*अशी ही साताऱ्याची शैली*
( पु. ल. देशपांडे लिखीत)
सातारची एक वेगळीच बोली, शेलक्या शिव्या, विशिष्ट हेल आहे. तसेच वेगळे-वैशिष्ट्यपूर्ण खाद्यप्रकारही आहेत. सातारी जेवण म्हणजे फक्त ‘चुलीवरचे गावरान चिकण किंवा मटण आणि भाकरी’ असा एक समज आहे. पण या व्यतिरिक्त कितीतरी अस्सल सातारी खाद्यप्रकार आहेत.
पौष महिना संपला, की सातारा जिल्ह्याला यात्रांचे वेध लागतात. गावोगावी यात्रा असतात. यात्रेच्या पहिल्या दिवशी गोड जेवण असते. म्हणजे पोळीचे! पोळी म्हणजे पुरणाची पोळी. साध्या पोळीला चपाती म्हणतात. पोळीबरोबर गुळवणी हवीच. अशा पोळ्यांचे ‘पाचुंदे’ (पाच पोळ्यांचे एकक) पचवणारे बहाद्दर गावोगावी आहेत. सातारा परिसरात कोणत्याही सणासुदीला पोळी आणि कटाची आमटीच सहसा असते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्रमपरिहारार्थ ‘नळीचे’ जेवण! चुलीवर भाजलेल्या टम्म भाकऱ्या आणि लालभडक तर्रीदार तवंग असलेल्या मटणाचा पातळ रस्सा आणि सुक्के! हा रस्सा कितीही प्यायला तरी बाधत नाही. पितळीत भाकऱ्या कुस्करून त्यावर रस्सा घालून खायचे. यजमान, जावाई-ईवाई यांना आग्रह करतच असतो – ‘पावणं, कुस्करू कुस्करू हाना.’ नळीच्या जेवणाचे आमंत्रण द्यायचीही एक विशिष्ट भाषा आहे. यात्रेचे मटण खायला या म्हणून आमंत्रण देताना ‘खेळायला या’ असे सांगतात. अस्सल सातारकराची पहिली पसंती अर्थातच मटणाला! ब्रॉयलर चिकन, समुद्री मासे या नाइलाजाने खायच्या वस्तू! कोंबडी असेल तर देशी आणि मासा असेल तर नदीचा हवा असा हट्टच असतो. सातारकराला सर्दी झाली की सुचवला जाणारा हमखास उपाय म्हणजे खेकड्याचा किंवा माशाचा गरम तिखटजाळ, पातळ रस्सा पिणे. सातारकराचे वशाटाबिगर भागतच नाही. निदान ‘कवट’ (अंडे) तरी हवेच! सातारकरांना ओल्या
खोबऱ्याचे मुळीच कौतुक नाही. भुईमूग हा वीकपॉईंट! ज्यात त्यात कूट घालायचे. गरगटे, तव्यातला बटाटा, पावट्याचा रस्सा, भाकरी आणि कोरड्यास ‘चटणी’ किंवा खर्डा आणि बुक्कीने फोडलेला कांदा.
‘चटणी’ हा एक विषयच आहे. चटणी किंवा तिखट म्हणजे शहरी भाषेत कांदा लसूण मसाला. साध्या तिखटाच्या पुडीला इकडे ‘भगवती’ म्हणतात. उन्हाळा लागला, की घराघरातून वर्षभराची चटणी बनवायचे वेध लागतात. मिरच्या आणणे, त्यांना ऊन दाखवणे, ‘सौदा’ (गरम मसाल्याचे जिन्नस) आणणे, डंकावर चटणी कुटायला सामुदायिकरीत्या जाणे आणि कानातून वाफा काढणारी ताजी ताजी चटणी आणि तेल भाकरीबरोबर खाणे म्हणजे परम सौख्य! सातारकरांच्या जिभेचे तसे चोचले नसतात. कालवणाला काही नसले, तर भरड कुटाचा ‘म्हाद्या’ चालतो. म्हाद्या घट्ट, पातळ, पळीवाढा – जसा हवा तसा करता येतो. तीन-चार दिवस टिकतोही! लोखंडी कढईत, तव्यावर म्हाद्या शिजत असतो तेव्हा ‘चुटचुट’ असा आवाज येतो म्हणून त्याला ‘चुटचुटं’ही म्हणतात. तर वाईकडे ‘फुदकनं’ म्हणतात.
पोलिस खातात हे जगजाहीर आहे पण सातारकर ‘पोलिस खातात’ याचा अर्थ अंमळ वेगळाच आहे. पोलिस म्हणजे काळा घेवडा. चटणी घालून केलेले पोलिसाचे कालवण, मटणाच्या रश्श्याला तोंडात मारील असे असते. वाटल्या डाळीचा झुणका किंवा झुणक्याची पोळी, शाळूची भाकरी, भातवड्या अशा बारीक सारीक खासीयती वेगळ्याच. लग्नाळू मुलगी सुगरण आहे हे जोखण्याची एक सातारी पद्धत आहे. भाकरीचे पीठ मळताना त्यात एक चार आण्याचे नाणे घालायचे, भाकरी भाजून झाली की तिच्या दोन पदरात नाणे खुळखुळले की मुलगी सुगरण!
पावसाळी थंडीतला सातारचा आवडीचा पदार्थ म्हणजे ठिकरीची फोडणी घातलेले वाफाळलेले घुटे आणि हुलग्याचे माडगे! सालीसकटच्या उडदाच्या डाळीचे, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर घालून केलेले, वरून ठिकरीची फोडणी दिलेले रसायन म्हणजे घुटे! ठिकरी म्हणजे दगडाची खोलगट कपची. ती लाललाल तापवून त्यातच लसणीची फोडणी करून ते घुट्यात दडपायचे. ठिकरीचा चुर्रर्र आवाज, घुट्याचा हिरवागार रंग आणि आसमंतात पसरलेला दरवळ म्हणजे जिभेला चटका आणि मेंदूला मुंग्या! धुवाधार पावसात, चिखलपाण्यात दिवसभर राबराबून सांजच्याला घरला आल्यावर कारभारणीने माडग्याचा वाडगा पुढे केल्यावर सगळे कष्ट क्षणात मिटतात. सातारा परिसरात पावसाळ्यातच फक्त मिळणाऱ्या भारंगी पाथरीसारख्या रानभाज्याही चविष्ट लागतात. माडग्यासारखे उन्हाळी पेय म्हणजे ज्वारी किंवा नाचणीच्या पिठाची आंबिल! उन्हाने तलखी होऊ नये, पोटाला ‘धर’ राहावा म्हणून आंबिल पिऊनच घरातून निघायचे. अजिबात तहान तहान होत नाही आणि ‘आंबिल’ नाव जरी चमत्कारिक असले, तरी नाचणीची आंबिल हिमोग्लोबिन वाढीसाठी प्रचंड उपयोगी आहे. थंडी संपता संपता, वावरात, झाडाखाली, तीन दगडांची चूल मांडून मातीच्या मडक्यात केलेला ‘शेंगसोला’ म्हणजे ऊंधियाचा ग्रामीण आविष्कार! मिळेल त्या भाज्या, हाताने मोडायच्या. अमुकच मसाला, अमुकच प्रमाण असे काही नाही. सोबत तीळ लावलेली मीठ घातलेली बाजरीची भाकरी! चव विसरता विसरतच नाही.