे देखावे घेवून यावर्षी सगळी मंडळे यंदा उभी राहिली.
अगदी सुरेख डेकोरेशन,पात्रांना योग्य तो मेकअप आणि कपडे,चांगल्या आवाजात कथानकाचे रेकॉर्डिंग,आवाजाची मर्यादा सांभाळून आपल्या देखाव्याला योग्य तेवढा आवाज असावा याची काळजी घेत असणाऱ्या डॉल्बी अशा सगळ्या लवाजमासोबत दरवर्षी जशी यात्रा भरते तसेच यंदाही झाले.
आवडणारी सर्वात उत्तम गोष्ट हीच असते की यात्रेसाठी फक्त नातेवाईक ,मित्रपरिवार न्हवे तर ज्यांना असे देखावे पहायला आवडते अशी असंख्य मंडळी गोळा होत असतात.
शासनाचे नियम,वेळेची मर्यादा या गोष्टी जरी महत्वाच्या असल्या वर्षातून एकदा येणारा हा दिवस सर्वांसाठी वेगळाच असतो.मग सगळ्याच गोष्टी मोजून मापून आणि कायद्याच्या चौकटीत बसवून करण्याचा प्रयत्न करत राहिलात तर मग जगणं नक्कीच अवघड होईल. हे देखील सर्वांनी मान्य करायला हवं.कुठेतरी थोडा छेद देवून मर्यादा सांभाळत तुम्ही तुमची सुरू असलेली परंपरा जपण्याचा प्रयत्न करत राहिला तर नक्कीच मग प्रशासन देखील तुमची साथ देते.
यावर्षी देखील बराच वेळ चाललेल्या या सोंगांच्या गाड्यांना पोलीस प्रशासनाने केलेल्या मदतीबद्दल,सहकार्याबद्दल यात्रा कमिटी,संपूर्ण खिंडवाडी ग्रामस्थ आणि मंडळांचे कार्यकर्ते... आम्ही सारे आपले मनापासून आभार मानतो.
यावर्षी आमच्या *श्री बाल गणेशोत्सव मंडळाने* सादर केलेला जिवंत देखावा म्हणजे *सध्या बदलत चाललेली शिक्षण पद्धती....शिक्षणाचे बाजारीकरण आणि शासकीय मराठी शाळांची होत असलेली दयनीय अवस्था...यासाठी जबाबदार घटक आणि बदलत चाललेली माणसांची मानसिकता* हा विषय घेवून आम्ही यावर्षी सोंग काढले.अपेक्षेपेक्षाही जास्त चांगला प्रतिसाद मिळाला यामुळे जे समाधान सर्वांना मिळाले ते अवर्णनीयच.आम्ही मांडलेला विषय कसा होता हे व्हिडिओ मधून तुम्हाला पहायला मिळेलच आणि लेख वाचणाऱ्या प्रत्येकाला माझी विनंती राहीलच की २४ मिनिटांची ही आम्ही सादर केलेली कला तुम्ही नक्की पहावी.
ज्या गोष्टी यात दाखवल्या त्या इथे लिहीत नाही.पण या संदर्भात जे काही माझी मते आहेत ती मी इथे मांडत आहे.कदाचित ही माझी मते चुकीचीही असू शकतील.पण चर्चेत हा विषय येणं गरजेचं वाटतं.....म्हणून हे सारं मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे.
इंग्लिश स्कूल......इंग्रजी शाळा....याला विरोध असावा अस माझं मत नाहीच.त्यामुळे चुकून जरी कोणते चुकीचे शब्द माझ्या लिखाणातून आले असतील तर त्यात कोणाच्या भावना दुखावण्याचा माझा हेतू नाही हे कृपया जाणून घ्यावं.
शिक्षणाला सुरुवात झाली...
पुढे जावून स्त्री शिक्षणाला सुरुवात झाली......असुविधा आणि कमी वयात आलेल्या जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली दबलेल्यांसाठी गाव पातळीवर रात्र शिक्षणाचे वर्ग भरवले गेले.....हळूहळू शिक्षण ही पण एक जीवनावश्यक गोष्ट आहे हे प्रत्येकाच्या मनात रुजले आणि रुजवले गेले......या सगळ्या प्रवासात अनेक गोष्टींमध्ये सुधारणा होत गेल्या....शाळांची....शिक्षण संस्थांची उभारणी झाली.....तो काळ असा होता जिथे जमिनी असो वा पैसा सहज दान केले जात होते.....त्यातून शिक्षणाचा प्रसार अगदी भराट्याने वाढला....आणि हे योग्यही होतं.... कारण जोपर्यंत वंचित गावे, वाड्या,वस्त्यांपर्यंत शिक्षणाची सुविधा पोहोचत नाही तोपर्यंत शिक्षणाचा प्रसार होणं शक्य ही न्हवते.....या कठीण काळात अहोरात्र मेहनत घेवून शिक्षणप्रसार करणाऱ्या सर्व ज्ञानऋषींचे मनापासून आभार.
मंदिरात.....पारावर.....एखाद्याच्या घरात भरणाऱ्या शाळांना पुढे जावून एक स्वतंत्र रूप मिळालं.....मोठमोठी विद्यापीठे स्थापन झाली.....सोयी सुविधांची वाटणारी चणचण हळूहळू कमी होत गेली.....उच्चशिक्षित ज्ञानऋषी....आणि शासनाने एकत्रित मेहनत घेवुन गावोगावी....खेडोपाडी शाळा उभ्या केल्या......आणि मग ज्ञानाचा महासागर सर्वांसाठी खुला झाला.
मग एवढं सगळ सुरू असताना कित्येक अधिकारी,खेळाडू,नोकरदार घडत होते......मग यानंतरच्या काळात सुरुवात झाली ती शिक्षणात असणाऱ्या त्रुटी दाखवत..... खाजगी शाळांची निर्मिती....."मुलांना इंग्लिश यायला हवं.....त्याने वागावं ,बोलावं कसं याकडे आम्ही लक्ष देवू आणि तुमच्या मुलाचा सर्वांगीण विकास करू....अशी एक वेगळीच चळवळ सुरू झाली.....मग ही स्पर्धा फक्त विद्यार्थांच्या पुरती मर्यादित असती तर एकवेळ समजू शकलो असतो.....पण ही स्पर्धा सुरू झाली ती अशा खाजगी संस्था.....शाळा....उभं करण्याची..... आणि ती उभं करणाऱ्या धन दांडग्यांची....यात कोणाचा वाईट हेतू आहे असं मला म्हणायचं नाहीच.मुलांना काहीतरी चांगले देण्याच्या हेतूने ही स्पर्धा सुरू झाली हेही मी मान्य करतो....त्यातून असंख्य विद्यार्थी घडले....आणि यशाची उत्तम शिखरे गाठली हे मी मान्य करतो....अशा मेहनतीने उभ्या केलेल्या या शाळांनी चांगले शिक्षक निवडले......शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडवले....विद्यार्थ्यांनी चांगला देश घडवला....घडवत आहेत...यात काहीच शंका नाही.मग एवढं सगळ योग्य असताना माझा या खाजगी शाळांना विरोध का असावा.....? सर्वच पातळीवर स्वतःचा वेळ,पैसा,आयुष्य खर्च करून उभ्या केलेल्या या शाळांना मी विरोध का करावा....? शासनाच्या कोणत्याही मदतीशिवाय....स्वतःच्या विचारांनी....स्वतः पुढाकार घेवून....समोर असणाऱ्या अनेक धोक्याचा विचार करून त्यावर मार्ग काढत नवीन विश्व निर्माण करणाऱ्या या सत्कर्मी व्यक्तींचा मी विरोध का करावा....?
तर मी म्हणेन नक्कीच नाही..... यात मला काही गैर वाटावं आणि मी त्यात विरोध करावा असं अजिबात नाही....कदाचित मी विचार मांडताना चुकत असेन..पण तुम्ही समजून घ्याल आणि माझे चुकत असेल तिथे सांगाल हीच अपेक्षा ठेवून मी माझे मत मांडत आहे.
मला प्रश्न हा पडतो की......शासनाने शाळा सुरू केल्या.....शिक्षक भरती केले...कामाचा योग्य तो मोबदला म्हणून शिक्षकांना चांगले पगार दिले......दुर्गम भागात सेवेस पाठवून त्या शिक्षकांना लोकांस शिक्षणाचे महत्त्व पटावे यासाठी मेहनत घ्यायला लावली....आणि ती या शिक्षकांनी पार पाडली.....शेवटी व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.....काही शिक्षक योग्य न्हवते....हे त्या त्या काळात वेगवेगळ्या प्रकारे समोर आलेच.....पण त्या मानाने तुलना केली तर नवी पिढी उत्तम घडवणाऱ्यांचे प्रमाण नक्कीच वाईट प्रवृत्तींपेक्षा जास्तीचे आहे हे मान्यच करावे लागेल.
मग एवढे सगळे उत्तम सुरू असताना गरज पडली ती इंग्लिश भाषा ज्ञानाची......हे शिक्षण ५वी पासून मिळत होते.....म्हणून पाया कच्चा राहीला आता मुलांचे भविष्य काय घडणार....यापेक्षा सुरुवातीपासून इंग्लिश मध्ये शिकवले तर ते उत्तम घडतील असा समज रुजू झाला.....त्यात काही गैर आहे असेही मी म्हणत नाही.....शेवटी काळानुसार बदल हा गरजेचा आहेच.
मग आता सुरू होतो प्रवास तो काहीतरी वेगळी भावना मनात ठेवून सुरू केलेल्या शिक्षणाच्या बाजारीकरणाला....हो बाजारीकरणच....कोणी केले का केले हा इथे मुद्दा नाहीच....मुद्दा आहे तो म्हणजे.....कोणतीही शाळा उभी करायची असेल तर शासनाची परवानगी असावी लागते....अशी रीतसर परवानगी घेवून असंख्य खाजगी शाळा उभ्या होत गेल्या....मग जर इंग्लिश ही काळाची गरज होती म्हणून तुम्ही या शाळांना परवानगी देण्याऐवजी......स्वतः शासनाच्या शाळेत हे प्रयोग का नाहीत सुरू केले.....? जेव्हा शाळा न्हवत्या तेव्हा अगदी मंदिरात शाळा भरवल्या गेल्या मग.....शाळांना स्वतःचं असं वेगळं स्वरूप आल्यावर याच शाळांत का नाही शैक्षणिक बदल केले......? जर मुलांना चांगले शिक्षण मिळावे हाच हेतू होता....असेच प्रोजेक्ट्स वाचून धडाधड खाजगी शाळांना परवानगी देत गेला.....मग हाच प्रस्ताव शिक्षण मंडळात मांडून का नाही शासकीय शाळांत बदल केले गेले.....?शासनाकडे भरपूर पैसा होता.... आणि तो नक्कीच आजही भरपूर प्रमाणात खर्च केला जातो यात काही शंका नाहीच... घरात तांदूळ आहे म्हणून नुसता भातच खाऊ एवढी अक्कल शून्य माणसं समाजात नसून त्यापासून इडली,डोसे बनवून ही खाऊ शकतो ही अक्कल अगदी अडाणी माणसात देखील असताना.....शिकलेल्या आणि शिकून शिक्षणाच्या उच्च पदावर बसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना एवढी अक्कल नसावी का.....? काहीतरी वेगळे निर्माण करणार म्हणून या खाजगी शाळांना परवानगी देत आहोत.....मग आपल्याकडे तर सर्व आहे...सरकारी पैसा आहे....अधिकार आहेत...शिक्षकांची मजबूत फळी आहे.....शाळेच्या इमारती उभ्या आहेत....मग एवढं सगळ तयार असताना....गरज होती ती फक्त मानसिकतेची......का नाहीत मग तेव्हाच बदल करू वाटले या शिक्षण पध्दतीत.....? जर या सरकारी माणसांनाच सरकारी शिक्षण पद्धत चुकीची वाटत होती तर मग का बदल करू वाटले नाहीत.....?आणि मग मनाला कुठेतरी जी गोष्ट टोचत राहते ती हीच....."माझे सर्व चाललय ना ठीक....कामाचा मोबदला वेळेत आणि मुबलक मिळतोय ना....मग मला काय गरज पडलीय काय बदल करायची...." हीच संकुचित वृत्ती कारणीभूत आहे या शिक्षणाच्या बाजारीकरणाला......
मला कोणाला दोष द्यायचा नाही....पण मला एक सांगा.... समाजात पैशांनी सधन असणाऱ्या कित्येक व्यक्तीच्या खाजगी शाळा आहेत.....कारण काय तर समाजसेवा.....????? मग कसली समाजसेवा ते ही सांगा...." खाजगी आहे मग आम्हाला शासनाकडून काही मिळत नाही....त्यात शिक्षकांचे पगार...एवढ्या सगळ्या बाकी सुविधा आम्ही देतो म्हणून एवढी फी आम्ही आकारतो......" अस अगदी निरागस चित्र एका बाजूला उभ केलं जातं.....आणि " अगदी बरोबर आहे या सरकारी शाळेत कुठे काय आहे....आता एवढं सगळ जर खाजगी शाळेत मिळतेय मग काय होतेय पैसे ज्यादा गेले तर.....शेवटी कमावतो कुणासाठी....."अस बोलून त्या चित्रात रंग भरणारे पालक....!!!! अशा चित्र रेखाटणाऱ्या श्रीमंत लोकांनी आणि त्यांनी रेखाटलेल्या चित्रात रंग भरणारे पालक यांच्यामुळे समाजाचे चित्रच बदलून गेले आहे.... बदलून जात आहे.... असं वाटतं नाही का....?
मला अजून एक प्रश्न पडतो तो म्हणजे..... जर या लोकांना.....खरच मुलांचे भविष्य घडवायचे होते तर आहे त्याच जवळच्या सरकारी शाळांत पैसा देवून का नाहीत बदल घडवून आणायचा प्रयत्न केला....? या श्रीमंतांच्या प्रयत्नात शासनाने एक पाऊल उचलले असते तर काय गरज पडली असती का खाजगी शाळांची.....? सगळे काही याच खाजगी शाळांत मिळायला काय अडचण आली असती....? हव्या त्या सोयी,हवी तशी शिक्षणपद्धती.....हे सगळे शिक्षण विश्व बनवताना काय अवघड झाले असते का.....? तर नक्कीच नसते झाले.....काहीच अवघड झालं नसतं....सगळ्या मुलांना आपल्याच भागात....गावात....वाडीत.... वस्तीत....हवं तसं शिक्षण घेणं सहज शक्य झालं असतं.....
पण स्वार्थाने भरलेल्या मनाचा गळा जरी सोन्याने भरलेला असला तरी खिशात सुध्दा हिऱ्यांची रास असावी अशी मानसिकता झालेली असते.मग वाढती भूक कोणाचं पोषण नाही तर समाजाचं शोषणच करू शकते.
लिहिण्यासारखं अजून बरच काही आहे पण झटपट बनणाऱ्या मॅगीच्या जमान्यात पुरणपोळीचा स्वाद कुठेतरी हरवत चालला आहे.मग वाढत जाणाऱ्या हनुमानाच्या शेपटीसारखे हा लेख वाढवून बाजारीकरणाची लंका तर मी जाळू शकणार नाही.पण कुठेतरी थोडी ठिणगी टाकण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न.
या सगळ्यांतून मला शेवटी एकच सांगायचं आहे की..... बंद आणि ओसाड पडत चाललेल्या सरकारी शाळांना पुन्हा उभारी देण्यासाठी शिक्षकांनी सुध्दा नव्याने सुरुवात करणे गरजेचं आहे..... तर उमेदीने उभ्या राहिलेल्या या शिक्षकांना साथ द्यायला पालकांनी ही सुरुवात करणे गरजेचं आहे.
अफाट पैसा खर्च करूनच उत्तम शिक्षण मिळतं अस नाही. तर ते मिळत असतं शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संतुलित नात्याने....मग यावर पालकांनी विचार करावा की नक्की पैसा खर्च करून तुम्ही तुमच्या मुलाला उभं करत आहात की श्रीमंताच्या नवीन प्रॉपर्टीला....?
टीप:
१)प्रतिलिपिवर हा लेख वाचणाऱ्या माझ्या मित्रांना इथे व्हिडीओ पाहता येणार नाही तर तो पाहण्यासाठी शब्दसारथी या माझ्या यू ट्यूब चॅनल वर ती पहावी लागेल.
२) यात्रेच्या सोंगात असलेले हे नाटक आवाजाची अस्पष्टता आणि बाजूच्या इतर आवाजामुळे व्हिडिओ मध्ये असणारे संवाद नीट ऐकू येत नसल्याने पुन्हा त्यात फेरबदल करून नंतर त्यात मूळ रेकॉर्ड आवाज समाविष्ट केला आहे.त्यामुळे बऱ्याच ठिकाणी हावभाव आधी आणि संवाद नंतर असे जाणवेल.पण आपण तेवढे समजून घ्याल हीच अपेक्षा ठेवतो.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
विचारांचं वाळवंट भाग १
*विचारांचं वाळवंट*
*भाग १*
कायम विचारांच्या जाळ्यात अडकेलेले आपण सर्वजण....मग त्याला वाळवंट का म्हणावं ना.....? किती इच्छा,कितीतरी स्वप्न,किती भावना...... साऱ्या विचारांचं कसं क्लिष्ट जाळं अगदी सुबकपणे मनात विणलेलं असतं.मग मनाने विणलेलं जाळं की जाळ्यात अडकेलेलं मन..... हा पण अगदी अवघड आणि न समजणारा प्रश्न आहे ना.....?
अशाच जाळ्यात अडकलेल्या आपणा सर्वांपैकी मीही एक.मग जाळ्याची एक एक विण समजून घेत गेलो की लक्षात येत गुरफटणाऱ्या विचारांना समजून घेण्याच्या विचारात....मन एवढं विचार करू लागत की....एक वेळ मनात हा विचार येतो की नक्की विचार कोणता करावा....? का करावा....? करावा की नाही करावा...? नाही करावा तर मग करावं काय...? करावा तर कसा मार्ग शोधावा....? आधीच डोक्यात नको एवढे विचार असताना त्यात अजून मी करावा न करावा,काय करावा असे बोलून अजून जास्त ताण देतोय ना तुम्हाला....? पण त्याबद्दल माफी असावी.
विचारांची सुरुवात इच्छेपासून होते तर इच्छेतूनच स्वप्न पाहिली जातात.स्वप्नांना कसले बंधन नसते पण विचारांना मात्र मर्यादा असतात.ह्या मर्यादा जेव्हा लक्षात येत नाहीत तेव्हा मग सुरू होते एक युद्ध.....! हो युद्धच....! जे स्वतःलाच स्वतः विरूध्द लढवत असतं.मग स्वतः विरूध्द लढायचं म्हणजे सोपी गोष्ट असते का....?तर नक्कीच नसते.त्यात त्याग,समर्पण,अहोरात्र मेहनत आणि एका बहिऱ्यासारखे जगावे लागते.....बहिरा यासाठी म्हणतोय कारण तुम्हाला जोपर्यंत तुमचा आवाज ऐकू येतो तोपर्यंत तुम्ही इच्छित दिशेने जात असता....पण भोवतीच्या जगाने निर्माण केलेल्या नकारात्मक घंटा कानात वाजू लागल्या तर मग सारं ध्येय विसरून आंधळे होवून जगावं लागणाऱ्यांची संख्याही कमी नाही.
विचारांचा संबंध फक्त ध्येयाशी ठेवण्यापेक्षा इतरांच्या अनुभवाशी जोडून स्वतःच्या वाटा शोधण्यात मनाला जास्त गुंतवले तर ते नक्कीच फायद्याचं ठरतं.मग शेवटी विचार हे विचारच असतात.मग ते सकारात्मक असो वा नकारात्मक.
आजवर फक्त हेच ऐकत आलो आहे की कायम सकारात्मक विचार करा.कधी नकारात्मक विचार करू नका.......पण अहो विचार हे शेवटी विचार असतात ना.अगदी पाण्यासारखेच की ते.जसे रंग ओतू तसेच ते रंगणार.आगीत हात घातला तर भाजेल..... हाच नकारात्मक विचार त्यात कोंबडी टाकली तर चांगली तंदूर खायला मिळेल इथपर्यंत जातोच की.
आज या विषयावर थोडं काही लिहिण्याची कारणे ही तशीच आहेत.शेवटी हे माझे विचार आहेत.ते आपल्या विचारांशी मिळतीलच असही नाही.पण मनात आलेले विचार बोलून दाखवले तर त्यावर अजून काही विचार करण्याची ऊर्जा आपोआप मिळते असं मला तर वाटतं.बरेच दिवस मनात घोळणाऱ्या विचारांना आज मी मुक्त करतोय.हे विचार पटो अगर न पटो पण त्याबद्दल आपलेही काय विचार आहेत हे जर सांगता आले तर नक्की सांगा.कारण विचारांची देवाणघेवाणच तर जगाचा कारभार चालवत असते ना....बरोबर ना...?
आजवर मी जे काही ऐकले असेल वाचले असेल त्यावर एक गोष्ट तर मला नक्की समजली की आयुष्याचा शेवट करून घेणे ह्याला नकारात्मक विचार हेच म्हणलं गेलंय.बरोबर ना....?मग ह्या नकारात्मक विचारात मी काही दिवसापूर्वी माझ्या मित्राला गमावून बसलो,काही ओळखीची माणसं ह्यात जग सोडून जाताना पाहिली,बातम्यांमधून समजणाऱ्या गोष्टी तर अगणित,अगदी मोठे सेलिब्रिटी देखील ह्या नकारात्मकतेचे बळी पडलेले आपण पाहिले आहेत.आपण त्यावरच्या चर्चा ऐकल्या आहेत.... कारणे ऐकली आहेत......सगळे घटनाक्रम समजून घेतले आहेत.मग मला सांगा जे ह्या वाईट प्रसंगाचे बळी पडत आले आहेत त्यांनी नसतील का ओ अशा बातम्या कधी वाचल्या,ऐकल्या.सगळ्या घटनांमधून जर सारांश घेतला तर एकच तर निघतो.... की कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे मनावर येणारे दडपण सहन न झाल्याने जीवनाला पूर्णविराम देताना आजवरच्या सगळ्या जबाबदाऱ्या विसरून क्षणात सारं संपवलं जातं.
*भिरभिरणाऱ्या डोळ्यांनी पाहिला होता जगाचा कारभार*
*सावरताना स्वतःला घेतला होता कोणाचा तरी आधार*
*तर आपल्यावर विसावलेल्यांचा बनेलेलो असतो आधार*
*विचारांची ही मनात होती नांदी,इच्छेंचा होता मनात भरेलेला बाजार*
*अपेक्षेंच्या पैलतीरावर मांडला होता सुखाचा संसार*
*कष्टाची ही कसली कमी न्हवती जिद्द ही होती बाणेदार*
*झगडणाऱ्या मनाला मात्र टोचत होती हतबलतेची सुई फार*
*आपला माणूस सोडून गेला की दाटून येतो आप्तेष्टांचा कंठ*
*पण जाणाऱ्याच्या विचारांचे झालेले असते वाळवंट*
होय म्हणूनच आज मला बोलायचं आहे ते.......विचारांच्या वाळवंटाबद्दलच...... खचलेलं मन जेव्हा हतबलतेचं शेवटचं पाऊल उचलत.... ते नकारात्मक विचाराने न्हवे तर त्या सुकलेल्या मनाला आनंदाचा एक वळीव देखील शांत करू शकत असतो पण त्याच्या नशिबी येतं..... ते भयाणतेचं वादळ......जिद्दीनं पुन्हा उभं राहू शकतो या भावनेचा ओलावा निघून गेलेलो असतो..... कारण.....जाळणाऱ्या विचारांनी मन करपलेलं असतं.......होरपळणाऱ्या या मनाला फुंकर घालावी तरी कशी कारण डोळ्यातील खारं पाणी त्या जखमांची अजूनच लाही लाही करत असतं.
ग्रासलेल्या या मनाला ओळखावं तरी कसं...? सावरून त्याला पुढे जाण्याचं बळ द्यावं तरी कसं..? कशी समजणार आपल्याला खचलेल्या मनाची व्यथा.....? कोमेजणाऱ्या या झाडाला फुटणार कशी पालवी....? थांबणार कसा हा वाळवंटातील जीवघेणा प्रवास.....?मिळणार कसं या प्रवासाला वाळवंटी जहाज....? जीवघेणं हे सत्र थांबायला तर हवं.... त्यासाठी स्वतःच्या मनानं स्वतःला काय सांगायला हवं....?उत्तराचा शोध घेता प्रश्नच आहेत फार....पण छोट्याशा या जीवनाला करायचं आहे आनंदाने पार....विचार असावेत फुलांच्या सुगंधासम दरवळणारे...... स्वप्न असावीत मोठी.... व्हाव्यात पूर्ण सर्वांच्या इच्छा.....विचारांमध्ये नसावी खोटी......आनंदी जगावं सर्वांनी ह्याच माझ्या सदिच्छा.
या साऱ्या प्रश्नांवर आता विचार सर्वांचा व्हावा......आपला महत्वाचा अभिप्राय माझ्या कानी यावा.....मत नसावं माझं एकाकी....एकमताने बोलू....हरलेल्या मनाला उभारणारं द्वार नवं खोलू..... वाळवंटातील सुखकर प्रवासाचं जहाज आपण गाठू.....सर्वांच्या विचारांवर विचार करून पुन्हा लवकर भेटू....
लवकरच आपल्या सर्वांच्या मतावर एकमत होवून भेटू दुसऱ्या भागात
माझे इतर लेख तसेच या लेखातील पुढील भाग आपण प्रतिलिपी ॲप वर देखील वाचू शकता.धन्यवाद
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
सासरातले माहेरपण
*_सासरातले माहेरपण_*
सुखाचा संसार अन् संसारातील सुख
जिथं आपुलकी अन् जिव्हाळ्याची माणसं असावी खूप
समजून घ्यावं प्रत्येकानं....असावी प्रत्येकाच्या बोलण्याला किंमत
क्वचित घडतं असं कुठेतरी बाकी हा विचार म्हणजे नुसती गंमत.
वाटत असतं प्रत्येकाला असावा सुखी संसार
पण उमगत नसते व्याख्या सुखाची
घडतात त्याच चुका वारंवार
मग आत्मपरीक्षण राहते बाजूला आत्माही जातो विठून
सांगा बर पुन्हा उभं रहायला आत्मविश्वास आणायचा कुठून?
*संसार....सासू....सुख....सून....* ही *स....* ची बाराखडी *सुंदर* तेव्हाच होणार जेव्हा कोणत्याही परिस्थितीत ही *साखळी* एकमेकांना *सावरत* राहणार.सुखाचा अर्थ आनंदाचे *सोबती* असा नसून पडत्या काळातही एकमेकांच्या विचारांना *समजून* घेणे आणि उभं रहायला *साथ* देणे असा होतो.
*सासू आणि सुनेच्या* विचारांचा *संगम* होणे......ही खर तर आजवर *स्वप्नवत* वाटणारी गोष्ट असली तरी ती *सत्यात* न उतरण्याची हजारो कारणे घराघरात वेगळी आहेत.मग दोन्ही बाजू ऐकून घ्याव्या आणि कोणा एकाला दोषी ठरवून निकाल लावला जावा अशी सोपी केस तर नसते ना ही. मुळात कोणा एकाला चूक ठरवणे हीच मोठी चूक असते.कारण तिथे त्या व्यक्तीचा आत्मसन्मान डिवचला जात असतो.
माझं ह्या विषयावर बोलणे योग्य आहे की नाही माहित नाही.कदाचित ते काहींच्या भावना दुखवू ही शकते.पण माझं मत हेच असेल की सुखासाठी काही बदल करून बघायला काय हरकत आहे....? तसे एक दुर्दैव हे ही आहे की सोशल मीडिया वरील हे लिखाण सून वर्गापर्यंत जास्त जाईल.कारण सासू वर्ग बऱ्यापैकी यापासून वंचित आहे.
पण कित्येक कीर्तनकार , प्रवचनकार सासू वर्गाला जागे करायचा प्रयत्न करत आहेच की.पण अजून एक गंमत अशीही आहे की
प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल यांची माहेरची साडी ही फिल्म पाहिली नसेल असा महिला वर्ग फार कमी.पण त्यातील अलका ताईंचा अभिनय पाहून सासूबाई देखील स्वतःला सुनेच्या भूमिकेत पाहत आल्या आहेत.
"हो आसच केलय माझ्या सासूनं.... आशीच वागलिय माझ्याबर......अजिबात देखु खवत न्हवती......जरा म्हणून सुख नाय....... कधी नीट बोलली नाय.....आणि मग डोळयातून पाणी.......चला फिल्म संपली.....टीव्ही बंद आता पुढची तयारी.......आता जी सासू फिल्म पाहताना स्वतःला सुनेच्या रुपात बघत होती ती आता पुन्हा सासू झाली होती.मग जोरात आवाज निघतो ये चहा आण ग तेवढा......हे झालं का ते झालं का....अजून नाय झालं...म्या अशी बसून राहिले असते तर माझ्या सासूने जीव घेतला असता माझा.....तुमचं आपल बर हाय....आम्ही आपल्या भोळ्या भेटलो म्हणून तुमचं चालतंय.....अस म्हणून शेजारच्या म्हाताऱ्या मैत्रिणीपुढे स्वतःच कौतुक स्वतः करून झालं की मग कुठं तरी मनाला आनंद मिळतो.
मग आता दोघींच्या हातात चहाचा कप येतो आणि मग पुन्हा सुरू होतं गप्पांच सत्र....."बघ ना आपल्या यळला काय हुत.... मर मर मरायचं काम करून आण वरनं सासूच्या शिव्या खायच्या....आमचं ह्य कितीबी सांगा काय फरक नाय.तू गप तू गप म्हणायचं......मग चहाचा घोट घेवून दुसरीचाही सुरात सूर मिळू लागतो..." तुझ काय आण माझं काय... यगळ हाय व्हय.....तुला बया चा तरी मिळतुया हातात माझीला तर काय बोललं की यितिया अंगाव धावून.पोरग तर बापाच्या वरच..... बाप कधी आईला बोलला नाय... आण ह्य पोरग बायकुला जरा काय बोललं की मलाच घालतंय शिव्या....."मग डोळं पुसत चहाच्या घोटासोबत आपलं दुःख पोटात टाकून...."चल बया निघते.....तुझ बर हाय... सून करून घालतीया तुला.मला सयपाकाचं बघायचय......"चहाचा पाहुणचार घेवून बाईसाहेब निघून गेल्या.
मग कप बाजूला ठेवत ह्या सासूबाईंच्या मनातले दुसरे विश्व बाहेर निघते.....ज्या मैत्रिणी सोबत पूर्ण फिल्म पाहून...एकमेकींच्या दुःखाचा डोंगर जणू खाली केलेला होता.आता त्याच समदुःखी मैत्रिणीचे बोलणे मनाला लागले होते....मग ती सल बोलून काढायची वेळ झाली होती.....मग स्वतःशीच पुटपुटत......
" आलीय सांगायला मोठी.... सून बुलतिया....बोललं नाय तर काय करल.... हायीच तशी ही.... सासू बोलून बोलून मिली.... पण हिला कसली अक्कल आली नाय.....एक काम धड नाय.....पोराला आधीच नीट वळाण लावलं असतं तर ह्यो दिवस आला असता वय तवा.पण नाय.... कधी दुसऱ्याच नीट बघवत नाय म्हणून ही यळ आलीय... बस आता भोगत.... " तेवढ्यात आतून सून चहाचा कप उचलायला आली... की मग अजून जोरात आवाज वाढला..... "म्या बर खपवून घिण... एकटीनं उभा केलाय संसार....नवरा कामाला तिकडं ममईला... हिथ पोर टाकून त्यो तिकड... म्या एकटीन बघितलय सगळं..... पोरं काय शिकत्यात ह्य तरी म्हाईत व्हत का त्याला.....म्या शिकिवलय......सासुच काय... जाग्यावं बसून नुसती....तब्येत ठीक नाय म्हणून म्हणून आख्खा जनम बसून काढला...... सासरा तर काय नुसता बैल त्याला काय बोललं तरी नुसता मान हालवून बसायचा....म्या म्हणून सोसलं सगळ.....नायतर टिकतय वय कोण......"सूनेकडे नजर वळवून अजून जोरात...." आमच्या आई बापानं आम्हाला नीट शिकावल म्हणून आम्ही नीट नांदलुया....नायतर आजकालच्या पुरी जरा काय बोललं की भोंगा पसरून सांगत्यात नवऱ्याला....जरा भी भ्या नाय....आई बापच नीट न्हाईत तर पोरगी कसली निघणार....." असं म्हणून सासूबाई चहाचा कप घेवून जाणाऱ्या सुनेकडे बघत बेड वर आरामात बसून राहिल्या.
आता वेळ आली होती सासूबाईंची फिल्ममेट शेजारीण असणाऱ्या बाईसाहेबांची..... तनतन करत घरात घुसत...."हातात सगळं मिळतया तरी मिजास सुचतिया....आली मोठी सांगायला ह्याव केलं त्याव केलं....काय केलंय.....त्या नवऱ्याला नुसता बैल केलेला...... त्यो आपला बिचारा सगळ हातात आणून द्यायचा.... पण ही औदसा एक शबुद कधी नीट बुलली नाय त्याच्याबर.....सासू बी बिचारी एका जाग्याव बसून...एक शब्दानं कधी उलट बोलायची नाय ....पण मयंदाळं छळलं तिला.बिचारी अजून १० वरीस जगली असती पण हिज बोलण ऐकून खाणं टाकलं बाईन....अशी असती सासू तर पाय धून पाणी पेलं असत तिझं......नाहीतर आमची..... कितिबी करा......तोंडाचा पट्टा चालू म्हणजे चालू .... नखभर दिखु खवत न्हवती....शेवटी मिली कर्मान....पण नशीब भी एवढं जळक मेल.... पॉर भी नीट नाय..... नुसत बायकु बायकु करतंय.....जणू अप्सरा नाय का ही.... माग माग करतंय नुसत....आम्ही नाय का संसार केला...आम्हाला नाय का पोर झाली.....नुसत कौतुक पाहिजे मिलीला......आपलंच नाणं खोटं म्हणायचं आण काय...." असं बोलून घरात पाऊल टाकलं की सुनेचा आवाज....." हे बर आहे आम्ही बसतो काम करत आणि ह्यांना शेजारी आरामात टीव्ही बघायला जायचं सुचत....मी बोलले की माझं तोंड दिसतं.....पण का बोलते नाही कळणार कोणाला.....ह्यांना पण आईचा पुळका .....तिला नको बोलत जावू म्हणे.....म्हणजे मी काय भांडायला उठलेली असते सारखी......आम्हाला काय अक्कल नाही जणू...." असं म्हणत आदळआपट करत सूनबाई भाजी चिरत बसलेली पाहून......सासूबाई आपला स्वयंपाक अजून बनवायचा राहिला आहे हा विचार डोक्यात घेवून दुसऱ्या रूम मध्ये निघून गेली.
दोन्हीही घरे पैसा,सुखवस्तू सगळ्यांनी भरलेली..... बाहेरून एखादा आला तर ह्या सुखी कुटुंबांची त्याला नक्कीच भुरळ पडेल अशी....पण वरून सुंदर दिसणारं हे फुलाचं झाडं आतून किती पोकरलं आहे हे पाहिलेच तुम्ही.इथे दुर्दैवानं एक गोष्ट मान्य करावी लागतेच की स्त्रीची सर्वात मोठी शत्रू ही स्त्रीच असते.
मला जे वाईट अनुभव आले ते माझ्या सुनेच्या वाटेला येवू नये ह्या विचारापेक्षा ईर्षेने अजून वाईट वागणे ह्यात कसला अर्थ आहे.
सूनेनेही विचार करायला हवा की आईला झालेला त्रास पाहिलेला असतो मग तिला जशी मदत करत आले तशीच मदत सासूलाही करायला हवी असा विचार सुनेने करणे काय चूक आहे.
नवऱ्याच्या अनेक चुकांवर किरकोळ भांडणे होत असली तरी तडजोड करून जी स्त्री संसार करतच असते....स्वतःच्या आईचे आजारपण सहन होत नाही म्हणून तिच्या तब्येतीची चौकशी वारंवार केली जाते.मग सासूचे आजारपण असो वा वयोमानाने आलेला थकवा त्यातून जर काही चुका घडल्या अथवा कामे झाली नाहीत तर सुनेने रागाने घर अगदी डोक्यावर का घ्यावे....?
मला माझी सासू नीट वागवत न्हवती....मीच सगळ बघितलं....मी म्हणून केलं....मग आता सुनेने ही मी म्हणेल तसच रहावं असा विचार सासूने का करावा....? स्वतःच्या नांदणाऱ्या मुलीला तिच्या नवऱ्याने समजून घ्यावे ,कामात मदत करावी,सासूने काही वाईट साईट बोलू नये अशी पोटतिडकीने असणारी अपेक्षा सुनेच्या बाबतीत कुठे जाते.....? आपल्या मुलाने सुनेला केलेली मदत का डोळ्यात खुपते.....?
आपल्या आईला त्रास होवू नये,वहिनींनी सगळे बघावे,आईला आता होत नाही,तिची काळजी घ्यावी,तिला जमले तर करेल नाहीतर बसून राहिली तरी तिला हातात द्यावे अशी वाटणारी सून स्वतःच्या सासूचा असा विचार करते का.....?
मी म्हणून केलं.....मी म्हणून करतेय.....ह्यातला मी पणा कधी संपेल का.....? संसाराला एकसंध बांधून नवं विश्व निर्माण करण्याची शक्ती असणारी स्त्री जेव्हा ह्या मी मधून बाहेर पडेल तेव्हाच खऱ्या संसाराची सुरुवात होईल अस वाटत नाही का....?
काळ बदलतो,वेळ बदलते, बदलत जातात विचार,घरचे प्रश्न मिळून सोडवू यापेक्षा बाहेर केला जातो त्याचा प्रचार.....आपल्या शंका, आपली अडचण समजून घ्यायला कशाला हवेत शेजारचे चारजण....?
हक्काने आपल्या घरच्यांसोबत मोकळे करता यावे आपले मन....
असतील अडचणी,उडतील खटके,
ऐकावे लागत असतील शाब्दिक फटके,
परक्यांना आपली व्यथा सांगण्यात सगळेच होणार व्यर्थ...?
संयमाने घरात संवाद हवा तरच येईल संसाराला अर्थ.
सासू असो सून दोघींमध्येही असावा जिव्हाळा
तरच मायेच्या ओलाव्याला कधी संपवू शकणार नाही रखरखता उन्हाळा.
तू तू मी मी ची नसावी कसली स्पर्धा
कशाला कामाच्या वाटणीत असावा भाग अर्धा अर्धा
सासुत पहावे रूप आईचे का समजावी तिला तिरकस बाई
सूनेमध्ये मुलगी दिसावी का समजावे तिला परकी बाई
हे भेद समजले,तरच उमगले समजावे
सुखी संसाराचे सार
नाहीतर कायम अडकत जावू दुःखाच्या खाईत फार
हे लिखाण समस्त स्त्री वर्गास समर्पित. जर काय चुकले असेल तरी आपलाच मुलगा....आपलाच भाऊ समजून माफ कराल हीच माफक अपेक्षा.कारण शेवटी सासू असो सून ज्या सासरी त्या दोघी आहेत ते घर दोघींना माहेर असल्याचं तेव्हाच वाटेल जेव्हा दोघी आनंदाने मिळून एक असतील.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
बाळंतपण
*बाळंतपण*
स्त्रीच्या नशिबी आलेली डोळ्यांना सुखद भासणारी पण जबाबदारींनी भरलेली धगधगती मशालच.त्या मशालीचा उजेड अनुभवायला बाजूच्या सर्वांचे डोळे जणू व्याकुळच असतात.पण तेवणाऱ्या मशालीचे चटके अनुभवते ती बाळंतीणच.
खर तर स्त्रिच्या नशिबी लिहिलेलं हे अग्निदिव्य आणि यावर आजवर मांडलेले विचार ,स्वतः अनुभवलेल्या कडू गोड आठवणी, ह्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्त्री स्वतः मांडत आली आहेच.मग मी वेगळं काय सांगणार....?
मीही वेगळं असं काही बोलणार नाहीच पण २६ मार्चला बहिणीला मुलगी झाली आणि मी मामा झालो.नऊ महिन्यांत तिच्यात होणारे बदल आणि तो प्रत्यक्ष वेदनांनी भरलेला दिवस आणि नंतर तिच्या चेहऱ्यावर उमटलेले हसू....... आणि आम्ही फक्त आनंदाने आमची नाती जोडू लागलो.त्या सुंदर परीच्या आगमनाने आम्हा सगळ्यांनाच बढती मिळाल्याचा आनंद होता.माझी आई आज आजी झाली. तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद अजूनही डोळ्यासमोर आहे.डोळ्यात पाणी.... पण आनंदाने चेहऱ्यावर उमटलेले एक वेगळेच तेज मी तिच्या चेहऱ्यावर आज पाहत होतो.
मनात विचारांचं एक वेगळंच विश्व तयार होवू लागलं होतं.बघा ना आपल्या जवळची कोणतीही व्यक्ती आपण जेव्हा हॉस्पिटल मध्ये घेवून जातो,जेव्हा ऍडमिट करण्याची वेळ येते तेव्हा ते क्षण जगणे,अनुभवणे हे आपल्यासाठी एक मोठी परीक्षाच असते.पण बाळंतपण ही अशी गोष्ट की आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला आनंदाने ऍडमिट करत असतो.गरोदर स्त्रीला होणाऱ्या त्या वेदना आपल्याला आनंद देत असतात.
*"अरे वा पोटात दुखतेय मस्तच झालं..... गेलं पाहिजे आता हॉस्पिटल मध्ये"* किती सहजपणे आपण सगळे हे बोलून जातो त्यापैकीच मीही एक.
महिने......आठवडे.....दिवस कसे भरकन सरून गेले होते,डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे ,आहार,आराम ,व्यायाम हे सगळं कसं व्यवस्थित जपलं होतं...... आणि आता वेळ झाली होती त्या नव्या जिवाच्या आगमनाची.
पोटात येणाऱ्या कळा ती सहन करत होती....आणि..... मला फक्त मी मामा होणार हेच सुख दिसत होतं.अजूनही कुठेच त्या वेदनांशी माझं नातं कसलं जोडलं गेलं न्हवतचं.सकाळची वेळ उलटून दुपार झाली कळा वाढल्या जाव्यात म्हणून तिला इंजेक्शन दिली जात होती.डोळ्यात पाणी दिसत होत शरीराची तडफड ह्या कुशीवरून त्या कुशीवर अशी वाढत चालली होती. उन्हाळ्याचे दिवस पंखा जोराने सुरू होता पण तरीही घामाचे लोट तिला आणखीच अस्वस्थ करत होते.
ह्या सगळ्यात अजूनही मी याच धुंदीत होतो की आता बहुतेक बाळ होणार.वेळ जवळ आलीय.ह्या वेगळ्याच आनंदात मी रमलो होतो.सिस्टर आल्या आणि मला बाहेर जायला सांगितले.आता तिच्या सोबत फक्त आई होती.मीही आता थोडा बैचेन झालो होतो पण तिला होणाऱ्या त्रासाने नाही तर कधी बाळ होतेय ह्या आशेने.
आता दुपार उलटून सायंकाळ झाली होती.जेवणाचा डबा आणावा म्हणून मी घरी आलो तेच मला बहिणीच्या मिस्टरांचा फोन आला की बहुतेक आता सिजर करावं लागणार आहे.कारण बराच वेळ झाला तरी काही हालचाल नाही होत.बाळाच्या जीवाला धोका पोहोचू शकतो.मी म्हणालो "असे कसे....?"करेल ती सहन.अजिबात सिजर नकोय आपल्याला.बघू मी येतो.आणि पटकन मीही हॉस्पिटल मध्ये पोहचलो.
आजवर थिएटर मध्ये अगदी मोठ्या स्क्रीन वर, मोठं मोठ्या अभिनेत्रींनी बाळंतीण होताना होत असणाऱ्या वेदना आपल्या अभिनयातून उत्कृष्टपणे साकारल्या आहेत.पण ती दृश्य फक्त डोळ्यापर्यंत आणि आवाज फक्त कानापर्यंत पोहोचले होते.पण आज ऑपरेशन थिएटर बाहेर उभा असताना आतून बहिणीच्या येणाऱ्या किंकाळ्या मनापर्यंत पोहोचत होत्या आणि नकळत डोळ्यातून पाणी गालांवर ओघळले होते.पण आता सुरू झाला होता तो माझाच अभिनय.आईचा रडवेला चेहरा पाहून.... मला काही वाटत नाही अस दाखवून गप बस रडतीय काय त्यात शांत हो असं वरवरचे बोलणे करून तिला शांत करत होतो.पण माझ्या मनात आज पहिल्यांदा ह्या किंकाळ्यांनी वेगळे घर केलं होतं.
सभोवार आजवर खूप ऐकत आलो नॉर्मल झाली.... सिझर झाली...मुलगा झाला....मुलगी झाली....सिझर झालं का...? मग मुलगा की मुलगी....? मुलगा...! अरे वा बर झाल... म्हणजे सुटली एकदाची.आता काय टेन्शन नाय...मुलगी झाली....सिझर झालं.... आरर बेकार झालं.सिझर झाल्यासारखं मुलगा झाला असता बर झाल असत.हे सारे शब्द आजवर खूपदा कानावर पडत आलेत.पण यामागील भावना मनापर्यंत कधीच पोहोचल्या न्हवत्या.
एका स्त्रीच्या शरीराची होणारी चिरफाड आणि त्या वेदनांची तीव्रता ही मुलगी झाल्यावर जेवढी तीव्र असते तेवढी मुलगा झाल्यावर नाही असा समाजाने बांधलेला अघोषित फरक आज लक्षात येत होता.मीच किती भावना शून्य होतो हेही आजच समजले मला.आजवर मित्र परिवार,नातलग,शेजारचे, ओळखीचे अशा माणसांच्या कित्येक बाळांना मी पाहत आलोय.पण एक असह्य वेदना,जीव नकोसा करून सोडणारा तीव्र आक्रोश पुढे जावून नव्या जीवाला जन्म देतो.ह्या अग्निदिव्यातून तळपून निघणारी कणखर स्त्री आज मनाला पटत होती.
विचारांचं हे चक्र सुरू असताना अचानक ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला आणि समोर डॉक्टर उभ्या... काय बोलणार...काय सांगणार हे वाटत असताना एकदम त्या म्हणाल्या पिशवीचे तोंड उघडले आहे त्यामुळे आम्ही आता नॉर्मल साठीच प्रयत्न करतोय आणि एवढं बोलून परत त्या आत निघून गेल्या.
आता मनाची अवस्था अशी झाली होती की काहीही करा पण लवकर तिच्या वेदना थांबाव्या.दिवस २६ मार्चचा वेळ संध्याकाळी ८:४५ ची बहिणीच्या ओरडण्याचा आवाज बंद झाला होता पण काय अंदाज लागत न्हवता.हातात मोबाईल घेवून वेळ बघायचा प्रयत्न सुरू होता.८:४८ची वेळ झाली आणि लहान बाळाच्या रडण्याचा आवाज कानावर पडला.काही क्षणापुर्वी बहिणीचा रडलेला आवाज नको वाटत होता.पण आता बाळाचं हे रडणं हवेसे झाले होते.क्षणात तुमच्या भावना कशा बदलतात.....आलेल्या दडपणाचा काळोख क्षणात दूर होवून आनंदाचा लख्ख प्रकाश आता दिसत होता.
मुलगा झाला की मुलगी असा प्रश्न ना माझ्या डोक्यात होता ना आई आणि दाजींच्या.बाळ जन्माला आले ह्याच आनंदात आम्ही तिघे एकमेकांना पाहत होतो. *"मुलगा होवुदे नाहीतर मुलगी आपण पेढेच वाटायचे"* असं आनंदाने आधीपासूनच म्हणणारी माझी आई चेहऱ्यावर हसू,डोळयातून ओघळणारे पाणी ह्या मिश्र भावनेने डोळे बंद करून, हात जोडून देवाचं आभार मानताना पाहून आज माझंही मन आनंदाच्या एका उंचचउंच टप्प्यावर असल्याचं जाणवतं होत.
काही वेळ असाच निघून गेला आणि बाहेर आलेल्या सिस्टरने मुलगी झाल्याचे सांगितले.आम्ही सगळे आनंदाने कधी तिला पाहतोय असे बैचेन झालो होतो.स्टेटस ठेव,फोन कर,मेसेज कर असे सगळे उद्योग माझे सुरूच झाले होते.बाळाला सगळ्यात आधी मीच हातात घेणार आणि माझा फोटो काढायचा हा माझा भलताच हट्ट.पण दाजीही काय म्हणाले नाहीत.आता बाळ आणि बाळंतीण दोघेही रूममध्ये आले होते.मी पटकन बाळ हातात घेतले आणि दाजिंनीही आनंदाने माझे बाळासोबत फोटो काढले.
आता गंमत अशी झाली होती मी,दाजी आणि आई तिघेही फक्त बाळाकडेच बघत होतो.काही क्षण आम्हाला त्या बाळंतीणीचा पूर्ण विसरच पडला होता.आम्ही मग काही वेळाने भानावर आलो आणि बहिणीची चौकशी करू लागलो.कशी आहेस...?आता नाही का काय त्रास...? शांत झोप आता एवढेच काय ते आम्हा तिघांचे बोलणे.......हे ऐकून माणूस किती विचित्र प्राणी आहे अस वाटत ना....? बघा ना त्या बाळाची काळजी पण बाळंतीण कशी आहे याची नंतर चौकशी...
पण याहून अजून मोठी गंमत म्हणजे काही वेळापूर्वी जोरात किंचाळणारी ही बाळंतीण एकदम हसत तिच्या बाळाकडे पाहत होती.प्रेम,माया,ओढ किती वेगळी असते ना याचा प्रत्यय अगदी प्रत्यक्ष समोर अनुभवत होतो.सगळ्या वेदना तिही पूर्ण विसरून गेली होती.
सीजर असो वा नॉर्मल पेशंटची त्यावेळची स्थिती,ती असह्य वेदना झेलण्याची क्षमता,बाळाची पोटातील स्थिती,पेशंटचा रक्तदाब,तब्येत अशा कित्येक बाबी समोर ठेवून डॉक्टर योग्य तो निर्णय घेत असतात.अशा हृदयाला पिळवटून टाकणाऱ्या कर्कश आवाजातही स्वतःच्या मनाला शांत ठेवून....आजवर आलेले अनुभव,केलेला अभ्यास आणि गरज पडली तर काही नवीन प्रयोग करून बाळाला हे नवं जग दाखवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या सर्व डॉक्टर्स,सिस्टर्स,मदतीस असणारे सर्वजण ह्या सर्वांचे मनापासून आभार.
बाळंतपण हा एक समोर अनुभवलेला प्रसंग इथे वर्णन करून झाला असला तरी ह्या विषयाचा शेवट मनात एका वेगळ्याच प्रश्नाची सुरुवात करतोय.....!!!
बघा ना अशा असह्य वेदना सहन करून बाळाला जन्म देणारी स्त्री ही कणखरतेचं प्रतीक ही आहे,मायेने त्याचं संगोपन करताना ती प्रेमळतेचं प्रतीक आहे,चुकांना पांघरून न घालता त्याला योग्य शासन करून त्याचं भविष्य सुंदर घडावे यासाठी धडपडणारी स्त्री सुसंस्काराचं प्रतीक आहे,पण दुर्दैव हेही आहे की अशा कित्येक गुणांनी संपन्न स्त्री ही पोटच्या गोळ्यासाठी वेगळी आणि सासू सासऱ्यांसाठी वेगळीच आहे.
मरणयातना देवून जन्माला येणारं मूल चेहऱ्यावर हसू आणतं..... पण सासू सासऱ्यांची छोटीसी चूकही जणू ह्या स्त्रीला मरणयातना देतं...... आणि मग जन्म होतो एका नव्याच बाळाचा जगभर ह्याचं एकच नाव गृहकलह........! मग ह्या बाळाच्या वाढीला पोषक खाद्य घरात रोज मिळत गेले तर त्याची वाढ एवढी होते की मग त्या सर्वांना एका घरात राहायला ती जागा ,ते घर पुरत नाही......आणि मग व्हावं लागत विभक्त.....!
असो यावर जास्त काही बोलत नाही.कारण मी सध्या आहे आमच्या छोट्या परीसोबत जिने मला मामा बनवले.मामा बनवणारी ही आमची परी तीन दिवस हॉस्पिटल मध्ये मुक्काम करून आज मामाच्या घरी आलीय.आठवणीतील कथा,मनातील व्यथा,समाजातील प्रथा तर कधी थोरांच्या गाथा घेवून भेटू असच पुन्हा लवकर.धन्यवाद
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग ३
*ट्रेक नंबर १७*
*पाटेश्वर भाग ३*
१२ आणि २६ डिसेंबर २०२१
*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास*
*भाग ३ - पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*
ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.
*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*
*भाग ३ - पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिध्दी*
नमस्कार पहिल्या भागात आपण पाटेश्वरवरील ठिकाणे तर दुसऱ्या भागातील उपभाग १ आणि २ मधुन त्या कलाकृतींचा अंदाजे अर्थ लावून तो इतिहास जाणण्याचा प्रयत्न केला.
खर तर त्या दोन्ही भागाचे विस्तृतपणे लिखाण करावं लागणं हेच दुर्दैव आहे.एवढ्या सुंदर स्थळाची माहिती सहजासहजी उपलब्ध नाही ही फारच मोठी शोकांतिका नाही का..?
सोमवार,महाशिवरात्री याच दिवशी देवाचा आशिर्वाद मिळावा एवढंच महात्म्य ह्या स्थळाचं आहे का..?देगाव गावातून पाटेश्वरवर यायला अगदी चांगला डांबरी रस्ता आहे.त्यामुळे सहजपणे कोणीही मंदिरात येऊ शकत.शासनाने केलेली ही सुविधा उत्तमच.
मुख्य पाटेश्वर मंदिराची स्वच्छता उत्तमच अगदी कोणीही भाविक आला तरी हे सारं पाहून नक्कीच प्रसन्न होईल.मग एवढं सगळं चांगले आहे असं म्हणणाऱ्या मला अडचण काय असा प्रश्न उभा राहतो ना...? एका बाजूला म्हणायचे सार काही उत्तम आणि पुन्हा म्हणायचे दुर्दैव हा विरोधाभास न्हवे का..?
तर वाचकांनो,मित्रांनो आणि वडीलधाऱ्या व्यक्तींनो आणि सर्व मान्यवरांनो मी आपली क्षमा मागूनच काही मुद्दे इथे मांडत आहे.कारण त्यामागे काही छुपी कारणे, बंधने असतील तर ती मी न जाणता तिथं जे काही पाहिलं या आधारावर लिहितोय.मग त्यात माझं काही चुकत असेल तरी अवश्य सांगावं.पण समजून हे घ्यावं की ह्यात मला कोणाला कमी किंवा चूक दाखवून कसला असुरी आनंद घ्यायचा नाही तर एकमेव हेतू हाच आहे की आपल्या साताऱ्यातुन एवढ्या जवळ असणाऱ्या सुंदर स्थळाला चांगली प्रसिद्धी मिळावी.
खर तर मी पहिल्यांदा गेलो ते ट्रेकिंगसाठी जवळचे ठिकाण आहे लगेच बघून होईल या उद्देशाने.सकाळी ७ ला निघालो तरी १० पर्यंत माघारी येऊ अस काय ते नियोजन.कारण काय..?तर तिथं नुसत्या पिंडी आहेत एवढीच माहिती कानावर.मग पिंडी बघायला असा किती वेळ लागतो दर्शन घेऊ आणि निघू.पण तिथं गेल्यावर जे दिसलं,जे अनुभवलं ते फारच सुंदर.
ट्रेकिंग म्हणजे सकाळी लवकर निघणे हे आलंच म्हणून आम्ही ७ वाजता तिथं पोहोचलो.पण तिथं गेटजवळ पोहोचलो आणि बोर्ड वाचला कोविडची सूचना " भक्तांसाठी दर्शनाची वेळ सकाळी ९ ते १२ आणि दुपारी ३ ते ५" म्हणजे इतर वेळेत परिसर बंद राहील.आता ह्यात मी काही चूक काढावी अस नाही.शेवटी देवस्थानाने घेतलेला हा निर्णय आहे.
पण मला एकच सांगायच आहे की पाटेश्वर हे एवढा ऐतिहासिक ठेवा असलेलं ठिकाण फक्त देवस्थान म्हणून का पहावं...? इथे फक्त भाविकांनी यावं देवाचे दर्शन घेऊन जावं एवढं साधं ठिकाण आहे का हे...?
अहो हजारो किलोमीटर अंतर पार करून ,हजारो रुपये खर्च करून,वातावरणाची तमा न बाळगता भक्ती,श्रद्धा,आस्था या गोष्टीसाठी स्वतःच्या शरीराची कमजोरी विसरूनही म्हातारी लोकं का जात असतील अमरनाथ यात्रेला...?,का फिरत असतील चार धाम…?,का करत असतील १२ ज्योतिर्लिंग यात्रा...?कारण फक्त एकच त्या जागेच महात्म्य लोकांपर्यंत पोहोचलय.पिढ्यानपिढ्या सगळेजण ऐकत आले आहेत.तिथली अद्भुत शक्ती,भगवान शंकरावर असणारी श्रद्धा आपोआप सर्वांना खेचते.अगदी वर्षभर यात्रा भरावी अशी सुंदर ठिकाण आपल्या देशात आहेत.इथं जाणारा प्रत्येक भाविक काय फक्त देवाचा आशीर्वाद मिळावा ह्याच हेतूने जात असावा का ओ...?तर कित्येक चौकस बुद्धी,अभ्यासूवृत्ती असणारी मंडळी ह्याच ठिकाणांत लपलेला इतिहास वर आणत असतात.
भक्ती सोबत ,जिज्ञासूवृत्ती ठेवून आजवर कित्येक लपलेली ठिकाणं वर आली आहेत.आता तुम्हाला वाटेल मग या सगळ्याचा इथे काय संबंध...?
तर संबंध आहे.अहो आजवर ट्रेकिंगसाठी म्हणून जास्त नाही पण थोडं बहुत आपल्या ह्या सातारा जिल्ह्यात फिरलो.प्रत्येक गडावर काही ना काही जुने अवशेष दिसत असतात त्यांना नजरेत आणि कॅमेऱ्यात साठवून ठेवत असतो.पण मी एवढी सुंदर कलाकृती...नुसती कलाकृती नाही तर त्याच भांडार दुसरीकडे कुठं नाही पाहिलं जेवढं पाटेश्वरवर आहे.
पण मी जे दुर्दैव म्हणतोय ना तो विषय खर सुरू होतो तो आत्ता.कोविड चे नियम सातारा नाही तर पूर्ण जगभर आहेत.काही महिन्यांपूर्वी तुळजापूरला आई तुळजाभवानीचे दर्शन सगळे नियम पाळून घेतले सकाळी ६ वाजता.प्रचंड गर्दी पण तरीही ठराविक अंतर ठेवून,रांगेने गेलो १.३० तास रांगेत वेळ गेला पण छान दर्शन झाले आणि बाहेर आलो.मागच्या महिन्यात रायगडावर गेलो.गडाची पुनर्निर्मिती(उभारणी) सुरू आहे,भारतीय पुरातत्व विभागाकडे सगळी जबाबदारी आहे.त्यानुसार नाममात्र फी घेऊन सकाळी ७ वाजता गड सर्वांसाठी खुला होतो आणि संध्याकाळी ५.३० पर्यंत पाहता येतो.परवा लोहगड पाहण्याचा योग आला तोही पुरातत्त्व विभागाकडे असल्याने नाममात्र तिकीट ठेवून सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत खुला आहे.
म्हणजे यातून मला हे सांगायच आहे की सगळे नियम व्यवस्थित पाळून ही गर्दीची आणि प्रसिद्घ ठिकाणे दिवसभर खुली आहेत आणि तिथं रोज हजारो लोकांची( देवस्थानच्या ठिकाणी रोज तर गडांवर शनिवार रविवार) ये जा सुरू आहे.तरीही सार व्यवस्थीत सुरू आहे.
मग त्यामानाने काहीच गर्दी नसलेल्या आपल्या पाटेश्वरवर असा नियम का..? सूचना फलकावर शेवटचा मुद्दा काय तर बिबट्याचा वावर असल्याने मंदिर परिसरात जास्त वेळ थांबू नये.आता यावर काय बोलावं..दुपारी १२ ते ३ हा बिबट्याचा जेवणाचा वेळ असावा का...? ज्यामुळे चुकून तिथं सापडलो तर आपली शिकार व्हावी.
मला यावर कुचेष्टा नाही करायची पण हा नियम नक्की कोणाच्या सोयीसाठी....? जर तिथं बिबट्याचा वावर आहे तर एखादी फॉरेस्ट खात्याची पोस्ट नसावी का मग...?
तिथं श्री सदगुरू गोविंदानंदांचा मठ आहे.(कृपया माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका.) म्हणजे तिथं मनुष्य वास्तव्य आहे.मी तिथे असणाऱ्या मुख्य गुरूंना भेटलो नाही.किंवा मला त्यांच्याबद्दल काही चूक म्हणायचे नाही.पण आलेला अनुभव मी मांडतोय.
आम्ही ग्रुपने तिथं गेल्यावर ह्या शांत ठिकाणी आमच्या गप्पांमुळे दंगा झाला.आम्हाला दंगा करू नका सांगण्यात आलं.अगदी योग्य आहे हे.पवित्र ठिकाणी दंगा मस्ती नसावीच.मग मी त्या मुलाला विचारले की "अहो मी जी माहिती वाचली होती त्यानुसार इथं मरगळ म्हशीचे लेणे कुठे आहे."त्याने मठाच्या मागील बाजूस हात करून सांगितले "इथून मागे जावा सगळं तिकडेच आहे."मी विश्वेश्वर पुष्करणी पाहिली होती मुख्य मंदिर ही पाहून खाली आलो होतो.मठाच्या मागील बाजूस असणारी ठिकाणे ही पाहून आलो पण मी जे विचारले ते मला दिसले न्हवते.मग फिरुन आल्यावर त्याच व्यक्तीला मी विचारलं "अहो नाही मागे.बघा ना कुठे आहे अशी पिंड ज्यावर म्हैस कोरली आहे आणि त्यावरच पिंड आहे".त्याने नकारार्थी मान हलवून नाही माहीत अस सांगितले.
आता माहीत नसणे ह्यात त्याची काही चूक आहे अस मी म्हणतच नाही.पण मला ती जागा काही करून पहायची होती.मी यू ट्यूब वर पाहिले,नेट वर माहिती पाहिली पण नाही माहिती मिळाली.पण एक संदर्भ मिळाला होता की विश्वेश्वर पुष्करणी जवळ हे लेणे आहे.मग १२ डिसेंबरची अर्धी माहिती मनात साठवून नव्या माहितीसाठी २६ डिसेंबर ला पुन्हा मित्रांसोबत आलो.आधी पाहिलेली सगळी ठिकाणे सर्वांसोबत पुन्हा व्यवस्थीत पाहिली आणि मग जाताना पुष्करणीच्या बाजूला माझ्या घिरट्या चालू झाल्या.तसा मी नियम मोडलाच त्याबद्दल माफी असावी पण काट्या टाकून बंद केलेलं आणि येणं जाणं बंद असल्याने झुडपं वाढलेली एक जागा दिसली.जमेल तशी ती अडचण दूर करून आत गेलो असता मला ते सुंदर दृश्य पहायला मिळालं.
आता हे एवढं सार सांगण्याचा हेतू स्पष्ट करतो.बघा ना संपूर्ण परिसराची स्वछता करण्याच काम ह्या मठातील व्यक्ती पाहतात.मुख्य मंदिराची स्वछता आणि तिथं जाणारा पायरी मार्ग फारच उत्तमरीत्या स्वच्छ ठेवला आहे.ह्यात काहीच शंका नाही.
पण मरगळ म्हशीच्या लेण्याची अवस्था,मठामागील पाण्याचे टाके,आणि बलीभद्र लेण्यातील पिंडी आणि बाजूचा भाग हा एकदम दुर्लक्षित दिसतो.यात चूक त्या व्यक्तीची आहे किंवा स्वछता पाहणाऱ्या कोण्या एकाची आहे असं नाही म्हणायच मला.
दोष आहे तो आपल्या सगळ्यांचा.कारण योग्य त्या माहितीचे फलक ज्या त्या ठिकाणी लावले गेले तर येणारा भाविक असो वा ट्रेकिंग साठी आलेला कोणी असो.जर माहिती वाचनात आली तरच त्याचा प्रसार आणि जागृती होईल ना...?
जर योग्य माहितीचे फलक सगळ्या ठिकाणी लागले तर पर्यटक फक्त मुख्य मंदिर नाही तर सारा परिसर फिरतील आणि सारा परिसर सर्वांच्या पाहण्यात आला तर आपोआप साऱ्या ठिकाणाची स्वछता ही केली जाईल ना.
आणि माझं एकमेव हेच मत आहे की इथे असणाऱ्या प्रत्येक पिंडीच्या आकारात काही ना काही अर्थ दडले आहेत.आपल्याकडे जाणकार ,अभ्यासू लोकांची कमीही नाही.मग जर सर्वांनी पुढाकार घेऊन अध्यात्माचा अभ्यास असणारे,इतिहास आणि जुन्या भाषेचे ज्ञान असणारे जाणकार इथे आणले... त्यांच्याकडून योग्य ती माहिती घेऊन सरकार दफ्तरी जमा केली. यावर योग्य ती कार्यवाही करून संपूर्ण पाटेश्वर परिसर प्रकाशझोतात आणला तर आज जसे वासोटा एक सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटन स्थळ झालंय तसेच आपले पाटेश्वर होणार नाही का...?
लहानतोंडी मोठा घास म्हणून मी जास्त काही बोलून गेलो असलो तरी माफी असावी.पण मला पाटेश्वर परिसर खूप आवडला आणि यावर काही अजून सखोल माहिती मिळेल अस आमचे मित्र श्री धनंजय कणसे यांनी सांगितले मग मी आमचे बंधू गुरुनाथ यांच्या सोबत आपल्या सातारा येथील वस्तू संग्रहालयात कार्यरत असलेल्या श्री.प्रवीण शिंदे सरांना भेटलो होतो तेव्हा तिथेही काही माहिती उपलब्ध नसून पाटेश्वर पुरातत्व विभागाकडे येत नाही हे समजले.
मी त्यांना सहज म्हणालो अहो तिथं असणाऱ्या सगळ्या पिंडी ह्या पुरातन आहेत हे तर मान्य आहे ना सर्वांना. मग तरीही कस काय नाही येत पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात...?
तर काही इतर गोष्टी समजल्या.जर आपल्या पाटेश्वरला चांगल्या प्रकारे प्रकाशझोतात आणायचे असेल तर आपल्या सर्वांना एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे.विशेषतः देगावकरांनी पुढाकार घेऊन शासनाला निवेदन देणे गरजेचे आहे.तर आणि तरच शासन देखील लक्ष घालेल आणि तेव्हाच ह्या कलाकृतींना ,शिल्पांना योग्य तो न्याय मिळेल.भले आज ती शिल्प कोणी बनवली हा उल्लेख कुठे नसेल.पण ज्या भक्तीभावाने त्या कारागिरांनी ही शिल्प उभी केली ती जगासमोर दिमाखात सादर झाली पाहिजेच ना.
आतील काही गोष्टी समजल्या त्याची मला वाच्यता करायची नाही.पण खरंच सर्वांनी आपले वैयक्तिक हेवेदावे बाजूला सारून प्रयत्न केले तर नक्कीच कास,वासोट्याला लाभलेली जनमाणसांची अभूतपूर्व साथ आपल्या पाटेश्वरला ही लाभेल.
मग पुढच्या गोष्टी सांगाव्या लागतील एवढया अवघड नाहीतच.पर्यटन वाढले की रोजगार वाढणार ह्यात शंकाच नाही.काही चुकीचे शब्द आले असतील तर पुन्हा एकदा माफी मागतो.सर्वांनी मिळून पाटेश्वर एक सुंदर देवस्थान आणि पर्यटनस्थळ बनावं यासाठी एकत्र येऊ.
ओम नमः शिवाय
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध…ट्रेक नंबर १७….पाटेश्वर भाग २ मधील उपभाग २
*ट्रेक नंबर १७*
*पाटेश्वर भाग २*
*उपभाग क्रमांक २*
१२ आणि २६ डिसेंबर २०२१
*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*
*भाग ३ - पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*
ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.
*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास*
*उपभाग क्रमांक २*
*पाटेश्वर मंदिर* -
पाटेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की समोर दिसतो तो एक अप्रतिम नंदी.पण त्या नंदीजवळ जाण्याअगोदर डाव्या बाजूस एक छोटे मंदिर दिसते.त्यात आपल्याला चारमुखी एक मूर्ती दिसते.चतुर्मुखी मूर्ती म्हणजे आपण सहज ती ब्रह्मदेवाची आहे असं म्हणतो.पण हा अंदाज चुकीचा आहे.कारण *ब्रह्मदेवाच्या हातात कमळ,वेद,कमंडलू आणि रुद्राक्ष माळ* अशी एक सर्वमान्य प्रतिकृति मानली गेली आहे.पण तुम्ही निरखुन पाहिले तर ह्या चतुर्मुख मूर्तीच्या हातात कमंडलू आणि रुद्राक्ष माळ दिसत असली तरी एका हातात त्रिशूळ आणि डोक्यावर चंद्रकोर पहायला मिळते.तर गळ्यात रुद्राक्षमाळा दिसतात.यावरून ही मूर्ती चतुर्मुख शिवाची आहे हे तूम्ही म्हणू शकता.मूर्ती समोर एक शिवलिंग आहे.ते पाहून तूम्ही मुख्य मंदिराच्या समोर असणाऱ्या नंदीजवळ आलात की आश्चर्य वाटल्या शिवाय राहणार नाही.अतिशय सुबक,रेखीव अशी नंदीची मूर्ती आपल्या जवळपासच्या भागात कुठेही पहायला मिळणार नाही.नंदीचे कान,नाक,डोळे,अंगावरील नक्षी एवढंच न्हवे अगदी पायाचे खूर देखील खूप सुंदररित्या कोरलेले आहेत.एवढंच न्हवे तर नंदीच्या पुढच्या पायाजवळ एक शिवलिंग कोरले असून त्या शिवलिंगाच्या दोन्ही बाजूस दोन दासी हातात चामर घेऊन बसलेल्या आहेत. *(पाटेश्वर डोंगर चढून वरती आल्यावर दिसणाऱ्या श्रीगणेशा शेजारी देखील एक दासी चामर आणि छत्र घेऊन उभी आहे.तर इथे पाटेश्वर मंदिरात प्रवेश करण्या अगोदर असणाऱ्या शिवलिंगाजवळ दोन दासी चामर घेऊन उभ्या आहेत)*
तिथून आत प्रवेश केलात की सूंदर रेखीव खांब हे पाहण्याजोगे आहेत.तिथे पाटेश्वराच्या मुख्य गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस भिंतीमध्ये भगवान विष्णूची निद्रिस्त अवस्थेतील अतिशय सुंदर मूर्ती आपल्याला पहायला मिळते.पाठी शेषनाग आहे म्हणून यास*शेषशायी विष्णू* असं देखील म्हणतात.तर गाभाऱ्याच्या उजव्या बाजूस भिंतीमध्ये एक मूर्ती दिसते की ज्या मुर्तीला सोंड आहे.सोंड म्हणलं की आपण सहज म्हणतो की ही श्रीगणेशाची मूर्ती आहे.पण असं नाही.
*वैनायकी*-
नीट पाहिले की सहज लक्षात येतं की ही गणेशाची स्त्री रूपातील मूर्ती आहे.मग असे का,याचा उल्लेख कुठं आहे हे जर पाहिलं तर *स्कंदपुराणात* ज्या ६४ योगिनी(स्वामिनी) आहेत त्यात ४१वी स्वामिनी ही वैनायकी आहे.हिलाच *गणेशानी*,*विघ्नेश्वरी* असंही म्हणलं जातं.१०व्या शतकात लिहिलेल्या *लिंगपुराण,अग्निपुराण* यात देखील गणेशाच्या स्त्री रूपाचा उल्लेख आढळतो.तर १६ व्या शतकात श्रीकुमार यांनी लिहिलेल्या *शिल्परत्न* यातही याचा उल्लेख आहे.सर्वात प्राचीन अशा *मत्स्यपुराणात* देखील याचे वर्णन आढळते.तर वैनायकी चे दर्शन घेऊन त्यामागील बाजूस उत्तरेकडील भिंतीमध्ये एक स्त्रीरुपधारी मूर्ती दिसते ती देवी *नागराज्ञी* किंवा *सिंहवाहिनीची* असावी.ती पाहून मुख्य गाभाऱ्याकडे आलोत की आत तुम्हाला एक शिवलिंग दिसेल तेच पाटेश्वराचे.गाभाऱ्याचा दरवाजा बंद असल्याने आपल्याला बाहेरून दर्शन घ्यावे लागेल.त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस एक मूर्ती दिसेल ती देवी *सरस्वतीची* आहे.
मंदिरातुन दर्शन घेऊन बाहेर आलो की आपल्याला एक छोटे मंदिर दिसते त्यात जी १८ हात असणारी मूर्ती आहे ती देवी *म्हैषासुरमर्दिनीची* आहे.तिथे दर्शन घेऊन तुम्ही मंदिराच्या मागील बाजूस जावून पुन्हा उत्तरेच्या बाजूस असणाऱ्या गोमुखातून जे मंदिरातील पाणी बाहेर येते तिथे गेलात की आणखी एक आश्चर्य आपल्याला पहायला मिळेल.ते म्हणजे त्या गोमुखावर एक छोटेसे शिवलिंग आहे.पण तिथे गेल्यावर समजते की ते उचलून घेता येते.भिंतीत योग्यप्रकारे बसवले असल्याने ते बाहेर घेता येत नाही. पण उचलून पाहिले तर त्या मंदिरातुन बाहेर गोमुखाकडे येणारा पाण्याचा मार्ग दिसतो.ती रचना फार अप्रतिम वाटते.हे पाहून मंदिरातुन बाहेर आलोत की डोंगर माथ्याच्या दिशेने जायचे.माथ्यावर आपल्याला भगवान शंकरपुत्र कार्तिकस्वामींचे मंदिर पहायला मिळेल.मंदिर पाहून पुन्हा खाली चालत यायचे.चालत विश्वेश्वर पुष्करणी आणि मठाजवळ आलोत की मठाच्या मागील बाजूस चालत गेलो की एक छोटेसे पाण्याचे टाके दिसेल.ते पाहून थोडे पुढे आलात की आणखी एक लेण्यांचा समूह दिसतो यालाच *बळीभद्र लेणे* असंही म्हणतात.
*बळीभद्र लेणे समूह* -
हा ५ लेण्यांचा समूह असून इथे तुम्हाला खूप आश्चर्यकारक अशी शिवलिंग,पट,शिल्प पहायला मिळतील.त्याची विस्तृत माहिती आपण पाहू.आत अंधार असल्याने उजेडासाठी बॅटरी सोबत असणे फार गरजेचे आहे.आतील शिवलिंग आणि पट व्यवस्थित पाहण्यासाठी पावसाळयात जाऊ नये कारण हे सारे पाण्याखाली जाते.
*पहिल्या लेण्यात* प्रवेश केला की एका ओळीत ३ शिवलिंग पहायला मिळतील.पहिले शिवलिंग साधे असून मध्ये असणाऱ्या शिवलिंगावर तुम्हाला, बदाम, सूर्य ,अर्धचंद्र,चांदणी,त्रिकोण,फुल,गोल असे वेगवेगळ्या आकारातील शिवलिंग दिसतील.हे नवग्रह असतील असा समज होत असला तरी त्या शिवलिंगावर एकूण १० छोटी शिवलिंग एका विशिष्ट रचनेने कोरलेली दिसतात.आणि मध्ये एक मोठे शिवलिंग आहे.त्याच्या विशिष्ट रचनेवरून लक्षात येत की ते *चार मुख्य दिशा ,चार उपदिशा, सूर्य आणि चंद्र* असा संकेत देतात.
तर त्याच्याच बाजूस असणारे सयोनी प्रकारचे शिवलिंग आहे.त्यावर 3 भागात शिवलिंग कोरली आहेत.आतील भागात मुख्य शिवलिंगाच्या बाजूस *५ -५ जे ४ समूह आणि १ अशी एकूण २१ शिवलिंग कोरली आहेत.* तर त्या बाहेरील बाजूस एकूण *२६ शिवलिंग* कोरली आहेत.बाहेरील २६ आणि आतील २१ यामध्ये एक शाळुंखा( पिंडीचा आकार) कोरून एक शिवलिंग बनवले आहे.तर हा सर्व शिवलिंगाचा समूह एका मोठया शिवलिंगावर कोरला आहे.मग इथे दिसतात २ शिवलिंगांच्या मध्ये एकूण *(२६+२१=४७ शिवलिंगं.)* मग आता प्रश्न पडतो की ह्या ४७ चा काय संबंध असेल?तर ह्यात *आतील शिवलिंगाची कडा,आणि आतील शिवलिंग,२१ आणि २६ ह्याला विभागणाऱ्या शिवलिंगाची कडा(शाळुंखा)आणि बाहेरील शिवलिंग अशी एकूण संख्या ५१ होते* मग विचार केलात तर सहज लक्षात येतं की ५१ ही शक्तीपीठांची संख्या आहे.
*दुसरे लेणे*-
इथे आपल्याला साधारण ४ फूट उंच आणि ८ फूट लांब असं शिवलिंग पहायला मिळेल.त्याच बरोबर जर त्या शिवलिंगाच्या मागील बाजूस गेलो तिथे दिसणारा पट हा अप्रतिम आहे.विष्णूचे १२ अवतार तिथे कोरलेले आपल्याला पहायला मिळतील.*मत्स्य,कूर्म(कासव),वराह,नृसिंह,वामन श्रीराम,अधिराज पृथु,परशुराम,बुद्ध,कल्की,श्रीकृष्ण आणि ऋषभदेव(जैन आद्य तीर्थंकार)* अशा क्रमाने डावीकडून उजवीकडे पहायला मिळतील.तसे विष्णूचे २४ अवतार पण त्यातील १० परिचित आहेत.पण इथे १२ अवतार कोरले गेले आहेत.
गौतम बुद्ध यांचा जन्म इ.स.पूर्व ५०० वर्ष असून बुद्ध धर्मप्रसार हा सम्राट अशोक यांच्या काळात इ.स.पूर्व २०० वर्षे ह्या काळात जास्त झाला.तर जैन धर्मप्रसार हा यांचे २४वे तीर्थंकार महावीर यांच्या काळात झाला.त्यांचा काळ म्हणजे इ.स.पूर्व ५०० वर्ष.मग इथे कोरलेली मूर्ती आद्य तीर्थंकार ऋषभदेव किंवा शेवटचे तीर्थंकार महावीर यापैकी असावी.पण यावरून हे समजते की *हिंदू धर्मासोबत,जैन आणि बौद्ध धर्म यातील धर्मगुरू यांचा देखील उल्लेख पाटेश्वर मधील लेण्यात असणे याचा अर्थ इ.स.पूर्व २०० वर्ष ते शिलाहार राजा भोज यांच्या आधी म्हणजे १० वे शतक यामधल्या काळात हे काम केले गेले असावे*
कारण जर शिलाहार राजांच्या काळात हे काम असते तर इथे बुरुज,तटबंदी,दरवाजे हे देखील पहायला मिळाले असते.असं मला वाटतं.तर ह्या लेणीतून तिसऱ्या लेणीत गेला की तिथेही तुम्हाला काही शिवलिंग पहायला मिळतील.पण तिथून पुढे असणाऱ्या चौथ्या लेणीत तुम्ही गेलात की पुन्हा समोर एक मोठे शिवलिंग दिसेल.आणि त्या मागील बाजूस दिसतील २ पट.त्यातील एका पटावर ५ तर दुसऱ्यावर ४ मूर्ती कोरल्या आहेत.त्यातील ५ मूर्ती कोरलेला एक पट पाहिला तर त्यातील एका मुर्तीच्या हातात धनुष्य तर दुसऱ्या मुर्तीच्या हातात गदा दिसते यावरून त्या ५ मूर्ती पांडवांच्या असाव्या असं मला वाटतं.तर जो पट ४ मूर्तींचा आहे.त्यातील पहिली मूर्ती पाहून समजते की ही भगवान शंकरांची असणार कारण गळयात साप कोरलेला आहे.तर त्यातील शेवटची मूर्ती आहे तिचा कमरेखालील भाग हा माशाच्या आकाराचा आहे.यावरून ती मूर्ती भगवान विष्णूंची मत्स्य अवतारातील असावी.मधील २ मूर्ती मला ओळखता आल्या नाहीत.हे सारे पाहून जेव्हा तुम्ही ह्या सलग असणाऱ्या ४ लेण्यांच्या समोर असणाऱ्या ५ व्या लेणीकडे याल तेव्हा त्या लेणी बाहेर एक नंदी दिसेल.तो पाहून लेणी मध्ये आलात की एक सुंदर कला तुम्हाला पहायला मिळेल.
*पाचवे लेणे*-
आत दिसणारी मूर्ती पाहिली की समोरून ती माणसाची वाटते तर बाजूने पाहिल्यावर तो नंदी दिसतो.ह्या मूर्तीची विशेषता सांगायचं झालंच तर समोरून दिसणाऱ्या मनुष्यरुपाला दाढी मध्ये खालील बाजूस दोन छिद्र केली आहेत.जेणे करून ती नंदीची नाकपुडी वाटावी.जर एक हाताने मूर्तीचा चेहरा झाकला तर ती नंदीची मूर्ती आहे असे जाणवते.
ह्यालाच *अग्नी वृष* किंवा *अग्नी वृषभ* म्हणतात.
*ऋग्वेदातील चौथ्या मंडलातील ५८ व्या सुक्तातील तिसऱ्या श्लोकात अग्नी वृषभाचे वर्णन आढळते.* ऋग्वेदात एकूण १०मंडल आहेत. त्यातील चौथे मंडल हे अंगीरसऋषी यांनी लिहिले आहे.हे सर्वात कमी सूक्त असणारे मंडल असून ह्यात एकूण ५८ सूक्त आहेत.त्यात जे वर्णन आहे ते असे
*"चत्वारि शर्डंगा,तरयो अस्य* *पादा,दवे शीर्षे,सप्त हस्तासो अस्य ।*
*तरीधा बद्धो वर्षभो,रोरविती महो देवो मत्यार्या आ विवेश ।।*
याचाच अर्थ *अग्नी हा ४ शिंगे,३ पाय,२ डोकी आणि ७ हात असणारा आहे.तो ३ ठिकाणी बांधलेला महादेवांचा वृषभ (नंदीच) आहे.
त्यानुसारच ह्या मुर्तीला ७ हात आहेत ह्यात वेगवेगळी शस्त्र आहेत.यातील एक हात छातीवर असून त्यात कमळाचे फुल आहे.
ह्या मुर्तीच्या मागे देखील २ पट दिसतील त्यावर ३-३ मूर्ती कोरल्या आहेत.पहिल्यांदा पाहिले की चटकन त्या ब्रम्हा,विष्णू,आणि महेशाच्या आहेत असं वाटत.पण ह्या मूर्ती स्त्री रूपातील आहेत.त्या अष्ठमातृका पैकी *ब्राम्ही,वैष्णवी,माहेश्वरी* ह्या आहेत आणि त्या खाली त्यांची वाहने आहेत.जसे ब्रम्हाचे वाहन हंस,विष्णूचे गरुड आणि शंकराचे वाहन नंदी तीच वाहने ह्या स्त्री रुपात असणाऱ्या मूर्ती खाली आहेत.दोन्ही पट सारखेच आहेत पण त्यातील एका पटात वैष्णवी चे वाहन गरुड असताना तिथे त्याऐवजी हनुमानासारखी मूर्ती कोरली असून त्याच बाजूला जैन तीर्थंकार महावीर अथवा ऋषभदेव यांची मूर्ती कोरली आहे.
हे पाहून बाहेर आलात की पुढे दक्षिणेकडे गेलं असता काही पाऊल चाललो की एक छोटं मंदिर दिसतं.त्यात दोन मूर्ती असून स्थानिक लोक त्यांना सटवाई म्हणतात पण ह्या दोन्ही मूर्ती *चामुंडेच्या* आहेत.दोन्ही मूर्ती चार भुजाधारी असून हातात शस्त्र आहेत त्यातील एका मूर्तीच्या हातात कमंडलू आहे.तर दुसऱ्या मुर्तीच्या पायाखाली मनुष्य आहे.हे पाहून तसेच पुढे दक्षिणेकडे चालत आलो की ३ लेण्यांचा समूह असणारे ठिकाण दिसते यालाच *वराडघर* म्हणतात.
*वराडघर*-
पाटेश्वर डोंगरावरील हे शेवटचे आणि अद्भुत लेणं आहे.बाहेर २ दीपमाळ आहेत.ज्या आता थोड्या पडलेल्या अवस्थेत आहेत.पण तरीही त्याची सुबकता तसूभर ही हलली नाही.वराडघरात जाण्याअगोदर बाहेर एक छोटंसं शिवलिंग दिसतं.ते पाहून आत प्रवेश केला की ज्याप्रकारे मुख्य पाटेश्वर मंदिरात सुबक कोरीव नंदी आहे.त्याचप्रकारचा नंदी इथे देखील पहायला मिळतो.तो पाहून आत गेलो की ३ लेणी दिसतील.समोर म्हणजे पश्चिमेकडे एक तर दक्षिण आणि उत्तरेस एक अशा ३ लेणी आहेत.पहिल्यांदा डावीकडील लेणीत प्रवेश केला तर वेगळा आकार,वेगळया संख्या दाखवणारी अशी एकूण ९ शिवलिंग पहायला मिळतील.ह्यातील डावीकडून पुढचे शिवलिंग आणि *मठाच्या बाहेर असणारे शंकराचे दाढीधारी शिवलिंग ह्यात पूर्ण साम्य आहे.वरती जसे वर्णन केले ५१ शक्तिपीठे,१२ शिवलिंगे आणि ४ धाम हाच संदेश यावर पहायला मिळतो* फरक हाच की तिथं शिवलिंगावरील छिद्र धाम दर्शवतात तर इथे चारही मुख्य दिशेला अयोनी शिवलिंग कोरली आहेत.बाकी शिवलिंगावर काहींवर ८ तर काहींवर एका बाजूस ८ आणि दुसऱ्या बाजूस १० अशी संख्या आहे.मग ह्यातून ८ दिशा,आकाश ,पृथ्वी असा काहीसा संदेश असावा असं वाटत.पण इथे अजून एक खूप सुंदर असं शिवलिंग पहायला मिळत जे ह्या लेणीत उजव्या बाजूला पुढेच आहे.म्हणजे लेणीत प्रवेश केला की पहिले हेच शिवलिंग पहायला मिळते.त्यावर ५ अयोनी शिवलिंगांचा छोटा समूह असे एकूण १०९ ( १०*१०=१०० आणि अजून ९ असे १०९) आणि शेवटच्या रांगेत जिथे ५ शिवलिंगांचे ९ समूह आहेत त्या बाजूला एक आणखी अयोनी शिवलिंग आहे.तर ह्या सर्वात मध्ये एक सयोनी शिवलिंग कोरले आहे.पण ह्याचा तसा अर्थ लागत नाही.पण जी १०८ शक्तीपीठ आहेत ती आपण मानली आणि मध्ये असणारे एक सयोनी शिवलिंग आणि त्याच शिवलिंगावर कोपऱ्यात असणारे एक अयोनी शिवलिंग आणि जो ५ शिवलिंगाचा एक समूह उरतो ती पंचमहाभूते असा अर्थ देखील निघू शकतो.
हे लेणे पाहून बाहेर आलात की मधले मुख्य लेणे आहे त्यात जाण्याअगोदर त्याच्या उजव्या कोपऱ्यात २ शिवलिंग पहायला मिळतील.त्यातील एकावर पिंडी ऐवजी २ कुंभ कोरले आहेत.मग त्याचा नक्की काय अर्थ असेल नाही सांगता येत पण पुराणात कुंभाचा संबध हा समुद्र मंथनात येणाऱ्या अमृत आणि विष ह्यातच येतो.आणि त्यातील विषाचा कुंभ भगवान शंकराने पिला होता हाच काय तो संबंध लक्षात येतो.यावरून असाही अंदाज येतो की अमृत आणि विष यापैकी विषाचा कुंभ निवडून तो आपल्या कंठात साठवून ठेवणाऱ्या हे शिवशंकरा तुमच्यामुळे बाकी देवता अमृत प्राशन करू शकली.त्या बाजूस आणखी एक शिवलिंग आहे त्यावर चार दिशेला चार मुख कोरली आहेत.स्थानिक लोकांच्या मते ती *ब्रम्हा,विष्णू,महेश आणि सूर्य यांची प्रतिकं आहेत* तर काहींच्या मते ही शंकराचीच *रौद्र,सौम्य,इंद्रशासित रूप आणि उमेशी म्हणजे पार्वतीशी बोलत असलेलं रूप* अशी ४ रूप आहेत.ती पाहून मुख्य लेणीत आत प्रवेश केला की समोर एक मोठे शिवलिंग पहायला मिळेल.त्यावर लहान अशी एकूण १००० अयोनी शिवलिंगे कोरलेली आहेत.याचा संबंध हा भगवान विष्णुच्या सहस्त्र नावाशी येतो.*विश्वम* ह्या पहिल्या नावापासून ते *सर्वप्रहरणायुध* ह्या हजारव्या नावापर्यंत असणाऱ्या विष्णुसहस्रनाम महात्म्यात भगवान श्रीविष्णूंच्या गुणांचे,रूपांचे,स्वभावाचे सारे वर्णन १०७ श्लोकांत केले आहे.म्हणजे जणू भगवान शंकराचा कोप शांत करण्यासाठी भगवान विष्णुची सारी नावे,रूपे पिंडीला अर्पण केली आहेत.पिंडीच्या बरोबर समोरील भिंतीत विष्णुसहस्रनामपट कोरला आहे ह्या पटावर १००० अयोनी प्रकारची शिवलिंग कोरली असून त्यावर भालचंद्र शिव,विष्णू आणि ब्रम्हा ह्या मूर्ती देखील कोरल्या आहेत.तर उजव्या बाजूस असणाऱ्या भिंतीत सुर्यसहस्रनामपट आहे.डाव्या बाजूस भिंतीमध्ये पार्वतीपट आहे त्यावर एकूण ९७२ अयोनी शिवलिंग कोरली आहेत.आता देवी पार्वती आणि ९७२ ह्या संख्येचे काही अर्थ जोडत गेलो की लक्षात येत देवी भागवतपुराण नुसार एकूण १०८ शक्तीपीठं आहेत मग ह्या १०८ शक्तीपीठांना ९ वेळा प्रदक्षिणा घातली असता मिळणारी संख्या ही ९७२ येते.यापटावर देवी पार्वतीची कोरलेली सुबक मूर्ती देखील आपल्याला पहायला मिळते.हे सारं पाहिले की तिथे खाली अजून एक पट दिसतो की जो विष्णू पटाच्या खाली जमिनीवर मांडलेला आहे.यावर *अष्टमातृका* कोरल्या आहेत.त्यांची नावे *ब्राम्ही,वैष्णवी,माहेश्वरी,इंद्राणी,कौमारी,वारही,चामुंडा आणि प्रत्यंगिरादेवी* अशी आहेत.बऱ्यापैकी सगळीकडे सप्तमातृका असतात पण देशात फार कमी ठिकाणी अशा अष्टमातृका पहायला मिळतात.हे सारं पाहून झालं की तिथं असणाऱ्या दोन्ही स्तंभावर नीट पाहिले तर शिवदंड दिसतात. त्यातील एक शिवदंड नागमोडी असल्याने तो सर्प कोरला आहे की काय असा संभ्रम होतो.ह्या शिवदंडांच्या बाजूला स्तंभावर देखील अयोनी प्रकारची शिवलिंग कोरलेली आहेत आणि दंडांवर देवनागरी लिपीत काहीतरी लिहलेलं आहे.पण ते पुसट झाल्याने नीट दिसून येत नाही. तसेच आपल्याला विष्णुपटाच्या उजव्या बाजूस ब्रह्मदेवाची मूर्ती पहायला मिळते.यावरून हे काम इ.स पूर्व ५०० वर्षामागील असावे असाही अंदाज आपण लावू शकतो. कारण त्यानंतरच्या काळात ब्रह्मदेवांची कुठे मंदिरे बांधली गेली नाहीत किंवा सध्याही त्यांची पूजा केली जात नाही.पण त्यापूर्वी ब्रम्हदेवांची पूजा केली जात होती.ह्या लेणीतील एका स्तंभावर काही लिखाण ही दिसते पण काळाच्या ओघात तेही पूर्ण पुसट झालेलं आहे.वऱ्हाडघरातील हे मुख्य लेणे पाहून आपण उत्तरेकडील असणाऱ्या तिसऱ्या लेण्यात( मुख्य लेण्याच्या उजवीकडील लेणे) गेलो की तिथेही छोट्या मोठ्या आकारातील शिवलिंगे आपल्याला पहायला मिळतील.यावर ही पंचमहाभूते,दिशा असे संकेत कोरलेले दिसून येतात.
अशाप्रकारे पाटेश्वर वरील मरगळ म्हशीचे लेणे,बळीभद्र लेणे,वऱ्हाडघर ही ठिकाणे,कार्तिक स्वामी मंदिर आणि मुख्य पाटेश्वर मंदिर हे सारं पाहिलं की ही सारी कलाकुसर कोण्या एका काळात बनली नसुन इथं बरीच वर्षे,वेगवेगळ्या काळात थोडी थोडी काम होत गेली हे समजत.
आख्यायिका, वेगवेगळ्या पुराणातील वेगळे संदर्भ यानुसार कुठे १०८ तर कुठे ५१ असा तर्क लावून आपआपल्या मतांनुसार ही कोरीव काम केली आहेत.आपणही ही पाहताना असे सारे संदर्भ गृहीत धरून जर व्यवस्थित सारा परिसर पाहिला तर नक्कीच मनाला मिळणारा आनंद हा विलक्षण असेल.
खरं तर ह्या साऱ्या लिखाणात बऱ्याच चुकाही असतील आणि हेच तर मलाही दुर्दैव वाटत की एवढया सुंदर कलाकृतीच वर्णन मला अंदाज लावून करावं लागतेय.यावरच काही परखड मतं मला मांडायची आहेत.जी बऱ्याच जणांना पटणार नाहीत.पण त्या लिखाणात मला कोणाला दुखावणे हा हेतू नाही.तर इतिहास जागृती व्हावी, संशोधन व्हावं,जाणकार लोकांनी पुढाकार घेऊन एक जागृती मोहीम हाती व्हावी ह्याच उद्देशाने मी काही मत मांडत आहे ती आपण तिसऱ्या भागात पाहू
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध…ट्रेक नंबर १७…पाटेश्वर भाग २ मधील उपभाग १
*ट्रेक नंबर १७*
*पाटेश्वर भाग २*
*उपभाग क्रमांक १*
१२ आणि २६ डिसेंबर २०२१
*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*
*भाग ३ - पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*
ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.
*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास*
*उपभाग क्रमांक १*
पहिल्या भागात आपण पाटेश्वर मंदिर आणि इतर लेण्यांत जाण्याचा मार्ग आणि तिथे असणाऱ्या देवतांची नावे पाहिली.पण ह्या भागात मी शिवलिंगाचे प्रकार, त्यावर असणाऱ्या आकृतींचे अर्थ,मूर्तींचा इतिहास, कालखंड,आख्यायिका यावर लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.ह्यात माझे काही अंदाज चुकीचे असतीलही.पण जेवढं काही समजलं आहे ते तूमच्या पर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत आहे.
देवदेवतांच्या काही गोष्टींचा इतिहास सांगण्याआधी गरजेचं असतं ते त्या संदर्भात असणारी आख्यायिका जाणून घेणं.कारण इथं त्या कारागिरांनी जी शिल्प बनवली आहेत त्यातून खूप काही सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे हे स्पष्ट समजते आहे.
*आख्यायिका*
ब्रम्हपुत्र...प्रजापती राजा दक्ष ह्यांना २ पत्नी होत्या प्रसूती आणि विरणी.त्यातील देवी प्रसूतींना २४ मुली आणि देवी विरणी ह्यांना ६०मुली झाल्या.सर्व मुलींचे विवाह हे चांगल्या श्रीमंत घराण्यात,तसेच काहींचा विवाह योगऋषींसोबत झाला.पण एकमेव पुत्री सती यांनी दक्ष राजाच्या विरोधात भगवान शंकर यांच्या सोबत लग्न केले होते.
सर्व मुली मनाप्रमाणे विवाह करून गेल्याने आणि सर्वजणी खूप ऐश्वर्यात असल्याने राजा दक्ष खुश होते.पण सतीने मनाविरुद्ध एका वैराग्यासोबत केलेलं लग्न त्यांना पसंत न्हवते.त्यांनी एक यज्ञ *कनखल(गंगाद्वार/हरिद्वार)* इथे आयोजित केला आणि त्यात सर्वपुत्री आणि जावई तसेच इतर देवदेवता यांना आमंत्रित केले.पण सती आणि भगवान शंकर यांना बोलावले न्हवते.पण सगळ्या बहिणी आल्या आहेत आणि त्यांना ही भेटावं ह्या हेतूने देवी सती यांनी भोलेनाथ जाऊ नको म्हणत असताना ही त्या यज्ञासाठी गेल्या.पण तिथे राजा दक्ष यांनी देवी सतींचा अपमान केला.भगवान शंकरांबद्दल अपशब्द वापरले.पतीचा अपमान सहन करून जगणे म्हणजे महापाप हा विचार मनात आला आणि देवी सती यांनी त्याच यज्ञकुंडात स्वतःला झोकून दिले आणि देहत्याग केला.
भगवान शंकरांना हे समजल्यावर त्यांना क्रोध सहन झाला नाही त्यांनी आपल्या जठेतून *वीरभद्र* ह्यांना प्रकट केले आणि राजा दक्ष ह्यांना मारण्यास धाडले.भोलेनाथांचा क्रोध पाहून आधीच सर्व देवदेवता घाबरले होते.वीरभद्राने दक्ष राजांचे मस्तक उडवले.पण पत्नीचा असा अंत पाहून भोलेनाथांचा क्रोध शांत होत न्हवता.देवी सतींचा मृतदेह घेऊन शिवशंकर क्रोध आणि व्याकूळता ह्या भावनेने पूर्ण वेडे झाले होते.त्यांना शांत करण्यासाठी देवदेवतांनी खूप प्रयत्न केले होते.तो देह असाच घेऊन बसले तर पुढे सृष्टी कशी चालणार ह्या विचाराने भगवान विष्णू यांनी आपले सुदर्शन चक्र सोडले आणि देवी सतींच्या देहाचे तुकडे करणे सुरू केले.त्या देहाचे तुकडे जिथे जिथे पडले तिथे शक्तीपीठं तयार झाली असं म्हणतात.आता त्यातही देवी भागवत नुसार १०८ ,देवी गीता नुसार ७२ ,तंत्र चुडामनी नुसार ५२ तर देवी पुराणानुसार ५१ शक्तीपीठं आहेत.
जेव्हा दक्ष राजाचे डोके उडवले गेले त्यांनतर बऱ्याच देवदेवतांनी विनवणी करून दक्ष राजाला जिवंत करायला लावले तेव्हा एका बकऱ्याचे डोके बसवून दक्ष राजाला जिवंत केले गेले.तेव्हा पासून दक्ष राजाला *अजमुख* सुद्धा म्हणले जाते.
हा तर ह्या आख्यायिकेचा पाटेश्वर मध्ये काय संबंध असा प्रश्न नक्कीच आपल्याला पडत असेल.तर त्यावर आता बोलू.
पाटेश्वरवर असणारी शिवलिंगे ही कोण्या एका काळात बनली नाहीत.तिथे असणारी ब्रम्ह मूर्ती पाहून लक्षात येते की हे काम इ.सन पूर्व ५०० वर्ष असेल.तर तिथे असणारी गणेश मूर्ती पाहून लक्षात येते की हे काम ७व्या शतकानंतर चे असेल.कारण *ललित माधव* मध्ये गणपती बद्दल ७व्या शतकात जास्त लिखाण दिसते.इथे पहायला मिळणारे पाटेश्वर मंदिर,विश्वेश्वर पुष्करणी यांची रचना १८ व्या शतकात छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्या काळात *परशुराम नारायण अनगळ* या सावकारांनी केलेली दिसते.त्यामुळे पाटेश्वर संदर्भात आपण निश्चित एक कालखंड नाही ठरवू शकत.पण तिथे वर्षानुवर्षे होत असलेलं हे शिवमहात्म्याचं काम निश्चितच उल्लेखनीय आहे.
इ.स.पूर्व काळात कोणती लेखी भाषा जास्त अवगत न्हवती त्यामुळे बरंच लिखाण हे मूर्तीरूपात केलं जायचं.मूर्तीरूपात केलेलं उत्तम लिखाण यासाठी अजंठा वेरूळ लेणी हे उत्तम उदाहरण ठरेल.तर असंच वेगळ्या आकाराची शिवलिंग पाटेश्वरमध्ये आकारून त्यातूनही शिवमहिमा सांगितला आहे.
मी मला ज्याप्रकारे समजले,जे काही वाचले,जे संदर्भ लागले त्यानुसार सुरुवातीला दिसणारी गणेश मूर्ती ते शेवटी वराडघरात असणारी अप्रतिम शिवलिंगं यांचे अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतोय.
देगाव मार्गे वरती आलो की सुरुवातीला एक गेट दिसते.तिथून आत आला की दर्शन होते श्रीगणेशाचे.
*श्रीगणेश*-
पाषणात कोरलेल्या ह्या मूर्तीला अलीकडे भगवा रंग दिला आहे.ह्या श्री गणेशाच्या मूर्तीच्या दोन्ही बाजुला दोन देवी दिसतात त्या पाहून आपला समज हा होतो की त्या गणेशाच्या पत्नी रिद्धी आणि सिद्धी आहेत.पण ते तसे नाही हे तुम्ही मूर्ती नीट पाहिल्या की लगेच लक्षात येईल.गणेश मूर्तीच्या डाव्या बाजुस असणारी स्त्रीरुपी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या डाव्या हातात चामर तर उजव्या हातात छत्र असलेलं दिसेल.आणि ह्या दोन मूर्ती एका पाषणात कोरल्या आहेत.तर गणेशाच्या डाव्या बाजूस असणाऱ्या स्त्री मूर्ती शेजारी एक लहान मूल देखील दिसते.त्या स्त्री मूर्तीच्या हातात दंड दिसतो.आणि नीट निरखून पाहिले की लक्षात येते की ही मूर्ती आणि गणेशाची मूर्ती ह्या भिन्न पाषणात आहेत.*(२ वेगळ्या दगडात मूर्ती आहेत.श्रीगणेश आणि एक स्त्री मूर्ती एका पाषाणात आणि दुसरी स्त्री मूर्ती आणि लहान मूल दुसऱ्या पाषाणात)* यावरून हा अंदाज लावू शकता की तिथे ही दुसरी मूर्ती नंतर उभारली आहे.जर ह्या रिद्धी सिद्धी आहेत असा उल्लेख कारागिराला करायचा असता तर एकाच पाषणात हे दृश्य कोरले गेले असते.आणि हातात चामर,छत्री,दंड हे दाखवले नसते.तसेच श्रीगणेशाची मूल दाखवायची असती तर २ लहान मुलं कोरली गेली असती.कारण *शुभ आणि लाभ* ही गणपतीची २ मूल.आणि दोन पत्नी बाजूस असत्या तर ही दोन मुलं गणेशाच्या मांडीवर अथवा त्यांच्या पायाजवळ असती.असा माझा अंदाज आहे.
त्यामुळे मी म्हणेन श्री गणेश आपल्या वडिलांना म्हणजे भगवान शंकराला भेटीसाठी वरती येत आहेत. येताना सोबत दासी आहे जी छत्र आणि चामर घेऊन सोबत आहे.आणि नंतर दुसरी स्त्री तिथे जोडली आहे.ज्यामुळे रिद्धी ,सिद्धी असा भ्रम निर्माण होत आहे.
श्रीगणेशाचे दर्शन घेऊन पुढे आलात की साधारण १५ ते २० मिनिट चालावं लागतं.आणि मग दिसते *विश्वेश्वर पुष्करणी*
*विश्वेश्वर पुष्करणी*-
एक सुंदर तलाव ज्यात तुम्हाला छान कमळं उमललेली दिसतील(उन्हळ्यात पाणी नसल्याने पावसाळा आणि हिवाळा हे दृश्य पाहण्यास उत्तम).ह्या तळ्याची रचना ही १८व्या शतकातील असणार.तळ्याचा औरस चौरस आकार, बांधणी,चौकोनी दगड एकत्र बांधायला चुन्याचा वापर,यावरून हे काम अलीकडच्या काळातील आहे हे लक्षात येतं.त्यामध्ये दक्षिणेच्या बाजूला शंकराची आणि बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली दिसते.जे मी वाचले होते त्यानूसार तिथं असणाऱ्या शंकराच्या मुर्तीला एक पाय आहे त्यामुळे तिला *अज एकपाद* असं म्हणतात असं समजलं.म्हणून मी जवळ जाऊन तिथला फोटो घेण्याचा प्रयत्न केला.पण पाणी जास्त असल्याने नीट तिथे उतरणे जमले नाही.पण मी जो व्हिडिओ पाठवला आहे त्यात नक्की पहा की मूर्तीचे दोन्ही पाय दिसत आहेत.हातात बहुतेक तलवार असावी असे दिसते आहे.मग नक्की ही मूर्ती शंकराची कशी असेल असं मला वाटतं.पण बाजूला असणाऱ्या मूर्तीकडे पाहून ती गणेशाची आहे हे लगेच समजते.हे पाहून झालं की पुढे मठाच्या दिशेने न जाता तळ्याच्या अलीकडे(उत्तर दिशेला) थोडं वरती चढून जायचे.थोडी अडचण असल्याने आणि वाट बंद केली असल्याने तिथं जाणे सहसा टाळले जाते.पण तरीही तुम्ही तिथं गेलात तर तुम्हाला पहायला मिळेल *मरगळ म्हशीचे लेणे* गुडघाभर शेवाळलेल्या पाण्यातून थोडे चालत गेलं की उजवीकडे असणाऱ्या दगडी बांधीव गुहेत जायचं.अंधार असल्याने सोबत उजेडासाठी बॅटरी असणं उत्तम.
*मरगळ म्हशीचे लेणे*-
हे नाव ऐकून जरा वेगळं वाटतं आणि समजत नाही नक्की असं का म्हणले जात असेल.पण थोड्या अडचणीच्या भागातून वाट काढत तुम्ही दगडांनी बांधलेल्या ह्या गुहेत पोहोचला की लक्षात येतं की किती सुंदर कलाकृती तुमच्या नजरेसमोर आहेत.आत प्रवेश केला की डाव्या बाजूच्या भिंतीवर छोट्या अशा एकुण ५ शिवलिंगाचा पट तुम्हाला पहायला मिळेल.ही पाच शिवलिंगे आपली पंचमहाभूते *( पृथ्वी, आप(पाणी),अग्नी,वायु,आकाश)* यांचं प्रतीक मानले जातात.तसेच पुढे गेलो की जमिनीवर ३ शिवलिंग दिसतात.ते पाहून लेण्याच्या उजव्या बाजूला खाली जमिनीवर पाहिले तर जवळ जवळ लागुन अशी अजून एकुण ३ शिवलिंगे तुम्हाला दिसतील.त्यातील पहिले शिवलिंग हे आजवर कुठे न पाहिलेलं असावं असं आहे.सयोनी प्रकारचं हे शिवलिंग असून त्यावर मध्यभागी म्हैशीचा आकार कोरून आणि त्यावर पिंडीचा आकार बनवला आहे.त्यामुळं ह्या लेण्याला मरगळ म्हशीचं लेणं असंही म्हणतात.पण वाचनात आलेल्या गोष्टींवरून भगवान शंकराच्या इतिहासात आणि कोणत्याही आख्यायिकेमध्ये म्हैशीचा उल्लेख मला कुठं आढळून आला नाही.मग नक्की हा नंदी असावा आणि त्याचं जे वशिंड आहे त्यालाच शिवलिंग केलेलं असावं असं मला वाटतं.कारण ह्या लेणी मध्ये नंदिकेश्वर आहे असंही म्हणलं जातं.मग नक्की ह्या शिवलिंगालाच *नंदिकेश्वर* म्हणले जात असावं.
त्याच शिवलिंगाच्या बाजूला एक आणखी सयोनी प्रकारचं शिवलिंग आहे आणि त्यावर बरोबर ६८ अयोनी प्रकारची शिवलिंगे कोरलेली आहेत. पिंडीच्या मध्यभागी एक उंच दंड गोलाकार कोरला असून ८ अयोनी प्रकारच्या शिवलिंगाची माळ अशा एकूण ८ माळा ( एकूण ६४) त्या मध्यभागी असणाऱ्या दंडगोलाकार भागाकडे चढत्या क्रमाने आहेत.तर शिवलिंगावर पूर्वेस २ तर पश्चिमेस २ अशी एकूण ६८ अयोनी शिवलिंग कोरलेली दिसतात.
मग ६८ च का असा विचार करत असता माझ्या वाचनात एक गोष्ट आली की ही तर तीर्थ स्थानांची संख्या आहे.मग नक्की ह्या ६८ तिर्थांना भगवान शिव यांच्या पुढे वाहणे हा तर कारागिराचा हेतू नसावा असा मनात विचार आला.आणि असा विचार येण्यामागे अजून एक कारण तिथे आणखी एक शिवलिंग आहे त्यावर ६८च शिवलिंगे कोरली आहेत.
हे अद्भुत शिवलिंग पाहिले की त्या बाजूला अजून एक शिवलिंग दिसते.*(सध्या ह्या लेणीत गुडघाभर पाणी असल्याने आणि अंधार फार असल्याने शिवलिंगे जास्त स्पष्ट दिसत नाहीत)* हे सारं पाहून बाहेर आलात की विश्वेश्वर पुष्करणी पासून पुढे यायचं.मठाच्या बाजूने वरती आलात की पायरीवरून थोडं पुढं आलात की मध्येच दोन शिवलिंग दिसतात.
*अयोनी आणि सयोनी प्रकारची २ शिवलिंगे* -
पायरी चढून पाटेश्वर मंदिराच्या दिशेने जाताना एका कोपऱ्यात असणारी ही २ शिवलिंगे भाविकांच्या नजरेतुन सुटतात कारण ती कोपऱ्यात आहेत.पण खरंच तुम्ही ती नीट पहावीत असं मला वाटत.कारण त्यातील सयोनी प्रकारचे जे शिवलिंग आहे *( सयोनी म्हणजे पूर्ण शिवलिंगाचा आकार असलेली पिंड तर अयोनी म्हणजे फक्त उभे जे पिंड दिसते ते शिवलिंग)* त्यावर एकाच दगडात एका ओळीत ९ अशी रेखीव एकूण ६८ शिवलिंगे कोरलेली आहेत.मग आपल्या लक्षात येतं की मरगळ म्हशीच्या लेण्यात असणारं शिवलिंग जे अयोनी प्रकारचं आहे आणि हे जे सयोनी प्रकारचं आहे.यावर मिळून जर पाहिलं तर ६८च संख्या येते .याचाच अर्थ ही ६८ तीर्थक्षेत्र भगवान शिवाला वाहिली आहेत असा मी अर्थ घेतला.
तर त्याच शिवलिंगाशेजारी असणारे एक अयोनी शिवलिंग आपल्याला दिसते.त्यात मध्यभागी असणाऱ्या शिवलिंगावर शंकराची दाढी आणि मिशा असणारी मूर्ती कोरली आहे.आणि बाजूने असणारी शिवलिंगे ही विशिष्ट प्रकारे कोरली आहेत.आणि ती संख्या मोजली तर ६७ भरते.मग थोडा अंदाज लावणे अवघड होते.पण मी हे शिवलिंग मुद्दाम जास्त वेळ पाहिले.त्याचा फोटो घेऊन बराच वेळ त्या रचनेवरून अंदाज लावण्याचा प्रयत्न केला.काही गोष्टी वाचून पाहिल्या तेव्हा कुठे एक अंदाज बांधण्यात यश आलं.कदाचित ते चूक असू शकेल.पण माझे मत मी मांडतो.
ह्या शिवलिंगावर मध्यभागी असणाऱ्या शिवलिंगावर शंकराची मूर्ती असनु पूर्व ,पश्चिम,दक्षिण आणि उत्तर अशा चार बाजूने ८ -८ अशी एकूण ३२ शिवलिंगे आहेत.त्याच्या आतील बाजूस आग्नेय ,नैऋत्य, वायव्य आणि ईशान्य अशी २ -२ शिवलिंगे एकमेकांस चिकटून अशी आहेत.त्यात नीट पाहिले की लक्षात येतं की सगळी शिवलिंगे जोडून आहेत पण नैऋत्येस असणारी शिवलिंगे ह्यात अंतर आहे.तसेच बाहेर असणारी शिवलिंगाची संख्या २७ आहे *(३२ + २७ + ८ =६७)* पण ह्या पिंडीवर आणखी एक वेगळा संकेत दिसतो तो म्हणजे पिंडीवर मुख्य चार दिशेला(पूर्व, पश्चिम,दक्षिण,उत्तर) छोटी छिद्र कोरली आहेत.आता तसं पाहिलं तर काहीच लक्षात येत नाही.फक्त कारागिराच कौतुक करावं आणि पुढे जावं यापलीकडे काहीच समजत नाही.पण ती ४ छिद्र, नैऋत्येस असणाऱ्या शिवलिंगात अंतर,३२ शिवलिंगाची चौकोनी माळ,त्या बाहेर असणाऱया २७ची विशिष्ट रचना *( उत्तरेस ८ ,दक्षिणेस २, पूर्वेस ८,पश्चिमेस ५ तर आग्नेय,नैऋत्य, वायव्य ,ईशान्य ह्या चारी दिशेस १-१ असे ४ आणि सर्व मिळून २७)*
तर आता ह्या साऱ्याचा विस्तार पाहू.आपण आख्यायिका वाचली आहेच.त्यानुसार जेव्हा देवी सतीचा देह घेऊन भगवान शिव फिरत होते तेव्हा भगवान विष्णू आपल्या सुदर्शनाने त्या देहाचे तुकडे करत होते.आणि जिथे जिथे हे तुकडे पडले तिथे शक्तीपीठं तयार झाली.अशी एकूण १०८ शक्तीपीठ आहेत.तर सर्वमान्य अशी एकूण ५१ शक्तिपीठं आहेत.तर १२ ज्योतिर्लिंग ही सर्वांना माहीत असून आणि ४ मुख्य दिशेस एक असे एकूण ४ धाम आहेत.आता ह्या साऱ्या ठिकाणांचा आणि ह्या शिवलिंगाचा संबंध जोडू.
शिवलिंगावर कोरलेली शिवाची मूर्ती दाढी मिशा असणारी आहे.म्हणजे देवी सतीच्या विरहात बुडालेले वैरागी शिव असा अर्थ आपण लावू.उत्तरेस असणारी ८ शिवलिंगे याला लागुनच वायव्य आणि इशान्येचं शिवलिंग आहे.अशी सलग १० अशी साखळी उत्तरेस दिसते तर दक्षिणेस २ शिवलिंग आहेत.आणि हे मिळवले तर बरोबर १२ ही ज्योतिर्लिंगाची संख्या होते.सर्वात महत्वाचं म्हणजे ४ धाम *( पूर्वेस- जगन्नाथपुरी,पश्चिमेस- द्वारका, उत्तरेस- बद्रीनाथ तर दक्षिणेस-रामेश्वरम)* म्हणजेच
*शिवलिंगावर असणारी ४ छिद्र ही ह्या चार धामाचे प्रतीक आहेत*
आता प्रश्न राहतो ते ह्या ६७ शिवलिंगांचा तर भगवान शिवाचे प्रतीक असणारी १२ ज्योतिर्लिंग आणि देवी सतीचे प्रतीक असणारी ५१ शक्तीपीठं अशी मिळून संख्या ६३ होते.तर आपण नीट बारकाईने पाहिले तर समजते ४ उपदिशांना जोडुन अशी ८ शिवलिंग आहेत.याचा अर्थ ते शिव आणि सती यांचं प्रतीक आहेत( शक्तीपीठ आणि ज्योतिर्लिंग) आणि नैऋत्येस दोन्हीत अंतर आहे यावरून शिव आणि सतीची ताटातूट दिसते.म्हणजे आतील ८ शिवलिंगे ही दोघांचं मिळून एक अशी जर मोजली तर ८ ऐवजी ४ अशी होतील.मग ही संख्या ६७ ऐवजी ६३ होईल आणि मग समजेल की हे शिवलिंग म्हणजे *शक्तीपीठ, ज्योतिर्लिंग आणि धाम* याचं प्रतीक आहे.याची कोपऱ्यात असणारी अवस्था यावर आपण तिसऱ्या भागात बोलू.
तर आपण ह्या दोन्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊन पायरी वरून जाताना १८व्या शतकात बांधलेल्या ह्या पायरी आणि बाजूने असणाऱ्या भिंतीमध्ये ८व्या ते १०व्या शतकांतील पिंडी आणि मूर्ती पाहत आपण मुख्य पाटेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ येतो.
*पाटेश्वर मंदिर आणि परिसर*-
मुख्य प्रवेशद्वार उंचीने खूप लहान असून आत वाकून प्रवेश करावा लागतो.पण त्यापूर्वी द्वाराच्या डाव्या बाजूस पाहिले तर आपल्याला सुबक असे साधारण ४ फूट उंचीचे शिवलिंग पहायला मिळेल.तर द्वाराच्या उजव्या बाजूस भिंतीत आतल्या बाजूस हनुमानाची मूर्ती पहायला मिळेल.ती पाहून बाहेर आलात तर एक सूंदर असे मानवरूपातील गरुडाचे शिल्प तुम्हाला पहायला मिळेल.
गरुड हे भगवान विष्णूचे वाहन पण भगवान शंकराचा वैरी.*( सर्प हे शंकराचे वाहन तर तेच गरुडाचे खाद्य)* पण इथे तुम्ही पाहू शकता गरुडाने दोन्ही हात जोडले आहेत आणि डोळे बंद केले आहेत.पायाखाली असणारा सर्प गरुडाने सोडलेला आहे.याचा अर्थ मी त्या आख्यायिकेशी जोडला.
जेव्हा देवी सतीचे निर्जीव शरीर पाहिले तेव्हा भगवान शिव कोपले होते.तेव्हा त्यांना शांत करायला सगळे देवदेवता प्रयत्न करत होते.त्याच वेळी जन्मजन्मांतरीचा वैरी असणारा हा गरुड देखील नतमस्तक झाला होता हेच ह्या शिल्पातून कारागिराला दाखवायचं आहे असं मला वाटतं.त्याच शिल्पाच्या बाजूला एकाच दगडात शिवलिंग,पंच महाभूते,मत्स्य आणि सुदर्शन कोरलेले आहे.त्यावर मी एक अंदाज बांधला आहे तो सांगतो
*ह्यातून जणू भगवान विष्णू शंकराला सांगत आहेत.हे देवादीदेवा महेश्वरा मी मत्स्य अवतार घेऊन ह्या पृथ्वीवर असणाऱ्या जीवांना महाप्रलयातून वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले.पण तरीही प्रत्येक जीवाला एक ना एक दिवस ह्या पंचतत्वात विलीन व्हायचं आहे.देवी सतींचा देह असा घेऊन फिरणे हे योग्य नाही.म्हणून मी ह्या सुदर्शनानाने त्यांचे भाग केले.देवी आता ह्या पंचतत्वात विलीन झाल्या आहेत.मी तुम्हापुढे नतमस्तक होतो पण तुम्ही शांत व्हा*
असा अंदाज लावून तुम्ही त्या मागे असणाऱ्या चाफ्याखाली असणाऱ्या छोट्या मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घेऊन.पुन्हा मुख्य प्रवेशद्वाराकडे यावे.पुढील माहिती उपभाग २ मध्ये पाहू
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध….ट्रेक नंबर १७……पाटेश्वर भाग १
*ट्रेक नंबर १७*
*पाटेश्वर भाग १*
१२ आणि २६ डिसेंबर २०२१
*भाग १- प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
*भाग २ - आख्यायिका आणि इतिहास (उपभाग १ आणि २)*
*भाग ३ - पाटेश्वर इतिहास जागृती आवाहन,संशोधन, प्रसार आणि प्रसिद्धी*
ह्या ३ भागात असलेलं लिखाण तुम्हाला हवी तेवढीच माहिती वाचून आपला वेळ वाचावा ह्यासाठी केलेलं आहे.ऐतिहासिक वारसा हा काही ठिकाणी फक्त पुजण्यासाठी तर काही ठिकाणी फक्त झिजण्यासाठी असलेला दिसतोय.हा अनमोल ठेवा योग्यरीत्या जपण्यासाठी आहे.तो पुढच्या पिढीला फक्त वाचून न्हवे पाहून समजायला हवा.त्यासाठी संवर्धन आणि संशोधन दोन्ही हवंय.
*पायी रुतेल जीवघेणा काटा*
*अंगावर येतील विरोधांच्या असंख्य लाटा*
*परी ध्येयास कधी न फुटो फाटा*
*मिळून शोधू भविष्याच्या सुंदर नव्या वाटा*
*जपलं तरच राहणार,खुपलं तर काय होणार*
*भुतलाचे पाहुणे आपण आज आहोत उद्या नसणार*
*जगलो फक्त धुंदीत आपल्या तर पुढची पिढी काय पाहणार*
*म्हणून आजच होऊ दक्ष, देऊ संवर्धनावर लक्ष*
*हे कार्य तुझे न माझे हे कार्य ईश्वराचे*
*साता समुद्रापार घुमावे नाव पाटेश्वराचे*
*भाग १ - प्रवासवर्णन आणि वैयक्तिक मते*
आपल्या साताऱ्यापासून अगदी १४ - १५ किमी अंतरावर असणाऱ्या देगाव गावातून वरती जाणाऱ्या रस्त्याने आपण पोहोचतो ते पाटेश्वर ह्या मनाला भुरळ घालणाऱ्या आणि अचंबीत करणाऱ्या ठिकाणी.
वयाची बत्तीशी पार केल्यावर अशा सुंदर जागी येण्याचा योग जुळून आला.खर तर अशी सुंदर जागा ह्याची देही ह्याची डोळी पहायला मिळालं हे जेवढं भाग्य म्हणावं तेवढंच इथे यायला एवढी वर्ष लागली हे दुर्दैव म्हणावं लागेल.
सहज कोणाला पाटेश्वर बोलताना ऐकतो तेव्हा कानी शब्द पडतात " आर बघलं तिकडं नुसत्या पिंडी हायतं,लय पिंडी हायतं,बारक्या मोठ्या लय हाईत" आता मला सांगा हे ऐकल्यावर डोळ्यासमोर काय येणार....
साहजिकच माझ्या मनात हीच कल्पना होती की खडकाळ भाग असेल त्यात साध्या पिंडी कोरल्या असतील.पण हा किती मोठा गैरसमज होता हे तिथे पाऊल ठेवल्यावर लक्षात येतं.त्यामुळं आजचं माझं बोलणं काहींना पटेल किंवा काहींना रागही येईल.पण ह्यात मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत.मला ह्यातून निव्वळ एकच गोष्ट सांगायची आहे की आपल्या साताऱ्यातुन एवढया जवळ असणाऱ्या ह्या अनमोल खजान्याची माहिती सर्वांपर्यंत योग्यप्रकारे पोहोचावी.हया कलेला नुसत्या पिंडीचे स्थान असे म्हणून तिचा प्रचार करणे म्हणजे ह्या अप्रतिम कलेचा निव्वळ अपमान आहे असं मी म्हणेन.
मी सुध्दा पहिल्यांदा १२ डिसेंबर ला डॉ प्रवीण जाधव आणि त्यांचे मित्र डॉ नितीन व्हरे,डॉ मिलिंद शिंदे ह्यांच्या सोबत गेलो तेव्हा नव्याने हे सारे पाहताना काहीच समजत न्हवते.फक्त सुंदर कलाकृती नजरेत साठवत होतो.आणि त्याचवेळी आमचे मित्र धनंजय कणसे ह्यांनी पाटेश्वर संदर्भात असलेली दक्ष राजाची आख्यायिका सांगितली.अगदी सुंदर असणारी ही कहाणी ऐकून मनाला थोडा आनंद भेटत होता की काही तरी माहिती हाती लागतेय हेच छान.पण का कोणास ठाऊक त्या साऱ्या सुबक शिवलिंगांना पाहून मनात अनके प्रश्न ऊभे राहिले होते.लवकर माघारी जावे लागणार होते.त्यामुळे ह्या साऱ्या प्रश्नांना तसेच मनात ठेवून परतीचा प्रवास झाला.
पुढचा आठवडा चकदेव,पर्वत राहता ट्रेक असल्याने पाटेश्वरला येणं लांबणार होतं.पण शेवटी २६ डिसेंबर हा दिवस पुन्हा नव्याने पाटेश्वरकडे घेऊन आला.ह्यावेळी माझ्यासोबत थोडी माहिती होती जी मी इंटरनेटवर वाचून मिळवली होती.
कोणत्या लेण्यांना काय नाव,कोणत्या मूर्तीचा काय अर्थ,ती कशाचे प्रतीक हे सारं तुम्हाला विकिपीडियावर वाचायला मिळेल.
पण मला हवे होते काही गोष्टींचे अर्थ आणि संदर्भ जे कुठे मिळत न्हवते.काही ओळखीच्या जाणकार लोकांकडून देखील थोडी बहुत माहिती मला मिळत गेली.पण खरंच दुर्दैव आहे आपले की योग्य आणि संपूर्ण माहिती मला कुठेही मिळू शकली नाही.
त्यामुळे मी लिहिताना आपली क्षमा मागून सुरुवात करतोय.कारण मी जे लिहीत आहे ह्याला विकिपीडिया आणि ती शिवलिंग पाहून त्यावर असणारी संख्या ह्यावर शोध घेत आणि अंदाज लावत मी आज पुढे लिहिणार आहे.हा लेख वाचून नक्की कोणी जाणकार असेल त्यासोबत पुन्हा नव्याने इथे येण्यास आणि जे काही बदल लेखात करावे लागतील ते करून जास्तीत जास्त योग्य माहिती आपणा सर्वांसमोर आणण्यास मी कायम तयार असेन.कारण गेली १ वर्ष साताऱ्यात फिरत असताना बरेच गडकोट,मंदिरे पाहिली गेली आहेत.पण आजवर कुठेच अशी शिल्प शृंखला पाहिली नाही.आज आपल्याकडे लिहायला,बोलायला अनेक माध्यमं आहेत.पण त्याकाळी कारागिरांनी देवतांच्या इतिहासाला ज्याप्रकारे शिल्परूपात मांडायचा प्रयत्न केला आहे तो उल्लेखनीय आणि अविश्वसनीयच म्हणावा लागले.
साताऱ्यातून देगावकडे येताना...अजंठा चौक...देगाव फाटा...अमरलक्ष्मी चौक...चंदननगर...कारंडवाडी...देगाव असा प्रवास करत आलात की उजवीकडे डोंगराकडे जाणारी एक पाटेश्वर कमान दिसते त्यातुन पुढे आलात की असणारा डांबरी रस्ता हा सरळ पाटेश्वर डोंगरावर येतो.काही अंतर अलीकडे आपल्या गाड्या लावून पायी थोडे चालत गेलात की गेट दिसते.कोरोनाच्या वातावरणामुळे सध्या वेळ सकाळी ९ ते १ आणि पुन्हा दुपारी ३ ते ५ अशी वेळ केली आहे.(ह्यावर मला आक्षेप नाही घ्यायचा. पण सहज मनात आले की जर वेळ मर्यादित ठेवली तर गर्दी वाढणार की कमी होणार...? उत्तर तुम्हीच सांगावे)
पाटेश्वर पाहण्यासाठी फ़क्त भाविक नाही तर ट्रेकिंगच्या माध्यमातून काही माहिती,पुरावे गोळा करण्यासाठी कित्येक अभ्यासू लोक देखील येत असतात.मग त्यांच्या सोयी साठी तिथे माहिती फलक अथवा माहिती देणारे कोणी व्यक्ती ह्यांचा असणारा अभाव ह्याच काय...?
असा प्रश्न उभा करून मला कोणाला दोष देण्याचा हेतू नाही.पण ह्यावरून जे चित्र उभे राहते ते एकच की हे देवाचे पवित्र स्थान आहे वेळेत दर्शन घ्या आणि जा.म्हणजे तिथे असणाऱ्या ह्या अद्भुत कलेचा हा अनादर नाही का...? तुम्हीच सांगा.
असो ह्या विषयावर व्यवस्थित आपण तिसऱ्या भागात बोलू.तर आपण गेट मधून आत आल्यावर आपल्याला दिसते ती दगडात कोरलेली गणपतीची सुबक मूर्ती आणि बाजूला दोन स्त्रीवेषधारी मूर्ती त्यातील एक मूर्ती शेजारी लहान बाळ देखील कोरले आहे.ह्यावर सविस्तर माहिती आपण भाग २ ह्या इतिहास सांगणाऱ्या भागात पाहू.
तिथून पुढे आल्यावर आपल्याला साधारण १५ ते २० मिनीट चालावे लागते.मग दिसते आपल्याला एक कमळांनी छान भरलेलं पाण्याचं टाकं त्यालाच नाव आहे *विश्वेश्वर पुष्करणी* आणि ह्या पुष्करणीच्या उजव्या बाजूला चढून वर गेलो की थोडे आत प्रवेश केला की लागते ते *मरगळ म्हशीचे लेणे*(काट्या टाकून झाकलेले आणि तिथे वाढलेल्या झुडुपांमुळे ही जागा दुर्लक्षित राहते.त्यात अजून म्हणजे गुढघाभर पाण्यात थोडे चालत जाऊन आत उजवीकडे असणाऱ्या गुहेत वळावे लागते.मग पाण्याखाली असणाऱ्या सुबक पिंडी तुम्हाला पहायला मिळतील.शेवाळलेले पाणी आणि दगड यामुळे जपून जावे)
हे लेणे पाहून पुष्करणी पासून चालत पुढे आलो की मठ लागतो.तिथे आपल्या पायातील वाहने काढून उजवीकडे वरती चालत आलो की पहिल्यांदा तुम्हाला अयोनी आणि सयोनी प्रकारातील दोन शिवलिंग दिसतील त्यातील अयोनी शिवलिंगावर भगवान शंकराची दाढी आणि मिशा असणारी मूर्ती कोरलेली दिसते.ती पाहून पुढे आल्यावर पायरी वरून चालताना दोन्ही बाजूनी असणाऱ्या भिंतींच्या मध्ये असणाऱ्या देवळीमध्ये देखील शिवलिंग आणि काही मूर्ती कोरलेल्या दिसतील.त्या पाहत वरती आलात की पाटेश्वर मुख्य मंदिरात जाणारा छोटासा दरवाजा लागतो.त्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या भिंतीतील गुहेत साधारण ४ फूट उंच असणारे सुबक शिवलिंग पाहून मनाला प्रसन्नता लाभते.ते पाहून झाले की मुख्य द्वाराच्या उजव्या बाजूस असणाऱ्या भिंतीतील गुहेत हनुमानाची मुर्ती पहायला मिळते.ती पाहून बाहेर आलात की झाडाखाली मनुष्यरूपी गरुडदेवाची हात जोडून नतमस्तक असलेली मूर्ती दिसेल.ती पाहून त्यामागे असणाऱ्या चाफ्याच्या झाडाखाली एक छोटेसं मंदिर दिसेल.त्यातही तुम्हाला एक शिवलिंग पहायला मिळेल.मंदिरा बाहेर असणारा नंदी तुटलेल्या स्वरूपात आहे.तिथून दर्शन घेऊन झाले की पुन्हा माघारी येवून पाटेश्वराच्या मुख्य द्वारातून आत प्रवेश केला की समोर दिसणारा नंदी पाहून लगेच लक्षात येईल की असा सुबक नंदी पंचक्रोशीत कुठेही नाही.नंदीचे नाक,कान,अंगावरील नक्षीकाम एवढंच न्हवे तर पायाचे खूर देखील अगदी सुरेखरीत्या कोरले आहेत.मुख्य मंदिरात प्रवेश करण्या अगोदर नंदीच्या ही जवळ जाण्या अगोदर डाव्या बाजूस एक छोटंसं मंदीर दिसतं त्यात चतुर्मुखी शंकराची मूर्ती दिसेल.डोक्यावर चंद्र,हातात कमंडलू, आणि त्रिशूळ असणारी ही मूर्ती देखील खूपच सुंदर आहे.तिथून दर्शन घेऊन मुख्य मंदिरात प्रवेश केला की डाव्या बाजूस अग्निकुंड दिसतो.तर सुंदर नक्षीदार खांब पाहिले की लक्षात येतं की त्याकाळी स्थापत्यशास्त्र किती विकसित होतं.मुख्य मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्याअगोदर डाव्या बाजूस असणारी भगवान विष्णूची निद्रिस्त अवस्थेतील मूर्ती आणि शेषनाग *(शेषशायी विष्णु)* आपल्याला पहायला मिळतो.तो पाहून गाभऱ्याच्या उजव्या बाजुस पाहिले की स्त्री रूपातील गणेशाची मूर्ती दिसते.खर तर ती गणेशाची मूर्ती नसून ती आहे *गणेशानी* अथवा *वैनायकी* देवीची आहे.त्याच मूर्ती पासून जवळच भिंतीमध्ये देवीची मूर्ती दिसते ती *नागराज्ञी* अथवा *सिंहवाहिनी* देवीची आहे.तिचे दर्शन घेऊन पुन्हा मुख्य गाभाऱ्याकडे आलो की दर्शन होते पाटेश्वर शिवलिंगाचे.गाभारा बंद असल्याने बाहेरून दर्शन घ्यावे लागते.त्या शिवलिंगामागे देवी सरस्वतीची मूर्ती दिसते.दर्शन घेऊन बाहेर आलो की डोंगर माथ्याच्या दिशेने जायचे वरती गेलो की आपल्याला भगवान शंकर पुत्र कार्तिक स्वामींची मूर्ती असलेलं छोटंसं मंदिर पहायला मिळते.
तिथुन पलीकडे दिसणारा रस्ता जो आहे तो बोरगाव शेती शाळेकडून वरती पाटेश्वरकडे येतो.ट्रेकिंगची आवड असणाऱ्यानां यामार्गे वरती येणे ही एक मनाला चांगली आनंद देणारी गोष्ट ठरते.तिथून पुन्हा खाली येताना भलेमोठे जे वडाचे झाड दिसते त्यावर फोटो घेणे आणि थोडा वेळ आराम करणे हे नक्कीच तुम्हालाही आवडेल.तिथून पुन्हा पाटेश्वर मंदीराच्या पायऱ्यांवरून चालत खाली आलोत की विश्वेश्वर पुष्करणी(कमळांनी भरलेलं पाण्याचं टाकं) आणि मठ इथं यायचं.मठाच्या मागील बाजूस चालत आलो की थोडया अंतरावर पाण्याचं एक छोटंसं टाकं लागतं त्यातील पाणी शेवाळलेलं आहे.ते पाहून पुढे आलोत की ५ लेण्यांचा एक समूह दिसतो.त्यालाच *बळीभद्र लेणी* म्हणून ओळखले जाते.८ दिशा, सूर्य ,चंद्र, भगवान विष्णुंचे १० अवतार असणारा पट, सुंदर सुबक आणि मोठी शिवलिंगे, ब्रम्हा,विष्णू, महेशाची स्त्री रूपे असलेला पट जो *ब्राम्ही, वैष्णवी, माहेश्वरी* आणि त्यांची वाहने असणारा पट,आणि सर्वात विलोभनीय असे मनुष्य आणि नंदी यांची एकत्रित शिल्प ज्याला *अग्नी वृष* अथवा *अग्नी वृषभ* म्हणतात हे पहायला मिळते.ह्याबद्दल सविस्तर माहिती आपण भाग २ मध्ये पाहू.ह्या ५ लेण्यांचा समूह पाहून थोडं पुढे चालत आलो की २ देवी असणारे एक छोटंसं मंदिर दिसतं स्थानिक लोक त्याला सटवाई देवी म्हणतात. पण त्या दोन्ही मूर्ती चामुंडा देवीच्या आहेत.त्यातील एक मूर्ती चतुर्भुज आहे आणि हातात शस्त्रे दिसतात.
तिथून पुढे थोडं चालत आलो की आपल्याला दिसते वराडघर.त्यासमोर असणाऱ्या दोन दीपमाळा अतिशय सुंदर आहेत.पण सध्या त्यांची थोडी पडझड झालेली दिसते.त्या पाहुन वराडघर ह्या ३ लेण्यांचा समूह पहायला आत जाताना एक छोटासा नंदी दिसतो तो पाहून आत प्रवेश करताच आणखी एक सुबक,रेखीव आणि डोळयांना मोहक वाटणारी नंदीची मूर्ती आपल्याला पहायला मिळते.ती पाहून आत प्रवेश केला की पहिल्यांदा डावीकडे असणाऱ्या लेणीमध्ये प्रवेश केला की विविध आकार आणि वेगळे संदेश देणाऱ्या अनेक सयोनी आणि अयोनी पिंडी आपल्याला पहायला मिळतील.
तिथून बाहेर आलोत की मुख्य लेणीत प्रवेश करायचा.तिथे सुंदर अशी भगवान विष्णूंची १००० नावे आहेत असा संदेश देणारे शिवलिंग पहायला मिळते.त्या शिवलिंगाच्या डाव्या बाजूस भिंतीवर *पार्वतीपट* आहे.ज्यावर अयोनी प्रकारची एकूण ९७२ शिवलिंग कोरली आहेत.तर डाव्या बाजूस भिंतीत सूर्याची १००० नावे असणारा *सूर्यसहस्र नामपट* आणि समोर *विष्णुसहस्र नामपट* आपल्याला दिसतो.आणि दोन्ही खांबांवर शिवदंड पहायला मिळतो.
विष्णुसहस्र नामपटाच्या उजव्या बाजूस ब्रम्हदेवाची मूर्ती दिसते. तर तिथेच खाली अष्ठमातृका पट आपल्याला दिसेल.हे सारं पाहून बाहेर आल्यावर उजव्या बाजूस असणाऱ्या लेणीत जाण्याअगोदर तिथेच बाहेर दोन कुंभ असणारे एक विशिष्ठ आणि वेगळेच शिवलिंग आपल्याला पहायला मिळेल.आणि त्याच्याच बाजूला असणाऱ्या शिवलिंगावर ४ चेहरे कोरले आहेत.ती ब्रम्हा,विष्णू ,महेश आणि सूर्यदेव याची असल्याचे स्थानिक लोक बोलतात.
ते पाहून झालं की आपण डाव्या बाजूस असणाऱ्या लेणीत आत प्रवेश करावा.तिथे देखील आपल्याला वेगळे आकार असलेली शिवलिंगे पहायला मिळतील.हे सारे पाहून वराडघराच्या बाहेर येवून पुढे चालत गेलो की निगडी वरून वरती येणारा कच्चा रस्ता आपल्याला पहायला मिळेल.
पाटेश्वरवर असणाऱ्या ह्या विविध स्थळांची फक्त नावे आणि तिथं जाण्याचा मार्ग एवढं सांगण्यात बघता बघता लेख किती मोठा झाला. यावरून देखील इथे असणाऱ्या अगणित,अद्भुत,अतुलनिय आणि अविश्वसनीय शिल्पांची महती आपल्या लक्षात येईल.म्हणूनच इथे असणारा प्राचीन इतिहास,वेगवेगळी शिवलिंगं आणि मूर्ती यांचे अर्थ याच्या थोड्या सखोल माहितीसाठी आपण भाग २ पाहू.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
लपा-छपी
*लपाछपी*
तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
हे आत्ताच काही क्षणापूर्वी चालू होती माझी लपाछपी
माझे सारे सवंगडी माझ्यावर राज्य देऊन पसार झाले
आणि मी या राज्याचा राजा
एकाकी, शोधतोय
माझे सैन्य, सेनापती, आणि हो प्रजेला देखील
.
आत्ता इथे एक सैनिक ओझरता दिसला होता मला
पण जणू काय मी इथे नाहीच असा निघून गेला
आपल्या राजाकडे न पाहताच
.
मी खूप ओरडलो, अगदी घसा खरवडून
पण विरून गेली माझी हाक
आभाळापर्यंत जाऊन परत आली
.
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
माझे सारे सवंगडी कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
का आता अंधार झाला म्हणून गेले सगळे आपापल्या घरी??
नाही पण
या आधी डाव असा अर्ध्यावर टाकून
कोणी गेले नव्हते
.
मी खरंच लपाछपी खेळतोय ना??
का मी एकटाच आहे
.
मग ते माझे राज्य, तो सैनिक, माझा सेनापती, माझी प्रजा
माझे सारे सवंगडी
कुठे लपले आहेत कोण जाणे
कोणीच कसं दिसत नाही
.
तुम्हाला आठवते
तुम्ही शेवटचे लपाछपी कधी खेळला होतात??
मला आठवतेय
.
हे आत्ताच काही क्षणापूर्वी
कोपरा नसलेल्या चौकोनी आंगणात
*मार्तंड*
स्मृतीगंध….ट्रेक नंबर १६…जखिणवाडी मळाई मंदिर.. मच्छिंद्रगड
स्मृतीगंध
भाग १
ऋतू बदलत जातात,बदलत जातो निसर्ग
बदलतात विचारधारा,बदलतात माणसं
काळानुसार बदलताना बदलून गेल्या कित्येक पिढी
बदलून गेलं सारं,बदलून गेल्या रूढी
सामर्थ्याच्या प्रदर्शनात सत्तांनी किती दिले एकमेकांना शह
थोड सांभाळून घेताना घडले किती तह
उभारलेल्या स्वराज्याला ही पुढे पडलं होतं खिंडार
जेव्हा उगारल्या गेल्या होत्या आपल्यांनी आपल्यांवरच तलवार
स्वराज्यासाठी शिवरायांनी शंभूराजांनी अर्पण केले होते सर्वस्व
पण पुढे एकमेकांत भिडली होती स्वराज्यगादी सिध्दकरण्या वर्चस्व
औरंगपुत्र आझमशहाने स्वप्न पाहिले भारी
भिडवून स्वराज्याची गादी मिळवू सत्ता सारी
अहो आले गेले कित्येक जरी धुळीस मिळाले सारे
कारण वाहत होते चोहीकडे फक्त शिवछत्रपतींच्या स्वराज्याचे वारे
भिडवून गादी मिटवू स्वराज्य स्वप्न पाही आझमशहा
विचारांस त्या चपराक बसली नमन त्या वारणेच्या तहा
ट्रेक नंबर १६
जखीणवाडी मळाई मंदिर....आणि मच्छिंद्रगड
५ डिसेंबर २०२१
वारणेचा तह आणि मळाई मंदिरातील तलवार याचा संबंध..... इतिहास आणि प्रवासवर्णन
आठवडा भरात अचानक पावसाने लावलेली हजेरी आणि पुन्हा विस्कळीत केलेलं जीवनमान ह्यात पूर्ण आठवडा गेला होता.आणि आनंदाची पर्वणी घेवून येणारा रविवार उजाडला.पावसाचे वातावरण....कडक थंडी....आणि दाट धुके ह्यात जावे तर कुठे जावे हे ठरत नसताना आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे सरांनी मच्छिंद्रगड,सदाशिवगड असे नियोजन केले होते.त्यात त्या भागात कधी फिरण्याचा योग न आल्याने मला काहीच माहीत न्हवते.मग आमचे मार्गदर्शक,इतिहास अभ्यासक श्री स्वप्नील चव्हाण सरांना कॉल केला आणि त्या भागातील माहिती घेतली आणि मग त्यानुसार भेटीची ठिकाणे ठरली.
सुरुवात करायची ठरली ती जखीणवाडी गावातून.आता तसे पाहिले तर तिथून जवळ असणाऱ्या आगशीव लेणी सर्वांना माहीत आहेतच.पण आम्हाला जायचं होते ते तिथल्या मळाई मंदिरात.
मंदिर तसे साधेच.अलीकडेच बांधलेले आहे....मग सोबत असणाऱ्या मित्रांना प्रश्न असा पडत होता की ह्यात नक्की पाहण्यासारखे असे काय...?
खर तर हा प्रश्न मलाही होताच.पण जेव्हा दक्षिण बाजूने असणारी आगाशिवची २३ लेणी पाहिली होती.तेव्हा आलेल्या वाचनात जखीणवाडीचा उल्लेख फार महत्वाचा होता.कारण हेच ते गाव जिथे साताऱ्यातून भेटीस निघालेले छत्रपती शाहू महाराज आणि पन्हाळ्याहून निघालेले छत्रपती संभाजी महाराज दुसरे यांची भेट २७ फेब्रुवारी १७३१ ला झाली आणि पुढे १३ एप्रिल १७३१ ला एक तह झाला.हाच तो वारणेचा तह.
मग हा तह जखीणवाडी मध्ये १७३१ मध्ये झाला.मग आता तिथे काय...? प्रश्न पडला ना...? उत्तर अगदी सोपं आहे....हो आज तिथे त्या मंदिरात आहे ती छत्रपती शाहू महाराजांनी भेट दिलेली तलवार.
आमचे सुदैव हेच की आम्ही ती तलवार हाती घेवुन पाहू शकलो आणि दुर्दैव हेच की ह्या एवढ्या इतिहास प्रसिद्ध गोष्टीची जास्त माहिती आपल्या पर्यंत नाही.शेवटी आपण वेगळ्या ठिकाणी राहणारे सर्वजण. सगळी माहिती असेलच असे नाही.पण ही गोष्ट गावकऱ्यांना ही माहित नसावी हे खूपच वाईट वाटलं.आम्ही सर्वांनी मंदिरात मळाई देवीचे दर्शन घेतले आणि तलवारी बद्दल विचारणा केली..भेटलेल्या गृहस्थाने प्रश्न केला "लग्न हाय का कुणाचं....?" आम्हाला समजलं नाही ते असं का म्हणत आहेत.मग पुन्हा आम्हीच विचारले असे का विचारत आहात...? त्यावर उत्तर आले...." लग्न आसंल म्हणून तलवार मागतायं असं वाटलं."
आम्ही समजून गेलो की ह्यांना काही माहित नाही.मंदिराचे ठिकाण विचारत येत असताना बऱ्याच लोकांना विचारलं होतं.पण बऱ्याच लोकांना ह्या तलवारी बद्दल काही माहित आहे किंवा अशी कोणती तलवार तिथे आहे हे माहीतच न्हवतं.असो हा विषय जास्त खोलात घेवून मला कोणते वाद नाहीत निर्माण करायचे.पण एक माफक अपेक्षा हीच आहे की इतिहास प्रसिद्ध असणारी ही घटना आणि त्या घटनेचे प्रतीक असणारी ही तलवार योग्य रीतीने माहिती फलक लावून छान प्रकारे मंदिरात लावली तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत अगदी सहजरीत्या हा इतिहास पोहोचेल.
मंदिराची देखभाल करणे,पूजा करणे ही जबाबदारी तिथे असणाऱ्या ४ गुरव कुटुंबावर आहे.एक एक आठवडा असा त्यांनी वाटून घेतला आहे.आम्ही भेटलो ते ह्या आठवड्यात सेवेची जबाबदारी असणाऱ्या सुरेंद्र काकांना.
तिथे असणारी ही मळाईदेवी... हा विष्णूचा अवतार असून कशाप्रकारे भगवान विष्णूने देवीचे रूप घेवून भस्मासुराचा अंत केला ही आख्यायिका त्यांनी आम्हाला छान प्रकारे सांगितली.
आणि जी गोष्ट पहायला आम्ही सर्वजण आतुर होतो ती तलवार त्यांनी आमच्या हाती दिली.तलवारीचा हाती झालेला स्पर्श आणि त्यावर डोके टेकवून आम्ही सर्वजण जणू त्या इतिहासचे साक्षीदारच झालो.
आमच्या सोबत असणारी ६ वर्षाची राजनंदीनी हिच्या हाती आम्ही ती तलवार देवून सुरेंद्र काकांना सोबत घेवून सगळ्यांनी तो क्षण कॅमेऱ्यात टिपला आणि तिथून निघालो ते मच्छिंद्रगडाकडे.
आता बऱ्याच गोष्टी अनुत्तरित राहिल्या असचं वाटतंय ना...पण ज्या काही गोष्टी मला समजल्या त्या मी तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करतो.
छत्रपती शिवाजी महाराजांनी उभं केलेलं स्वराज्य पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तम प्रकारे वाढवलं.आतील लोकांचे होणारे छुपे कारस्थानी हल्ले,परकियांचे हल्ले सारे काही पेलून छत्रपती संभाजी राजे लढत राहिले पण काळाने अचानक घातलेल्या फसव्या डावात ते शेवटी अडकले. पण धर्म आणि स्वराज्य ह्याचा अभिमान न सोडता शेवटी त्यांनी मरणाला मिठी मारली....राजांची हत्या झाली. अतिशय क्रुरतेचा कळस गाठत औरंगजेबाने जे केले..... त्याने स्वराज्य संपेल हा त्याचा भ्रम पुढे चांगलाच मोडीत निघाला.
" माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दोन चुका एक म्हणजे शिवाजीची आग्ऱ्याहून सुटका आणि दुसरी म्हणजे संभाजीची हत्या" असे खुद्द औरंगजेबाचे बोल बरचं काही सांगून जातात.
कारण आग्ऱ्याहून झालेल्या सुटकेनंतर स्वराज्य वृंधीगत होत गेले. कारण राजांची युद्धनिती,गनिमी कावा,दूरदृष्टी सारं काही सर्व जनमानसात पसरलं. तसचं छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येनंतर स्वराज्य न संपता उलट आणखी त्वेषाने पेटून उठलं.ह्याच त्या दोन चुका ज्यामुळे अखंड भारताचा बादशहा म्हणवून घेणाऱ्या औरंगजेबाला मरेपर्यंत ह्या महाराष्ट्राच्या मातीत झुंझावं लागलं पण यश काही मिळालं नाही.
संभाजी राजांची हत्या करून औरंगजेबाने आपला मोर्चा वळवला तो स्वराज्याची राजधानी रायगडाकडे.त्याने त्याचा वजीर असद खान ह्याचा मुलगा झुल्फिकार खान ह्याला रायगडाकडे पाठवले....रायगडाला वेढा पडणार होता.....त्यावेळी महाराणी येसूबाई ह्यांनी खूप धीराने निर्णय घेतला.पतीचे छत्र हरवले होते.पण पूर्ण राज्याचा विस्तार सांभाळायची जबाबदारी असणाऱ्या येसूबाई स्वतःला दुःखात बुडवून ठेवणाऱ्या न्हवत्या.त्यांनी छत्रपती राजाराम महाराजांचे मंचकारोहन करून घेतले आणि त्यांना जिंजीला धाडले....कारण फक्त एकच.अमाप सैन्य घेवून आलेल्या झुल्फिकार खानाच्या ताब्यात पूर्ण राजघराणे सापडू नये.छत्रपती राजाराम महाराज पत्नी ताराराणी, राजसबाई,अंबिकाबाई ह्यांना सोबत घेवून जिंजीकडे गेले.आणि स्वतः महाराणी येसूबाई आपले पुत्र शाहू महाराज ह्यांना घेवून मुघलांच्या कैदेत गेल्या.
पुढे ९ जून १६९६ ला छत्रपती राजाराम महाराजांना पत्नी ताराराणी यांच्याकडून पुत्ररत्न प्राप्त झाले त्याच नाव त्यांनी शिवाजी असं ठेवलं.त्यांनतर १६९८ मध्ये पत्नी राजसबाई यांच्याकडून देखील पुत्ररत्न प्राप्त झाले. त्याचं नाव त्यांनी संभाजी असं ठेवलं.३ मार्च १७०० मध्ये राजाराम महाराजांचा मृत्यू झाला.त्यानंतर वयाच्या चौथ्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज द्वितीय ह्यांना गादीवर बसवून सारा राज्य कारभार स्वतः महाराणी ताराराणी पाहू लागल्या.सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या असणाऱ्या ताराराणी यांनी अतिशय जिद्दीने आणि धाडसाने विस्कळीत होत चाललेली स्वराज्याची घडी पुन्हा बसवली.एक एक उत्तम सरदार नेमून पुढची ७ वर्ष औरंगजेबाला झुंझत ठेवले.त्याच दरम्यान औरंगजेब पुत्र आजमशहा हा देखील लढाईत स्वतः उतरला होता.मराठ्यांची ताकत,अवघड गडकिल्ले, चिवट झुंज देणारे मावळे ह्यामुळे त्यालाही चांगली जाणीव होती की स्वराज्य जिंकणे एवढे सोपे नाही.त्याच्या डोक्यात वेगळेच नियोजन बनत चालले होते. योगायोगाने नेमके ३ मार्च १७०७ म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या बरोबर ७ वर्षाने औरंगजेबाचा मृत्यु झाला.आणि सत्तेची सर्व सूत्र आझमशहाने स्वतःच्या हाती घेतली.
त्याच्या डोक्यात हाच विचार आला की स्वराज्यात फूट पाडायची असेल तर दोन्ही राजांना एकमेकांविरोधात उभं करायचं.आणि त्याने १ मे १७०७ मध्ये शाहू महाराजांची कैदेतून सुटका केली.आझमशहाचे दुर्दैव हेच की तो पुढे जास्त जगला नाही.त्याच्याच सावत्रभावाने ८जून १७०७ मध्ये त्याची हत्या केली.
पण शाहू महाराज कैदेतून सुटले ही खूप मोठी गोष्ट ठरली.पुढे त्यांचे महाराणी ताराराणी ह्यांच्यासोबत काही पटले नाही.छोट्या मोठ्या लढाया होवू लागल्या.१७०८ मध्ये शाहू महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला आणि सातारा ही राजधानी बनवली.
आपसातील हे वाद सहज मिटणारे न्हवते.त्याच दरम्यान छत्रपती राजाराम महाराज यांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई ह्यांनी महाराणी ताराबाई यांच्या विरोधात बंड पुकारले.आणि आपले पुत्र संभाजी ह्यांना गादीवर बसवले.मग छत्रपती संभाजी महाराज दुसरे आणि छत्रपती शाहू महाराज ह्यांच्यात सारखी युद्ध होवू लागली.निर्णायक युद्ध झाले ते १७३० मध्ये जे सातारचे छत्रपती शाहू महाराज यांनी जिंकले.पण शेवटी आपलाच भाऊ त्याचा असा पराभव करून नुसती सत्ता मिळवणे हे योग्य नाही.हे चांगल्या प्रकारे छत्रपती शाहू महाराजांनी ओळखले.आणि असा वाद होवू नये या दृष्टीने कसे पुढे जाता येईल हा विचार केला.आणि त्यांनी स्वतः साताऱ्यातून कोल्हापूरला छत्रपती संभाजी महाराज दुसरे ह्यांना भेटायचे ठरवले.तिकडून छत्रपती संभाजी महाराज हे देखील स्वतः पुढे आले.आणि दोन्ही राजांची ती ऐतिहासिक भेट घडली ती २७ फेब्रुवारी १७३१ ला जखिणवाडी मध्ये.त्यावेळी जखिणवाडी ते वाठार एवढ्या भागात साधारण २ लाख जनसमुदाय जमला होता.नंतर संभाजी राजे यांना घेवून शाहू महाराज साताऱ्यात आले.साताऱ्यात असणाऱ्या अदालतवाडा इथे काही दिवस वास्तव्य झाले.बऱ्याच चर्चा झाल्या आणि शेवटी १३ एप्रिल १७३१ मध्ये दोन्ही बाजूने ९ कलमी एक करार झाला.त्या तहालाच वारणेचा तह म्हणतात.
ह्या तहातील ५वे कलम फार महत्वाचे ठरते.की ज्यात लिहिले आहे.
"तुम्हाशी जे वैर करतील त्याचे पारिपत्य आम्ही करावे.आम्हाशी जे वैर करतील त्याचे पारिपत्य तुम्ही करावे.तुम्ही आम्ही एकविचारे राज्यवृध्दी करावी."
ह्या तहाची आठवण म्हणून स्वतः छत्रपती शाहू महाराजांनी जखिणवाडी गावाला जी तलवार भेट दिली तीच ही तलवार.जी पाहण्याचे भाग्य आम्हाला मिळाले.
ही फक्त एक तलवार नसून हा एक इतिहास आहे.जो सांगतो आहे की कितीही परकी सत्तांनी आम्हाला छेडण्याचा,आमच्यात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला तरीही आम्ही एक आहोत आणि कायम एक असू.जेव्हा योग येईल तेव्हा अवश्य भेट द्या.सोबत आगाशिव लेणी भेटीचे नियोजन केले तरी हा ट्रेक सर्वांना खूप आनंद देवून जावू शकतो.
दिवसाची सुरुवात ह्या तलवारीच्या दर्शनाने झाली आणि आम्ही पुढे मच्छिंद्रगडाच्या दिशेने मार्गस्थ झालो. रेठेरे मधून कृष्णा साखर कारखाना पार करून आम्ही पोहोचलो किल्ले मच्छिंद्रगड पायथ्याशी.गडावर जायला सिमेंटचा रस्ता असल्याने आम्ही गाडीनेच गडावर गेलो.गडावर चडून आल्यावर मध्यभागी मच्छिंद्रनाथाचे मोठे मंदिर आहे.त्याच्या समोर छोट्या तोफा ही आपल्याला पहायला मिळतात.तिथून जवळच मच्छिंद्रनाथाचे शिष्य गोरक्षनाथ ह्यांचे मंदिर आहे.ते पाहून पुढे गेले असता तुम्हाला बेरडमाची पहायला मिळते.माची पूर्णपणे ढासळली असली तरी तिथे असणारे अवशेष यावरून ती ओळखून येते. मच्छिंद्रनाथाच्या मंदिरामागे एक मोठी विहीर दिसते ज्यात थोडे बहुत पाणी असून ते गढूळ आहे.मंदिरातून दक्षिणेकडे चालत आल्यावर दत्त मंदिर दिसते.ते अलीकडच्या काळात बांधले गेले आहे.गडावर जुने असे काही अवशेष किंवा कलाकृती काही आढळून येत नाहीत.थोडक्यात इतिहास सांगायचा झालाच तर १६५९ मध्ये अफजल खान वध झाल्यानंतर राजांनी दक्षिणेकडे चाल करत बरेच गड किल्ले काबीज केले होते.त्यापैकीच एक मच्छिंद्रगड.पण पुढे सिध्दी जौहरने दिलेल्या वेढ्यात महाराज बराच काळ अडकून पडले होते.त्या दरम्यान हा गड पुन्हा आदिलशाही मध्ये सामील झाला.पण पुन्हा १७७० -७१ मध्ये राजांनी गड पुन्हा जिंकून घेतला.त्यावेळी आपलेच काही सरदार (निंबाळकर,घाडगे) हे आदिलशाहीच्या बाजूने राजांविरोधात लढत होते.त्यांच्यावर व्यवस्थित लक्ष ठेवता यावे आणि जरब बसावी ह्या हेतूने राजांनी मच्छिंद्रगड नव्याने बांधून घेतला होता.
तसा ह्या गडाचा काही इतिहास आढळून येत नाही पण १६९३ साली स्वतः औरंगजेब ह्या गडावर आला होता.हा उल्लेख आहे.नंतरच्या काळात हा किल्ला परशुराम पंतप्रतिनिधी ह्यांच्या ताब्यात होता.पण नंतर पेशवे आणि पंतप्रतिनिधी यांच्यात झालेल्या युध्दात बापू गोखले यांनी हा किल्ला जिंकून घेतला. छोटा असलेल्या ह्या गडाला एक भाविक म्हणून नक्कीच भेट द्यावी.आणि मच्छिंद्रनाथाचे,गोरक्षनाथाचे दर्शन घेवून स्वराज्यात असलेल्या ह्या गडाची सफर अनुभवावी.
मच्छिंद्रगड पाहून आम्ही सगळे गेलो ते कोळे नृसिंहपुर मध्ये.तिथे असणारी साधारण ५ फूट उंचीची शाळिग्राम मध्ये असणारी नरसिंहाची मूर्ती आणि मंदिर ह्याबद्दल असणारी माहिती आपण दुसऱ्या भागात पाहू.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतिगंध….ट्रेक नंबर १५..…भाग ३……साखरगड
स्मृतीगंध
भाग ३
ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा
ट्रेक नंबर १५
साखरगड
२८ नोव्हेंबर २०२१
साखरगड इतिहास आणि प्रवासवर्णन
नांदगिरी पासून साधारण ७ किमी पुढे पेठ किन्हईकडे आलो असता आपल्याला दिसतो एक छोटासा,आटोपशीर आणि रुबाबदार गड.... तोच साखरगड.
गडावर जाण्यासाठी पायरी मार्ग आणि डांबरी रस्ता असे दोन्ही मार्ग आहेत. भर दुपारी उन्हाची वेळ आणि काही जणांना लवकर घरी जायचे होते म्हणून आम्ही पायरी वरून न जाता डांबरी रस्त्याने सरळ वरती आलो.
अतिशय सुंदर असा दरवाजा आणि त्यावरील नक्षीकाम,अलीकडे केलेलं रंगकाम ह्याने गडप्रवेशा आधीच मनाला खूप छान वाटत.
गडावर अंबामातेचे खूप सुंदर मंदिर आपल्याला पहायला मिळते.तिथे असणाऱ्या ४ दीपमाळा ह्या अतिशय सुंदर आहेत.त्यातील सर्वात उंच असणारी दीपमाळ इ.स१८५२ मध्ये उभारली असून त्यावर मोराची नक्षी असून दिपमाळेवर वानरांचे शिल्प ही आहे.
आत प्रवेश केल्यावर अंबामातेचे दगडात कोरलेलं आणि अलीकडे रंग दिलेलं शिल्प आहे ज्यात तिने औंधासुराचा वध केलेलं दर्शविले आहे.तटबंदीच्या भिंती मध्ये छोट्या छोट्या दिवळी असून त्यात श्रीकृष्ण,विठ्ठल रखुमाई,शिवलिंग अशा वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती आहेत.मंदिर तसे छोटे असले तरी एकदम सुंदर आहे. पूर्वाभिमुख असणाऱ्या ह्या मंदिराच्या समोर एक छोटीसी हनुमान मूर्ती असून त्याच्याच बाजूला शिवलिंग पहायला मिळते.
हे सारे पाहून आम्हा सर्वांनाच छान वाटलं.आणि एकाच दिवशी ह्या दुसऱ्या गडावर देखील आलो याचे समाधान वाटले.मजा आली ती खर राजनंदिनीच्या करामती पाहून.मोठ्या दिसणाऱ्या दीपमाळेकडे पाहून आणि त्यावर असणारे मोराचे नक्षीकाम पाहून तिने त्यावर चढून बसण्याचा हट्ट केला आणि त्यावर बसून बराच वेळ खेळण्याचा आनंद घेतला.
कल्याणगडाची चढाई आणि पुन्हा उतरून ह्या दुसऱ्या गडावर आलो तरी आमच्या सोबतचे लहानगे दिव्यांश आणि राजनंदिनी दोघेही अजिबात थकेलेले न्हवते हेच विशेष.
भाग एक मध्ये कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांच्या पासून ते पुढे शिवकाळात आपल्या साताऱ्यात घडलेल्या घटना मांडल्या आहेत.पण शिवकाळापुढे आणि छत्रपती संभाजी महाराजांनंतर... छत्रपती राजाराम महाराज यांच्या काळात..... इ.स.१६९० ते १६९९ दरम्यान आपल्या पराक्रमाने किन्हईचे परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांनी राजाराम महाराजांकडून सुभालष्कर,समशेरजंग हे खिताब मिळवले होते.त्याच दरम्यान त्यांनी औंध संस्थानाची स्थापना केली.पन्हाळा पुन्हा मिळवून (राजाराम महाराजांच्या काळात) स्वराज्यात आणण्यात परशुराम त्रिंबक पंतप्रतिनिधी यांचे योगदान फार मोठे ठरते.
पुढे श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी ( कार्यकाळ इ.स.१८४८ ते १९०१) ह्यांनी साखरगड वर असणारी उंच दीपमाळ इ.स.१८५२ मध्ये उभारली. तसा उल्लेख देखील ह्या दिपमाळेवर आहे.
आपल्या साताऱ्यातून अगदी जवळ असणाऱ्या ह्या कल्याणगड आणि साखरगडाला अवश्य भेट द्यावी असं मला वाटतं.चढाईला अगदी सोपे आणि पहायला देखील सुंदर असणाऱ्या ह्या गडांचं पावित्र्य देव देवतांच्या असणाऱ्या मूर्ती आणि मंदिरं हे पहायला येणाऱ्या भाविकांमुळे नक्कीच चांगले राहिले आहे.पण दुर्गभ्रमंतीचे वेड असणाऱ्यांनी देखील नक्कीच इथे यायला हवे.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध….ट्रेक नंबर १५..….भाग २….…कल्याणगड प्रवासवर्णन
स्मृतीगंध
भाग 2
ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा
ट्रेक नंबर १५
कल्याणगड
२८ नोव्हेंबर २०२१
कल्याणगड ,साखरगड प्रवासवर्णन
कल्याणगडाला नांदगिरीचा किल्ला देखील म्हणतात....गडाचा इतिहास आपण भाग १ मध्ये पाहिला.आता तो प्रवास आणि आलेले अनुभव ह्या लेखात मी मांडण्याचा प्रयत्न करतोय. सातारा....वाढे फाटा......वडूथ....सातारारोड मार्गे.... नांदगिरी पायथ्याला आलो की दोन मार्ग गडावर जातात......तुम्ही गाडी घेवुनही कच्च्या रस्ता असलेल्या मार्गाने महादरवाजा पर्यंत जावू शकता....पण आम्ही थोडे पुढे जावून असणाऱ्या पायरी....आणि पुढे कच्चा असणाऱ्या रस्त्याने चालत गेलो.
आजच्या ट्रेक मध्ये विशेष बाब म्हणजे आमच्या सोबत होती आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे यांची ६ वर्षाची मुलगी राजनंदिनी आणि माझे मोठे बंधू गुरुनाथ याचा ९ वर्षाचा चिरंजीव दिव्यांश....दोघेही वयाने लहान पण गड चढाई मध्ये आमच्या ही पुढे होते.....योगीराज सरांनी अगदी लहान वयात मुलीमध्ये दुर्गभेटीची निर्माण केलेली ही सवय आणि आवड खूपच कौतुकास्पद वाटली.....त्यांनी सांगितले आजवर तिने १६ गडकिल्ले पाहिले आहेत....आणि मी सहज म्हणालो ६ वर्षात हिने १६ गड पाहिले....पण मी १६ वर्षात ६ गड पाहिले न्हवते......आणि हे खरच आहे.जर लहान वयात अशी आवड निर्माण झाली तर नक्कीच येणारी पिढी ही चांगली घडेल.माझा पुतण्या दिव्यांश देखील गडावरील शिल्प पाहून त्याचं बारीक निरीक्षण करत होता... भले त्या शिल्पातील अर्थ उमगत नसेल....पण त्याकडे कुतूहलाने पाहणे हे देखील उत्तम निरीक्षक होण्याचेच लक्षण न्हवे का....? ह्या दोन छोट्या प्रवाशांसोबत आम्ही सर्वजण गड चढत होतो.
कामाचा ताण आणि रोजचे रूटीन जीवन आपण सगळे जगत असतोच.त्या रोजच्या जीवनाला छेद देत फायनान्स क्षेत्रात काम करत असलेले श्री संदीप भोसले सर देखील आज आमच्या सोबत होते.ह्या ट्रेक मध्ये आम्ही १० जण आणि सोबत २ लहान मूलं होती.गड भेटीची खूप आवड असणारे आमचे मित्र अनिल पोगाडे हे देखील आज नव्याने आमच्या सोबत जोडले गेले.
हा.... तर सांगत हे होतो की कच्च्या रस्त्याने आम्ही थोडे वरती चालून गेल्यावर.....पाण्याचे एक खांबटाके दिसले....साधारण ६ फूट लांब दिसणाऱ्या ह्या खांबटाक्यात आत प्रवेश केला तर.... उजव्या बाजूस आतपर्यंत साधारण २० फूट खोदले आहे......आत मध्ये चालत शिरताना पाणी जवळजवळ १ फूट वर लागते... ५ ते ६ खांबांवर असलेले हे टाके आत वाकून गेले की आपल्याला ते सारे व्यवस्थित पाहता येते.... टाक्याची उंची साधारण ३ ते ३.५० फूट असेल.
ते टाके पाहून वर आल्यावर आपल्याला उत्तराभिमुख महादरवाजा दिसतो......आजही अत्यंत सुस्थितीत असणाऱ्या ह्या दरवाजातून आत गेलो असता.....डावीकडे वळायचे......तिथे अलीकडे बांधलेले शेड दिसते......तिथून थोडे खाली उतरलो की उजव्या बाजूला एक छोटेसे मंदिर लागते....आत मध्ये असणारे शिवलिंग पाहून मनाला शांती मिळते.....आजवर मी आणि माझ्या सोबत असणाऱ्या मित्रांनी ज्या ज्या गडांवर गेलो तिथे शिवलिंगाचे दर्शन घेवून पुढे जाणे हाच क्रम असायचा.....पण आज काही वेगळेच घडले होते....डॉ प्रवीण जाधव सरांचे मित्र.....श्री यतिष गुजर सर आमच्या सोबत होते.....त्यांनी आपल्या बॅग मधून तांब्याचा कलश बाहेर काढला आणि पाण्याची बॉटल त्यात ओतली....मला काही समजणार ह्या आधी त्यांनी मंदिरात प्रवेश केला....आणि शिवलिंगावर पाणी ओतून ते छान धुवून घेतले.....सोबत आणलेली फुले वाहून पूजा केली....एवढ्यावर हा कार्यक्रम थांबला नाही तर त्यांनी सोबत तेल अन् कापूर आणला होता.... दिवा लावून कापूर पेटवला आणि मग आम्ही सर्वांनी शंकराची आरती म्हणली.....गडांना दिलेल्या आजवरच्या भेटीत हा एक विलक्षण अनुभव होता.....तिथून असणाऱ्या पायऱ्या उतरून आम्ही खाली आलो....साधारण ४ फूट उंच असणाऱ्या गुहेच्या तोंडात आम्ही प्रवेश केला.....थोडे वाकून आत चालत गेले असता पुन्हा गुहेची उंची ६ फुटांवर जाते......आणि आत दोन्ही बाजूला छोटी भिंत बांधून घेतल्याने पाणी बाजूला अडले जाते..... पूर्वी ते पाणी पायातच येत असे.....चालत आतमध्ये साधारण १०० फूट आल्यावर उजव्या बाजूस सध्या बांधून घेतलेले एक छोटे जैन मंदिर लागते....त्यातच ९व्या शतकात बनवली गेलेली भगवान पार्श्वनाथ यांची मूर्ती दिसते.
तिथून पुढे आलो की डाव्या बाजूस देवी पद्मावतीची एक छोटीसी मूर्ती दिसते ती अलीकडच्या काळातील असेल.... तर काही पावलं चालत पुढे आलो की दर्शन होते दत्त दिगंबराचे....संगमरवरी मूर्ती आणि बाजूची भिंत टाइल्सने बांधून घेतल्यामुळे फार सुरेख दिसते आणि ते पाहून गुहेत एवढ्या आत आल्याचे समाधान मिळते.....तिथेही दिवा लावून आम्ही सर्वांनी दत्ताची आरती म्हणली.....आणि मूर्तीच्या बाजूला आम्हाला दिसला एक शंख......आमच्या सोबत पहिल्यांदाच आलेले... आयुर्वेदात चांगले काम करणारे आमचे मित्र श्री योगीराज सरकाळे सर.... त्यांनी तो शंख नसून ती शंखीनी असल्याचे सांगून ती हातात घेतली...आणि शंखनाद केला......गुहेत असणारी भयाण शांतता आणि त्यात झालेला हा शंखनाद आम्हा सर्वांना खूपच आवडला.....मग श्री यतिश गुजर सर आणि धनुभाऊ यांनी देखील त्या शंखीनीचा नाद उत्तम भरला......कधी न्हवे ते समोर हे घडताना पाहून मला ही मोह आवरला नाही...आणि मी ही प्रयत्न केला.....आणि जाणवले की जरी हे दिसताना सोपे वाटत असले तरी तशी अवघड कला आहे....कारण बराच वेळ प्रयत्न करूनही मला काहीच जमत न्हवते.....मग शेवटी हार मानून तो घुमणारा शंखनाद मनात साठवून आम्ही गुहेतून बाहेर निघालो.....पुढे आल्यावर दिसला तो पूर्वाभिमुख दरवाजा.....आणि बाजूला असणारे दोन बुरुज....खूप सुंदर रचना असणाऱ्या ह्या दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे वळलो की लागते ते हनुमानाचे मंदिर....आणि वरती असणाऱ्या कळसावर बनवली आहे ती गणपतीची मूर्ती...ती पाहून तसेच उत्तरेकडील टोकाकडे आले असता लागते एक जुने घर..... ते उघडून आत गेल्यावर एक यज्ञकुंड दिसतो......तिथून वर आलो की उत्तरेकडे पाहिले तर काही पवनचक्की दिसतात.... वरून पाहताना त्यांची फिरणारी पाती चांगलीच मोठी दिसतात...कारण फार जवळून ते आपण पाहत असतो.....ते पाहून पुन्हा दक्षिणेकडे चालत यायचं......मग आपल्याला दिसते ती कल्याणस्वामींची समाधी आणि जवळच एक पाण्याचा तलाव ....पाण्याचा उपसा नसल्याने पाणी एकदम शेवाळलेले दिसते.....तिथून पुढे चालत आलो की लागते एक घर.....जिथे सध्या वास्तव्य आहे ते बलदेव महाराज त्यागी स्वामींचे.....त्यांच्या घरासमोर असणाऱ्या व्हरांड्यावर बसून आम्ही सोबत आणलेला नाश्ता खाऊ लागलो....पण सर्वांनी एकमेकांचे आणलेले पदार्थ एकत्र नीट खाता यावेत म्हणून बलदेव महाराजांनी आम्हाला त्यांच्या जवळ असणारी ताटे दिली. ज्यात आम्ही सर्वांनी मिळून मिसळून गप्पा मारत आणलेला खाऊ खाल्ला.
त्यांच्या घराच्या मागे असणाऱ्या मोठ्या सभागृहाच्या डाव्या बाजूला एक शीळा आहे त्यावर तलवार शिल्प कोरले आहे.अतिशय सुबक असणारे ते शिल्प आम्ही कॅमेऱ्यात कैद करून पुढे गेलो.....तिथून पुढं आल्यावर लागते ते उंच असे वडाचे झाड आणि त्या बाजूला आहे एक कबर...... कोणा अब्दुल करीम याची ती कबर असल्याचे बोलले जाते.....तिथून पुढे दक्षिणेकडे आल्यावर पाण्याचे एक छोटे टाके लागते.....त्यातील पाणी पिण्यायोग्य नाही.ते पाहून झाल्यावर सुरू होतो परतीचा प्रवास.
कल्याणगडावरील बऱ्याच आठवणी आम्ही कॅमेऱ्यात कैद केल्या होत्या.सारे फिरुन वेळ झाली होती दुपारी १२ची मग ठरवले इथून जवळच असणारा साखरगड देखील पाहूनच जावू....आणि मार्गस्थ झालो पेठ किन्हईकडे.....साखरगडाची माहिती आपण तिसऱ्या भागात पाहू.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध…..ट्रेक नंबर १५……भाग १….कल्याणगड अन् सातारा इतिहास
स्मृतीगंध
भाग १
ह्या सुंदर जगाचा काही काळ रहिवासी तू
शोधण्या स्वतःला फिरशील सर्वत्र तू
भेटेल का कधी तुला तूझ्यातील स्वत्व रे
जर नाही उमगले कधी स्वतःचेच महत्त्व रे
भटकशील नुसता भेटतील असंख्य लोक रे
राहशील रिकामा जर ना उमगली जगण्याची रीत रे
विसरून जगाला शोधावा कधी असा एखादा प्रांत
जिथे मनालाही मिळावा थोडासा एकांत
जर असशील निर्भीड तर नसेल कसली भ्रांत
दुःखातही सावरुन स्वतःला करता यावं शांत
शिकवायला तुला बघ हा निसर्ग आहे उभा
फक्त तुला ऐकता याव्या ह्या झाडाझुडपांच्या सभा
ट्रेक नंबर १५
कल्याणगड अन् सातारा इतिहास
२८ नोव्हेंबर २०२१
सातारा......राजधानी सातारा.....आपला सातारा.....इथून अगदी २५ किमी अंतरावर असणारा किल्ले कल्याणगड आणि तिथून जवळच अगदी ७ किमी अंतरावर असणारा साखरगड... ह्या गडांची रविवारी भेट घडली.सकाळी अगदी लवकर जावं आणि दुपारपर्यंत माघारी यावं असा हा अगदी सोपा ट्रेक.....पण आजवर जाणे झाले न्हवते.त्यात एका मित्राला सहज विचारले अरे कल्याणगड पहायला जाणार आहे....त्यावर तो सहज म्हणाला " य जाऊन भारी हाय... कल्याणगडाव एक लांबडी गुहा हाय त्यात दत्ताची आण पार्श्वनाथाची मूर्ती हाय...बाकी दोन दरवाजे आन समाधी हाय वर ; बाकी काय नाय एवढं बघाय....आन साखरगडाव देवीच दिवुळ हाय.... य बघून लगीच हूयील बघून"
आता ह्यात त्याचं काहीच चुकल नाही.....कारण एवढीच माहिती आपल्यापर्यंत आली आहे ना.....मग तो तरी वेगळे काय सांगणार.....आणि वेगळे काही समजले नाही तर आपण तरी तिथे का जाणार ?
खरच राजांचा प्रत्यक्ष संबंध आलेल्या गडकोटांची माहिती सगळीकडे आहे ......शिलेदारांनी लढविलेल्या गडांची माहिती देखील बऱ्यापैकी आहे ......मग साहजिकच आपल्या भेटी तिथे होणार.....कारण उत्सुकता तेव्हाच राहते जेव्हा आपल्याला तिथलं काही माहित असतं.... पण खर तर अशी अनोळखी ठिकाणं बऱ्याचदा इतिहासाची नव्यानं ओळख करून देतात.....ज्ञान आणि सुख मिळवण्याच्या हेतूने आपण परिचित ठिकाणी जातो हे योग्यच....पण काही अपिरिचित ठिकाणीही बरच काही सुख दडलेलं असतं हे कल्याणगड पाहून समजलं..... जसा पूर्ण चंद्र एक विलक्षण आनंद देतो तशी चंद्रकोर ही नभाला सुशोभित करतेच की.....कारण तिचं अस्तित्व थोड दिसत असलं तरी नभाचं सौंदर्य कमी झालेलं नसतं.
त्यामुळं आज मला ह्या लेखातून सांगावासा वाटतोय तो ह्या दोन्ही गडांबद्दलचा इतिहास.....जो थोडा बहुत मला माहीत आहे.माझ्या वाचनात एक अशी गोष्ट आली की त्यात स्पष्ट लिहिलं आहे.... की गडावर दत्ताची मूर्ती अन् कल्याणस्वामींची समाधी आहे...त्यामुळे इथे पर्यटकांपेक्षा भाविकांची गर्दी जास्त असते.....आणि जसे मी मघाशी म्हणालो तसेच आहे ना.....ज्या प्रकारची माहिती उपलब्ध असेल तसेच घडणार.....आता माहितीच जर फक्त देव अन् समाधीची असेल तर इथे भाविकचं जास्त येणार ना.
गडांचा इतिहास फार जुना आहे....शिवकाळात त्याला खूप महत्त्व आहे.....कारण ह्याच गडकोटांनी राजांच्या स्वप्नातलं स्वराज्य उभं करायला मदत केलीय....पण जसं की आपण ऐकलय १० व्या ११ व्या शतकात शिलाहार राजांनी बरेच गड बांधले आहेत.आणि कल्याणगड देखील कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांनी इ.स.११७८ ते १२०९ ह्या काळात बांधला असावा.
राजा भोज दुसरे यांचे आजोबा राजा गंडरादित्य यांची पत्नी राणी कर्णावती ह्या जैन धर्माचे आचरण करणाऱ्या होत्या. त्यामुळे हिंदू,बौद्ध मंदिरांसोबतच जैन धर्मीयांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात दानधर्म केला जात होता.हीच परंपरा पुढे त्यांचे पुत्र विजयादित्य,अन् आणि नातू... राजा भोज द्वितीय यांनी सुरू ठेवली.
इ.स पूर्वी पासून सुरू असणाऱ्या जैन धर्मीयांचे एकूण २४ तीर्थंकार.पहिले तीर्थंकार ऋषभदेव(आदिनाथ) तर २४ वे महावीर आहेत. त्याआधी असणारे २३वे तीर्थकार म्हणजे भगवान पार्श्वनाथ ज्यांचा कार्यकाळ इ.स पूर्व ८७२ ते ७७२ असा आहे.
कल्याणगडाच्या गुहेत असणारी मूर्ती ही भगवान पार्श्वनाथांची आहे.याचा अर्थ इ.स.पूर्व काळापासून चालत आलेला हा जैन धर्म आणि त्यांचे धर्म प्रचारक देशभर भ्रमंती करत असताना त्यांनी ठिकठिकाणी गुहा,लेणी बांधली आहेत. इ.स.पूर्वी पासून असणाऱ्या ह्या लेण्यांचा अभ्यास आजही खूप मोठा आणि विचार करायला लावणारा आहे.
ही झाली जैन धर्म आणि तिर्थकार भगवान पार्श्वनाथ यांची पार्श्वभूमी.आता आपण जर पुन्हा ११व्या शतकात असणाऱ्या कोल्हापूरचे शिलाहार राजा भोज दुसरे यांच्या बद्दल पाहिले तर साताऱ्यात अजिंक्यतारा,चंदन वंदन,पांडवगड,केंजळगड,सज्जनगड,वैराटगड आणि कल्याणगड हे त्यांनी बांधले आहेत.त्यामुळे साताऱ्याच्या इतिहासात त्यांचा उल्लेख असणे फार गरजेचे आहे.
दक्षिण उत्तर पसरलेल्या कल्याणगडावरून पाहिले असता उत्तर टोकावरून चंदन वंदन,वैराटगड,साखरगड दिसतो तर दक्षिण टोकाकडे आल्यावर समोर जरंडेश्वर,आणि लांब दूरवर असणारा अजिंक्यतारा दिसतो.पण प्रत्यक्ष इतिहासात जास्त काही घडामोडी ह्या किल्ल्या बाबतीत दिसत नाहीत.कदाचित चढाईस सोपा असूनही पण जावली खोरे ते कोल्हापूर....विजापुर प्रवासात हा लांबवर असल्याने हा युध्दात दुर्लक्षित राहिलेला असावा.
राजा भोज द्वितीय यांचे वाढते साम्राज्य बघून देवगिरीचे राजा सिंघण यांनी युद्ध करून शिलाहार राजवट संपवली. इ.स.१२१२ मध्ये शिलाहार घराणे संपले त्यांनतर इ.स.१३१८ पर्यंत देवगिरीच्या यादवांचे साम्राज्य दिसते.पण इ.स.१३१८ मध्ये मुबारक खिलजीने..... हरपालदेव यांचा पराभव करून यादव साम्राज्य संपवले.पुढे इ.स.१३४७ पर्यंत खिलजीचे असणारे साम्राज्य बहामनी साम्राज्याने संपवले.
पुढे इ.स.१५२६ पर्यंत बहामनी साम्राज्य पूर्ण दक्षिण भारतावर चांगले विस्तारले होते.पण अंतर्गत वादातून निर्माण झालेल्या ५ शाह्या.... त्यातील आदिलशहाची कारकीर्द फार मोठी ठरली आणि त्याच्याच काळात सातारा हा इतिहास पटलावर जास्त केंद्रित झालेला दिसतो.कारण दक्षिणेत विजापूर मधून राज्यकारभार चालवताना उत्तरेतून येणारा शत्रू....त्याची चाहूल घेणे,.....त्याच्या सोबत युद्ध करून इथेच थोपवणे आदिलशहाला सोयीचे होते कारण.....जावळीचे खोरे.......आणि पूर्ण सातारा परिसर .....हा घनदाट जंगलांनी वेढलेला असल्याने शत्रूचा बिमोड करणे सोपे जात होते.
इ.स.१६५९ मध्ये अफजलखान वध केल्यानंतर दक्षिणेत बरेच गड राजांनी जिंकले त्यात पन्हाळा देखील होता.पण त्यातही कल्याणगडाचा उल्लेख दिसत नाही.पण पुन्हा जेव्हा इ.स. १६७३ मध्ये पन्हाळा नव्याने जिंकला त्या दरम्यान राजांनी कल्याणगड स्वराज्यात सामावून घेतला.
खर तर कल्याणगड भेटीत ही सारी माहिती देणे कितपत योग्य आहे नाही माहित.पण हे सारे सांगण्यामागे एकच उद्देश की ११व्या शतकापासून ते १६ वे शतक संपेपर्यंत संपूर्ण भारतात....विशेषतः दक्षिण भारतात बरेच आक्रमण....बऱ्याच लढाया झाल्या.....ह्या सर्वात ही अत्यंत शांत राहिलेला कल्याणगड म्हणजे एक शांततेचे ठिकाणचं म्हणावं लागेल.
गडावर पाहिलेली ठिकाणे आपण भाग २ मध्ये पाहू.आणि साखरगडाच्या माहितीसाठी भाग ३ चे लिखाण केले आहे.एकच लेख मोठा झाला की वाचण्यात ही कुचराई होते....आणि उगाच लिखाण देखील रटाळ होवून जाते म्हणून ह्या ट्रेक बद्दल ३ भागात लिखाण आणि व्हिडिओ बनवल्या आहेत.भेटू भाग २ मध्ये
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतीगंध……ट्रेक नंबर १४….किल्ले पुरंदर
स्मृतीगंध
महाराष्ट्राच्या मातीमध्ये कित्येक जन्मले वीर आजवर
रणांगणावर कापले शत्रू,कित्येक वार झेलले छातीवर
मनी मस्तकी बाळगला होता एकच विचार बरोबर
झुकणार ना ही मान कोणा शत्रूसमोर
होतील वार, कटतील माना
पण प्राण अर्पण फक्त स्वराज्यावर
शिवरायांनी पेरलेल्या ह्या विचारांवर
कित्येक उगवले वीर धुरंदर
स्वराज्याची वाढू लागली व्याप्ती
उत्तरेत ही होवू लागली ख्याती
दक्षिणेला ही बसला दणका
मराठ्यांना मिळाला राजा खमका
सरले पावसाळे,संपले हिवाळे
सांगता आली उन्हाळ्याची
१४ मे १६५७ उगवला
अन् पहिली डरकाळी फुटली छाव्याची
मासाहेब बनल्या सावली,सईबाई झाल्या माऊली
ऊर भरून आला स्वराज्याच्या सिंहाचा
पुरंदर ही धन्य जाहला आवाज ऐकून धाकल्या धन्याचा
ट्रेक नंबर १४
किल्ले पुरंदर
२१ नोव्हेंबर २०२१
किल्ले पुरंदर.....जिथे जन्मले छत्रपती संभाजी महाराज.....जिथे मोघलांना झुंजवले आणि स्वराज्यासाठी प्राण अर्पण केले मुरारबाजी देशपांडे यांनी...जिथे घडला इतिहास प्रसिद्ध तह....शहाजीराजांना कैद करून शिवाजी राजांवर चाल करून आदिलशहाने धाडला फत्तेखान त्याला जिथे धूळ चारली......जिथे राजांनी वीर नेतोजी पालकरांना त्यांची चोख कामगिरी पाहून सरनौबत म्हणून निवडलं....असा धुरंदरांनी पावन झालेला किल्ले पुरंदर.
गडभ्रमंतीच्या आवडीमध्ये बऱ्याच ठिकाणी फिरताना मनात सारखा विचार यायचा एक ना एक दिवस बरेच किल्ले पाहून होतील पण जिथे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला तो पुरंदर काय पाहता येणार नाही......कारण ही तसचं होतं....हा किल्ला आपल्या सैन्यदलाच्या देखरेखीखाली आहे....तिथे सैन्य प्रशिक्षण दिलं जातं....मग आपल्या सारख्या सामान्य माणसांना कसे जाता येणार ना तिथे......पण मला अभिमान वाटतो आपल्या सैन्यदलाचा.....ज्यांनी ३ नोव्हेंबर पासून सर्वांसाठी गड खुला केला.....आधीच त्यांना भरपूर कामे असताना....लोक भेटीला येणार म्हणजे सारी तपासणी करणं....ठरवलेल्या नियमांनुसार सारे तपासून घेणं......हे अतिरिक्त काम त्यांनी स्वतःवर घेतलं......नियम ही काही जाचक नाहीत बर का.....सोबत ओळखपत्र असावं,१८ वर्षावरील व्यक्तींनी कोविडच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेले असावेत....मास्क हवे....ड्रोन कॅमेरा सोबत नसावा.... आर्मी ने प्रतिबंध घातलेल्या क्षेत्रात जाण्याचा प्रयत्न करू नये.....बस एवढं ऐकलं की मग सगळ काही आलबेल आहे.
आजचा आमचा हा ट्रेक देखील अगदी अविस्मरणीय असा वाटला.....स्वतः डॉ प्रवीण जाधव सर आज सोबत येणार होते.... त्यांच्या मित्र परिवाराने राजगडचे नियोजन केलं होतं .... पण त्यांना नकार कळवून आमच्या सोबत पुरंदर पहायला यायचं असंच त्यांनी ठरवून टाकलं.....ग्रुप मधील बऱ्याच जणांनी वेगवेगळे नियोजन आधीच केल्याने पुरंदर भेटीसाठी जास्त लोक येणार नाहीत हे स्पष्ट दिसत होतं.पण जे येतील त्यांच्या सोबत जायचं असं ठरवून शनिवारी रात्री झोपी जाणार तेवढ्यात रात्री १२ वाजता फोन वाजला आणि मित्र गणेश सुभनावळ म्हणाला "मी पण येणार उद्या"....मग काय झालच कामं....५ जण येणार म्हणून सचिन शिंदे सरांची एकच फोर व्हीलर होती त्यातून जायचं ठरलं होतं....कारण अजुन पावसाळा संपला नाही ना....मग टू व्हीलरवर कसे जाणार ...ह्या निसर्गाचं चक्रचं जणू उलटं फिरतयं.....सोबत असणारे साहित्य भिजेल म्हणून हा सारा फोर व्हीलरचा घाट घातला होता.पण आता गणा येणार.... मग त्याला जोशी विहिरी जवळ यायला सांगितले.तिथे रायगड इन हॉटेल वर नाश्ता करून बंधू गुरुनाथ बाबर(भाऊ),डॉ प्रवीण जाधव सर,सचिन शिंदे सर,धनंजय कणसे(धनुभाऊ) ही एक टीम फोर व्हीलर मधून आणि मी अन् गणा टू व्हीलर वरून अशा दोन टीम झाल्या.....बोलत बोलत....भिजत भिजत......खंबाटकी बोगदा......खंडाळा....शिरवळ....करत नारायणपूर गाठलं.....आणि पुढे सुरू झाला पुरंदर घाट प्रवास......गडावर जाणारा रस्ता हा आर्मीच्या ट्रेनिंग सेंटर गेट...आणि मग आत घेवून जाणारा असल्याने अगदी उत्तम आहे.....गेट वर व्यवस्थित माहिती पुरवल्यानंतर आम्ही आत आलो.....आर्मीचे जवान अगदी व्यवस्थित सर्व सूचना देत होते......आम्ही ६ जण आत आलो......ते सर्वप्रथम एक तळे दिसले....पहिल्यांदा वाटले हेच की काय पद्मावती तळे....पण ते नाही.....नंतर आपल्याला दिसते एक छोटेसे दत्तमंदिर...पुन्हा शिवमंदिर.....आणि मग लागते एक चर्च......सुंदर रचना असणाऱ्या ह्या चर्च मध्ये काही क्षणचित्रे टिपली की आपण पोहोचतो ते बिनी दरवाजा जवळ....नारायणपूर मधून चालत वर आल्यावर ह्याच दरवाजाने आत प्रवेशाचा मार्ग आहे...पण सध्या तो बाहेरून बंद केला आहे......अगदी मजबूत बांधकाम....पहारेकऱ्यांच्या देवड्या....कमानी जवळ भिंतीतच श्री गणेशाची छान मूर्ती...आणि पायऱ्यांवरून कमानी वर जायला रस्ता.....वरती अगदी २० फूट लांब आणि १० फूट रुंद जागा आहे.....तिथून खाली आलात की सरळ थोडे पुढं आले मी एक चर्च लागते....आणि त्या चर्चच्या समोर म्हणजे पश्चिमेच्या बाजूस आर्मिने सिमेंटचा वापर करून जमिनीवर भारताचा नकाशा बनवला आहे.....तसेच पुढे आल्यावर एक भला मोठा पुतळा दिसतो.....हो..... त्या उंच पुतळ्याकडे मान करून पाहिले की दिसतो एक करारी चेहरा.....दोन्ही हातात तलवार....आणि निधड्या छातीने शत्रूला "आरं..... ए अंगावर नाय तुझं तुकडं केलं तर नावाचा मुरारबाजी देशपांडा नाय......म्या राजांचा सरदार हाय.... तुझा कौल घेतो काय...."म्हणत दिलेरखानावर चालून जाणारा हाच तो पराक्रमी योद्धा.....सरदार मुरारबाजी देशपांडे यांचे ते रूप पाहून आणि कार्य आठवून आपण नतमस्तक होतो.
" देऊन आपल्या प्राणांची आहुती,
झाले अमर हे वीर मावळे किती,
भाग्य आमचे...पाहतो आज हे स्वराज्य
अन् लावतो कपाळी आपल्या पदस्पर्शाची माती "
मुरारबाजींचा पुतळा आणि त्याला लागून असणारे त्यांचे समाधी मंदिर पाहून आम्ही पुढे चालत आलो.....आणि दिसले गडावरील पुरंदरेश्वर मंदिर......थोडेफार हेमाडपंथी स्वरूपाचे असणारे हे जुने मंदिर अलीकडे पुन्हा जीर्णोध्दार झालेले दिसते....तिथे असणाऱ्या शिवलिंगाचे दर्शन घेतले....त्यामागे आहे छोटी....साधारण १ फूट उंचीची इंद्रदेवाची मूर्ती आहे....तिथून बाहेर आलो की मंदिराच्या मागे पेशव्यांनी बांधलेले छोटेसे रामेश्वर मंदिर दिसते....तिथून बाहेर आलात की हनुमानाचे एक छोटेसे मंदिर आहे....पुरंदरेश्वर,रामेश्वर अन् हनुमानाचे दर्शन घेतले की पुढे सरळ चालत जायचं....मग एक ब्रिटिशकालीन यंत्र दिसतं.....ते पाहून आम्ही वेगळेच तर्कवितर्क लावत होतो....छपाईचे यंत्र असेल,लोखंड वाकवण्यासाठी वापरले जाणारे यंत्र असेल असे वेगळे अर्थ लावून झाले....आणि शेवटी कंटाळून आर्मीच्या जवानाला विचारले तेव्हा समजले की ते विहिरीतून पाणी काढण्यासाठी वापरले जात होते...जवळच एक विहीर आणि पेशवेकालीन पडका वाडा दिसतो....आता तिथे आल्यावर दोन रस्ते आहेत....एक सरळ पुढे...पद्मावती तलाव...आणि छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळाकडे जातो....तर एक रस्ता वरती गडाकडे जातो.
पहिल्यांदा आम्ही गडाच्या दिशेने वरती आलो....सगळीकडे सिमेंटचे असणारे रोड सोडून आता प्रवास सुरू होतो छोटया कच्च्या चिंचोळी वाटेतून.....थोडे वरती आल्यावर ब्रिटिश काळात बांधलेली दोन पाण्याची टाके आणि एक पडकी भिंत दिसते....आणि तिथून ५ मिनिट वर चालत आलात की दिसतो दिल्ली दरवाजा...
होय दिल्ली दरवाजा....उत्तरेकडे तोंड करून असणारा हा दरवाजा.....बाजूच्या भिंतीत कोरलेली हनुमानाची मूर्ती....पाहून मनात एक विचार आला आणि काही वेळ दरवाजाकडे पाठ करून मी पण उत्तरेकडे पाहू लागलो.
आणि डोळे बंद करून गडाचा भूगोल डोळ्यासमोर आणला.....पूर्व पश्चिम बेलाग पसरलेला पुरंदर....गडाच्या पूर्व सोंडेवर वज्रगड....असा हा किल्ला जणू आपले हात पूर्व पश्चिमेला पसरून छाती ठोकून उत्तरेला सांगतोय...."या मुघलांनो या....मी उभा आहे छातीवर वार झेलायला....माझ्या कुशीत बसलेली ही माझी सह्याद्रीची पिल्ले....माझ्या राजाचे मावळे.....भले संख्येने कमी असतील....पण तुमची लाखाची फौज कापून काढतील..... लढायला अन् हसत हसत मरायला न घाबरणारी ही पिल्ले आहेत माझी....आणि मी अजस्त्र उभा आहे छातीवर तुमच्या तोफांचे वार झेलायला....बघु या समोर कोण अडवतो माझ्या राजाला....मी ठाम उभा आहे.....दक्षिणेतला शत्रू....आदिलशहा.....पाठीवर वार करतोय....माझ्या राजाच्या स्वराज्याची ही.... माझी लेकर कधीच भारी पडली हायत त्याला....म्हणूनच तर तू पण घाबरला हायस औरंग्या आणि तुला भीती आहे तूझ्या दिल्लीच्या तख्ताची.....कारण माझा राजा कधीच काळजात घुसला आहे तूझ्या.....भीतीनं हैराण आहेस तू.....समजत नाही तुला काय करावं.... एवढुस वाटणारं जहागिराचं पोर......आता स्वराज्य उभारायला निघालयं.....जिंकली त्यानं जावळी.... फाडलं त्यानं अफजलखानाला....जेरीस आणलं त्यानं सिद्दी जौहराला.... जिंकला पन्हाळा अन् जणू कापल नाक त्या आदिलशहाचं....बंद केलं त्याचं दार इकडे माझ्याकड यायचं..... आर् वेड केलं त्यानं पुऱ्या आदिलशाहीला.....आता तू ही वेडा झालास अन् घाबरून पाठवलस मिर्झाराजाला...."
खरच राजांचा पराक्रम.....दिल्लीच्या तख्ताला भिडला......म्हणून तर मिर्झाराजा जयसिंगाचा वेढा पुरंदराला पडला.
दिल्ली दरवाजा पाहून वरती आल्यावर सुरक्षेच्या दृष्टीने पत्र्याची भिंत उभी केली आहे.... त्यापलीकडे खोल दरी आहे.....एक खोल दरी...एक कडा...तोच तो खंदकडा....तिथून पुढे आल्यावर आणखी एक पूर्वाभिमुख दरवाजा लागतो....अन् तिथून आत आल्यावर पुन्हा एक उत्तराभिमुख दरवाजा.....असे एकूण ३ दरवाजे पार केले की आत आपण गडावर येतो.....गडाची उत्तर रांग....अनेक बुरुजांनी भक्कम केली आहे.....तर आत पडका वाडा....पुढे पिण्याच्या पाण्याची विहीर......वरती जाताना विहिरीच्या उजव्या बाजूस मोठे पाण्याचे टाके लागते....आणि त्याच्या पलीकडे देखील अजुन एक भलेमोठे टाके आहे....
ज्यात उतरायला पायऱ्या देखील आहेत.त्या पाहून पुन्हा मुख्य कच्च्या रस्त्यावर आलो की सरळ पुढे चालत यायचं.....थोडासा धोकादायक वाटेल असा छोटा रस्ता आहे...आणि त्याच्या डाव्या बाजूला छोटे पाण्याचे टाके आहे....जर पाय घसरला तर त्यात पडू शकतो....ज्यांना भीती वाटते त्यांनी टाक्याच्या अलिकडून एक रस्ता थोडा खाली जातो त्या मार्गाने चालत पुन्हा वरती यावे.....ते पाण्याचे टाके पार केले की पुन्हा आणखी एक टाके लागते....ते पाहून आम्ही चालत पुढे आलो.....आणि मग दिसला एक सुरेख पायऱ्यांचा रस्ता.....अगदी कोरीव आणि साचेबद्ध हे दगडी बांधकाम पहात चालत आम्ही पायरी मार्गाने वरती आलो.....आणि दर्शन झाले घुमटात असणाऱ्या नंदीचे अन् समोर असणाऱ्या त्रिशुळाचे.....पायातील बूट बाजूला ठेवून प्रवेश केला.... तो त्या गडावरील सर्वोच्च स्थानावर असणाऱ्या केदारेश्वर मंदिरात...... शिवलिंगासमोर नतमस्तक होवून क्षणभर आठवला तो इतिहास......विचारांची शृंखला तशीच मनात सुरू ठेवत.... सर्वांशी गप्पा मारत सुरू झाला परतीचा प्रवास....चालत खाली आलो....आणि जिथून दोन वाटा फुटतात.....एक गडावर जाण्यासाठी....आणि एक सरळ छत्रपती संभाजी महाराज वंदन स्थळाकडे.....तिकडे जाताना पहिल्यांदा लागते छोटीशी बाग ज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.....तिथून पुढे आल्यावर आहे.....पद्मावती तलाव.....आणि मग आहे ते छत्रपती संभाजी महाराज वंदनस्थळ.....आपल्या आर्मीने अलीकडेच फेब्रुवारी २०२१ मध्ये त्याचे नितनीकरण केले आहे.....आत मध्ये गडांचे सुंदर चित्र.....तलवारीची माहिती.....संभाजी महाराजांचा जीवनक्रम दाखवणारी चित्र.....स्वराज्याच्या कामी आलेल्या प्रत्येक सरदाराचे नाव असणारा फलक.....हे सारे पाहून आपण बाहेर आलात.....की पुन्हा होतो परतीचा प्रवास.....
गडावरील बरीच ठिकाणे सुरक्षेच्या दृष्टीने फिरण्यास बंद केली असली तरी जेवढे आपण पाहतो त्यातही जीवनाचे सर्वात मोठे सुख मिळाले असे वाटल्याशिवाय राहणार नाही.
गडाचा इतिहास सर्वश्रुत आहे त्यामुळे त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही.पण सध्या आर्मीने परवानगी दिलीच आहे तर नक्की सर्वांनी भेट द्यावी....कारण आपले वर्तन हे कायम घातक ठरवून जगत असलेला मनुष्य नक्कीच तिथे काही भलते साहस करण्याच्या इराद्याने वागायचा आणि पुन्हा गड आपल्या सामान्यांना बंद व्हायचा असे नको.
कारण समोरच एक घटना अशी झाली की जीवनात पहिल्यांदा असे घडले की छत्रपती शिवाजी महाराज की....असा आवाज कानी आल्यावर जय म्हणू वाटले नाही....तर ते म्हणणाराचा राग आला.....काय चुकले असेल माझे बोलणे तर क्षमा असावी....पण घडलेला प्रकार आपल्या सोबत सांगू वाटतोय....
गड पाहण्याची वेळ सकाळी १० ते ४ केली आहे....आम्ही ३.३० वाजता खाली उतरलो त्यावेळी मुलांचा एक ग्रुप तिथे आला होता.....वेळ खूप झाला असल्याने जवान समजावून सांगत होते की ४ वाजता बाहेर निघावं लागेल.....त्या सूचना ऐकताना मुलं कुचेष्टेने हसत होती.... गप बस कळतय आम्हाला...असे एकमेकांत कुजबुजत होती...काहीजण किंचाळत होती...आणि त्या जवानाने त्याचे तोंड बंद करून सूचना सांगणं बंद करावं या उद्देशाने त्याच्याकडे बघत जोरात छत्रपती शिवाजी महाराज की....हा घोष देत नाचत होती......काश्मीर मध्ये दगडांचा मार खावून देखील आपल्या माणसांवर नजर रागाने वर देखील न करणारे....अनुशासन,मर्यादा,शांतता ह्याचा पूर्ण अभ्यास असणारे जवान शांत बसले खरं....पण हाच का त्यांच्या बद्दलचा अभिमान.... हाच का त्यांचा आदर.....ह्याचा विचार प्रत्येकाने करायला हवा.....आपल्याच अनुशासित माणसांनी....आपल्यासाठी खुला केलेला हा मार्ग.....केलेल्या सुविधा.....आपल्याच लोकांनी जपायच्या की असे वेडे चाळे करुन आपल्याच लोकांची गैरसोय करायची हे आपल्यालाच ठरवायचे आहे.
शब्दसारथी
निलेश बाबर
९२७१००८८९३
स्मृतिगंध…..ट्रेक नंबर १३…..जंगली जयगड
स्मृतीगंध
उंच पुऱ्या वृक्षांचा काय तो अजब थाट
गर्द घण्या जंगलात उभे ते ठेवून कणा ताठ
हरवून स्वतःला ह्या गर्द झाडीत विसरावी नेहमीची ती पाऊलवाट जीवनातही मग येईल सुखाची खरी सोन पहाट
ट्रेक नंबर १३
जंगली जयगड
१४ नोव्हेंबर २०२१
जंगली जयगड.....नाव थोड वेगळं वाटलं ना......मलाही.....जेव्हा हे ऐकलं तेव्हा एक कुतूहल मनात जाग झालं...... की जयगड नाव ठीक आहे पुढे जंगली शब्द कशाला...? का असे नाव असेल...? पण लगेच कानावर बातमी आली "तिथे जाता येत नाही वनविभागाची परवानगी लागते"....हे ऐकलं आणि गडाचा थोडा अंदाज आला....ज्याअर्थी हा भाग राखीव आहे त्याअर्थी नक्कीच तिथे निसर्गाच्या सुंदर छटा पहायला मिळतील.....असा मनोमन कयास लावत गडाची काही माहिती नेटवर मिळतेय का हे पहात.... काही लेख, व्हिडिओ पाहण्यात आल्या.पण म्हणावे असे जास्त काही कोणाचे लिखाण किंवा काही संदर्भ सापडत न्हवते.श्री भगवान चिले सरांनी वर्णन केलेला जंगली जयगड आणि माझ्या सारख्या काही भटक्यांनी बनवलेले व्हिडिओ पाहून देखील जास्त काही हाती येत न्हवते.मग ठरवले हे सुख वाचून नाही तर समोर पाहूनच चांगले अनुभवता येईल.
काही दिवसापासून ह्या भटकंतीच्या वेडात माझ्यासोबत सामील होणारे खूप जण आता भेटत आहेत.....मागे म्हणालो ही होतो जशी तुमची आवड असेल तसे सोबती ही आपोआप तुम्हाला मिळत जातात....पांडवगड भेटीत श्री स्वप्नील चव्हाण सर हे इतिहास अभ्यासक भेटले तर त्याच भेटीत धनंजय कणसे (धनु भाऊ) हा दुर्गवेडा......त्यानेच तर ह्या जंगली जयगड चे मनात भरवले.....त्याने ठिणगी टाकली खरी पण मनात गड भेटीचा वणवा चांगलाच पेटला होता..... मग तिथे पूर्वी गाईड म्हणून काम केलेले श्री दिनेश यादव यांचा नंबर मिळवला त्यांना कॉल करून माहिती घेतली पण अजुन परवानगी देणे सुरू केले नाही....झाले की कळवतो असे ते बोलले.त्यांनीही चांगली मदत केली.सध्या कामानिमित्त मुंबई मध्ये असल्याने त्यांनी सध्या जंगली जयगड भागात फिरण्यास मदत करतील अश्या श्री महेश शेलार सरांचा नंबर दिला.....संपर्क सुरू होताच पण नेमके धनु भाऊ ने संपर्क करून परवानगी ची सोय केली होती.... आता गडाची भेट घडणार हे निश्चित झाले होते.मग सुरुवात झाली ती कोण कोण येणार ह्याचे नियोजन करण्याची.....आणि मी वैद्यकीय प्रतिनिधी असताना पासून ओळख असणारा मित्र विक्रम घाडगे भेटला.मग आता नेहमीच्या ग्रुप मध्ये अजुन काही जण वाढणार होते त्यानुसार विक्रम घाडगे,संदीप पवार,विनय दिघे,विनोद मतकर,सचिन शिंदे सर हे येवून मिळाले.तर राजू ढाणे सरांनी मोठ्या मोठ्या मुक्कामी कॅम्प मध्ये जे विविध प्रकारचे उपक्रम घेतले जातात त्यात रायफल शूटिंग चे ट्रेनिंग देणारे श्री अनिल घाडगे सर यांना आणले. धनू भाऊ ने आपले मित्र साजेश कणसे आणि प्रशांत कणसे ह्यांची भेट घडवून आणली.आणि बाकी मग आम्ही नेहमीचे होतोच.....पण कमी होती ती ट्रेकिंग ची छान आवड असणारे शिंगाडे सर,गणेश सुभनावळ,दिनेश जाधव सर आणि बंधू गुरुनाथ (भाऊ) ची.
मनाने आणि बोलण्याने एकदम निखळ असणारे धनंजय पाटील सर आज सोबती होतेच... की ज्यांच्या असण्याने वातावरण एकदम हसरे आणि मजेशीर राहत असते.असे एकूण १३ जण ह्या जंगली जयगड कडे जायला सकाळी ६ वाजता साताऱ्यातून निघालो.
सातारा......उंब्रज....पाटण.... कोयनानगर असा प्रवास करत पुढे गाठले ते आमचे तिथे असणारे गाईड श्री योगेश देसाई(नामदेव) याचे गाव मानाईनगर.पंचविशीच्या ह्या तरुणाला भेटून छान वाटलं कारण भटकंतीची आवड त्याच्यातही मनापासून भरलेली आहे हे त्याच्या देहबोली आणि बोलण्यातून स्पष्ट दिसत होते.
त्याला मानाईनगर मधून घेवून आम्ही गेलो ते पुढे नवजा धबधब्याच्या जवळ......मी तर तिथे पहिल्यांदाच गेलो होतो पण सोबत असणारे सहकारी धबधबा पहायला याआधी ही येवून गेले होते.....तिथे जावून जे दृश्य पाहिले यावर हेच शब्द कानावर येत होते की "काय झालंय राव...हे नवजा हाय वळखून पण यिना.... लय बदल झालाय.....कायच कळत नाय ....आपण हिथ यिवून गेलुय वाटणा अजिबात" मी फक्त ऐकत होतो कारण माझी ही पहिलीच वेळ होती पण सभोवती पाहताना स्पष्ट दिसत होते निसर्गाने केलेलं नुकसान....आइस्क्रीमच्या कप मधून चमच्याने जसा घास बाजूला करतो ना अगदी तसाच ह्या सह्याद्रीचा पडलेला तुकडा....वाहून खाली आलेली माती....भले मोठे दगड... हिरवा शालू नेसलेल्या ह्या नवजाचा... फाटलेला हा पदर पाहून मनात एक विचार आला.... साध्या मुंगीला डीवचले तर प्रतिकार करून ती देखील चावा घेते....मग इथे तर आपण ह्या निसर्गाला सगळ्या बाजूने नुसते टोचत आहोत....मग तो तरी का गप्प बसेल.....हो ना.....? ते काही असेल नाही माहित....पण जेव्हा आमचा गाईड नामदेव..."आम्ही त्याला नामाच म्हणत होतो".... नामा म्हणाला "यंदा पहिल्यांदा झालय आसं नायतर एवढं नाय कधी तुटलं......अहो इथ एक चौकी हुती आणि बारकी दुकान सगळी गायब हायत..... म्हंजे त्यांचा साधा पत्रा पण अजुन भेटला नाय...का म्हायते का....ह्यो सगळा ढिगारा दिसतोय ना ह्याच्या खाली आसल सगळं" मी फक्त ऐकत होतो आणि नजर फिरवत होतो त्या मातीच्या ढिगाऱ्यावर...वाहणाऱ्या धबधब्यावर.....हिरव्या शालूने नटलेल्या उंच डोंगर रांगांवर....आणि फाटलेल्या शालुच्या त्या पदरावर....मनात हाच विचार येत होता.....निसर्ग पर्यटन हे योग्य आहे कारण सिमेंटच्या जंगलात रोज फिरत असताना हरवून गेलेली मनाची शांतता ही पुन्हा मिळते ती ह्याच निसर्गाच्या कुशीत....पण पर्यटनाच्या नावाखाली सगळीकडे होत असलेली निसर्गाची हानी.....उभे राहत असलेल्या इमारती....खरंच गरजेच्या आहेत का.....? जर निसर्गात राहायचं आहे....तो सुंदर अनुभव घ्यायचा आहे तर का मागणी होत असते आपली... की मला राहायला एसी रूम हवी...ह्याला जबाबदार फक्त व्यावसायिक म्हणावे.....? की अशी मागणी करणारे आपल्या सारखे निसर्ग प्रेमी...? आणि खरच असे छान निसर्गात फिरायला येवून अगदी घरच्या सारखे राहायला मिळावे ही अपेक्षा करणारे आपण नक्की निसर्गप्रेमी.....की निसर्गद्रोही....?
जर फिरणाऱ्याने मागणीच उच्च केली तर व्यावसायिक ती पूर्ण करणार....हा भाग आलाच व्यवसायाचा....पण जर आपण भटक्यांनी मागण्याच कमी केल्या...तर जेमतेम सुविधा वापरून देखील फिरण्याचा आनंद लुटू शकतो ना......? मला ह्यात कोणाची कमी दाखवून नाही द्यायची....फक्त मत हेच की आपण हे सारं जपायला पाहिजे......मत व्यक्त करून.....किंवा नुसते होकार देवून सगळे होणार नसते....तर तसा प्रयत्न करत गेलो तर नक्कीच हे साध्य होईल असं मला वाटतं.
आखलेलं नियोजन....सुरू झालेला प्रवास....सोबत आलेले प्रवासी.....मनाला वाटत असलेली मतं....हे सारं व्यक्त करून झालं एकदाचं......आता सुरू करू तो जंगली जयगड प्रवास....आधुनिक बदल.....अन् इतिहास....
नवजा जवळ असणाऱ्या अधिकाऱ्यांकडून प्रती व्यक्ती रू.३०/- शुल्क देवून आम्ही जवळ असणाऱ्या चेक पोस्ट वर पोहोचलो.....तिथे चेकिंग झाल्यानंतर आम्हाला आत जायला परवानगी मिळाली...गाडी अगदी गडाच्या पायथ्याशी लावून आम्ही सगळे आपापल्या गाडीतून उतरून एकत्र जमलो....आणि नामा काय सांगतो त्या सूचना ऐकू लागलो......"जंगलात लय वेगळे पक्षी ... अस्वल....डुक्कर.....गवे..... बिबट्या....साप हायित....सगळे टोळीने चला आणि शांत चाला...."मी मध्येच म्हणलो आपण शांत आवाज न करता गेलो तर भेटेल का काय बघायला.....? नामा लगेच म्हणाला..." मिळलं की पण शांत चालायचं....दंगा नाय करायचा... नायतर पळून जात्याल जनावरं" मग काय सगळेच एकमेकांना म्हणायला लागलो ए बोलू नका ,बोलू नका....आणि बोलू नकाचा हा दंगा आरामात ती शांतता भंग करत होता.....मनात हसू येत होते पण न बोलता राहवत ही न्हवते......चालत चालत आत आलो आणि ऊंचच्या उंच झाडे पाहू लागलो.....घनदाट जंगल....ही उंच झाडे....हे सगळे पाहून मनाने आपोआप निर्णय बदलला.....नको बाबा काय दिसायला समोर... आल एखादं जनावर तर काय करणार....??? अशा चर्चा होवू लागल्या....आणि तेव्हाच लक्षात आलं की..... का हे नाव जंगली जयगड आहे....अशा भयाण घनदाट जंगलात काय हिमंत आहे त्या जनावरापासून पळून जायची....नाही....अजिबातच नाही..... खर तर त्या जंगलात आम्हाला कोणते जनावर आडवे येणार न्हवते तर आम्हीच त्यांना आडवे गेलो होतो..... कुतुहुल का असेना पण त्या उत्सुकतेने त्यांचा अधिवास आम्ही भंग करत होतो......त्यांच्या घरात आम्ही गेलो होतो......कारण फक्त एकच मुक्त हिंडण्याची आवड..... बस एवढच काय ते उत्तर..... बाकी आम्ही कोणी साधू न्हवतो की शांत ध्यान करायला एकांत शोधावा....आम्ही फक्त तिथे अनुभवत होतो ते निरव शांतता....आणि एरवी तोऱ्यात मोठे बनून फिरणाऱ्या आम्हाला आम्ही फक्त कस्पटासमानच आहोत याची जाणीव चांगलीच झाली होती.
काही पडलेली झाडे.....काही उंच झाडे....पहात आम्ही ती दृश्ये कॅमेऱ्यात साठवत पोहोचलो ते घोडेतळा जवळ.......ब्रिटिश काळात इंग्रज लोक तिथे आपली घोडी बांधत आणि वर चालत गडावर येत असत...म्हणून ह्या पाणवठ्याला घोडेतळ म्हणतात......तिथेच बाजूला एक चौथरा बांधला आहे...तिथून चालत पुढे आलो......आणि मग लागतो तो एक छोटासा टेहेळणी बुरुज.....त्यालाच ढालकाठी बुरुज म्हणतात.....त्यावरून कुंभार्ली घाट दिसून येतो......तिथून पुढे चालत आल्यावर लोखंडी पाईपने बांधलेला संरक्षक कठडा दिसतो....तो पार करून पुढे आलो की डाव्या बाजूला लांबवर काही तरी बांधलेले आहे हे दिसते....मग नामाला विचारले हे काय.....तेव्हा समजले ते ठिकाण म्हणजे पोफळी.... की जिथे कोयना विद्युत प्रकल्पाची पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याची वीजनिर्मिती होते.....आणि जवळच आहे ती सर्जवेल...... सर्जवेल म्हणजे काय असा प्रश्न पडला असेल ना....? मलाही माहीत नव्हतं....पण नामाने सगळे सांगितले .....जेव्हा पाणी मोठ्या फोर्स ने बोगद्यातून येते तेव्हा समजा पाण्याला काही अडथळा आला किंवा हवेचा दाब वाढला तर पाणी तसेच मागे येताना बरेच नुकसान होवू शकते मग अशा सर्जवेल म्हणजे मोठ्या विहिरी आहेत ह्यातून ते पाणी असेल किंवा हवा हे बाहेर येते.
दूरवर असणारी सर्जवेल आणि पहिला दुसरा टप्पा हे लांबून पाहिले पण त्याच्या अलीकडे म्हणजे जयगडच्या डाव्या बाजूच्या पायथ्याला जमिनीवर काहीतरी पांढरे ठिपके.....जाळी.... तारा दिसत होत्या.....त्याबद्दल माहिती घेतल्यावर समजले ते आहेत स्विचयार्ड......जवळ जवळ ७ ते ८ एकर मध्ये पसरलेल्या त्या विद्युततारांबद्दल नंतर काही माहिती वाचली तेव्हा समजले ह्या विद्युततारांमध्ये जवळपास १८ मीटर अंतर ठेवले जाते कारण त्या जवळ येवून कोणता धोका निर्माण होवू नये.त्यामुळे पूर्ण संच चालवताना बरीच जमीन ह्यासाठी लागते....समुद्र सपाटीपासून कोयना धरणाची उंची आहे ५७९ मीटर आणि पोफळी हे ठिकाण आहे ५०० फूट खाली.... ह्याच उताराचा फायदा घेत कोयनेचे पाणी ४५° मध्ये वळवून मोठ्या बोगद्याच्या मदतीने पोफळीकडे आणले आहे....हा बोगदा एवढा मोठा आहे की त्यात समजा ट्रक उभा केला तर तो देखील खेळण्यातला आहे असे वाटेल......एवढ्या मोठ्या बोगद्यातून पाणी जोरात साधारण १४.५ ते २० टन वजनाच्या टर्बाइन्सवर फेकले जाते...ह्या पूर्ण युनिट चे वजन साधारण २०० टन असेल.१४.५ ते २० टनाच्या ह्या टर्बाइन्सवर पडणाऱ्या त्या पाण्याने ते एक सेकंदात जवळपास ३०० वेळा फिरते यावरून त्या पाण्याचा वेग काय असेल याचा अंदाज बघा.....
पहिल्या टप्प्यात २८० मेगावॅट तर दुसऱ्या टप्प्यात ३२० मेगावॅट वीजनिर्मिती होते.वीजनिर्मिती करून झाल्यावर पुन्हा हे पाणी मोठ्या बोगद्याने बाहेर काढून वशिष्ठी नदी पात्रात सोडून गडाच्या उजव्या बाजूला वळवले आहे....तिथे कोळकेवाडी जवळ एक धरण बांधून पाणी अडवले आहे.त्या पाण्यावर तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याची वीजनिर्मिती होते.
तिसऱ्या टप्प्यात ३२० मेगावॅट तर चौथ्या टप्प्यात सर्वाधिक १००० मेगावॅट वीजनिर्मिती होते.
तसे गडावर असताना ही सारी कोयनेची माहिती देणे कितपत योग्य आहे माहित नाही.पण गड माथ्यावर जावून उजव्या बाजूला दिसणारी सर्जवेल डावीकडे दिसणारे कोळकेवाडी धरण.....शेवटच्या टोकावरून तिसऱ्या टप्प्याची दिसणारी सर्जवेल....बोगदे.....रस्ते.......हे पाहून एकाच नजरेत पूर्ण कोयना विद्युत प्रकल्प साठवण्याचा अनुभव फक्त जंगली जयगड वरूनच येवू शकतो हे जाणवते.....
ते पाहून पुढे चालत आलो की दगडाची उंच कपार दिसते.....त्याला स्थानिक लोक दीपमाळ म्हणतात.....तिथे काही फोटो काढून पुढे चालत येताना रस्ता खूप अरुंद आहे.एका बाजूला कपारीचा भाग मध्ये थोडा रस्ता आणि दुसऱ्या बाजूला खोल दरी हे पहात हळूहळु पुढे चालत यावे लागते.....तिथे आल्यावर लागते ते मूळ ठाणाई देवीचे मंदिर.....अगदी छोटेसे असे ते मंदिर....बाजूला दगडी दीपमाळ आणि दगडी भांडी....तिथली स्थिती खूपच अडगळीची झालेली दिसते.तरी तिथे थोडी फार सफाई... गवत काढले आम्ही...पण तरीही बऱ्याच प्रमाणात सभोवती वाढेलेले गवत दिसते....देवीचा आशीर्वाद घेवून पुढे आल्यावर गडाच्या पश्चिम टोकावर आपण येतो...तिथे समोर दिसणारी सर्जवेल पाहून पुन्हा परतीचा प्रवास करावा......गडउतार होताना शरीराची बरीच दमछाक झालेली जाणवते.
आम्ही खाली उतरून आल्यावर समजले ते एका वेगळ्याच आणि आश्चर्यकारक ठिकाणाचे.....ते म्हणजे रामबाण......गड उतरून आम्ही त्या ठिकाणी जायचे ठरवून गाडीत बसलो आणि मुख्य रस्त्यात आलो तर रस्त्यात एका भल्या मोठ्या घोरपडीचे दर्शन झाले....पण आम्ही गाडीतून उतरलो नाहीच....कारण ती आमच्या रस्त्यात नाही तर आम्ही तिच्या रस्त्यात आलो होतो....गाडीतूनच तिला कॅमेऱ्यात कैद केले.....आणि थोड्याच वेळात ती देखील नजरेआड झाली......मग आम्ही पुढे निघालो ते रामबाण शीलातीर्थ पहायला...... मुख्य रस्त्याबाजूला गाडी लावून डोंगरात उजव्या बाजूला वरती चालत आलो......चिरा दगडांनी पूर्ण रस्ता बनवला आहे....त्यावरून चालत वरती आलो.....नामाने एक भला मोठा दगड दाखवला....आणि बोलला हा रामबाण दगड.....
बस एवढे ऐकले....तिथे लिहिलेली सूचना म्हणजे मांसाहार करून किंवा पायात चपला घालून शिलेस हात लावू नये....आम्ही कोणीच मांसाहार केला न्हवता....मग पायातील बूट बाजूला करून शीलेस स्पर्श केला आणि दगडात असणाऱ्या खोबणीत आत पाहिले तर पाणी होते....ते पाणी हातात घेवून आचमन केले....उन्हातून चालत झालेला प्रवास.... थकेलेलं... भुकेलेलं शरीर....आणि मग हातात आलेले हे थंड पाणी .....अगदीच कसं शांत वाटू लागलं.आणि मग सुरू केले ते त्या पाण्याने सोबत आणलेल्या बाटल्या भरणे.....जवळपास १० -१२ बाटली पाणी त्या छोट्या खोबणीतून आम्ही घेतले होते....तरीही पाण्याची पातळी जशीच्या तशी होती......मग खरी सुरुवात झाली त्या आश्चर्याचा विचार करण्याची......
त्या ठिकाणी असणाऱ्या त्या दगडाबद्दल अशी माहिती तिथल्या लोकांकडून मिळते की....जेव्हा श्रीराम लक्ष्मण सीता वनवासात जात असताना तिथे आले होते..... सीता मातेला तहान लागली पण जवळपास कुठेही पाणी न्हवते.....मग श्रीरामाने त्या शिळेस बाण मारला आणि त्यातून पाणी काढले......त्या खोबनीचा आकार अगदी बाणाच्या टोकासारखा आहे....आणि विशेष हे की जमिनी पासून साधारण ४ ते ४.५० फूट उंच अशी ती खोबणी आहे.....आजूबाजूला कुठेही पाणी किंवा तसा ओलावा दिसत नाही.....त्या दगडी शिलेस पूर्ण चक्कर मारली तरी ती कोणत्या कड्याला चिकटलेली दिसत नाही .....पूर्णपणे तो दगड मोकळा आहे.....त्याला कशाचा आधार अजिबात नाही....मग मनात विचार येतो जमिनीपासून ४ ते ४.५० फूट उंचीवर असणाऱ्या त्या खोबणीत पाणी कसे.....? आणि जर तिथे पाणी आहे तर तिथला उपसा झाल्यावर ते कमी का होत नाही.....?आणि जर कोणत्या दाबाने ते पाणी वर येत असेल असे जर म्हणालो तर तर मग तो दाब वाढून पाणी खाली का वाहत नाही.....? पाणी खाली वाहत नाही....पाणी कमी होत नाही .....जमिनीपासून उंचावर......आणि आजूबाजूला कसला शिळेला आधार नाही....जवळ असणाऱ्या त्याच आकाराच्या शिळेत पाणी नाही .......आजूबाजूला ओलावा नाही.....वर्षाच्या बाराही महिने तिथे तेवढेच पाणी राहणे.....ही एक फार मोठी विलक्षण बाब आहे......खरच खूप विचार करायला लावणारे हे ठिकाण पहायला दुसऱ्या देशातून लोक येत असतात....तिथे काही संशोधन देखील केले आहे...पण पाण्याचे गुपित असणारा हा प्रश्न आजवर अनुत्तरीतच राहिला आहे......
रामनवमीला इथे फार मोठी यात्रा भरते.जवळपास असणाऱ्या गावातून लोक येतात आणि हे पाणी तीर्थ म्हणून घेतले जाते....
पुन्हा मनात हाच प्रश्न.... ही एवढी मोठी गोष्ट.....एवढे मोठे आश्चर्य.....ते ही आपल्याच जिल्ह्यात.....पण आजवर माहित नसलेलं......कितीतरी अज्ञानात सुख मानून आपण जगत असतो.....हो ना...?
रामबाण शिळातीर्थ.....जंगली जयगड ची सफर..... हे सारं मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो......नामा आम्हाला आग्रहाने त्याच्या रानातील घरात घेवून गेला.....आम्ही आलेलं पाहून आजींनी पडवी चांगली झाडून घेतली.....एक छोटीशी विहीर....शेती....छोटेसे कौलारू घर.....जवळच दिसणारा कोयनेचा जलाशय.....हे सारे सुंदर दृश्य पाहत....एकमेकांची चेष्टा करत आम्ही जेवणाची पंगत थाटली.....सर्वांनी आणलेले डबे....दिवाळीचा फराळ....भेळ....शेंगा.....असे एकमेकाचे सगळे एकमेकात वाटून गप्पा मारत छान जेवण केले......जेवण केल्यावर चांगलीच सुस्ती सर्वांना जाणवत होती....ते जाणवले म्हणून नामा लगेच म्हणाला आज रहा पाहिजे तर सगळे.....कोंबडा करून घालतो सगळ्यांना....स्वतः माळकरी असणारा साधाभोळा नामा आमचा फक्त गाईड म्हणून राहिला न्हवताच....आपुलकीने बोलणे.....आणि आपले मानून केलेला आमचा पाहुणचार ह्यातच त्याने आम्हा सर्वांची मने जिंकली.....आम्ही पुन्हा येवू आणि राहते येवू असे सांगून मानाईनगरच्या योगेश देसाईचा( नामदेव) निरोप घेतला...आणि परतीला निघालो.
आता सांगायचा राहतो तो गडाचा इतिहास......खर तर ह्या गडावर छत्रपती शिवाजी राजे यांचा काही इतिहास आढळून येत नाही.....पण पुढे हा गड औंधाचे पंतप्रतिनिधी यांच्या हाती होता....याचा अर्थ हा गड स्वराज्यात आधीपासून होता.....वर असणारा ढालकाठी टेहेळणी बुरुज आणि एकंदरीत गडाची रचना पाहता ह्या गडाचा उपयोग कुंभार्ली घाटावर लक्ष ठेवण्यासाठी होत असावा.....
इ.स.१७५८-५९ मध्ये पंतप्रतिनिधींकडून पेशव्यांचे सरदार खंडोजी मानकर यांनी हा किल्ला जिंकून घेतला पण पुन्हा पेशवे आणि पंतप्रतिनिधी ह्यांच्यात असणारे वाद थांबले आणि पुन्हा गडाचा ताबा पंतप्रतिनिधी यांच्याकडे आला.....
पुढे परशुराम पंतप्रतिनिधी ( जन्म इ.स.१७७७) कारभार पाहू लागले......वयाची १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत पेशव्यांचे कारभारी कृष्णराव जोशी कारभार पहात होते......पुढे संपूर्ण कारभार स्वतः परशुराम पंतप्रतिनिधी पाहू लागले....पुढे त्यांनी दोन लग्न केली काशीबाई आणि लक्ष्मीबाई या मोठ्या घराण्यातील स्त्रियांशी .....पण सुरुवातीपासून अय्याशी मध्ये जगण्याची सवय असणाऱ्या परशुराम पंतप्रतिनिधी यांचे लक्ष संसारात लागलेच नाही......पुढे त्यांचे संबंध आले ते रमा उर्फ ताई तेलीण हिच्या सोबत.....परशुराम पंतप्रतिनिधी यांच्या वतीने सगळा कारभार ताई तेलीण पहात होती.....पुढे पेशव्यांच्या विरोधात बरीच कामे पंतप्रतिनिधी करत असल्याने त्यांनी सरदार बापू गोखले यांना पाठवले. इ.स. १८०८ ते १८१० च्या दरम्यान झालेल्या युद्धात परशुराम पंतप्रतिनिधी यांचा उजवा हात कलम केला गेला.आणि ते धरले गेले. त्यानंतर ते थोटोपंत म्हणून ओळखले जात होते...पण ह्या युध्दात ताई तेलीण हरली न्हवती.....पण मोठी सैन्य तुकडी आणि जोरदार हल्ला पाहून तिने जंगली जयगड सोडला आणि वासोटा किल्ल्यावर गेली......तिथे ८ महिने किल्ला मोठ्या धैर्याने लढवला...
पण शेवटी हार मानावी लागली.....असाच काही तो थोडाफार इतिहास वेगवेगळ्या संदर्भातून सापडतो.....ह्यात मुख्यत्वे श्री भगवान चिले सर.... श्री सुखलाल चौधरी सर....यांच्या लिखाणाचा सार घेतला आहे.
अतिशय सुंदर पण दुर्लक्षित ह्या गडाला आणि रामबाण शीलातीर्थ ह्या दोन्ही ठिकाणांना अवश्य भेट द्या.....आपले गाईड...मित्र....श्री योगेश देसाई (नामदेव) याचा मोबाईल नंबर
७७७५९६७६१७ / ९४२१९२५२६०
शब्दसारथी
निलेश बाबर
प्रेम
शब्द….मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र.
*शब्द*.......मुक्या भावनांना व्यक्त करणारे एक अस्त्र. आपलं जीवन शब्दात बांधता येईल एवढं सोपं कधीच नसतं असं वाटतं ना....?कारण काहींना मनातलं शब्दात मांडता येतं,तर काहींचे शब्द मनातच राहून जातात. कधी डोळे बोलके भासतात तर कधी शब्दही मुके होतात. पण बघा ना धार बनून काळजाला चिरणारे ही शब्दच आणि काळजीने आधार देणारेही शब्दच.लहानपणीचे ते बोबडे बोल,तारुण्यातील प्रेमळ हाक आणि उतार वयात हवे असतात ते आधाराचे शब्द.हे सारंच कसं शब्दात बांधलं गेलंय ना....! खरंच शब्दांनी एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचता येतं.पण त्याआधी त्या शब्दांपर्यंत पोहोचता यायला हवं ना.कारण काही वेळा शब्दच हरवून जातात.मग का....? कसे....? असे अनेक प्रश्न पडतात ना....? पण अशा निशब्द भावनांवर बोलताना शब्दांत जरासा झालेला बदल हा देखील कित्येक नव्या अर्थांना जन्म देत असतो.मग अशा अनेक अर्थांनी भरलेल्या सोहळ्यात जन्म घेणारे हे शब्द कित्येकदा पूर्ण जन्म निघून गेला तरी मनातील दुरावे दूर करू शकत नाहीत. उब देणारी गोधडी थंडीत जशी हवीशी वाटते तशीच ती उन्हाळ्यात अगदी नकोशी झालेली असते.शब्दांची उब तरी काय अशीच तर असते.योग्य वेळी योग्य त्या शब्दातून व्यक्त झालो तरच ती उब हवीशी वाटते नाहीतर मग भावनाशून्य वाळवंटात तुमच्या आपुलकीच्या गोधडीला दूरवर फक्त टांगते ठेवले जाते कारण त्याखाली बसून.... फक्त सावलीत मिळणारा विसावा अनुभवता यावा म्हणून.मग एखाद्याच्या विरंगुळ्याचं कारण बनून असच हवेत फडफडणाऱ्या शब्दांच्या सावलीला किंमत..... ही फक्त समोरच्याला क्षणभर विश्रांती मिळावी एवढीच.म्हणूनच तर अर्थपूर्ण शब्दही निरर्थक ठरतात कारण त्यांच्या वापराच्या योग्य त्या वेळा साधता येत नाहीत.चुकलेली वेळ आयुष्याचा मेळ पुन्हा बसवेल असे कोणतेच शब्द नसतात.म्हणून योग्य त्या वेळी शब्दांचे बांध फोडत रहा.....कायम व्यक्त होत रहा.आपल्यांसाठी अन् आपल्यांपाशी शब्दांचा झरा कधी आटू देवू नका.तरच नात्यांचा ओलावा कायम टिकून राहील ना. शब्दांच्या या खेळामध्ये सावरताना स्वतःला हे शब्दच मला तारती कारण मी त्या शब्दांचा आणि शब्द माझे सारथी. *शब्दसारथी* *निलेश बाबर* *९२७१००८८९३*
दिल बेचारा
दिल बेचारा..
तुम ना किसी के हुए तो क्या.
मै तुम्हारा मैं तुम्हारा वो चंदा ..
दिल बेचारातलं हे अप्रतिम गाणं. जीवनाचे सत्य अधोरेखित करणारे. वेदनेचा अविष्कार सुंदर जगुन आनंदात परावर्तित करायचा असतो. काही गोष्टी आपल्या होऊ शकत नाही पण आपण तर त्यांचे होऊ शकतो ना. आवाक्या बाहेरच्या गोष्टीवर प्रेम बसतं तेव्हा आपल्याला प्रेम करायला कुणी रोखू शकत नाही. सौंदर्य हे प्रेमासाठी असतं, आस्वादासाठी असतं. सौंदर्याचे हजारो उपासक असतात. देवाचेही हजारो उपासक असतात. देवाने आपल्या कडे लक्ष नाही दिलं, देव मंदिरातून अदृश्य झाला, देऊळे बंद झाली तरी आपलं देवाविषयी प्रेम असतंच आणि त्याला कोणी रोखू शकत नाही. प्रेम करणारा माणूस मिळाले की आयुष्याला कलाटणी मिळते, जगावसं वाटू लागतं.
आपण प्रत्येक जण रियालिटी शोच्या ऑडिशनसाठी आलेले असतो. कधी एलिमिनेशन होईल सांगता येत नाही पण वाइल्ड कार्ड ने पुन्हा एन्ट्री कधी कधी मिळते, तसच आयुष्यात काही माणसे भेटल्यानंतर पुन्हा काही काळ आपण आपल्याला सिद्ध करू शकतो, ही उमेद जगण्याला कारणीभूत ठरते.जन्म आणि मृत्यू आपल्या हातात नसतो पण कसं जगायचं हे आपल्या हातात असतं असं म्हणणारा नायकच जेव्हा जगाला रामराम करतो तेव्हा त्याचं ते म्हणणं अभिनय होता का? तो अभिनय जगत होता का जिवन जगत होता हा प्रश्न पडतो.. खोटे आणि छोटे-छोटे अभिनय करतच माणसे जगतात. माणसे दिसतात तशी नसतात. तत्त्वज्ञान सांगण वेगळं आणि जगणं वेगळं. माणसे केवळ औषधावर जगत नाहीत. प्रेमावर व प्रेरणेवर जगतअसतात.
नायक नाईका दोघांनाही कॅन्सर असतो. मृत्यू पर्यंत दोघेही एकमेकाला फुलवतात आनंद देतात.
प्रत्येकालाच मृत्यूच्या भोज्ज्याला शिवूून येता येतं नाही. वेदना जगलेला माणूस मृत्यू जगलेलाच असतो.प्रत्येक वेदनेतून फिनिक्स पक्षी उभारी घेत नाही.
मृत्यू अटळ आहे हे समजल्यावर राहिलेला संकल्प पूर्ण करणे, आनंद जगुन घेणे एवढेच आपल्या हातात असतं. आपली शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी अर्धवट गाण्याच्या पुढच्या ओळी काय असतील हे जाणून घेण्यासाठी नायिकेच्या इच्छेनुसार नायक नायिकेला घेऊन पॅरिसला, ज्या कवी ने हे गाणं लिहिले आहे त्याच्याकडे जातो. प्रत्येकाची आशा वेगळी. निराशा वेगळी. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारे त्यावेळी त्या क्षणापुरते सुखीच असतात.दुःखाला आनंदात बुचकळायला हवं.
काही माणसें असली काय आणि नसली काय त्यांच जाणं आणि अभिनय चटकाच लावतं.वेदना जेव्हा प्रेमाला हात घालते तेव्हा ती सुगंधी जखम करून जाते.
अभिनयात सुशांत व संजना उणीव शब्दाची आठवण करून देत नाहीत.
आपणही आपल्या आयुष्याच्या पुढचं काय वाढून ठेवलंय हे पाहण्यासाठी कळत नकळत प्रस्थानच करतो.
डॉ.अनिल कुलकर्णी.

लम्हे
लम्हे..
हमारा दिल धुंडता रहा
फुरसत के वो लम्हें
तुम्हारी बीती हुई लम्होंने
तो आज तक जिंदा रखा है
जहां रहो वहां खुश रहो
कबर तक राह देखेंगे
तुम्हारी खबर की
तुम नही तो क्यां
लम्हों ने कहां छोडा है.
मोहब्बत..डॉ. अनिल कुलकर्णी
अगर मोहब्बत ना होती
तो इश्क ना होता
इश्क के अफसाने न होते
जीने के कुछ मायने ना होते
जीवन मे बहारे नही होती
जहा प्यार वहा मोहब्बत
गर न होती मोहब्बत
पत्थर के सनम
जगह जगह होतें.
डॉ. अनिल कुलकर्णी
लपंडाव
लपंडाव त्या रवी मेघाचा।
हा खेळ अनोखा सृष्टीचा ।
कधी किरणांचा कधी मेघांचा।
सुखद आनंद दृष्टीचा ।
भेदू आपण मेघांना,
अट्टाहास त्या किरणांचा ।
थोपवून त्या रवी किरणांना,
विश्वास वाफेच्या मेघांचा ।
बघणाऱ्या त्या डोळ्यांना,
स्पर्श थंड वाऱ्याचा।
खेळ नसतो हा पराभवाचा किंवा जिंकण्याचा ।
खेळ आहे हा रवी मेघाच्या प्रेमाचा।
या प्रेम-मिलन खेळातून जन्म होतो पावसाचा।
धडा घ्यावा आपण या सृष्टीकडून,
फक्त आणि फक्त प्रेमाचा।
कवी- क.दि.रेगे
नाशिक..
ज्ञानसूर्य
ज्ञानसूर्य तू ..
ज्ञानाच्या अथांग आकाशातला ज्ञानसूर्य तू।
ज्ञानाच्या आकाशगंगेत मुक्त विहार करणारा रवी तू।
जनसामान्याच्या आयुष्यातला अविरत ज्ञानप्रकाश वाटणारा भास्कर तू।
स्वतः तळपून मायेची ऊब वाटणारा दलितांचा आदित्य तू।
ज्ञानमहासागरासही तापवणारा तेजस्वी असा मित्र तू।
भारतमातेच्या पारतंत्र्याच्या बेड्या वितळवणारा खग तू।
कठीण परिस्थितीवर मात करून दिन-दलितांना वाट दाखवणारा मरीच तू।
शिक्षणाचा अधिकार मिळवून दिले हे हिरण्यगर्भ तू।
संविधान या भारताचे लिहिणारा हे भानवा तू।
मातेचा या भूमीचा महामानवा सवित्र तू।
महान भारतीय संस्कृतीत रोवला गेलेला अर्काय तू।
एकच परी तू भारतरत्न वंदन तुला करतो हर एक मानव असा पूष्णेः तू।
ही बारा नावे सूर्याची शोभतील तुलाच..
...... असा तू ज्ञानसूर्य
.....असा तू ज्ञानसूर्य
कवी - कपिल रेगे . नाशिक
तुम न जाने किस जहाँ में खो गये…
तुम न जाने किस जहाँ में खों गये
हम अकेले तन्हा रहे गयें...
समोर असणारी माणसें हरवतात, काही तात्पुरती काही कायमचं जातात का?
जें जायला पाहिजे ते जात नाहीत. छळणारेंच छळतअसतात. तेच छळंतच राहतात. सगळ्यांच्या जाण्याने पोकळी निर्माण होत नाही.
माणसे जातात म्हणजे आपल्याला आत्मनिर्भर करून जातात. अस्तित्वासाठी कात टाकल्या प्रमाणे माणसांना सोडावं लागतं.
तेरा जना दिल कें अर्मानोंका लुट जानांच अस्तं.
थांब माझ्या लेकराला न्हाऊं घालू दें म्हणंत अनेकांनी आपलं पोषण केलेलं असतं.
माणसें ठसा उमटवून जातात माणसे वसा देऊन जातात. माणसें पाऊल वाट निर्माण करतात.
माणसें प्रेम करतात, माणसें द्वेष करतात. माणसे जाळतात, माणसे जळतांत. माणसे अनंत असतात, अनंत स्वभावाची असतात, शेवटी अनंतातच विलीन होतात. एखाद्याचं काही जणांच्या असण्यानें जीवन समृद्ध होतं. भरलेलं वाटतं.त्यांच जाणं सहनंच होत नाही.
मिनाकुमारी गेलीं की दर्द भरी दास्तां आठवतें. विजय तेंडुलकर गेले की जीवनातलं नाट्य आठवतं. दिवाकर गेले की नाट्यछटा आठवतात. पुलं की विनोद आठवतो. वपू गेले की वपुर्झा आठवतो. दुर्बोध कविता हल्ली दुर्मिळ झाली. त्यामुळे कवितेतच ग्रेस राहिला नाही.
प्रत्येकाच्या एक पाऊस असतो, त्यांनी आपल्याला कधी ना कधी भिजवलेलं असतं. ज्या आठवणीत आपण भिजतों त्याच लक्षात राहतात. आठवणीच आपल्या लाला अंकुरित करतात, स्वतःतून उमलाला भाग पाडतात. माणसांचे फुलासारखं आहे़. उमललीं नाही की कोमेजून जातात. ऊमलण्याचे प्रसंग असतील तरच फुलें कोमेजत नाहीत. माणसांचेही असंच आहे. अनेकांच्या आठवणीनेच माणसें उमलतात,बहरतात.
बाबा सारखा कल्पवृक्ष अनेकांनी आपल्या अंगणात लावलेला असतों. एखाद्याच्या जाण्याने जीवनातलं नाट्य संपतं, जीवनातलं संगीत सपतं, जीवनातला संवाद सपतो. ति येते आणिक जातें याच्यातच जीवनाचा सर्व आवाका असतो का? समोर असणारी माणसें सापडत नाहीत.ओळखू येत नाहीत. ओळख दाखवत नाहीत. कुठे गेलीं लताची दर्द भरी गाणीं. तलत,के.एल सैगल दुःख देऊन हस्ते जखम देऊन गेले. जमा ईलाही हे सुगंधी जखमा देऊन गेले. सुरेश भटांनी जगण्यातलं छळणंअधोरेखित केलं. सरणावर सुटका होते हे जाणवून दिलं. कळतं सगळं पण वळण्यासाठी कुणीतरी
हवं असतं. सगळेच हरवलें, हरवत चाललेत. त्यांच्या पावलावर पाऊल टाकायचे आहे. पावलावर पाऊल टाकले की रस्ता सुकर होतो. जाणाऱ्याने पाऊलवाट निर्माण करायची असतें. सामान्यांनी पाऊलवाटेवरून चालायच असतं. म्हणजे रस्ता चुकत नाही. गालीबचं दालन अजून आम्ही पूर्ण कुठें उघडलं आहे?
आपल्याकडे समृद्ध वारसा आहे याचा एक अभिमान असतो,तोच जगण्यासाठी पुरेसा असतो. कुणी न कुणी कोणासाठी तरी निमित्त असतं, जगण्यासाठी. माणसे गेली तरीही घडवून जातात.
आत्मनिर्भर करून जातात.
काही पुस्तके नुस्तीच वाचायची काही नुसतिच करमणुकीसाठी, काही विरंगुळ्यासाठी काही, अभ्यासासाठी, काही निष्कर्षा साठी, काही चिंतन, मनन करण्यासाठी, काही पारायण करण्यासाठी. पुस्तकांची आणि माणसांची उपयुक्तता कधीच संपत नाही. पुस्तकें आणि माणसें सारखी सारखी वाचलीं पाहिजेत, नव्या संदर्भात. वाचाल तरंच घडांल
एकलव्य व्हायची तयारी असली की द्रोणाचार्य भेटतांतच. अनुकरणानेच माणसें शिकतात. आपण निसर्गाचे अनुकरण करतों पैसे कुठे द्यावे लागतात?
दुसऱ्यांच्या विचारावर आचारांवर आपले पालनपोषण होते, पैसे कुठे द्यावे लागतात.
मुळांसारखं गाभ्या पर्यंत जाता यायला हवं. खूप लोक गेलें. कुणी नक्षत्राचे चांदणं देऊन गेले, कुणी शरदाचे चांदणे देऊन गेले. प्रत्येकाचं देणंआपलं संचित असतं. वारसां नावाचा आरसांच आपल्याला जिवंत ठेवतो.
आपला स्वयंमूल्यमापन करतो, आपल्याला प्रेरणा देतो.
तुम्ही गेल्यावरच कळालें, आम्ही कुणाकडून शिकलो? कसे शिकलो? कोणी आम्हाला वाढविलें, आमचे अस्तित्व दखलपात्र तुम्हीच केलें, तुम्हीच आम्हालाओळख दिली. तुम्ही आणि तुमच्यासारखें दृष्य,अदृष्य ज्यांनी आम्हाला घडविलें. तुम्ही आज नसलां तरीही,
सोहळा वैभव आहे, ते तुमचंच आहे. रक्तातून तर फार प्रचंड वाहतंच. अनुवंशिकतेचे झरे कधीच आटत नाहीत. त्यांना जिवंत ठेवणं आपलं काम आहे. निरीक्षणातूनही फार प्रचंड आपल्याला मिळतं.
पूर्वजांचे हावभाव, हेवेदावें हातवारे, वागण्याची पद्धत, आवाज, विचार हे सगळं आपल्याला वारसा म्हणून मिळालेला असतं. वारसा समृद्ध असला तरीही आरसा प्रमाण मानायचा.सोडून गेलेल्यांच्या भांडवलावरंच आपण जगतों. अनेकांचा ठेवां आम्हाला अजून माहीतच नाही. समृद्ध संस्कृतीची अजून आमची ओळख तरी कुठें झाली आहे? म्हणून तर miles to go before I sleep प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपली ही मूर्ती कोणाच्या तरी मन मंदिरात वास्तव्यं करावी अशी आपलीही इच्छा असते. हे सगळें ऋणानुबंधच तन्हां पासून आपल्या ला वाचतात.मग काळजी कशाला करायची?
डॉ.अनिल कुलकर्णी ंंंंंंंंं
ंंंंंंंंं
या मनांवर शतदा प्रेम करावे:डॉ. अनिल कुलकर्णी
या मनांवर शतदा प्रेम करावे...
डॉ.अनिल कुलकर्णी.
मनाचा खेळ कधी कुणाला समजलेंत. स्वतःच्या मनाचे खेळ सुद्धा स्वतःला समजत नाहीत. आत्महत्या करणाऱ्या च्या हातातच असतो मनाचे खेळ थांबवण्याचा लगाम. कधी कधी परिस्थिती प्रवृत्त करते, कधी कधी मनंच मनांला प्रवृत्त करतं.
कॅनव्हास वर मनसोक्त रंगाची उधळण करत सुंदर चित्र काढता येतं. सुंदर क्षणांची उधळण करुन वेगळे वेगळे क्षण सभोवताली गोळा करता येतात. क्षणांची रांगोळी काढून, मनासारखे रंग भरता यायला हवेंत. चित्र पुसता येतें, रांगोळी ही पुसता येतें. क्षणांना पुसलं कीआयुष्य संपतं.
सुखाचा इंद्रधनू पाहायचा असतो, अनुभवायचा असतो, बघायचा असतो, तो ओरबडायचां नसतो. सुख ही अनेकरंगी असतं. प्रत्येक रंग माणसाला ओरबाडून हवां आहे. सत्ता, कीर्ती, पैसा वासना, प्रेम,समाधान, यश
हे सगळं यशाच्या इंद्रधनूंत असतं. एका वेळेस एकच मिळेल व ते भोगावं.
आत्महत्या करणारे कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात यशस्वी असतांतच. यशानंतर दोन रस्ते असतात,समाधान व नैराश्य.
नैराश्याच्या रस्त्यावर आत्महत्या भेटतें.
यशोशिखरावर असणारे जेव्हा आत्महत्या करतात तेव्हा खरंच समाजामध्ये संभ्रमावस्था निर्माण होते.
मन ही आवाक्यात न राहाणारी गोष्ट आहे. माणसे उन्मत्त होई पर्यंत मनाचं ऐकत राहतात.
मनाच्या खेळावर ज्याचं नियंत्रण आहे, तोच उत्तम आणि यशस्वी जीवन जगू शकतो. मन आवाक्यात नसलें की मनात अनेक समस्या घर करतात. मनाला कळणं आणि वळणं याचा सुवर्णमध्य साधता आला पाहिजे. कुणाचं मन कुणावर जडेल याचे काही ठोकताळे नाहीत.प्रत्येक क्षण विविध रंगात न्हाऊन निघालेला असतों आणि तोच मनाचं अस्तित्व टिकवून ठेवतो. 'दुखी मन मेरे
जहा नही चैना वहा नही रहेना' असं म्हणलंच आहे. क्षणांना जिंकलं की आयुष्य आपलंच असतं.क्षणांना जिंकता यायला हवं. तुमचा अखेरचा श्वास ठरवतो क्षणंच.
मनातल्या तरंगावर आपलं नियंत्रण नसतं. तरंग आपले नसले तरीही अंतरंग आपलंच असतं.आपल्या अंतरंगात आपण कधी डोकावतंच नाही, आपण नेहमी दुसऱ्याच्या अंतरंगात डोकावून तुलना करत बसतो. तुलना तुमच्या मनाला जाळतें तुमच्या मनाची राख करतें. सारखंआरशात पाहून चित्र बदलत नाही. वारसा आणि कर्तुत्व हातात हात घालून आले तर तरच आरसा दखल घेतो.मनाचा थांगपत्ता लागू न देण्यात माणसा सारखा माणसाचा हात कोणीच धरू शकत नाही.चेहरे व मुखवट यांचे नियोजन कधीच एकमेकांना पूरक नसतं. मुखवट्याची ब्लु प्रिंट चेहरा कधीही बदलू शकतो.
चेहऱ्याचा नियोजन मुखवट्या शिवाय अंमलात येऊच शकत नाही.
खरा चेहरा उघडकीला येऊ नये म्हणून मुखवटे तारे वरची कसरत करतात.
माणसं सगळं उघड़ करतील, पण मन उघड करण्याची लक्ष्मण रेषा कधीच ओलांडत नाहीत. मृत्यूनंतरही माणसाच्या मनातलं कळत नाही. शरीराने जवळ येणारे मनाने रत होतांतच असं नाही. मन खुंटीला टांगलं की माणसं मनां सारखं वागायला लागतात. मनाला विसावण्यासाठी आश्वासक खांद्याची गरज असतें. पाय धरणारे व्यक्तिमत्व व विश्वासाने विसावणारे खांदे आज दुर्मिळ झाले आहेत. मानवी संबंधाचा सगळा इतिहास मनातलं ओठावर न आल्यामुळे झाला आहे. मनानें ठरवलं तर काही होऊ शकतं.आपल्याच मनाचं विश्लेषण आपल्याला करता येत नाही. आपण दुसऱ्याच्या मनातलें विश्लेष,ण करू शकतों कां?माणसे स्वतःच्या मनावर प्रेम करतच नाहीत, स्वतःच्या मनाला गोंजारततच नाहीत. स्वतःच्या मनाला वेळ देत नाहीत नेहमी उपेक्षेने, तिरस्काराने मनाचे खच्चिकरण झाल्यावर नैराश्य येणार नाही तर काय? मनाला वेळ देण्यासाठी स्वतःला वेळ काढला पाहिजे. सगळ्यांना जगाची चिंता, मालिकेतल्या पात्रांची चिंता पण घरातल्यांची व स्वतःच्या मनाची चिंता नाही.आई कुठे काय करते ऐवजी स्वतः आपण काय करतो, स्वतःसाठी, मित्रांसाठी हे मनात डोकावून पाहणे गरजेचे आहे. जगायला माणसांना वेळ नाहीच. कुटुंबासाठी ते नाही नाही ते करतील, नको नको त्या गोष्टी घरात आणून ठेवतील. भौतिक समृद्धता आणण्यासाठी स्वतःच्या मनाचा कोंडमारा करतील.घरच्या माणसांना वेळ हवा, संवाद हवा आणि तेच नेमकं चुकतय. मुलांना खेळणी घेऊन देणारें पालक मुलांच्या मनाशी व मुलांशी किती खेळतात?
बायकोला फ्लॅट घेण्याच्या नादात स्वतः फ्लॅट होतात. बायकोला हवा असतो फक्त गजरा व संवाद. मनं जिंकायची आयुधं फार वेगळी असतांत. मन प्रसन्न करां हे ठिक आहे, पण सभोवताली तसां निसर्ग हवां, तसं सौंदर्य हवं, तसं समाधान हवं. मन चांगलं ठेवां व चांगल्या मनाच्या माणसाच्या सोबत रहा, मनाचे काहीच प्रश्न राहणार नाहीत.
कुणाचे मनाने वाईट चिंतू नका. माणसांची बरीच शक्ती जळण्यात जातें
जळणं स्वतःला संपवतं
ईतरा वर जळण्यांत स्वतःच्या मनाची स्मशानभूमी कधी होते हे माणसाच्या लक्षातंच येत नाही. मन पतंगासारखं भर करटतं, त्याला नियंत्रणात ठेवणें महत्त्वाचं असत. मनासारखे खांदे मिळणं हेच आयुष्याच संचित.शेवटचे चार खांदे तरी आपल्या कुठें हातातअसतात?्र््र्््र््र््र््र््र्र्र््र्््र््र््र््र््र्
माझा स्वाभिमान
कविता
Kapil-Rege - 0
मी कधीच न विकला माझा स्वाभिमान
मी कधीच न दुखावला कोणाचाच स्वाभिमान
माझे जीवन अन् जपतो मी सदैव माझा स्वाभिमान
ठेच लागता वाहते रक्त, मला माझ्या रक्ताचा अभिमान
गल्ली-बोळात नाही मिरवत मी रिकामी शान
मला माझा, माझ्या अस्तित्वाचाच आहे स्वाभिमान
आज-काल पैसाच झाला आहे प्रत्येकाचा अभिमान
पैशानीच विक्री-खरेदी होतो प्रत्येकाचा स्वाभिमान
जे स्वातंत्र्य म्हणून करतात चाकरी आजही
जे स्वातंत्र्य मिळवून खातात लाचारीची भाकरी आजही
जिथे नाही भेटत मान आणि खाली घालावी लागते मान..
तिथे का कोणी करावी चाकरी? आणि का विकावा पुन्हा पुन्हा स्वाभिमान।
कवी -क.दि.रेगे
नाशिक
अस्तित्वाच्या पाऊलखुणा: डॉ.अनिल कुलकर्णी
अस्तित्वाच्या पाउलखुणा: डॉ अनिल कुलकर्णी.
प्रत्येकाला वाटतं आपल्या अस्तित्वाची कोणीतरी नोंद घ्यावी. जाणीव झाल्यापासून माणसं स्वतःला इतकी जपतात की आपल्याच विश्वात जगतात.
अस्तित्व टिकवण्यासाठी व दाखवण्यासाठी माणसें काही ही करतात. अस्तित्वाला हादरें बसल्याशिवाय माणसें सुधारत नाहीत. पाण्याला सुद्धा वाटतं आपल्या तरंगाची दखल घ्यावी, तसंच मनाला ही वाटतं आपल्या विचारांची दखल कुणीतरी घ्यावी.
बेदखल नैराश्य घेऊन येतं आणि दखल आशा घेऊन येतं.अस्तित्वं ठरवतं आपलं व्यक्तिमत्वं.
नोंद नसेल तर अस्तित्वाला अर्थ नाहीं. रानफुलांची नोंद कोण घेतं? केवळ निर्माल्यां साठीच फुलायचं नसतं.
निर्माल्य पर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर चा प्रवास ठरवतों अस्तित्व. फुलणं ते निर्माल्य होणें यामधील प्रवास म्हणजेच जीवन.फुलालां कुठे माहित असतं फुलल्यानंतर त्याला चुरगाळलं जातं कां एखाद्या सौंदर्यवतिच्या केसात माळलं जातं, कां चितेवर रवानगी केलं जातं. प्रत्येक टप्प्याचा अनुभव वेगळां पण तो घेण्यासाठीच फुल निर्माल्य होईपर्यंत तग धरतंच.
आपल्या अस्तित्वाचं वलय विस्तारलं जावं असं प्रत्येकाला वाटतं. बिंदूला ही वाटतं वर्तुळ ही मोठं व्हावं,विशालव्हावं.
अस्तित्वाचा प्रत्येक टप्पा सुखद करण्यासाठी माणूस धडपडत असतो. अस्तित्व श्वासाबरोबर येतं आणि श्वासाबरोबर जातं, पण अस्तित्वाच्या खुणा मृत्यूनंतर ही शिल्लकराहतात.
पृथ्वीवरच्या माणसांना चंद्राच्या साक्षीचं अप्रूप असतं आणि म्हणून पृथ्वीवरच्या माणसांनी चंद्रावर आपल्या पाऊलखुणा उमटवल्या.
माणसें जिवंतपणीच अस्तित्वा साठीच धडपडत नाहीत तर मृत्यूनंतरही आपलं अस्तित्व कायम राहावं म्हणून धडपडत असतात. प्रत्येकाचं अस्तित्व ठरलेलं असतं, तेवढ्या काळात जगायचं आणि जगवायचं. प्रत्येक क्षणाला अस्तित्व असतं. प्रत्येक क्षण माणूस अस्तित्वासाठी जगतो.क्षणांची मालिका ठरवते अस्तित्व.
आपलं अस्तित्व तर केवळ आपल्या हातात असतं असं नाही तर ते दुसऱ्यांच्या ही हातात असतं.
अस्तित्वाला आव्हान दिलं की अस्तित्व तावून सुलाखून निघतं.
कुणाच्या तरी मनात आपल्याला, आपल्या अस्तित्वाला स्थान असावं असं प्रत्येकाला वाटतं. आपल्याच अस्तित्त्वाची आपल्याला जाणीव नसतें.
प्रसंगानुरुप काही गोष्टी अस्तित्व सिद्ध करतात. अस्तित्व हे अनुवंशिकतेंच देणंआहेच, पण अंगावरच्या दागिन्या प्रमाणे स्वतःचं अस्तित्व समृद्ध ही करायचं असतं. आनुवंशिकतेतून गोड गळा मिळेल पण रियाज करून अस्तित्व टिकवावं लागतं. संधी मिळाली की अस्तित्व बहरतं. कापलेल्या वृक्षातूनही अंकुर आपले अस्तित्व दाखवंत. खडकातही बिज अंकुरतं.
अस्तित्वाच्या पाऊलखुणांची पाऊलवाटच ठरवतें तुमचंं अस्तित्व.
डॉ.अनिल कुलकर्णी.
राजकारण
अस्मिता नव्हे, ममतांचे राजकारण
अस्मिता नव्हे, ममतांचे राजकारण
@ किशोर बोराटे
बंगालमध्ये ममतांनी सत्ता राखल्यानंतर अनेकांनी पोस्ट केल्या की तिकडे प्रादेशिक अस्मिता जागृत झाली. आता महाराष्ट्रात कधी होणार? तर अशा पोस्ट करणारांनी थोडे मागे जाऊन बंगालचा राजकीय इतिहास पाहावा. स्वातंत्र्यानंतर तिथे सर्वाधिक काळ डावी आघाडी सत्तेत राहिली आहे. ज्योती बसू किती वर्षे मुख्यमंत्री होते याची माहिती घ्या. डाव्या आघाडीचा पराभव करून ममतांनी बंगाल काबीज केले. त्यामुळे बंगालची अस्मिता आत्ताच जागृत झाली वगैरे असे काही नाही. अगोदरही तिथे ममताच सत्तेत होत्या. त्यांनी सत्ता राखली आहे.
पहिल्यापासूनच बंगालमध्ये राष्ट्रीय पक्षांना स्थान नाही. गेल्या विधानसभा निवडणूकीत पण ममतांनी एकहाती बाजी मारली होती. दक्षिण भारतासह बंगालमध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या भाजपा-काँग्रेसची ताकत नगण्यच होती. अपवाद फक्त कर्नाटकाचा आहे. बंगालचा विजय हा अस्मितेचा नव्हे, तर फक्त आणि फक्त ममतांच्या राजकारणाचा विजय आहे. आता त्यांचे राजकारण कशा पद्धतीचे आहे हे लिहायला घेतले, तर मूळ विषय बाजूला पडेल. त्यामुळे त्या खोलात जायला नको. पण बंगालात भाजपाचा पराभव झाला असे जर कुणी म्हणत असेल तर ते साफ चुकीचे आहे. ३ आमदारावरून भाजपा थेट ७०-८० च्या घरात गेली, ही बाब कधीच दुर्लक्षित करून चालणार नाही. राजसाहेब ठाकरे यांच्या प्रादेशिक अस्मितेच्या राजकारणाला ज्यांनी नेहमीच विरोध केला, त्याच लोकांना आज बंगालच्या अस्मितेचा पुळका आला आहे हे विशेष आहे. तिथे ममता जे करतेय ते योग्य, पण राज ठाकरे यांनी केले तर मात्र चुकीचे. किती वैचारिक परिपक्वता आहे पहा?
आता मूळ मुद्द्यांवर येऊ, तो म्हणजे अनेकांनी पोस्ट केली की महाराष्ट्राची अस्मिता कधी जागृत होणार? महाराष्ट्रात अस्मितेचे अनेक प्रयोग झाले आहेत. पण त्यात राजकीय पक्षांना पूर्णपणे अपयश आले आहे. विशेषतः सेना, मनसे सारख्या प्रादेशिक पक्षांनी अस्मितेचे राजकारण करून सत्तेत येण्याचा प्रयत्न केला. सन्मा. बाळासाहेब ठाकरे आणि सन्मा. राजसाहेब ठाकरे यांनी कडवट मराठीचा मुद्दा घेऊन प्रखर अस्मितेला फुंकर घातली. पण त्यात त्यांना यश आले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, तेंव्हा पहिल्या विधानसभेला सामोरे जाताना महाराष्ट्राचा मोठा नेता, जाणता राजा अशी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पवार साहेबांची इमेज तयार केली होती.
महाराष्ट्रात अस्मितेच्या मुद्द्यांवर राजकारण करून यश मिळवणे अवघड आहे. त्याचे कारण म्हणजे विकासाच्या बाबतीत इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र हा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. महाराष्ट्राचा जीव मुंबईत आहे आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे साहजिकच अप्रगत राज्यातून प्रगत महाराष्ट्रात स्थलांतरण जास्त होत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक लोकं नोकरी, व्यवसाय आणि कामा-धंद्यासाठी स्थायिक झालेली आहेत. अन्य भाषिकांची संख्या महाराष्ट्राच्या मोठ्या शहरात प्रचंड प्रमाणात आहे. त्यामुळे त्यांची मतं येथील निवडणुकांच्यावर मोठा प्रभाव पाडतात. मुंबईचाच विचार केला, तर आजचे मुंबईचे चित्र काय आहे? मुंबई मराठी माणसांचीच असे आपण म्हणतो, मुंबई ही महाराष्ट्राचीच होती, आहे आणि राहणारच. त्यासाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी करायला आपण मागे-पुढे पाहणार नाही हे ही सत्य आहे. पण आज मुंबई हे बहुभाषिक शहर झाले आहे. तिथे किती मराठी टक्का उरला आहे? प्रादेशिक अस्मिता घेऊन तुम्ही मुंबई महापालिकेची निवडणूक लढवू शकता काय? मनसेने लढवली, त्यात त्यांना किती यश मिळाले?
बाहेरच्या राज्यातून येऊन स्थायिक होणारांची संख्या महाराष्ट्रात जास्त आहे. त्यांच्या मतदानाचा टक्का लक्षणीय असल्याने राजकीय पक्षांना, सरकारला सर्वसमावेशक भूमिका घ्यावी लागते आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रात प्रादेशिक अस्मिता कुचकामी ठरतेय. सन्मा. बाळासाहेबांच्या हे लक्षात आल्यानेच त्यांनी कट्टर हिंदूत्त्वाची भूमिका घेतली, त्यानंतरच ते सत्तेत आले. सुरुवातीला सॉफ्ट हिंदूत्त्वाची भूमिका घेतलेल्या राज यांनी सुद्धा नंतर कट्टर हिंदूत्त्वाची भूमिका घेत बाळासाहेबांच्याच रस्त्याने जाणे पसंत केले. प्रादेशिक अस्मिता ही माणसाच्या मनात, रक्तात असावी लागते. जी दक्षिण भारतीय जनतेच्या आहे.
महाराष्ट्रातील मराठी माणूस हा सहिष्णू आहे. तो सर्वसमावेशक आहे. आपली भाषा, आपली अस्मिता तो दुसऱ्यावर लादत नाही. समोरचा हिंदी बोलणारा असेल, तर आपला माणूस स्वतःच्या भाषेत संवाद साधण्यापेक्षा समोरच्याच्या भाषेत संवाद साधतो. कोणतेही एक औषध सर्व रोगांवर चालत नाही, त्याप्रमाणेच बंगाल असेल किंवा दक्षिण भारत असेल, तिथे प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यांवर राजकीय यश मिळाले म्हणून ते इथे मिळेल ही फक्त आणि फक्त अंधश्रद्धा आहे. महाराष्ट्रात राजकीय यश मिळवायचे असेल तर मुंबई सारख्या शहरांत हिंदूत्त्वाची भूमिका आणि ग्रामीण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकारी संस्था केंद्रस्थानी ठेवून राजकारण करावे लागेल. तरच राजकीय यश मिळेल आणि ते टिकेल. प्रादेशिक अस्मितेच्या मुद्द्यांवर सत्ता मिळेल ही एक अंधश्रद्धा आहे. धन्यवाद
-किशोर बोराटे
आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्या
तिसरा डोळा- भाग ९६
आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्यात.
गेल्यावर्षी पासून कोरोनाने हाहाकार माजवला आहे. अनेकजणांना प्राण गमवावे लागले. तर कित्येकजण चांगले बरे होऊन घरी आले. जे सोडून गेले, त्यांच्या कुटुंबियांचे अश्रू अजून सुकले नाहीत. या आजाराने आपल्याला आरोग्याचे आणि स्वातंत्र्याचे महत्त्व पटवून दिले. तसेच निवडणुकीत काय काय फुकट देणार हे आश्वासन घ्यायचे की आरोग्य सुविधा काय काय देणार हे आश्वासन घ्यायचे हे समजून आले. प्राधान्यक्रम कशाला द्यायचा हे आता एव्हाना सर्वांच्या लक्षात आलेच असेल.
नको त्या गोष्टी फुकट घेण्याने, हवे ते विकत मिळणे सुद्धा मुश्कील झाले. उत्तम निरोगी आयुष्य किती महत्त्वाचे असते हे समजले. तसेच कोरोनाच्या आधी कुठेही मुक्त संचार करता येत होता. विना मास्क फिरले तरी काही अडचण नव्हती. कुठेही जा, काहीही खा. कुठेही फिरा. कसलीच बंधने नव्हती. हवेतून फुकट ऑक्सिजन मिळत होता. त्याची किंमत नव्हती. आता पैसे देऊनही मिळेना.
राजकीय पक्षांना सुद्धा आता आपण कोणत्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे हे समजले असेल. आरक्षण, मोफत पाणी, वीज की ऑक्सिजन? हॉस्पिटल्स, आरोग्य सुविधा? जगण्यासाठी आरक्षण हवे होते. आता मरताना आरक्षण आहे का? ज्यांना आरक्षण आहे, त्यांना कोरोना झाला नाही आणि ज्यांना आरक्षण नाही अशानांच कोरोना झाला असे काही निदर्शनास आले का? गेल्यावर्षीपासून आरक्षण आहे म्हणून कुणाचे जगणे सोपे झाले नाही आणि आरक्षण नाही म्हणून कुणाचे जगणे अवघड झाले नाही.
आपत्ती, आजार, महामारी ही जात, धर्म, आरक्षण, गरीब-श्रीमंत पाहून येत नाही ही बाब जरी लक्षात आली असेल, तरी या महामारीतून आपण खूप काही शिकलो असे समजायला हरकत नाही. जेंव्हा ऑक्सिजन लेव्हल कमी होते ना, तेंव्हा जात, धर्म, आरक्षण, पैसा, श्रीमंती काही उपयोगी येत नाही. आपल्या प्राथमिक गरजा काय आहेत हे लक्षात घ्या. सगळ्या जाती-धर्माच्या लोकांना जगायला ऑक्सिजनच लागतो.
ऑक्सिजन कमी होऊन धाप लागते ना, तेंव्हा डॉक्टरांच्या पुढेच हात जोडावे लागतात. त्यावेळी डॉक्टरांच्यातच आपल्याला राम-अल्ला-बुद्ध-गुरुनानक-येशू दिसत असतात. आपल्या प्राथमिक गरजा ओळखा. आरक्षण देणारांना नव्हे, तर ऑक्सिजन देणारांना मतदान करा. आपल्या देवावर आपली श्रद्धा असायलाच हवी. मंदिरे ही आपली श्रद्धा स्थाने आहेतच. कुणी असे म्हणत असेल की मंदिरे नकोत. तर ते चुकीचे आहे. ते आवश्यक आहेच, पण त्याबरोबर इतर पायाभूत सुविधाही अत्यावश्यक आहेत. आम्हाला मोफत काही नको. पण जे अत्यावश्यक आणि आवश्यक आहे, ते कमी पडायला नको.
जनता फुकट काहीच मागत नाही. तुम्ही आश्वासने देता, लॉलीपॉप तुम्ही दाखवता. मोफत वीज द्या म्हणून जनता कधी रस्त्यावर उतरली? मोफत राशन द्या म्हणून जनता कधी रस्त्यावर उतरली? मोफत लसीची कधी मागणी केली? गॅस, पेट्रोल, डिझेल, तेल, डाळी महागल्या तरी मुकाट पैसे देऊन आम्ही आमच्या गरजा भागवत आहोतच. फुकट नको, पण विकत तरी लस द्या. कोरोना होऊन जीव धोक्यात घालण्यापेक्षा आणि हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन लाखो रुपये बील भरण्यापेक्षा आम्हाला लसीसाठी १००-२०० रुपये मोजणे कधीही परवडेल. मग तुम्ही का मोफत लसीची घोषणा करता? एक म्हणतो मोफत द्या, दुसरा म्हणतो देऊ, तिसरा म्हणतो देता येणार नाही. पण आम्ही कधी मोफत लस मागितली हे तरी सांगा? मोफत नको, विकत द्या, वेळेवर द्या आणि मुबलक द्या. पुढच्या जाहीरनाम्यात आम्हाला बदल दिसू द्यात. आम्हाला आमचे प्राधान्यक्रम ठरवू द्यात आणि जे आम्हाला हवे तेच द्या.
धन्यवाद
-किशोर बोराटे
हाच तो महाराष्ट्र धर्म
हाच तो महाराष्ट्र धर्म
किशोर बोराटे @
कोकणातील नाणार प्रकल्पाबाबत आत्तापर्यंत खूप चर्चा झाली. काल मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांना पत्र लिहून राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने प्रकल्पाचे काम चालू करण्याचे आवाहन केले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प करण्याचे ठरले. पण स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. शिवसेना भाजपाचा सहकारी पक्ष सत्तेत सामील होता. पण नाणारचा विषय यायचा त्यावेळी सेनेची भूमिका नाणार बाबत दुटप्पी होती. भाजपा नाणारबाबत ठाम होती. पण सेना मात्र मंत्रालयात एक भूमिका घ्यायची आणि कोकणातील स्थानिकांच्या समोर वेगळी भूमिका घ्यायची. त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्थानिक कोकणवासीयांना भेटले, त्यावेळी त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला आणि त्यांचे मंत्री मात्र मंत्रालयात फडणवीस यांच्यासमोर नांगी टाकून बसायचे.
अनेक महिने हे असेच चालू होते. अखेर हे सर्व प्रकरण राजदरबारी पोहोचले. त्यानंतर राज यांनी कोकण दौरा केला स्थानिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि त्यानंतर त्यांनी तिथेच घोषणा केली की स्थानिकांच्या समस्यांचे जोपर्यंत निराकरण होत नाही, तोपर्यंत हा प्रकल्प होणार नाही. सरकारने कोकणातील जनतेला विश्वासात घेऊन त्यांच्या ज्या काही शंका आहेत, त्याचे निराकरण करायला हवे. त्यानंतर तूर्तास तो विषय थांबला. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यावेळी नेहमीप्रमाणे कोणतीही उघड भूमिका घेतली नाही. तद्नंतर निवडणूका झाल्या.
राज्यात बरीच राजकीय उलथापालथ झाली. गेले संपूर्ण वर्ष कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये गेले. लोकांचे ना व्यवसाय चालू होते, ना नोकऱ्या. सगळं जग थांबलं होतं. ज्यांची हातावर पोटं आहेत, त्यांचे तर खूप हाल झाले. मध्यमवर्गीयांनी जी काही थोडी बचत केली होती, त्यावर कशीतरी वेळ मारून नेली. एका बाजूने आर्थिक संकटाचा सामना करत, राज्य सरकारला दुसऱ्या बाजूने कोरोनाशी दोन हात करावे लागत होते. दरम्यानच्या काळात कोरोनाने अल्पविश्राम घेतला आणि हळूहळू परिस्थिती पूर्ववत होतेय असे वाटत असतानाच कोरोनाने आता परत एकदा आपले रौद्ररूप धारण केले आणि महाराष्ट्रातील जनता संकटात सापडली.
आता परत एकदा कोरोनाने राज्याला विळखा घालायला सुरुवात केली असतानाच राज्यासमोर आर्थिक तसेच बेरोजगारीचे संकट पाय रोवून उभे राहिले आहे. गाडीच्या काचेवर जसे धुके साठून राहिल्यानंतर गाडी चालकाला समोरच रस्ता दिसत नाही. तशी अवस्था राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची झाली आहे. अशातच थोडी दूरदृष्टी दाखवून मनसेप्रमुखांनी काचेवरील धुके पुसून नाणार प्रकल्पाबाबत सकारात्मक भूमिका घेऊन एका तासातच राज्यातील राजकारणाला वेगळी दिशा दिली. राज यांनी प्रमुख पक्षाच्या नेत्यांना साद घातली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार, भाजपा नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून राज्यावरील आर्थिक संकट, बेरोजगारी यावर मात करण्यासाठी म्हणून कोकणच्या पर्यावरणाला धक्का न लागता राज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प त्वरित चालू करावा यासाठी राज यांनी पुढाकार घेतला आहे.
संबंधित नेत्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की गेल्या काही दिवसांत नाणारवासीयांचा या प्रकल्पाला जो विरोध आहे. त्याची कारणे जाणून त्यांच्या मनातील भीती किती वास्तव आहे आणि या प्रकल्पाचा खरोखरच कोकणच्या पर्यावरणाला काही त्रास होऊ शकतो का? याबाबत प्रसिद्ध शास्त्रज्ञ अनिल काकोडकर यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून शंका निरसन करून घेतले आहे. तसेच अजूनही काही तज्ञ लोकांशी यासंदर्भात चर्चा झाली आहे. त्यांनी प्रकल्पामुळे कोकणच्या सौंदर्याला, पर्यावरणाला कोणतीही बाधा होणार नाही असे सांगितले आहे.
त्यामुळे शासनाने वेळ न दवडता ताबडतोब प्रकल्प चालू करावा. नाणारवासियांशी मी स्वतः बोलेन. तिथे होणाऱ्या प्रकल्पात स्थानिक कोकणवासियांना व मराठी माणसांना प्रथम रोजगार, नोकऱ्या उपलब्ध व्हायला हव्यात हे मात्र त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच विनाकारण विरोध करणारांना धडा शिकवला जाईल असाही इशारा राज यांनी आपल्या पत्रातून दिला आहे. आज प्रत्येक राज्य आपापल्या राज्यात उद्योग यावेत यासाठी धडपडत असताना, महाराष्ट्राने गाफील राहून चालणार नाही. एवढा मोठा प्रकल्प राज्याच्या हातून गेला तर कधीही भरून न येणारे नुकसान होईल आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला हे परवडणारे नाही अशी भूमिका राज यांनी व्यक्त केली आहे.
राज यांच्या भूमिकेला भाजपाने तातडीने समर्थन दिले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज यांच्या भूमिकेचे स्वागत करून सहकार्याची तयारी दर्शवली आहे. राज यांच्या पत्रानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वतः राज यांच्याशी फोनवर चर्चा करून प्रकल्पाबाबत अनुकूलता दर्शवली आहे. चारी बाजूंनी राज्य सरकार अडचणीत असताना राज्याच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून राज यांनी दूरदृष्टीने नाणार प्रकल्पासाठी सर्वांना एकत्र येण्यासाठी जे आवाहन केले आहे यालाच खरा महाराष्ट्र धर्म म्हणतात.
संकटाने हातपाय गाळून बसण्यापेक्षा त्यातून मार्ग कसा काढायचा याचे राज यांनी फक्त उदा. घालून दिले नाही तर, त्यासाठी त्यांनी पुढाकार देखिल घेतला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अद्यापही काही प्रतिक्रिया दिलेली नाही. ते राज यांच्या भूमिकेला किती प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. पण राजसाहेब महाराष्ट्र धर्माला जागले असेच म्हणावे लागेल. आता चेंडू उद्धव यांच्या कोर्टात आहे. सत्तेत ते आहेत. मुख्यमंत्री ते स्वतः आहेत. ते काय प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल. राज्याच्या हितासाठी जसे राज पुढे आले, तसे उद्धव येतील काय?
-किशोर बोराटे
अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी
*अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी*
किशोर बोराटे@
*शरद पवार* या सहा अक्षरी शब्दाची जादू फक्त महाराष्ट्रच नाही तर, संपूर्ण भारतभर गेली *५९ वर्षे* पसरली आहे. आतापर्यंत अनेक लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाच्या इच्छुक यादीत पवारसाहेबांचे नाव १००% असायचेच. तशी राजकीय परिस्थिती त्यांच्या बाजूने कधी नव्हती किंवा त्यांना पंतप्रधान करावे अशी परिस्थितीही कधी निर्माण झाली नाही. मुत्सद्दीपणा दाखवून तशी परिस्थिती निर्माण व्हावी म्हणून त्यांनी कायम पडद्यामागे राहून प्रयत्न केले असतील पण त्यात त्यांना यश आले नाही. पवारसाहेबांनी काँग्रेस सोडल्यानंतर तर ही शक्यता तशी धुसरच झाली. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्याचा आवाका पाहता हे कदापि शक्य नव्हते आणि इथून पुढेही नसेल.
*तरीही आपल्या भारत या देशाचा इतिहास चमत्कारांनी भरलेला आहे आणि इथली जनताही चमत्काराला नमस्कार करणारी आहे.* तसे शरद पवारसाहेब पंतप्रधान व्हावेत अशी इच्छा बाळगणारे लोकंही प्रचंड संख्येने आहेत. तरीही पात्रता असूनही त्यांना पंतप्रधान पद काही मिळाले नाही. देवेगौडा यांना पंतप्रधान पदाची तशी लॉटरीच लागली असे म्हणावे लागेल. देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात तर मग शरद पवार का नाही? त्यानंतर शरद पवार समर्थकांच्या आशा वाढल्या होत्या. खुद्द पवारसाहेबांनाही तसे वाटत होते. पण तसे काही घडले नाही. म्हणूनच दुर्दैवाने का होईना पण *अपेक्षित मी, तरीही उपेक्षित मी* असेच त्यांच्याबाबतीत झालेले आपल्याला पाहायला मिळते. पवारसाहेबांचे कट्टर राजकीय विरोधक आणि त्यांचे वैयक्तिक जीवनातील मित्र मा. बाळासाहेब ठाकरे हे ही त्यांच्या पंतप्रधान पदाचे समर्थक होते. त्यांनी अनेकदा शरद पवारांनी पंतप्रधान व्हावे ही इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी गरज पडली तर शिवसेना त्यांना पाठिंबा ही देईल असे ही बोलायला ते विसरले नव्हते. त्याला कारण ही तसेच होते ते म्हणजे बाळासाहेबांचे महाराष्ट्र प्रेम. मराठी माणूस पंतप्रधान होत असेल तर मा. बाळासाहेब राजकीय वैर आणि आपली तत्त्वे बाजूला सारून त्यांना पंतप्रधान पदासाठी पाठिंबा द्यायला तयार होते. बाळासाहेब म्हणजे शब्दाचे पक्के, त्यांनी प्रतिभाताई पाटील यांनाही भाजपाच्या विरोधात जाऊन राष्ट्रपतीपदासाठी मदत केली. *स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांच्यानंतर दिल्लीत महाराष्ट्र जिवंत राहिला, तो फक्त शरद पवारसाहेबांच्या मुळेच हे बाळासाहेब ही मान्य करत होते आणि पवारसाहेबांचे इतर राजकीय विरोधक ही मान्य करतात.*
पवारसाहेब जरी काँग्रेसी विचारसरणीचे असले तरी त्यांच्या घरातील वातावरण हे शेकापच्या बाजूने होते. पवारसाहेबांचे वडील शेकापचे समर्थक होते. त्यांचे थोरले भाऊ वसंतराव यांनी वकीलीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पूर्ण वेळ शेकापचे काम केले. यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे काँग्रेसमध्ये आलेल्या शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये येण्या अगोदर काँग्रेसच्या विरोधात काम करून बारामतीत काँग्रेसला पराभूत केले होते. *१९५३ साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना झाली. पंडित नेहरू यांनी सौराष्ट्रसह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली आणि पंडित नेहरू व राज्य पुनर्रचना आयोगाच्या विरोधात त्यावेळी महाराष्ट्रात प्रचंड भडका उडाला. त्यावेळी पवारसाहेबांच्या घरातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठबळ मिळाले व शेकापच्या माध्यमातून त्यांनी नेहरू आणि काँग्रेसला उघडपणे विरोध केला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत पवारसाहेबांनी सायकलवर फिरून काँग्रेस विरोधी प्रचार करून बारामतीत काँग्रेसचा पराभव केला.* त्यांची जडण-घडण जरी काँग्रेसी विचारांची असली तरी जशी वेळ येईल, तसे त्यांनी आपले विचार आणि आचार बदलले. त्यांचे व्यक्तिमत्त्व हे तसे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहे. त्याचा अनुभव वेळोवेळी देशाने घेतला आहे. *समस्या कोणतीही असो तिच्याकडे तटस्थपणे पाहून तिच्या मुळाशी जाऊन चौफेर विचार करून त्यातील फायदे-तोटे जाणून घेऊन मग निर्णय घेणे आणि घेतलेला निर्णय लोकांच्या गळी उतरवणे ही हातोटी त्यांच्याकडे उत्तम आहे.*
सुरुवातीच्या काळात ते राजकारणात उतरले त्यावेळी पासून त्यांनी आपला दृष्टिकोन व्यापक ठेवला. बाळासाहेबांच्या सारखी फक्त हिंदूत्वाचीं कास धरली नाही. त्यापलीकडे त्यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन बहुजन वर्गाला साद घातली. ते करत असताना आपली *मराठा नेता* इमेज ही सांभाळली. त्याबरोबरच ब्राम्हण समाज दूर जाऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेतली. धार्मिक विचारांचा पगडा त्यांचेवर कधीच नव्हता.
शरद पवारसाहेबांची राजकीय कारकीर्द तशी उतार-चढावांची राहिली आहे. त्यांना जेवढे समर्थन मिळत गेले, तेवढाच त्यांना विरोधही झाला. *भ्रष्टाचाराचे, जमिनी खरेदीचे, दाऊद बरोबर संबंध असल्याचे शेकडो आरोप त्यांच्यावर झाले. पण यासंदर्भात आजपर्यंत त्यांच्यावर एकही आरोप सिद्ध झाला नाही किंवा साधा गुन्हा सुद्धा दाखल झाला नाही.* एवढा मोठा आवाका ज्याला राजकारण, शिक्षण, कृषी, सहकार, खेळ, प्रशासन, उद्योगधंदे, शेती सर्व बाजूचे ज्ञान असताना प्रचंड जनसंपर्क असताना गाढा राजकीय अभ्यास महाराष्ट्राची इत्यंभूत माहिती असताना देखील या सर्व यशाला एक अपयशाची किनार होती ती म्हणजे त्यांना राष्ट्रवादीच्या निर्मितीपासून कधीही महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणता आली नाही.
*जे चंद्राबाबूंनी आंध्रमध्ये, मनोहर पर्रिकरांनी गोव्यात, जयललिता आणि करुणानिधी यांनी तामिळनाडूत, मोदींनी गुजरातमध्ये, माया-मुलायम यांनी उत्तरप्रदेशात तर लालू-नितीश यांनी बिहारमध्ये केले ते पवारसाहेबांना महाराष्ट्रात करता आले नाही.* पवारसाहेबांनी राजकीय मित्र कमावले त्यापेक्षा जास्त त्यांना राजकीय विरोधक मिळाले. *काँग्रेसमध्ये असतानाही दिल्लीच्या दरबारी पवार विरोधी लॉबी सक्रिय होती त्याचे नेतृत्त्व वेळोवेळी विठ्ठलराव गाडगीळ, शंकरराव चव्हाण, प्रतापराव भोसले, बाळासाहेब विखे, विलासराव, पृथ्वीराज चव्हाण, पतंगराव यांनी केले. हयात गेली यांची शरद पवारांच्या पायात पाय घालण्यात.* तसे पहिले तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शरद पवारांना ५-१० अशा संख्येने प्रबळ विरोधक आहेत. जे फक्त त्या जिल्ह्याच्याच नाहीतर राज्याच्याही राजकारणावर प्रभाव पाडू शकतात. त्यामुळे त्यांच्या राजकीय महत्त्वकांक्षेस मर्यादा पडत गेल्या. राजकीय वर्तुळात मा. पवारसाहेबांचे व्यक्तिमत्त्व कालही विश्वासू नव्हते आणि आजही नाही. बेभरवशी आणि उपद्रवी राजकारणाचा शिक्का त्यामुळेच त्यांच्यावर बसला आहे. कालपर्यंत जनतेचा विश्वास त्यांनी संपादन केला पण आपल्या राजकीय वर्तुळातील लोकांचा विश्वास ते संपादन करू शकले नाहीत. त्यांच्या विश्वासघातकी राजकारणामुळे सर्वजण त्यांच्यापासून चार हात दूर राहणेच पसंद करत होते आजही तेच चालू आहे.
यशवंतराव चव्हाण यांच्यापासून ते भुजबळ यांच्यापर्यंत पवारांनी पाठीत *खंजीर* खुपसला असे म्हणणाऱ्यांची यादी मोठी आहे. *राज ठाकरे यांना एकदा पत्रकारांनी विचारले की अलीकडे पवारसाहेब तुमची सारखी स्तुती का करत असतात? त्यावेळी त्यांनी अतिशय मार्मिक पण गंभीर उत्तर दिले की त्यांनी एकवेळ टीका केली तर समजू शकतो पण स्तुती केली की समजावे काहीतरी घोळ आहे.*
मा. शरद पवारसाहेबांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय जीवनात सर्वसामान्य माणसाशी नाळ जी जोडली होती ती कधी तुटून दिली नाही. प्रशासनावर वचक, अफाट स्मरणशक्ती तसेच त्यांचा गाढा प्रशासकीय अभ्यास, नाविन्याची ओढ याचा त्यांना त्यांच्या राजकीय जीवनात नेहमीच फायदा झाला. त्यांचे संबंध राजकारणापुरतेच मर्यादित नव्हते. राजकारणा बरोबरच ते खेळ, कला, साहित्य, शिक्षण, उद्योग, शेती, समाजकारण, पाणी, सहकार, स्थानिक स्वराज्य संस्था अशा वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी ठसा उमटवला. महाराष्ट्रात सहकार खऱ्या अर्थाने त्यांनी रुजवला. विकासाच्या बाबतीत पश्चिम महाराष्ट्र जो आज एवढा विकसित दिसतोय त्यात पवारसाहेबांचे योगदान मोठे आहे हे अजून माझ्या वयाच्या तरुण पिढीला किंवा माझ्यानंतरच्या पिढीला अजून माहित नाही. सतत अभ्यास करून, महाराष्ट्राच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात फिरणे, शेतकऱ्यांच्या, व्यावसायिकांच्या अडचणी समजून घेणे, जगात होणारे बदल त्याची माहिती करून घेणे अशाप्रकारे त्यांनी आपले नॉलेज वाढवले. जे ज्ञान मिळेल ते घेत गेले. त्यामुळेच आज दिल्लीत किंवा राज्यात सरकार कोणाचेही सत्तेत असो अचानक काही समस्या निर्माण झाली ते सरकारला लगेच पवारसाहेबांची आठवण येते. पवारसाहेबांच्या तुलनेत विचार केला तर आताच्या राजकीय नेत्यांचा अभ्यास कमी पडतोय. ही खंत त्यांनीही अनेकदा बोलून दाखवली आहे. याचा विचार व्हायला हवा.
मा. शरद पवारसाहेबांनी कुणी कितीही आरोप केले तरी कुणाविषयीही मनात द्वेष ठेवला नाही. जे येईल त्याला आपले करत गेले. जे अगदीच नडले त्यांना त्यांनी तितक्याच संयमाने योग्य वेळ पाहून कात्रजचा घाट दाखवला. आता काळ बदलला, नेते बदलले, पण देशापुढचे व राज्यापुढचे प्रश्न पूर्वीचे आहेत काही नवीन निर्माण होत आहेत. आताची तरुण पिढी शिकली, सुशिक्षित झाली. आधुनिकीकरण झाले इंटरनेट आले. सोशल मिडीयाच्या माध्यमातून आज लोकांना घरबसल्या जगाची माहिती समजू लागली. तरुण पिढीचा तरुण देश म्हणून भारताची गणना होऊ लागली. *आताच्या पिढीला आक्रमक राजकीय नेते आवडू लागले. एवढ्या वर्षाच्या काँग्रेस भ्रष्टाचारी राजवटीला जनता किकली होती. त्यांना काँग्रेसच्या दरबारी आणि बोटचेप्या राजकारणाचा वीट आला होता. त्यामुळे त्यांनी भाजपाकडे मोर्चा वळवला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच त्यांच्या सहकारी पक्षांचे मुस्लिम प्रेम आणि हिंदुविरोधी धोरण याचा फटकाही काँग्रेसला तसेच त्यांच्या धोरणावर चालणाऱ्या पवारसाहेबांना बसला. आताची पिढी आणि पवारसाहेब यांच्यात एक मोठी वैचारिक दरी निर्माण झाली आहे.* ती दूर करणे तसेच स्वतःवर असलेले बेभरवशी, विश्वासघाती, उपद्रवी, भांडवलदारांना, भ्रष्टाचार्यांना पाठीशी घालणार नेता, गरजेनुसार माणसं वापरणे आणि काम झाले की त्यांना कात्रजचा घाट दाखवणे हे जे आरोप त्यांच्यावर सातत्याने होत आहेत त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेला धोका पोहोचत आहे.
जेवढी त्यांच्या गुणांविषयी चर्चा झाली तेवढीच कथित अवगुणांविषयीही झालीय आणि आजही होत आहे. कुणीही व्यक्ती परिपूर्ण नसते. पवारसाहेबांचे विरोधक सुद्धा त्यांना मान देतात तो त्यांच्या बुद्धिमतेला आहे. कुणी काही म्हणो मा. शरद पवारांना तुम्ही नावं ठेवली तरी त्यांचे नाव घेतल्याशिवाय तुम्हाला पुढे जात येणार नाही. त्यांच्या मुत्सद्दीपणाची झलक आपण आत्ता १०५ आमदार असूनही भाजपाला सत्तेपासून दूर ठेवून सेना आणि काँग्रेसला बरोबर घेऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करताना पाहिली आहे. आज महाराष्ट्रातल्या खेडी-पाड्यातल्या, वाडी-वस्तीवरील सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते नावानिशी ओळखतात. कोणती व्यक्ती कुठे फिट होऊ शकते हे त्यांना बरोबर माहिती असते. *शरद पवारांना वजा करून तुम्ही दिल्लीत महाराष्ट्र शोधा नाही सापडणार. महाराष्ट्रात तुम्ही त्यांना वजा करूच शकत नाही केलं तर तुमचे गणित चुकलेच म्हणून समजा. हा पवारसाहेबांच्या धोरणांचाच परिणाम आहे.* आज अशा या मोठ्या थोर नेत्याचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या हातून महाराष्ट्र हिताचे राजकारण घडो आणि त्यात त्यांना ईश्वरी साथ मिळो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. ते ईश्वराला मानत नसले तरीही...
धन्यवाद
-किशोर बोराटे
कोरोना आणि अर्थचक्र
कोरोनानामक महामारीने जगासमोर पुन्हा एकदा काही गोष्टी सिद्ध़ केल्या आहेत. विकसित राष्ट्र आणि अविकसित राष्ट्र, श्रीमंत आणि गरीब ह्या दऱ्या अधिकाअधिक खोल होत चालल्या आहेत.
पण महामारीला कसलाच भेदभाव ठाऊक नसतो, ती फक्त विद्ध़ंसक असते. खरंतर संकट गरीबी-श्रीमंती बघून येत नसतात पण पैसा असला की संकटांशी लढाई लढायला एक प्लस पॉईन्ट मात्र असतो. स्वच्छता, हाईजीन, सोशिअल डिस्टन्सिंग अशा बऱ्याच गोष्टी उच्चभ्रू लोक आणि विकसित देशातील उच्चभ्रूंना अंगवळणी पाडायला फारसे जड गेले नाही आणि खूप कमी वेळात ह्या सवयी अशा लोकांची लाईफस्टाईलच झाली असे म्हणता येईल.
प्रश्न आहे तो एका मोठ्या लोकसंख्येचा जी विकसित किंवा उच्चभ्रू मधे मोडत नाही आणि तीच 90% आहे.
याचा अर्थ असाच आहे की जगाचे मास पॉप्युलेशन हे मध्यम आणि दारिद्र्य रषेखाली आहे आणि हेच मास पॉप्युलेशन मोठ- मोठ्या कंपन्यांंचे ग्राहक आहेत.
आता सगळ्यांना प्रश्न आहे बेसिक नीडस् चा, पण जेव्हा ह्या नीडस् मध्ये वाढ होते म्हणजे ती नीडस् निर्माण केली जाते आणि हळूहळू आपल्या बेसिक नीडस् ची लिस्ट नकळत वाढत जाते विकासाच्या आणि अर्बनायझेशनच्या नावाखाली तेव्हा निश्चितच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते खरी पण अनावश्यक अशा गरजा निर्माण होतात आणि पुन्हा सगळे भांडवलशाहीचे गुलाम होतात. किंबहुना हे 10% विकसित आणि उच्चभ्रू देश लोक 90% पॉप्युलेशनला कन्ट्रोल करतात.
आणि अशा भयंकर महामारीमध्ये तर भांडवलशाही खूप वेगाने डोके वर काढत आपले साम्राज्य प्रस्थापित करून पूर्ण जगात इकोनॉमिक इन्स्टँबिलिटीस कारणीभूत ठरते.
थोडक्यात जर हे टाळायचे असेल तर 'सहकार' धर्तीवर नवीन उद्योग खूप मोठ्या प्रमाणात उभारले गेले पाहिजे.
क.दि.रेगे
नाशिक
जग अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर…?
आर्मेनिया आणि अजहर बैजान या देशांमध्ये अलीकडेच झालेला प्रत्यक्ष युद्धसंघर्ष भयंकर स्वरुपाचा होता. शीतयुद्धानंतर एवढे भयानक आणि अमानुष युद्ध जगाने कधीही पाहिले नव्हते. हा संघर्ष संपतो न संपतो तोच इथियोपिया आणि इरीट्रिया या दोन देशांत संघर्ष सुरू झाला आहे. कोरोना संकटाचा एकजुटीने सामना करण्याची गरज असताना जग परस्पर संघर्षामध्ये, वर्चस्ववादामध्ये, धार्मिक ध्रुवीकरणामध्ये विभागले आहे. बहुराष्ट्रीय संघटना, चर्र्चेची जागतिक व्यासपीठे क्षीण झाली आहेत. अशा अराजक परिस्थितीत एखाद्या संघर्षाप्रसंगी अण्वस्रांचा वापर केला जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. ती लक्षात घेता मोठ्या राष्ट्रांनी परिपक्व भूमिका पार पाडणे गरजेचे आहे.
गेल्या जवळपास 10 महिन्यांपासून कोरोना संसर्गाच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले आहे. या महासंकटातून बाहेर पडण्यासाठी आणि कोरोनाच्या तीव्र आर्थिक झळांतून उभारी घेण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेत. संपूर्ण जगाने एकजुटीने या आव्हानावर मात करण्याची गरज असताना राष्ट्राराष्ट्रांमधील संघर्ष वाढताना दिसत आहेत. हे संघर्ष इतके वाढले आहेत की, पहिले महायुद्ध ते दुसरे महायुद्ध यांच्या दरम्यानच्या काळासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली दिसत आहे. आजवर ज्या वादांवर तोडगा निघत नव्हता किंवा जे जुनाट वाद निवलेले होते, शांत होते ते आता नव्याने उफाळून वर येताहेत. दुसरीकडे पहिल्या आणि दुसर्या महायुद्धांदरम्यान ज्याप्रमाणे लहान-लहान संघर्षांमध्ये महासत्ता सामील होत होत्या आणि त्यामुळे त्याचे स्वरूप व्यापक बनत होते असे प्रकारही घडताना दिसत आहेत.
अलीकडेच आर्मेनिया आणि अजहर बैजान या देशांमध्ये प्रत्यक्ष युद्धसंघर्ष घडून आला. गेल्या 20 वर्षांमध्ये किंबहुना शीतयुद्धानंतर एवढे भयानक आणि अमानुष युद्ध जगाने कधीही पाहिले नव्हते. या युद्धामध्ये कोणत्याही युद्धनियमांचे पालन करण्यात आले नाही. लहान मुले आणि महिला यांच्यासह अनेकांच्या कत्तली केल्या गेल्या. शेकडो जण ठार मारले गेले. क्षेपणास्त्रे, बॉम्ब यांचा सढळ वापर केला गेला. हा संघर्ष संपतो न संपतो तोच इथियोपिया आणि इरीट्रिया या दोन देशांत एक नवा संघर्ष सुरू झाला आहे. तिकडे उत्तर कोरियाचा क्रूरकर्मा हुकुमशहा किम जोंग उन याने पुन्हा एकदा नव्या जोमाने अण्वस्त्र चाचण्या करायला सुरूवात केली आहे. जगभरात अनेक देशांमधून तिथल्या सत्ताधीशांविरोधात आंदोलने होण्यास सुरूवात झाली आहे. चीनचा आक्रमकतावाद वाढतो आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष आजही कायम आहे. चीनची नाकेबंदी करण्यासाठी अमेरिका सर्वतोपरी प्रयत्न करतो आहे. ब्लादीमिर पुतिन यांच्या नेतृत्वाखाली रशिया पुन्हा एकदा स्वतःचं नेतृत्व सिद्ध करण्यासाठी धडपडतो आहे. एकंदर, एक प्रकारच्या अराजकतेची स्थिती जागतिक पटलावर आहे.
एका बाजूला असे वातावरण असताना संयुक्त राष्ट्र संघटनेची भूमिका पाहिल्यास कोरोना संसर्गकाळात ती जवळपास नगण्य राहिली आहे. जागतिक व्यापार संघटना कालबाह्य झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेने ट्रम्प यांच्या कारकीर्दीत अनेक करारांतून अंग काढून घेतल्यामुळे वैश्विक स्तरावर एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती भरून काढण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी मोेठे देश संघर्ष वाढवण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसर्या महायुद्धाच्या काळात अशीच परिस्थिती होती. अनेक देशांना आपल्या छत्राखाली आणण्याचा हिटलरचा विस्तारवाद बोकाळला होता. आज चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हिटलच्या वाटेनेच निघाले आहेत.
हे सर्व कमी की काय म्हणून जगभरात धार्मिक तेढ वाढत चालली आहे. युरोपात अल्पसंख्यांक मुसलमानांविरोधात कमालीचा असंतोष पसरलेला आहे. याला खतपाणी घालण्याचे काम मूलतत्ववादी धार्मिक संघटना करताहेत. हे सर्व संघर्ष एकत्ररित्या पाहिल्यास केवळ अण्वस्त्रांचा वापर करणेच बाकी राहिल्याचे दिसते. अझरबैझान आणि आर्मेनिया संघर्षात अण्वस्त्रांचा वापर करणेच बाकी होते.
भारत-चीन यांच्यातील संघर्षात चीनने तिबेटमध्ये अण्वस्त्रे तैनात केल्याचे उघड झाले आहे. डीएफ 70 सारखे क्षेपणास्त्रही तैनात केले आहे. भारताला धाक दाखवण्यासाठी ही चीनची चाल आहे, असे आज वाटत असले तरी भविष्यात चीन अण्वस्रांचा वापर करु शकतो, हे स्पष्ट होते. अमेरिकेने दुसर्या महायुद्धात जपानवर अण्वस्त्रे डागली होती; त्यानंतर जगात आजवर अण्वस्त्रांचा वापर करण्यात आलेला नाही. अनेक अभ्यासकांनी अण्वस्रांबाबत काही सिद्धांत मांडले आहेत. त्यानुसार, अण्वस्त्र हे केवळ धाक दाखवण्याचे साधन आहे. ती एक शोभेची वस्तू आहे. त्याचा वापर केला जाणार नाही. अण्वस्त्रे असल्याने देश संघर्ष करण्यासाठी घाबरतील, असा विचार मांडण्यात आला. थोडक्यात, दहशतीचा समतोल साधला गेल्याने अण्वस्रांमुळे युद्धे होणार नाहीत, अशी थिअरी मांडण्यात आली होती. असे अनेक सिद्धांत दुसर्या महायुद्धानंतर विकसित झाले. त्यातूनच एनपीटी आणि सीटीबीटीसारखे करार करण्यात आले. पण या करारांनाही काही अर्थ राहिलेला नाही. कारण आज उत्तर कोरिया, इराण यांसारख्या देशांचा अण्वस्त्र विकास कार्यक्रम सुरू आहे. सद्यस्थितीतील अराजकसदृश परिस्थिती अण्वस्त्र वापरण्यासाठी अत्यंत पोषक आहे, असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
कोरोनामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डबघाईला आलेल्या आहेत. त्यामुळे जनतेच्या शासनाविरोधातील असंतोष वाढला आहे. बेरोजगारी कमालीची वाढते आहे. उद्योगधंदे ठप्प झाले आहेत. जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापारावर परिणाम झाला आहे. सामान्य जनतेचा शासनावरचा दबाव वाढतो आहे. त्यामुळे अनेक सत्ताधीश भावनिक किंवा अतिरेकी राष्ट्रवादाला खतपाणी घालून जनतेचे लक्ष विचलित करताहेत. सार्वभौमत्वाचे, प्रखर राष्ट्रवादाचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. राष्ट्रा-राष्ट्रांमधील संघर्षादरम्यान अनेकदा अण्वस्त्रांचा वापर करण्याच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष धमक्या दिल्या जाताहेत. पाकिस्तान, उत्तर कोरियासारखे देश उघडपणाने अशा धमक्या देताना जगाने पाहिले आहे. नुकतेच उत्तर कोरियाने अण्वस्त्र परीक्षण केले आहे आणि त्याचा वापर करू शकतो असे वक्तव्यही केले आहे. ही परिस्थिती निश्चितच चिंताजनक आहे.
सुमारे 9 वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये रशिया आणि अमेरिका या दोन देशांमध्ये प्रत्येक देशाने किती अण्वस्त्रे ठेवायची ती संख्या मर्यादित करण्याविषयीचा करार झाला होता. या कराराला न्यू स्टार्ट ट्रीटी म्हणजेच स्ट्रॅटेजिक आर्म रिडक्शन ट्रीटी (नवीन) असे म्हणतात. दहा वर्षांसाठी हा करार झाला होता. या करारानुसार नवी अण्वस्त्रे बनवायची नाहीत, नव्या चाचण्या करायच्या नाहीत असे निर्धारित करण्यात आले होते. 2021 मध्ये हा करार संपुष्टात येतो आहे. पण तो पुनर्जिवित करण्यासाठी किंवा त्याची मुदत वाढवण्यासाठी अमेरिका आणि रशिया या दोघांमध्ये परस्परसहमती होत नाहीये. ट्रम्प यांनी यापूर्वीच असे सांगितले आहे की याप्रकारच्या कोणत्याही कराराला अमेरिका बांधील राहाणार नाही. आम्ही नव्याने चाचण्या करणारच. हाच प्रकार रशियाकडूनही होतो आहे. या दोन्ही राष्ट्रांकडून अत्यंत अत्याधुनिक शस्त्रास्त्रांचे परीक्षण केले जात आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. याबाबत सर्वाधिक चिंता आहे ती नॉन स्टेट अॅक्टर्सची. विशेषतः पाकिस्तानातील दहशतवादी संघटना या परिस्थितीचा फायदा घेऊ शकतात. आज पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खानच्या विरोधात प्रचंड असंतोष माजलेला आहे. अशा वेळी अनेक दहशतवादी संघटना अण्वस्त्रे ताब्यात घेऊ शकतात.
आजवरचा इतिहास पाहिला तर, एखाद्या देशाने अण्वस्त्रांचा वापर करण्याची धमकी दिली तर त्याला नियंत्रित करण्यासाठी एकमत असणारी राष्ट्रे एकत्र येऊन त्याचा सामना करत असत. याला सामूहिक सुरक्षितता म्हटले जाते. सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर हल्ला केला तेव्हा प्रतिआक्रमणासाठी अमेरिका आणि इतर देश एकत्र आले होते. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. अमेरिका, चीन, रशिया यांच्यामध्ये एकमत नाही. जागतिक सुरक्षा परिषद राजकीय द़ृष्ट्या दुभंगलेली आहे. परिणामी, अण्वस्त्रांचा वापर करून जागतिक शांतता, सुरक्षा धोक्यात आणू शकणार्या देशांना वठणीवर आणणार कोण अशी स्थिती आज निर्माण झाली आहे. उदाहरणार्थ, उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर अण्वस्र हल्ला करण्याचा निर्णय घेतला, तर त्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने प्रतिहल्ला केला तर रशिया आणि चीन हे उत्तर कोरियाला समर्थन देऊ शकतात. उत्तर कोरियावर संयुक्त राष्ट्राने आर्थिक निर्बंध लावूनही 10 वर्ष झाली आहेत. परंतु ते यशस्वी झालेले नाहीत. कारण चीन उत्तर कोरियाला सातत्याने मदत करत आहे. बहुराष्ट्रीय संघटनाही कमकुवत झाल्या आहेत. त्यामुळे भविष्यात शत्रू राष्ट्राचा विध्वंस करण्यासाठी अण्वस्रांचा वापर करण्यास एक प्रकारे मोकळे रान मिळाले आहे. परिणामी, अण्वस्त्रांबाबतची म्युचुअली अॅशुअर्ड डिस्ट्रक्शन (मॅड) ही थिअरी आता फोल ठरताना दिसत आहे.
यानिमित्ताने आठवण होते ती क्युबन मिसाईल क्रायसिसची. 1962 सालातील ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात हे संकट जगावर ओढवणार होते. शीतयुद्धाच्या काळात पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली होती की जेव्हा रशिया आणि अमेरिका एकमेकांवर अण्वस्त्र हल्ले करणार होते. अमेरिका क्युबावर अण्वस्त्रांचा हल्ला कऱणार होता. 13 दिवस संघर्षाची परिस्थिती गंभीर होती. पण हा संघर्ष शमला; अन्यथा दुसरे अण्वस्त्र युद्ध होऊन जग बेचिराख झाले असते. म्हणूनच क्युबन मिसाईल क्रायसिस अत्यंत धोकादायक मानला जातो. या क्रायसिसला 58 वर्षे पूर्ण झाली. पण आज पुन्हा त्याच्या आठवणींना उजाळा देण्याची वेळ आली आहे. कोरोनामुळे राजनयावरही परिणाम झाला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना, ब्रिक्स, जी-7 यांच्या बैठका नियमितपणे होत नाहीयेत. राजकीय संघर्ष सोडवण्यासाठीची व्यासपीठेही उपलब्ध नाहीयेत. अशा परिस्थितीत जगाला विशेषतः प्रगत महासत्तांना परिपक्वता दाखवावी लागणार आहे. अन्यथा महासंहारक युद्धाला जगाला सामोरे जावे लागू शकते. परराष्ट्र, संरक्षण धोरणातील, आंतरराष्ट्रीय संबंधातील सर्व चालूघडामोडींविषयी, कोरोना, भारत - चीन तणाव या विषयी मराठी व इंग्रजीतून माहिती व विश्लेषणासाठी.
* Instagram - https://instagram.com/dr.shailendradeolankar?igshid=1dpe34b2p0ai2
* Twitter -
https://twitter.com/skdeolankar?s=09