कोरोना अजून गेला नाही
पण सुट्टी त्याची संपलीय,
मुंबई पुण्याच्या कंपन्यांची
हळूहळू टाळेबंदी उठलीय,
सहा-सात महिने सुट्टीनंतर त्याला
आपला गाव सोडवेना झालाय,
गावीच करू काहीतरी
विचार त्याने पक्का केलाय,
रिकाम्या खिशाकडे पाहून
त्याचा पुरता नाईलाज झाला,
मिळेल ती गाडी पकडून
तडक एस.टी स्टॅण्ड गाठला,
कोरोनाच्या सुट्टीत गडी’ रांगडा झालेला
लहानपण, तरूणपण तो पुन्हा जगलेला,
धावणं, खेळणं पट्टीच्या सुरात पोहणं त्याने पुन्हा अनुभवलं,
मित्रांची संगत, पार्टी ची गंमत, जग त्याला पहिल्या सारखं भासलं,
महिने भराभर उलटुन गेले
डोळे त्याचे पाणावले,
गाव सोडण्याच्या विचाराने मन दुखावले,
‘आपली माणसं ‘ त्यांच्यात किती मन रमले,
शहरांच्या गर्दीत ‘आपला माणूस’ नेहमी हरवणारा,
कोण कुठे राहतोय कर्जत कसारा
कोणी पोहोचले विरार नालासोपारा,
लोकलच्या गर्दीतुन हुश्श करत नेहमी एक विचार येतो,
” गड्या आपला गाव बरा “